रिंगणनाट्य – दिशा आणि दृष्टीचा वस्तुपाठ
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
डॉ. सुनीलकुमार लवटे
  • अतुल पेठे यांची एक मुद्रा आणि ‘रिंगणनाट्य’चं मुखपृष्ठ
  • Sat , 22 October 2016
  • सुनीलकुमार लवटे Suneelkumar Lawate Atul Pethe अतुल पेठे रिंगणनाट्य

बंगाली नाट्यकर्मी ‘नाटक खेल बो’ (नाटक खेळू या) म्हणतात, तर मराठी नाट्यकर्मी ‘नाटक करू या’ म्हणतात. नाटक हा मुळात खेळ आहे. ते करण्याची कृत्रिमता नाटकात आली, ती त्याला अभिजात बनण्याच्या अट्टाहासातून. यामुळे नाटक रंगमंच, नेपथ्य, दिग्दर्शन, वेशभूषा, प्रकाश-योजना, संगीत आणि संहितेत करकचून बांधलं गेलं. बर्टोल्ट ब्रेख्त, ब्रनो एकार्डट, बॉब अर्न्सटथल, पीटर स्युमनसारख्या नाटककारांनी युरोपातील शेक्सपिअर, शॉ, इब्सेन, चेकॉव्ह प्रभूती नाटककारांच्या पारंपरिक, सांगीतिक नाट्यपरंपरेस छेद देत मुक्त नाटक करत प्रायोगिक नाटकांचा मार्ग प्रशस्त केला. नाटक पुन्हा खेळ बनला. या खेळास प्रबोधन, प्रचार, प्रसाराचं माध्यम बनवलं रंगकर्मी मेयेलोद मेयेल्होल्द यांनी. ही गोष्ट आहे १९१८ची. विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात ‘ऑक्टोबर क्रांती’नं जगातील विविध क्षेत्रात मन्वंतर घडवून आणलं होतं. ऑक्टोबर क्रांतीच्या पहिल्या वर्धापन दिनाचं निमित्त साधून मेयेलोदने मायोस्कोवस्की या नाटककाराचं ‘मिस्ट्री बुफे’ हे नाटक चक्क रस्त्यावर सादर केलं. त्या प्रयोगाला, उपस्थित प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं. बहुधा ते जगातलं पहिलं पथनाट्य असावं. साधेपणा, समकालीनता, प्रेक्षकांना साद घालणारे नि त्यांचा प्रतिसाद मिळवणारे संवाद, साधे पोशाख, रोजच्या जीवनातील प्रसंग यामुळे ते नाटक लोकांचं, लोकांनी, लोकांसाठी लिहिलेलं नाटकं ठरलं.

इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते म्हणतात. भारतात आणीबाणीच्या काळात अगदी असंच घडलं. वर्षं होतं १९७५. स्थळ मुंबईचं बोरीबंदर रेल्वेस्थानक. (आताचं छ.शिवाजी टर्मिनस उर्फ सीएसटी). जागर संस्थेनं आणीबाणीविरोधी पथनाट्य सादर करायला प्रारंभ केला नि पोलीस आले. नाटक ऐन रंगात आलेलं. प्रेक्षकांनी पोलिसांना उत्स्फूर्त रोखून धरलं आणि बजावलं की, ‘खबरदार, “रिंगण’ तोडून आत जाल तर रिंगणाच्या बाहेर जिवंत जाऊ कणार नाही.’ खेळ यशस्वी झाला हे वेगळं सांगायला नको. ‘रिंगण’ची ठिणगी या घटनेत पाहता येईल. ती ठिणगी परत पेटली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनं. अतुल पेठे व अजीम उर्फ राजू इनामदार लिखित ‘रिंगणनाट्य’ हे पुस्तक वाचताना ‘रिंगण’ या नाटक व गाण्यांनी आकाराला येणाऱ्या, कार्यकर्ते कलाकारांनी साकारलेल्या विचारगर्भ, कलात्मक, सृजनशील नाट्यप्रकाराची प्रकृती कळते. वैचारिक बांधीलकी असलेले रंगकर्मी म्हणून पेठे-इनामदारांना महाराष्ट्र ओळखतो.

