चला, स्वातंत्र्य दिनानिमित्त आईस्क्रीम खाऊ या!
ग्रंथनामा - झलक
रवीश कुमार
  • रवीश कुमार आणि त्यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं मुखपृष्ठ
  • Thu , 15 August 2019
  • ग्रंथनामा झलक रविश कुमार Ravish Kumar द फ्री व्हाइस The Free Voice सुनील तांबे Sunil Tambe

निर्भीड आणि नि:पक्षपाती पत्रकार आणि २०१९चे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते रवीश कुमार यांच्या ‘द फ्री व्हॉइस’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा पत्रकार सुनील तांबे यांनी मराठी अनुवाद केला आहे. मधुश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या अनुवादाची नुकतीच दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. आज १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्तानं या पुस्तकातील हे एक प्रकरण...

.................................................................................................................................................................

१५ ऑगस्ट जवळ येऊ लागला की, अनेक लोक प्रश्न विचारू लागतात, स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाने काय कामगिरी केली. आपण काहीही मिळवलं नाही, अशी काहीशी पोकळपणाची भावना त्यांना ‘पंधरा ऑगस्ट’ निमित्त जाणवू लागते. आपण काय कामगिरी केली वा केली नाही, हा प्रश्न आणि कामगिरीची वाटचाल, जणू अनंतात विरणारा आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून सत्तर वर्षांत भारताने लांबचा पल्ला गाठला आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात आपण असलो तरी आपल्याला देशाचा अभिमान वाटू शकतो. आपण म्हणजे भारतातल्या जनतेने या देशाला अभिमानास्पद बनवलं आहे आणि ते कार्य सुरूच राहील. सुधारणेला नेहमीच जागा असते आणि सुधारणेसाठी जे प्रयास भारतातील जनता करते, त्यातून भारतीयत्व सिद्ध होतं. आपण काय यश कमावलं असा प्रश्न विचारण्याऐवजी आपण काय करू शकतो, असं विचारायला सुरुवात केली पाहिजे. आणि मोठ्या कृतींपेक्षा छोट्या छोट्या कामांनी आरंभ करायला हवा.

पण काहीतरी करायची इच्छा वा आकांक्षा ठेवली तर त्यातच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल असं नाही. आपण आपल्यासाठी कोणता मार्ग निवडतो त्यातही ते उत्तर सापडेल. सर्वांना लाभकारक आहेत असा दावा सातत्याने करणाऱ्या आर्थिक, राजकीय व्यवस्थांचं विश्लेषण करणं आपल्याला जमतंय का? लोकशाहीचा आत्माच लुबाडण्याची जी चाहूल लागते आहे, ती आपण ओळखत आहोत का? आर्थिक उन्नतीचा अर्थ स्टॉक मार्केटमधली तेजी नाही, तर प्रत्येक नागरिकाला आर्थिक सुरक्षितता हा असायला हवा, अशी मागणी आपण करतो का?

विकासाचे अग्रणी मानल्या जाणार्‍या देशांनाही आर्थिक विषमता नष्ट करता आलेली नाही. काळानुरूप तंत्रविज्ञानाने मिळणारी सारी सुखे गोळा करूनही आपल्याला जीवनातील ताण कमी झालेले नाहीत. त्यामुळे सोप्या पळवाटा शोधण्यावर आपलं सर्वांचं जणू एकमत झालं आहे. आपल्याला नवी व्यवस्था शोधायची नाही, हे ठरवून घेतलंय आपण आणि ज्यात अगदी मूठभरांनाच सगळे फायदे मिळतात अशा व्यवस्थेची आपण पाठराखण करतो. आणि एकदा का आपण या निवडक मूठभरांच्या गटात सामील व्हायचा निर्णय घेतला की, आपण त्या दिमाखदार दालनांमध्ये जाण्यासाठी आपल्या क्षमता घासूनपुसून चकचकीत बनवू लागतो.

अनेकदा आपण आर्थिक यशासोबत अध्यात्माची सांगड घालू पाहतो, पण खरे पाहता या दोन्ही वाटा पूर्णतः भिन्न आहेत. उपभोगवादी झाल्याशिवाय आपण आर्थिक प्रगती करू शकत नाही आणि उपभोगवादी असलो तर आध्यात्मिक होऊ शकत नाही. पण आपण अर्थातच दोघांमधला समतोल गाठू शकतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भारतीय स्वातंत्र्यलढा हा जागतिक इतिहासातील आश्चर्यकारक घटनाक्रम आहे. स्वातंत्र्याचं स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी आपण नव्वद वर्षांपेक्षा अधिक काळ लढत होतो. अनेक समाजांतील आणि धर्मातील लोक- आपसातले झगडे सुरू असतानाही देशनिर्मितीच्या लढ्यात सहभागी झाले होते. आपल्याला हे कळू लागले होते की, स्वतंत्र भारतात वर्गभेदांना थारा असणार नाही, धर्मद्वेषालाही देशात स्थान नसेल, या तत्त्वावर आपला विशेष जोर होता. सहिष्णुता आणि प्रेम ही तत्त्वं आपण महत्त्वाची म्हणून स्वीकारली होती.

