चित्रकलेचं निसर्गदत्त वरदान लाभलेल्या काही चित्रकारांना काही शापही वागवावे लागतात
ग्रंथनामा - आगामी
चंद्रमोहन कुलकर्णी
  • ‘तीन चित्रकार’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 15 March 2019
  • ग्रंथनामा आगामी तीन चित्रकार Tin Chitrakar सतीश भावसार Satish Bhavsar

चित्रकार सतीश भावसार यांचं ‘तीन चित्रकार’ हे पुस्तक उद्या, १६ मार्च, मुंबईत ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. ग्रंथालीतर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकात व्हिन्सेंट व्हॅन गॉग, अमृता शेरगिल आणि प्रभाकर नाईक-साटम यांच्याविषयीच्या दीर्घ लेखांचा समावेश आहे. या पुस्तकाला चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.............................................................................................................................................

चित्रकार चित्रं काढतात.

हे तीन शब्दांचं वाक्य वाटतं तितकं साधं नाही. चित्रकलेचं निसर्गदत्त वरदान लाभलेल्या काही चित्रकारांना ह्या वरदानाबरोबर काही शापही वागवावे लागतात. जन्मभर!

काय असतात हे शाप?

नातेसंबंध? प्रेम, मैत्री?

शत्रुत्व, स्वत:ची प्रतिमा, की स्वत:बद्दलच्या वास्तव-अवास्तव कल्पना??

फ्रस्ट्रेशन; की आपल्याला न झेपणारी आपलीच ताकद?

मानसिक आजार?

जगातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या, तीन वेगवेगळ्या काळातल्या तीन चित्रकारांबद्दल सतीश भावसार लिहितायत : ‘तीन चित्रकार’.

हे चित्रकार मनस्वी आहेत. नातेसंबंधांच्या आणि प्रेमप्रकरणांच्या जंजाळात भंजाळलेले आहेत. तन, मन, प्रसंगी धनही झोकून काम करतायत. ह्या ‘तीन चित्रकारां’मधला व्हॅन गॉग केवळ सदतीसाव्या वर्षी मरणाला सामोरा जातोय. स्वत:ची चित्रं अत्युच्च स्थानावर पोहोचत असतानाच हा स्वत:वर गोळी झाडून घेतो. स्वत:च्या भावाच्या नात्याचं (आणि नावाचंसुद्धा) जन्मभर ओझं वाहणारा हा चित्रकार. किती स्त्रिया आल्या त्याच्या आयुष्यात; आणि त्या आल्यामुळे काय काय झालं त्याच्या चित्रकलेचं? विधवा झालेल्या, पदरी अपत्य असलेल्या चुलत बहिणीबद्दल काय भावना होत्या व्हिन्सेंटच्या? त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर डेरेकचं काय म्हणणं होतं व्हिन्सेंटच्या मानसिक आजाराबद्दल? व्हिन्सेंटच्या मनातली काळ्या पोशाखातील बाई, युजेनची आई आणि व्हिन्सेंट ह्यांच्यातला प्रेमाचा दिखाऊपणा आणि युजेनवरचं त्याचं प्रेम, हॅनबिक कुटुंबातली कॅरोलिन, क्लासिना म्हणजे सीएन हुर्निक ह्या वेश्येबद्दल त्याला वाटलेल्या माणुसकीपेक्षा सहानुभूतीतनंच व्हिन्सेंट घडला का? ‘सॉरो’ हे चित्र व्हिन्सेंटनं तिच्यावरनंच काढलं. ‘सॉरो’मधून त्यानं स्त्रीच्या जगण्याचा संघर्ष चित्रित केला आहे. समाजानं बहिष्कृत केलेल्या सिएनबद्दल बोलताना तिनं सोसलेले आघात, तिचं दु:खं, तिची अ‍ॅडव्हर्सिटी ह्यांनी तिच्यावर कोरलेल्या खुणांबद्दल उल्लेख करून व्हिन्सेंट म्हणतो, ‘सीएन ह्या कुरूप स्त्रीसारखी सुंदर सहचारिणी मला आजपर्यंत मिळाली नव्हती.’ सीएनबरोबरच मार्गोटसारखी लाजाळू स्त्री, अ‍ॅगोस्तिना सेगातोरी ही रेस्टॉरंट मालकीण, गार्डीना आणि इतर काही अशा स्त्रियांचाच फक्त त्याच्या कलात्मक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम झाला होता का? खरं तर त्याचं वैयक्तिक आणि कलात्मक जीवन वेगळं वेगळं तरी होतं का? (...आणि कोणाचं तसं असतं तरी का?) थिओ ह्या त्याच्या मोठ्या भावाचा व्हिन्सेंटच्या संपूर्ण जीवनावर खोलवर परिणाम होता का? ह्या अशा काही उत्तरित आणि पुष्कळशा अनुत्तरित प्रश्नांमधनं व्हॅन गॉग ठेचकाळत, तडफडत जगतो आहे, मरतो आहे. व्हिन्सेंटच्या अवतीभवतीचं नातेवाईकांचं विश्व, ओळखीपाळखीचे, समकालीन चित्रकार, मित्र, शेजारीपाजारी, कुटुंबं, बायका, त्याला असलेला बुद्धिमान आजार आणि त्याच्या मृत्यूबद्दलचं गूढ या सगळ्यालाच लेखकानं त्याच्या लेखणीच्या टोकानं स्पर्श केलाय.