‘रिंगणनाट्य’ हा तसा नवा नाट्यप्रकार. पथनाट्याचा हा रुंदावलेला परीघ म्हणूनही याकडे पाहता येईल. तरी ते पथनाट्यापेक्षा सर्वांगांनी भिन्न आहे. म्हणजे असं की, रिंगण मनोरंजनातून प्रबोधन करतं. यातले कलाकार चळवळीतले कार्यकर्ते असतात. त्यांच्यात समूहभाव असतो. ते विचारांना बांधील असतात. तसं हे पथनाट्यासारखं ‘झिरो बजेट’ नाटक. विचार हा त्याचा आत्मा. प्रेक्षकांवर काय बिंबवायचं ते निश्चित असतं. संवाद छोटे, प्रेक्षक प्रतिसादी व प्रबोधनकारी असतात. ध्वनियंत्रणा, प्रकाश-योजना, नेपथ्य, वेशभूषा असल्या पूर्वअटी नसतात. सादरीकरणात लवचीकता, रस्त्यावर नि सभागृहात दोन्ही ठिकाणी ते सादर करता येतं. प्रयोगानंतर प्रेक्षक-संवाद असतो. कलाकार कार्यकर्ते असल्याने उत्तरे देतात. भाषा बोला-चालीची, प्रसंग अनुभव असतो. परिणाम सहमती असते. नाटकात गाणं-बजावणं-बतावणी सारं असतं. त्यामुळे ते प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. मला आठवतं, दिल्लीच्या जागतिक पुस्तक मेळ्यात ‘सुकरात से दाभोलकर वाया तुकाराम’ हा ‘रिंगण’चा हिंदी प्रयोग असा रंगला की, प्रेक्षक मोठ्या संख्येनं तर जमलेच पण पुस्तक विक्रेतेही आपापले स्टॉल सोडून नाटक पाहत राहिले. ही असते ‘रिंगण’ची ताकद.

‘रिंगणनाट्य’ हे पुस्तक तसं पाहिलं तर रिंगण नाट्यप्रकाराच्या निर्मितीसाठी घेतलेल्या कार्यशाळेचा वृतान्त आहे, पण या पुस्तकास ‘रिंगण संहिता’ असं रूप आलं आहे. हे पुस्तक मुखपृष्ठापासून वाचक व नाट्यप्रेमींची पकड घेतं. मुखपृष्ठ लक्षवेधी आहे आणि लक्ष्यकेंद्रही. आसपासची पानं कार्यशाळेचं नैसर्गिक सौंदर्य दाखवतात. नाटकाप्रमाणे या पुस्तकाचा प्रारंभही ‘रसिकजनांच्या रसिक मनाला वंदन आम्ही करितो’ या नांदीनं होतो. ‘रिंगण धरण्यापूर्वी’ या प्रस्तावनेत नाटक कार्यशाळेचा वृतान्त देण्यापूर्वी लेखकद्वय रिंगणनाट्यामागील पार्श्वभूमी विशद करतात. त्यातून रिंगणविश्व उभं राहतं. रिंगणनाट्य एका कार्यशाळेचा वृतान्त असला तरी नाटकप्रक्रिया समजावणारी संहिता म्हणूनही या पुस्तकाचं आगळं महत्त्व आहे. डॉ. दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन कार्य करायचे. त्यांच्या निर्घृण हत्येच्या कृतिशील, सनदशीर, सर्जनशील निषेधाचं साधन म्हणून ‘रिंगण’चा जन्म झाला.

पेठे-इनामदार हे नाट्यकर्मी एक प्रकारे सफदर हाश्मी, बादल सरकार, हबीब तन्वीर या नाट्यकर्मींचे वंशज आहेत. त्यांनी घेतलेल्या पाच दिवसांच्या कार्यशाळेत प्रत्येक दिवशी रिंगणच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देण्यात आली. या कार्यशाळेचा विषय होता, संविधान. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत सांगितलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही,  धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही मूल्यं मानून माणूस नावाचा समाज घडवणारं नाटक रचणं, रिंगण धरणं हा या कार्यशाळेचा हेतू होता. काही संघटना कारस्थान शाळा योजतात. तिथं हिंसू निर्माण केले जातात. इथं तसं नव्हतं. दर्जा व संधीचं संविधानिक आश्वासन लक्षात घेऊन सामाजिक न्यायाच्या दिशेनं स्त्री-पुरुष समानता, दलितांविषयी सहानुभूती, वंचितांप्रती भावसाक्षरता, लोकशाहीवरील विश्वास, अहिंसेवरची दृढता यावर भर देणारी व्याख्यानं, लेखन-वाचन, चर्चा, घोषणा-गाणी तयार करत ‘रिंगणनाट्य’ तयार करणं, त्याचं सादरीकरण व त्याला मिळालेला प्रेक्षक प्रतिसादाचं मूल्यमापन असं या कार्यशाळेचं नियोजन होतं. ‘नियोजनाबरहुकूम कार्यवाही’ हा खास पेठेकृत समर्पक परिणाम. याशिवाय जिज्ञासूंसाठी या पुस्तकात संविधानविषयक घोषणा, गाण्यांचा (जी शिबिरात तयार झाली) खजिना आहे. तसंच ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक आणि ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ची मूळ संहिता वाचावयास मिळते. ज्यांना ‘रिंगण’ धरायचं आहे, कार्यशाळा योजायची आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक चांगली मार्गदर्शिका आहे.

