‘सोशल मीडिया’च्या तीव्र कोलाहलात स्वतःचा आवाज हरवू न देणाऱ्यांसाठी आणि सजग नागरिक म्हणून आपली भूमिका न सोडणाऱ्यांसाठी महत्त्वाचे पुस्तक!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राहुल माने
  • ‘पॉलिक्लिक’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 09 August 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस पॉलिक्लिक Policlick सोनाली शिंदे Sonali Shinde

१९५२ मधील पहिल्या लोकसभा निवडणुकीतील बैलगाडी, भोंगे, सायकल तसेच फलक यांच्या साहाय्याने केलेला निवडणूक प्रचार ते आता एकविसाव्या शतकात सोशल मीडियाच्या आधारे अत्याधुनिक प्रचाराचा झंझावात असा प्रवास टिपणारे छोटेखानी परंतु महत्त्वाचे असे चित्रण दूरचित्रवाणी पत्रकार सोनाली शिंदे लिखित ‘पॉलिक्लिक’ या पुस्तकात आहे. या पुस्तकात आजच्या माध्यमयुगातील महत्त्वाच्या बदलांचे छोटेखानी, परंतु माध्यम प्रतिनिधींच्या ‘फर्स्ट हँड’ साक्ष असणाऱ्या प्रचितीचे टिपण आहे. 

या पुस्तकाची सुरुवात होते ती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेने... त्यावेळची दिल्लीतील विज्ञानभवनमधील उत्कंठा आणि पत्रकारांची  लगबग सुंदररीत्या उतरली आहे. माध्यम तंत्रज्ञानाच्या प्रवासात ‘मोबाईल पत्रकारिता रिव्हॉल्युशन’ म्हणजेच ‘मोजो (MoJo) रिव्हॉल्युशन’ ही आता हळूहळू स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. त्याबद्दल लेखिकेने टिपलेला महत्त्वाचा बदल म्हणजे आधी वृत्तवाहिनीसाठी बातमीदार, कॅमेरा, लाईट, ट्रायपॉड, ओबी व्हॅन व त्याचे तंत्रज्ञ असे मोठे युनिट लागायचे. मध्यंतरीच्या काळात ‘लाईव्ह युनिट’ आले आणि आता त्या सर्वांवर कडी केली ‘मोजो’ने! हा फक्त तंत्रज्ञानातील बदल नाही तर माध्यम व्यवसायात काम करणाऱ्या कुशल आणि गतिमान लोकांसाठी ही एक नवीन जीवनशैली आहे. याची काही वैयक्तिक अनुभवातून आलेली उदाहरणे, या पुस्तकात आलेली आहेत.  

उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये माध्यमे ही आपल्या अवयवांचे विस्तारित अंग कसे होऊन बसते, याबद्दल मार्शल मॅक्लुहन या माध्यम अभ्यासकाने मांडलेला सिद्धान्त त्यातील ठिसूळपणामुळे कालबाह्य झाला असला तरी त्या सिद्धान्तातील मूलतत्त्व आजही अंशतः कायम आहे. पहिल्या निवडणुकीचे काही तपशील, तसेच जगभर व भारतात मतदानाचा हक्क मिळवण्याच्या संघर्षाचे उल्लेखसुद्धा यानिमित्ताने पुढे येतात.

१९५२ ते २०१४ पर्यंत झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकांतील राजकीय प्रचाराची मुख्य साधने आणि प्रयोग कोणते होते, याचे एक चांगले लघु-संकलन या पुस्तकात आहे. यामध्ये व्यंगचित्रे, दूरचित्रवाणी मालिका आणि राजकीय कॅम्पेन्स ते अलीकडच्या फेसबुक लाईव्हचीही नोंद आहे. १९९१ नंतर भारतामध्ये सॅटेलाईट टीव्हीचे युग अवतरले. याची सुरुवात कशी झाली आणि मराठी माध्यमविश्वात या वाहिन्यांचा प्रवास कसा झाला, याचा धावत आढावा घेतला आहे. ‘अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण’ हा कदाचित लेखिकेचा आवडता विषय वाटतो. प्रत्येक प्रकरणामध्ये याचे संदर्भ मिळतात.

