जणू काही रवीश कुमार महाराष्ट्रीयन आहेत आणि मूळ पुस्तक त्यांनी मराठीतच लिहिलं आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
दीपा देशमुख
  • ‘द फ्री व्हॉईस’च्या मराठी अनुवादाचं मुखपृष्ठ
  • Mon , 29 April 2019
  • ग्रंथनामा शिफारस रवीश कुमार Ravish Kumar द फ्री व्हाइस The Free Voice सुनील तांबे Sunil Tambe

निर्भीड आणि नि:पक्षपाती पत्रकार रवीश कुमार यांच्या ‘द फ्री व्हॉइस’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा पत्रकार सुनील तांबे यांनी मराठी अनुवाद केला आहे. मधुश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या अनुवादाची नुकतीच दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. त्यानिमित्तानं...

.............................................................................................................................................

‘द फ्री व्हॉईस’ या रवीश कुमार यांच्या सुनील तांबे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकात ‘बोलते व्हा’, ‘यांत्रिक लोक आणि नव्या लोकशाहीची इमारत’, ‘भयपेरणीचा राष्ट्रीय प्रकल्प’, ‘जिथे झुंड असते, तिथे हिटलरचा जर्मनी असतो’, ‘आपण जनता आहोत’, ‘बाबालोकांचा देश’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘खाजगीपणाचा मूलभूत हक्क’ आणि ‘चला, स्वातंत्र्यदिनानिमित्त आईस्क्रीम खाऊ’ या लेखांचा समावेश आहे.

‘द फ्री व्हॉईस’ या पुस्तकातील प्रत्येक लेखावर एक प्रतिक्रिया लिहायला पाहिजे. पण इथं ‘प्रेमाची गोष्ट’ या लेखावर लिहिण्याचा मोह होतोय. खरं तर एक बातमी या लेखावर लिहायला कारणीभूत ठरली. ऑनर किलिंगच्या बातम्या सततच वर्तमानपत्रांमधून, टीव्ही चॅनेल्सवरून वाचायला, बघायला मिळतात. काल सकाळी वर्तमानपत्रात सोनई गावातल्या एका प्रेमिकांची बातमी वाचली. या प्रेमिकांची जात वेगळी असल्यानं घरातून विरोध होईल हे ठाऊक असल्यानं पळून जाऊन दोघांनी संगमनेर इथं लग्न केलं. लग्नानंतर सुखाचा संसारही सुरू झाला. मात्र काहीच दिवसांत मुलीच्या घरच्यांनी तिच्याशी संपर्क साधला आणि ‘आमचा आता विरोध मावळला असून तू घरी परत ये. आम्ही रीतसर पुन्हा तुमचं लग्न लावून देतो’ असं सांगितलं. आई-वडिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुलगी माहेरी परतली आणि जन्मदात्यांनीच तिची हत्या करून तिचे अंत्यसंस्कारही करून टाकले. मुलाला जेव्हा आपल्या पत्नीचा मोबाईल लागेना, तेव्हा तो तडक सासुरवाडीला जाऊन पोहोचला. तेव्हा मुलीचा हृदयविकारानं अचानक मृत्यू झाला असून तिचे अंत्यसंस्कार केल्याची बातमी तिच्या घरच्यांनी दिली. मुलानं पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदवली. तपास सुरू आहे.

ही बातमी वाचून ‘प्रेम’ हा विषय मनात घोळू लागला. या प्रेमी जिवांच्या ताटातुटीबद्दल मन खंतावलं. रवीश कुमारचा लेख मनात पिंगा घालू लागला. रवीश कुमार म्हणतात, ‘भारतात प्रेम करणं एक लढाई आहे.’ त्यांचे हे शब्द सत्याची प्रचिती देऊन जातात. या लेखात रवीश कुमारांनी चित्रपटातली प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. गरीब-श्रीमंत दरी, जातीच्या भिंती अनेक चित्रपटांतून दाखवण्यात येतात. त्यामुळे प्रेम करताना जातीच्या रिंगणातच प्रेमाच्या शक्यता शोधाव्यात असं उपहासानं रवीश कुमार म्हणतात.

बहुतांश चित्रपट व्यवस्थेला धक्का न बसू देता तयार केले जातात. यात इतकं पराकोटीचं काल्पनिक विश्व उभं केलेलं असतं की, नायक-नायिका सुंदर असतात, छान छान गाणी गातात. ही गाणी गुलजार किंवा आनंद बक्षी यांच्यासारख्या ख्यातनाम गीतकारांकडून लिहून घेतली जातात आणि कडू-गोड प्रसंगानंतर पळून जाण्याचा संदेश यातून दिला जातो.