याशिवाय हे पुस्तक नाटकाविषयी बऱ्याच गोष्टी समजावतं. नाटक हे कलेतून वैचारिक दृष्टिकोन विकसित करायचं साधन आहे. ते माणूस बदलाचं माध्यम आहे. सर्व काळात कलावंत, विचारक, वैज्ञानिक, विवेकवादी यांच्याकडे सनातन, प्रतिगामी शक्ती ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून पाहत आल्यात. पण समाजाचा विवेक व विचार कधीच मरत नसतो आणि हत्येनं तो संपवता येत नाही असा दृढविश्वास हे पुस्तक देतं.

‘रिंगणनाट्य’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची संहिता सामूहिक चर्चा, विचार विनिमयातून जन्मते आणि समूहाकडून समूहासाठी सादर होते. त्याअर्थानं ‘रिंगण’ हे समाजनाट्य आहे. हे नाटक सर्वांना कृतिशीलतेतून सृजनशील बनवतं. हे नाटक प्रेक्षक, रंगकर्मी, कलाकार, कार्यकर्ते यांना दृष्टी देतं. सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची जाण विकसित करण्याचं साधन, माध्यम म्हणून या पुस्तकाची उपयुक्तता मोलाची आहे. ‘रिंगण’चे आजवर ५०० ठिकाणी प्रयोग झाले आहेत. त्यात २५० कार्यकर्ते रंगकर्मी बनले. त्यातून विवेकवादी विचारधारा बुलंद होण्यास साहाय्य झालं. ‘जीवनासाठी कला’ हे खांडेकर-फडके प्रभुतींचं सूत्र प्रत्यक्षात आलं. ज्यांना आवाज नसतो, त्यांना स्वर देण्याचं काम ‘रिंगण’ करतं.

हे पुस्तक वाचताना मिळणारा दिलासा उमेद जागवणारा आहे. मागे राहिलेल्या वंचित घटकांना समाजाच्या मध्यप्रवाहात आणण्याचं कार्य भारतीय राज्यघटना करते, हे समाजभान, ही समाजदृष्टी हे पुस्तक देतं. शिवाय एकट्या वंचित व्यक्तीलाही विकासाचा हक्क व सामाजिक न्याय मिळवून देणारी घटना म्हणून लोकशाहीतील तिचं महत्त्व हे पुस्तक अधोरेखित करतं. हे पुस्तक नाटकाचं तंत्र सांगत माणुसकीचं गाणं ऐकवतं. नाटक हा शिळोप्याचा उद्योग नसून उभारणीचं तत्त्वज्ञान होऊ शकतं असा विश्वास हे पुस्तक जागवतं. ज्यांना समष्टीगत जीवन अंगीकारायचं आहे त्या सर्वांनी एकदा अशा कार्यशाळेच्या मांडवाखाली काही दिवस घालवलेच पाहिजेत. कार्यशाळा ते नाटकसंहितेची निर्मिती असा प्रवास उलगडणारं हे पुस्तक वेदनेचा विलाप न राहता विवेकाचा विचार बनतो, याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे.

रिंगणनाट्य – अतुल पेठे, राजू इनामदार, साधना प्रकाशन, पुणे, पाने – १७८, मूल्य – १५० रुपये.

 

लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.

drsklawate@gmail.com

'रिंगणनाट्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

https://goo.gl/CgaFCI

 

Post Comment

Nilesh Pashte

Sat , 22 October 2016

टेस्ट प्रतिक्रिया


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......