या पुस्तकाच्या पहिल्या भागात लोकशाहीचा उत्सव माध्यमांतील बदलांच्या अनुषंगाने टिपण्याचा प्रयत्न केला आहे, तर पुस्तकाच्या दुसऱ्या भागामध्ये सोशल मीडियाने नेतृत्व केलेली अलीकडच्या काळातील आंदोलने (अण्णा हजारे, निर्भया) ही त्याबद्दलच्या काही घटनांच्या संदर्भात मांडली आहेत.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात ‘मोदी ब्रँड’ या विषयाला स्पर्श केला आहे. राजकीय व निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हा ब्रँड कसा घडवला जातो. हे वाचताना लेखक Philip K. Dick यांचे एक वाक्य उद्धृत केले आहे. त्याचा उल्लेख करायला हवा - “Today we live in a society in which spurious realities are manufactured by the media, by governments, by big corporations, by religious groups...so what is real?” या वाक्याचा असा अर्थ होतो की, “आज आपण अशा समाजात राहत आहोत जेथे सरकार, माध्यमे, धार्मिक संस्था आणि मोठे बहुराष्ट्रीय उद्योग हे सर्व  बनावट, नकली वास्तवाचा आभास निर्माण करत आहेत. ‘Post-Truth’ (सत्योत्तरी सत्य) या संदर्भात या मुद्द्याबद्दल अधिक विस्ताराने चर्चा केली जाऊ शकली असती, परंतु या चर्चेचा अभाव काही या पुस्तकातील उणीव वाटत नाही.

पुस्तकातील विभाग तीन, ‘सोशल मीडियाचे विश्वरुप दर्शन’ हा त्यामानाने अलीकडच्या काळातील काही ऐतिहासिक घटनांची नोंद घेणारा आहे. यामध्ये सोशल मीडियाने पश्चिम आशियामध्ये सत्तांतर घडवून आणलेली अरब क्रांती (अरब स्प्रिंग), अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा ते वर्तमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या स्थित्यंतर झालेल्या प्रवासामध्ये सोशल मीडियाची काय भूमिका राहिली आहे, याचा धावता आढावा घेतला गेला आहे.

शेवटचे प्रकरण ‘मत तुमचं, मेंदू कुणाचा?’ हे पुस्तकाचे उपशीर्षक बनले आहे. या प्रकरणात २०१९ लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडियावर घडलेल्या काही रंजक, पण महत्त्वाच्या चर्चांची नोंद आहे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमाने आपल्या मनातील निर्णय आणि आपले मानसिक कल यांचे मापन करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान उदयास आले आहे आणि त्यातील सुप्त धोक्यांकडे इशारा करण्यात आलेला आहे.

हे पुस्तक का महत्त्वाचे आहे, हे लेखिकेचेच पुस्तकाच्या ब्लर्बवरील वाक्य सांगून व्यक्त करावेसे वाटते - ‘सोशल मीडियाच्या या तीव्र कोलाहलात ज्यांना स्वतःचा आवाज हरवू द्यायचा नाही आणि सजग नागरिक म्हणून आपली भूमिका सोडायची नाही, त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.’

‘पॉलिक्लिक’ या पुस्तकामध्ये ‘केम्ब्रिज अनॅलिटीका’ या ब्रिटिश माध्यम व तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संदर्भात ‘मत तुमचे, मेंदू कुणाचा’ असा प्रश्न विचारला गेला आहे. ही संकल्पना नागरिकांच्या आणि ग्राहकांबद्दलच्या विविध माहितीचा राजकीय आणि व्यापारी कारणासाठी कसा वापर केला जातो याकडे दिशानिर्देश करतात.

‘पॉलिक्लिक’ या पुस्तकामध्ये पत्रकारितेच्या दुर्बिणीतून भारताच्या बदलत गेलेल्या आणि बदलत चाललेल्या राजकीय संवाद संस्कृती-शैलीचे कवडसे टिपण्याचा सुंदर प्रयत्न आहे. हे प्रयत्न सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये योगदान करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पत्रकारितेच्या अलीकडच्या काळातील अनेक प्रेरणादायक, ध्येययवादी अशा कर्तृत्ववान कहाण्यांचे साक्षीदार आहेत. राजकीय संज्ञापन (Political Communication) या राज्यशास्त्र आणि संज्ञापन-पत्रकारिता या दोन विद्याशाखांच्या संयुक्त अशी ही एक नवीन अभ्यासशाखा आहे. या विषयांवर अधिकाधिक पुस्तके येणे गरजेचे आहे, हे या पुस्तकाच्या निमित्ताने जाणवते.

राजकारण, संस्कृती, समाजकारण याबद्दल सतत सजग असलेले कार्यकर्ते आणि माध्यम क्षेत्रातील सक्रिय पत्रकार, संपादकीय चमूतील लेखक यांच्यात अधिक सहकार्याने राजकीय संवादप्रक्रियेवर प्रकाश टाकणारी पुढील संशोधनात्मक पुस्तके लिहिली जातील, अशी आशा या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते.

पुस्तकाच्या शेवटी विविध माध्यम संस्थांचा उल्लेख आणि काही मोजक्या पुस्तकांची, लेखांची यादी संदर्भ म्हणून दिलली आहे. ती उपयुक्त आहे.

...........................................................................................................................................

'पॉलिक्लिक' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5011/Policlick

...........................................................................................................................................

लेखक राहुल माने पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.

creativityindian@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......