स्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग काय असावेत यावरही आपण वादविवाद करत होतो आणि आपला असाही प्रयत्न होता की, स्वतंत्र भारतात प्रत्येकाला समता आणि प्रतिष्ठेचं जीवन मिळालं पाहिजे. विसाव्या शतकातील राष्ट्रवादाच्या संदर्भात भारत भौगोलिक आणि राजकीय अस्तित्व सिद्ध करत होता, तेव्हा एकही विषय अस्पर्श नव्हता आणि प्रत्येक प्रश्न विचारला जात होता.

परंतु स्वातंत्र्य आंदोलनात, ज्यात देशासाठी अनेक लोक एकत्र जोडले गेले, सांप्रदायिक दंग्यांचा रोग दूर झाला नाही. दंगे हा ब्रिटिश राजवटीचा वारसा आहे. लाऊड स्पीकरवरून मौलवीने आझान देणं, धार्मिक मिरवणुका- प्रक्षोभक वातावरण करण्याच्या हेतूंनी हिंदूंनी मुसलमानांच्या वस्तीत जाणं किंवा उलट, कोणताही विषय घ्या, त्याचा नीट अभ्यास वा विश्लेषण करा. तुमच्या असं ध्यानी येईल की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत त्यामध्ये सातत्य आहे. या वेडेपणाला असलेली प्रतिक्रिया म्हणून असेल कदाचित पण भगतसिंगाने आपण नास्तिक असल्याचं जाहीर केलं. संपादक आणि वार्ताहर गणेश शंकर विद्यार्थी कानपूरमधील सांप्रदायिक दंगा रोखताना शहीद झाले. एक वा दुसरं कारण देऊन वा विविध प्रकारच्या विषमतांना वेठीस धरून, समाजात दुही माजवणार्‍यांची संख्या आज प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यांना जुने हिशेब ताबडतोब चुकते करायचे आहेत. कोणत्याही एका घटनेसाठी संपूर्ण समाजाला जबाबदार धरलं जात. हे दोन्ही बाजूंनी घडतं आणि तिरस्काराच्या राजकारणाची सुरुवात होते.

२०१४ साली उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सरावा गावातून एक बातमी आली. स्थानिक मदरशामध्ये हिंदी शिकवणार्‍या बावीस वर्षांच्या एका महिलेने आरोप केला की, गावाच्या मुखियाने तिचं अपहरण केलं, जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सोशल मीडियावर याचे अतिशय आक्रमक पडसाद उमटले आणि संपूर्ण मेरठ काही काळासाठी तणावग्रस्त झालं. त्या प्रकरणाची पोलीस चौकशी अजून चालू आहे. मात्र या प्रसंगाची सबब सांगून मुस्लीम समाजातील कुणाचा तरी खून वा लैंगिक छळाच्या घटनेचं समर्थन करण्यात आलं.

समाजामध्ये द्वेष पसरवणारा गुन्हेगारी कृत्य करतो आणि त्या कृत्याला धर्माभिमानाच्या ‘युद्धाचा’ भाग बनवतो.

संबंधित महिलेच्या दाव्यांबाबत पोलीस तपासात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मेरठमधील ती घटना वादग्रस्त बनली. आणि अनेक प्रश्न उभे राहिले. त्यानंतर द्वेषप्रसारक टोळ्यांनी आपला गाशा गुंडाळला.

या प्रसंगाबाबत गरमागरम चर्चा सुरू होती, त्यावेळी मला अगणित फोन आले. मी हा विषय का घेतला नाही, त्यावर का बोलत नाही, हे जाणून घेण्यासाठी. मला आठवतं की, मी अचंबित झालो होतो, कारण बहुतेक फोन अशा लोकांनी केले होते, ज्यांना या कोणत्याही प्रकरणाच्या धार्मिक बाजूंना उठाव देऊन वेडाचार पसरवायचा होता. एकाही इसमाला फोन करून असं सांगावंसं वाटलं नाही की, हे विषय कपोलकल्पित आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, नपेक्षा याची परिणती समाजात विष पसरण्यात होईल... या लोकांना फोन करून असं का सांगावसं वाटलं नाही की, आपण जगण्याशी संबंधित, जीवनाला भिडणार्‍या प्रश्नांची चर्चा करूया?

आणखी एक बाब, अनेकांनी फोन करून मला धमक्या दिल्या- हा प्रश्न उठवला नाहीत तर परिणामांना तयार राहा. दैवदुर्विलास असा की, याच माणसांनी असं जाहीर केलं होतं की, धर्माच्या मुद्द्यावर ते उदारमतवादी आणि मोठ्या मनाचे आहेत. उदारमतवादी आणि मोठ्या मनाचा माणूस द्वेषपूर्ण कसा बोलतो, धमक्या कशा देतो?