प्रत्यक्षातही ज्यांनी आंतरजातीय विवाह केले आहेत, विशेषतः राजकारणातल्या व्यक्ती असतील तर सार्वजनिकरीत्या ते आपलं प्रेम व्यक्त करत नाहीत. मतदार नाराज होतील अशी भीती त्यांना वाटत असते. खूप क्वचित वेळा काही लोक हे जाहीरपणे बोलण्याचं धाडस करतात आणि त्याची किंमतही मोजतात. रवीश कुमार म्हणतात, आपल्याकडे प्रेम करण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत. निर्धास्तपणे आपल्या प्रियकराच्या खांद्यावर डोक ठेवून विसावण्यासाठीची जागा मी शहरात जागोजागी प्रेमाची उद्यानं बांधून निर्माण केली असती.

हुंड्याच्या अर्थशास्त्रावरही रवीश कुमार प्रकाशझोत टाकतात. प्रेम असलं तरी हुंडा देणं-घेणं यात त्या तरुणालाही वावगं वाटत नाही, याबद्दलची खंत व्यक्त करून रवीश कुमार अशा तरुणांना ‘चुल्लूभर पाणी में डूब मरो’ असं वैतागून म्हणतात.

प्रेम माणसाला जबाबदार बनवतं. प्रेमानं त्यांना जग बदलायचं असतं. ऋतूंचा ताल प्रेमिकांच्या हृदयात असतो, अशी हळुवारपणे प्रेमाची ताकद सांगत असतानाच प्रेमाचं दुबळेपणही रवीश कुमार सांगतात. प्रेम करणं म्हणजे केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणं नसून दुसर्‍याबरोबरच स्वतःलाही ओळखणं असतं. ऑनर किलिंगची उदाहरणं देताना रवीश कुमार प्रेम, हिंसा, धर्म,  याबरोबरच मुलगी नको म्हणून पोटातच मारून टाकणार्‍या पालकांच्या मानसिकतेवरही प्रहार करतात.

प्रेमाला मोकळं अवकाश मिळायला हवं. त्या मोकळ्या अवकाशात प्रेम बहरायला हवं आणि प्रेमातून माघार घेणार्‍या प्रेमिकांनी डरपोक व्हायचं की, स्वतः निर्णय घेऊन आपलं प्रेम यशस्वी करायचं हे ठरवायला हवं. 

रवीश कुमार हे भारताचे ज्येष्ठ पत्रकार तर आहेतच, पण त्याचबरोबर निर्भीड पण तटस्थ अशी पत्रकारिता हे त्यांचं खास वैशिष्ट्य! वैयक्तिक नफा किंवा तोटा यांचा जराही विचार न करता, कुठलेही पूर्वग्रह न बाळगता, जनसामान्यांचं हित पाहणारी आणि सत्यकथन करणारी अशी त्यांची पत्रकारिता आहे. त्यांना ऐकणं हा जेवढा आनंददायी अनुभव आहे, त्याचबरोबर त्यांचं लिखाण वाचणं हाही अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा अनुभव आहे.

‘द फ्री व्हॉईस’ या पुस्तकाची निर्मिती मधुश्री पब्लिकेशनने दर्जेदार केली असून या पुस्तकाची अल्पावधीतच दुसरी आवृत्ती निघाली आहे. रवीश कुमार यांचं हे पुस्तक सुनील तांबे यांनी अनुवादीत केलं आहे. अनेकदा मूळ कथानकाचा अनुवाद किंवा इतर भाषेतलं त्याचं रूपांतर तितकंच सरस होईलच याची खात्री बाळगता येत नाही. लिखाणाच्या बाबतीत तर अनेक वेळा अचूकता जपण्याच्या नादात मूळ भाषेतला गोडवा नष्ट होऊन एक प्रकारचा रूक्षपणा, कोरडेपणा त्यात उतरतो आणि मग ते लिखाण वाचकाच्या मनाला भिडत नाही, त्याच्या अंतःकरणाला स्पर्शून जात नाही. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे रवीश कुमारचं मूळ लिखाण वाचल्यावर अनुवादीत लिखाणाच्या बाबतीत तुलना होण्याची दाट शक्यता होती. मात्र असं झालं नाही. याचं कारण सुनील तांबेंनी इतका सुरेख अनुवाद केला आहे की, जणू काही रवीश कुमार महाराष्ट्रीयन आहेत आणि मूळ पुस्तक त्यांनी मराठीतच लिहिलं आहे… इतका जिवंतपणा, रसरशीतपणा त्यात उतरला आहे. याचं सगळं श्रेय सुनील तांबे यांचं आहे. जरूर वाचा ‘द फ्री व्हॉईस’.

रवीश कुमार यांच्या या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice

.............................................................................................................................................

दीपा देशमुख

deepadeshmukh7@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

SUDHIR PATIL

Mon , 06 May 2019

छान....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......