‘ताम्रपट’ आणि मराठा स्त्रिया
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
डॉ. संध्या शेलार
  • कादंबरीकार रंगनाथ पठारे आणि ‘ताम्रपट’चे मुखपृष्ठ
  • Fri , 07 June 2019
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो रंगनाथ पठारे Rangnatha Pathare ताम्रपट Tamrapat संध्या शेलार Sandhya Shelar मराठा स्त्रिया

प्रसिद्ध कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे यांची ‘ताम्रपट’ ही कादंबरी ९ ऑगस्ट १९९४ रोजी प्रकाशित झाली. या वर्षी तिला पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या कादंबरीतल्या स्त्रीपात्रांविषयीचा हा पुनर्मुद्रित लेख...

.............................................................................................................................................

“सीताबाईचे वय ऐंशीच्या आसपास पोहचले होते. डोक्याचे सारे केस, पापण्या, भुवया सारे पांढरे झाले होते. चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या आणि हसली की राहिलेले उरलेसुरलेले निळसर पिवळे दात दिसत. ओठावर स्पष्ट जाणवण्याइतपत केस होते. तेही पांढरे झाले होते. केवढे प्रदीर्घ आयुष्य पाहिले, सोसले या स्त्रीने! दादासाहेबांच्या मनात आले, अगदी तरुण वयात ही विधवा झाली. पुढे सारे आयुष्य तिने असे एकाकी काढले. जवळचे कोणी राहिले नाही तरी ती राहिली. कुळीसाठी गंधर्व लावला नाही. नात्यातल्या साऱ्या मुलांना भाकरी बडवून घातल्या. हिने आयुष्याकडे काय मागितले असेल? कोणत्या आकांक्षा बाळगल्या असतील? कोणते श्रेय तिला मिळाले?”

ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या ‘ताम्रपट’ या साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या कादंबरीमध्ये जेमतेम चार ते पाच ठिकाणी सीताआजी या पात्राचा उल्लेख येतो. या एका पात्रातून पठारे यांनी मराठा समाजाच्या एका धगधगत्या आणि तितक्याच दुर्लक्षिलेल्या प्रश्नाला समोर आणलं आहे. कुळीच्या सन्मानासाठी सीताआजी बालविधवा असून गंधर्व लावत नाही. महात्मा जोतीबा फुले यांनी बालविधवांचा प्रश्न समोर आणून त्यासंबंधी समाजजागरण केल्यानंतरचा साधारण शंभर वर्षानंतरचा काळ, तरीही स्वतःला कुलीन समजल्या जाणाऱ्या मराठ्यांमध्ये हे महात्मा फुलेंचं कार्य पोहचलेलं दिसत नाही किंवा ते इतक्या गांभीर्यानं कुणी हाताळलेलंही दिसत नाही!

कादंबरीच्या सुरुवातीला ‘सीताबाईच्या पडळी’चा उल्लेख येतो. ही पडळी शहरपासून लांब एकटी वस्ती आहे, शहरात शाळा-कॉलेज शिकणाऱ्या मुलांना ही आजी सांभाळते आहे. ही पडळी  म्हणजे त्यांच्या राहण्यासाठी मोफत वसतिगृहच आहे! मुलांच्या आई-बापांनी फक्त धान्य आणून टाकायचं आणि या सीताआजीनं ते करून या मुलांना घालायचं, इतका साधा हिशोब! पण त्यामागे आजीचा वेळ जाणं, त्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन  आणि सर्वांत महत्त्वाचं समाजातील गलिच्छ प्रवृत्तीपासून संरक्षण मिळणं. ही म्हातारी कुणाचाही आधार नसताना हिमतीनं उभी आहे. फक्त उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ती या मुलांकडे पाहत नाही, तिचे लांबून नातेवाईक असलेली ही मुलं ती कर्तव्यभावनेनं आणि मायेनं सांभाळते आहे. अगदी निरपेक्षपणे! तिच्याकडे राहणारा तुकाराम जेव्हा स्वातंत्र्यचळवळीतला त्याचा सहभाग लपवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सीताआजी वडिलकीच्या नात्यानं त्याला समजावतेच, परंतु कर्तव्याचा विसर पडू नये म्हणून त्याला घरच्या परिस्थितीची जाणीव करून देते. शेवटी भावनिक आवाहनसुद्धा करते. या म्हातारीची कर्तव्यभावना फक्त शब्दात नाही. जेव्हा तुकाराम जखमी होऊन तिच्या शहरापासून लांब कुठल्या तरी दवाखान्यात असतो, तरीही ती कुठलीही माहिती नसताना तिथे जाते. विशेष म्हणजे ती माहितीही एका पोलिसाकडूनच मिळवते, तेही त्याला नातेसंबंध सांगून भावनिक आवाहन करत!