यासंबंधात आपल्याला सामूहिक निर्णय करायला हवा. आलतूफालतू कारणांवरून आपल्याला द्वेष – वास्तविक वा काल्पनिक, पसरवायचा आहे की, नष्ट करायचा आहे? आपण या लोकांना अलग करणं, एकटं पाडणं गरजेचं आहे.

कोणत्याही युक्तिवादाने द्वेषाचं समर्थन करता येतं? न्यायालयात न्याय न मिळाल्याची आपल्या देशात अनेक उदाहरणं आहेत. त्यांचा वापर समाजात विष कालवण्यासाठी करायचा? माध्यमांनी एखाद्या व्यक्तीची वा घटनेची दखल का घेतली नाही, हा प्रश्न अवश्य विचारायला हवा. पण द्वेष कालवण्याच्या उद्देशाने असा प्रश्न विचारायचा?

आपल्याला आपल्या समाजाबद्दल करुणा नसेल तर हिंदू वा बौद्ध वा मुसलमान असण्याचा अर्थ काय, हे आपल्याला कधीही समजणार नाही. करुणेशिवाय कोणीही धार्मिक होऊ शकत नाही. करुणा नसलेला मनुष्य दया आणि धार्मिकतेच्या आवरणाखालचा राक्षस असतो.

.............

पंधरा ऑगस्टची पोकळी जाणवणारे काही लोक मला प्रश्न विचारतात की, त्यांनी स्वातंत्र्य दिन का साजरा करावा. कारण त्यांच्या दृष्टीने आपण काहीही कामगिरी केलेली नाही.

मी त्यांना सांगतो तुम्ही कोणत्याही प्रकारच्या द्वेषावर वर्चस्व मिळवलं असेल, तुमची सहिष्णुता वाढवली असेल तर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा तुम्हाला हक्क आहे. तुम्हाला दुसर्‍या समाजाचा वा धर्माचा द्वेष नसेल तर तुम्ही पंधरा ऑगस्ट साजरा करू शकता. तुम्ही द्वेषाच्या विरोधात आवाज उठवला असेल आणि त्यासाठी युद्ध वा संघर्ष केला असेल तर तुम्ही पंधरा ऑगस्ट साजरा करू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की, भगतसिंग तुमच्यासाठी हुतात्मा झाला, खुदीराम बोस तुमच्यासाठी फासावर चढला आणि महात्मा गांधींनी तुमच्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या, तर तुम्ही बेलाशकपणे पंधरा ऑगस्ट साजरा करू शकता.

तुम्ही एखाद्या समाजाचा द्वेष करता तरीही भगतसिंगाच्या हौतात्म्याचा मुकुट डोक्यावर चढवता आणि तुम्ही देशभक्त असल्याची घोषणा करता हे अमान्य आहे, असंही मी त्यांना सांगतो. तुम्ही हे केलं नसेल तर लाखो लोकांनी त्याग करून सांभाळलेलं स्वतंत्र भारताचं स्वप्न तुम्ही जिवंत ठेवलं आहे. स्वातंत्र्य दिन तुमचा आहे.

खूप काही करायचं आहे, अनेक क्षेत्रात काम करायचं आहे. मात्र जिथे काम करायचं आहे, त्या क्षेत्रांचं आपल्याला भान असेल, तर आपण एक दिवस सुट्टी घेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करू शकतो. आपण आईसक्रीम खाऊ किंवा गुलाबजाम किंवा दोन जिलब्या. मिठाई खरेदी करून आपल्यापेक्षा कमी सुदैवी लोकांना वाटू शकतो. अनेक पिढ्यांनी स्वतंत्र भारताचं स्वप्न पाहून ते सुंदर स्वेटरच्या विणकामासारखं आपल्यापुढे ठेवलं, म्हणून आपल्यामधील भलेपणाच्या आणि योग्य बाबी आकारास आल्या आहेत. या स्वेटरच्या ऊबेमुळेच आपली मनं विशाल आणि उदार होतात. त्यामुळे स्वातंत्र्याचा हा महत्त्वपूर्ण सोहळा साजरा करण्याचं धैर्य आपल्याला मिळतं.

​​​​​​​.................................................................................................................................................................

रवीश कुमार यांच्या ‘द फ्री व्हॉईस’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

 

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 15 August 2019

भाग्यश्रीताई, ही शाळेतनं शिकवलं जात नाही कारण चालू शिक्षण मेकॉलेछाप आहे. ते फक्त क्लार्क उत्पन्न करणारं शिक्षण आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


Bhagyashree Bhagwat

Thu , 15 August 2019

अफलातून! 'करुणेशिवाय कोणीही धार्मिक होऊ शकत नाही' - अफलातून. हे शाळेत का शिकवलं जात नाही?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......