वयाच्या कोवळ्या वीस वर्षांच्या अमृता शेरगिल या मुलीनं केलेल्या सौंदर्य आणि सेक्स यांची रेलचेल असलेल्या न्यूड मॉडेलच्या चित्रांचं उघडंनागडं रूप आणि बघणाऱ्यांची परिपक्व आणि अपरिपक्व दृष्टी याबद्दल सुरुवात करून भावसारांनी अमृताच्याही जीवनाच्या गाठी उलगडण्याचा प्रयत्न केलाय. अमृताची आई, वडील, तिचं परदेशातलं जीवन, भारतातलं जीवन, अजिंठ्याच्या चित्रकलेचा तिच्यावर झालेला गडद परिणाम, तिचे मित्र, तिचा नवरा, तिचं गरोदरपण, लैंगिक आजार ह्या सगळ्या अवघड वाटावळणांमधनं भावसार पोहोचतात ‘अमृता शेरगिल’ या अदभुत रसायनापर्यंत.

‘लेटर्स टू थिओ’ ह्या व्हॅन गॉगच्या पुस्तकाचा उल्लेख करून ‘व्हीटफिल्ड विथ क्रोज’ ह्या त्याच्या चित्राला स्पर्श करून अमृताचं आणि व्हॅन गॉगचं नातं लेखक इथे विशद करतो. काय होता व्हॅन गॉगच्या चित्रांचा आणि अमृताच्या चित्रांचा संबंध? व्हॅन गॉगचं ‘पोटॅटो इटर्स’ पाहताना अमृताला नेमकं काय होत होतं? आणि दु:ख, वेदना, संघर्ष ह्या समानतेत अमृता आणि व्हॅन गॉग दोघेही कसे कलानिर्मिती करत होते, हे इथं वाचायला मिळेल. पं. नेहरू आणि अमृता यांच्यासंबंधातील चर्चा, त्यांची सत्ता, तिची चित्रं, आई-वडिलांनी जाळलेला त्यांचा पत्रव्यवहार आणि अमृताचं जीवन, तिची चित्रं, तिचा आणि तिच्या चित्रांचा स्वभाव, कार्ल खंडालवाला आणि अमृता ह्या सगळ्या जिवंत कॅनव्हासमधले रंग गडद गडद होत जातात आणि लेखक आपल्याला अमृताच्या रहस्यमय शेवटाकडे नेतो : शनिवार, ६ डिसेंबर १९४१.

ह्या काळानंतर कलासमीक्षकांना हे मान्य करावं लागलं की, भारतीय चित्रकलेमध्ये रवीन्द्रनाथ टागोर, जेमिनी रॉय यांसारख्या महत्त्वाच्या नावाबरोबरच अमृता शेरगिल हे नावसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

अमृता आणि व्हॅन गॉग ह्या दोन धाग्यांबरोबर तिसरा ‘दोऱ्या’चा धागा जोडताना लेखक आपल्याला भारतातल्या प्रभाकर नाईक-साटम ह्या महत्त्वाच्या कलावंताची ओळख करून देतो.

जपानमधल्या सर्वांत मोठ्या म्युझियममध्ये ‘लाईफ आफ्टर डार्क’ ह्या टेपेस्ट्रीच्या उद्घाटनाच्या प्रसंगापासून सुरुवात करून कणकवलीच्या बांदिवडे गावच्या ह्या प्रभाकरची ओळख करून देतो. त्याचं कुटुंब, समुद्र, आजूबाजूचा परिसर, म्हसकर मास्तर. त्याचे मित्र आणि इतरांनी सूर्योदयाचं चित्र काढलेलं असताना प्रभाकरनं काढलेल्या कोयत्याच्या चित्राबद्दल लेखक इथे बोलतो. कोयत्याचं चित्र गाजल्यानंतर प्रभाकरची चित्रकलेच्या प्रदेशातील सुरुवात. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मातोंडकर मास्तर, दंडवती मठ सर आणि अचानक सापडलेलं वळण ‘लेदर वर्किंग स्कूल, खेरवाडी’. केनेडी पुलाच्या बोगद्याखाली भेटलेला दगडू चांभार आणि प्रभारकरचं पूर्ण झालेलं शिक्षण, कॅलिको डिझाईन एजन्सीतला त्याचा दबदबा, त्याची नवनवीन डिझाईन्स, लंडन स्कूल ऑफ आर्टस्मधील शिक्षण आणि पुढे पुन्हा अहमदाबाद हा सारा प्रवास भावसार मोठ्या रंजकतेनं वर्णन करतात.

...आणि दोरा.

दोरा हे तर प्रभाकरच्या आयुष्यातलं महत्त्वाचं माध्यम.

ह्या दोऱ्याचा धागा प्रभाकरनं पुढे आयुष्यभर जोडून घेतला. ह्या दोऱ्यानं प्रभाकरचं आयुष्य इतकं वेढलं की, पुढे टेपेस्ट्रीसाठी लागणारे रंगीत दोरे तर प्रभाकरनं स्वत: तयार केलेच; पण टेपेस्ट्रीसाठी लागणारा उभाच्या उभा मागही प्रभाकरनं तिथल्या लोकांच्या मदतीनं उभा केला. भारतातल्या छोट्या बांदिवडेसारख्या छोट्या खेड्यापासून एक छोटा मुलगा आपल्या आयुष्याची सुरुवात करतो आणि जपानसारख्या कर्तव्यकठोर देशाच्या सांस्कृतिक सन्मानाचा मानकरी ठरतो. हा मोठा विलक्षण प्रवास निरनिराळ्या देशांतल्या मानवीसंबंधांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. इतक्या शंभर-सव्वाशे पानांच्या छोट्या पुस्तकात तीन चित्रकारांच्या कलात्मक आणि वैयक्तिक आयुष्याला केलेला स्पर्श हे चित्रकार सतीश भावसारांच्या हातून पुढे निर्माण होणाऱ्या संपूर्ण मोठ्या कलाकृतीचं बीज आहे, असं मी मानतो.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

'तीन चित्रकार' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4793/Teen-Chitrakar

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......