बुद्धिमत्तेच्या बाबतीत या आजीबाई नंबर काढतात. पंधरा-सोळा वर्षानंतर ही आजी बापूसाहेब देशमुख यांना पाहून, एका भेटीच्या आधारावर संपूर्ण कुटुंबाचा लेखाजोखा सांगून जाते! अशा या आजीला कर्तव्यभावनेतून म्हणा किंवा तिच्या प्रेमळ वागण्यामुळे म्हणा, पण दादासाहेब (आधीचा तुकाराम जो नंतर सहकाराच्या माध्यमातून आधी साखर कारखान्याचा चेअरमन होतो आणि नंतर खासदार!) स्वतःच्या घरी कायमचे ठेवून घेतात. तिच्या मृत्यूनंतर ती ज्या झाडाखाली दिवसरात्र बसून राहत असते, त्या झाडालापण सीताआजीच्या नावानंच ओळखलं जातं. अशी ही लांबची नातेवाईक आजी दादासाहेबांच्या घराचा अविभाज्य भाग बनून जाते.

दादासाहेब जेव्हा या आजीला आराम करायचा, पडून राहायचा सल्ला देतात तेव्हाचे तिचे शब्द तिनं आयुष्याचा केलेला स्वीकार सांगून जातात. ‘‘ झोपायचं? म्हातारपणी आता कह्याची झोप? काम नायी, धंदा नायी मला म्हातारीला. खायाप्यायाचं आणि बसून राहायचं– रातंदेही कव्हायबी बसून राहायचं.’’

मराठा विधवा, सर्वांत जास्त शोषित आणि वंचित स्त्री. त्यात ती जर उच्चकुलीन असेल तर जास्तच शोषित. यात पुन्हा निसंतान असेल तर तिची परवड न बघण्याजोगीच म्हणावी लागेल. ती कुलाचाराच्या नावाखाली गंधर्व लावू शकत नाही, परंतु अवतीभवती जे समाजमान्य रक्षक असतात तेच तिची शारीरिक, मानसिक पातळीवर सर्वांत जास्त विटंबना करतात. घराच्या चार भिंतीत तिचा आक्रोश चिणून टाकला जातो. त्यात एखादी धाडसी असेल तर ती याविरुद्ध बंड करते. मग तिचे अलिप्त राहणं अपरिहार्य होतं. समाजाच्या या विकृतीवर रंगनाथ पठारे यांनी सीताआजी या पात्राच्या रूपानं बोट ठेवलं आहे.

याच प्रकारे निराधार झालेली कदमबांडे ही बाई मात्र वेगळा पर्याय निवडताना दिसते. सीताआजी जिथं नकळतपणे मुलांचं वसतिगृह चालवून एकप्रकारे समाजकार्य करत स्वतःचं शील जपण्यात धन्यता मानते, तिथं कदमबांडे बाई समाजकार्याच्या बुरख्याखाली व्यभिचार दडवण्याचा अट्टाहास करताना दिसते. इथं सीताआजीचं वेगळेपण प्रकर्षानं जाणवतं.

विधवा स्त्रियांचा प्रश्न अशा दोन्ही अंगानं पठारे यांनी यशस्वीपणे चित्रित केला आहे. हे चित्रण आहे १९७९ च्या आधीचं, मात्र आज २०१६ मध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती आढळत नाही. एखाद्या मराठा कुटुंबातील स्त्री भर तारुण्यात विधवा झाल्यावर होणारी तिची अवहेलना, विटंबना आजही तशीच आहे. स्त्री शिक्षित झाली परंतु ती सरंजामशाहीच्या बेड्या तोडू शकली नाही. त्या अधिक घट्टच होत गेल्या आहेत. त्यासाठी जागतिकीकरण खरंतर वरदान ठरायला हवं होतं, पण ते या स्त्रियांच्या बाबतीत शाप ठरलं आहे. आधी कुणबी हा विधवेला कुणी अपत्य नसेल तर गंधर्व लावू देत होता. शिक्षण, भांडवलीकरण यामुळे बागायती कुणबी श्रीमंत झाला. इथंच त्याची उच्चकुलीन होण्याची लालसा गहिरी होत गेली. मग ‘उच्चकुलीन मराठा’ ही ओळख दाखवणं म्हणजेच कुटुंबातील गंधर्वाची परंपरा खंडित करणं. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत १९९१ नंतर झालेल्या या बदलामुळे सर्वच मराठा समाज ‘आम्ही छत्रपतींचे वारस म्हणून आम्ही गंधर्व लावत नाही’ असं म्हणू लागला. परिणामी मराठा विधवा स्त्रीची कुचंबना जी ठराविक वर्गात मर्यादित होती, ती सर्वच समाजात अनिवार्य झाली! हा प्रश्न इतकाच मर्यादित राहिला नाही तर अशा स्त्रीच्या वारसाहक्कानं येणाऱ्या संपत्तीच्या लालसेनं त्यातच वाढच झाली आहे. सामाजिक दबाव आणून अशा स्त्रियांना कुटुंबाला हवा तो वारसदार निवडण्यासाठी भाग पाडलं जाऊ लागलं. त्यासाठीही तिच्यावर अत्याचार होतात. याला जबाबदार फक्त त्या महिलेचं सासरच नाही तर माहेरच्या लोकांचा कुलीनतेचा अट्टाहासही तिला सासरी खितपत पडण्यास भाग पाडू लागला. म्हणजे जोतीबांच्या स्त्रीशिक्षणानंसुद्धा अगदी नगण्य प्रमाणात या स्त्रीला मुक्त होता आलं आहे !

‘ताम्रपट’मध्ये रेखाटलेली सीताआजी आणि कदमबांडेबाई आणखी जास्तच तयार होताना दिसत आहेत. उलट त्यात अनेक प्रकारे शोषणाची भरच पडली आहे असं मी म्हणेन. माझ्या या म्हणण्याला शहरी भाग थोडाफार अपवाद ठरत असेल, परंतु ग्रामीण भाग आजही याच रूढीखाली दबलेला आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ येत आहे. आता या स्त्रीला तिची कुचंबना दिसावी असं वाटतं. मूलतः अशा अनेक शोषित महिला आपण शोषित आहोत हेच मान्य करत नाहीत. त्यांनी हे प्राक्तन म्हणून स्वीकारलेलं दिसतं. नवीन शिक्षित आणि सोशल झालेल्या मुली मात्र स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक होताना दिसत आहेत. याची प्रचीती सध्या महाराष्ट्रभर होत असलेल्या मराठा क्रांती मोर्च्यात स्त्रियांच्या लक्षणीय सहभागावरून लक्षात येते आहे!

.............................................................................................................................................

'ताम्रपट' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4905/Tamrapat

.............................................................................................................................................

लेखिका डॉ. संध्या शेलार मुक्ताई ग्रामीण महिला संघ (नागरगाव, शिरूर, जि. पुणे)च्या अध्यक्ष आहेत.

Shelargeetanjali16@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......