संघर्ष करणारा कधीच मोडून पडत नाही, हे या आत्मकथनाचे सार आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
वसंत केशव पाटील
  • ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 01 March 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफार मी लोकांचा सांगाती Mi Lokancha Sangati संपतराव पवार Sampatrao Pawar

अगदी विद्यार्थिदशेपासून गेली तब्बल पाच तपे शेतकऱ्यांचा निर्भीड वाली आणि खंबीर वकील म्हणून सातत्याने संघर्षरत असलेल्या भाई संपतराव पवारांचे ‘मी लोकांचा सांगाती’ हे लक्षवेधी आत्मकथन आहे. या आत्मकथनात व्यक्तीपेक्षा समष्टीचा पैस नि परीघच अधिक प्रभावी आहे. एकूण सहा प्रकरणांत विभागलेले हे लेखन खरे तर एकाच अंत:सूत्रात बांधलेले आहे. शेतीचे अर्थशास्त्र, चारा-पाण्याचे न्याय्य नियोजन, गावगावकीचे तिढे-तिपडे, प्रस्थापित राजकारण्यांचे दांभिक मुखवटे, धनदांडग्यांची सत्तालोलुपता, पुढाऱ्यांची दाखवेगिरी, सरकारी अधिकाऱ्यांची ढिम्म वृत्ती, तत्त्वनिष्ठा गुंडाळून रंग बदलणारे पक्षश्रेष्ठी, दुष्काळामुळे होणारी गुराढोरांची परवड नि अशा गावाशिवाराला तळागाळात लोटणाऱ्या विविध समस्यांचा हा कोलाज आहे.

संपतरावांची मूळ पिंड-प्रकृती ही अथक लढवय्याची. एकीकडे समंजस, संयमी आणि समर्पणभाव, पारदर्शक परखडपणा, घट्ट मूल्यनिष्ठा; तर दुसरीकडे सळसळती अशी, ‘शेंडी तुटो पारंटी तुटो’ या पंथातील सर्वमंगलकारी दृढनिश्चयी भूमिका. युवाशक्तीची बळ-बांधणूक करण्यातील असोशी व त्याकरिता रात्रंदिवस पायाला भिंगरी, अन्याय-अत्याचार व जातिभेदाची जळमटे यांविषयीची तर्कशुद्ध चीड, सहकार्य, समन्वय, श्रमदान, स्वयंसूचन सामोपचार यांवर मन:पूत विश्वास, आंदोलन-मार्चे वगैरेचे काटेकोर नियोजन आणि विशेष म्हणजे समग्र प्रयोजनातील सुस्पष्टता, ही अशी एकूण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची समृद्ध खतावणी.

एन.डी. पाटील, अप्पासाहेब शिंदे, मुकुंदराव किर्लोस्करांदीसह आपले आई-वडील तसेच अनेक सहकाऱ्यांची विशेषत: भारत पाटणकर, बाबराव गुरव यांची संपतरावांनी चितारलेली कृष्णधवल चित्रेच-चरित्रे एकरंगी किंवा एकांगी वाटत नाहीत. शासन-प्रशासनातील भल्याबुऱ्या घटना-प्रसंगांचे रोखठोक वर्णन, विश्लेषण मोठे मार्मिक व समतोल आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात आलेल्या दोन परस्परविरोधी वर्तन-व्यवहाराच्या प्राचार्यांविषयी संपतरावांनी कथन केलेले अनुभव ताठ कण्याचा आणि कणखर बाण्याचा विद्यार्थी काय असतो, याची प्रचीती देतात. भारतीय व जागतिक राजकारणातील संपतरावांनी दिलेले संदर्भ त्यांच्या चौफेर व अभ्यासू वृत्तीची साक्ष म्हणता येईल.

या लेखनातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपतरावांनी ‘बिटविन द लाइन्स’मध्ये जी सूचक स्पेस सोडली आहे ती बरेच काही सांगून जाते. संपतराव मातीच्या पायांची फारशी दखल घेत नाहीत. जो स्वत:शी नेक-नामदार किंवा प्रामाणिक असत नाही, तो कुणाशीही कधीच प्रामाणिक असू शकत नाही, हे जीवनमूल्य उराशी जपत संपतरावांनी केलेली काटेरी वाटचाल ‘सारेच दीप मंदावले…’ अशी खंत बाळगणाऱ्यांना मोठी उभारी देणारी आहे.

हा जागल्या पाठीवर गावाशिवारातील जटिल समस्यांचे गाठोडे घेऊन, आपल्या उरा-शिरावर परिस्थितीचे प्रहार झेलत सुसाट निघालेला प्रभंजन आहे. आणि या साऱ्या पार्श्वभूमीला सातत्याने मंद-मृदू तरीही तारसप्तकात निनादणारी संपतरावांची कृतकृत्य नम्रता, परमत सहिष्णुता, भक्ती-विभक्ती तसेच विरक्तीही कशी भोवंडून टाकते, यासाठी मुळातून हे पुस्तक वाचावे लागते.

मातीच्या पायांनी त्यांना लाख खोडे घातले, जिवाभावाच्या साथीदारांनी अकारण-सकारण फारकत घेतली, पण हा रापलेला गडी पुढे नि पुढेच धावत राहिला. धपापत राहिला. उसासत राहिला. जगाच्या लेखी हीच त्याची चिमूटभर कहाणी. त्याने स्वत:तच प्रस्तावनेत म्हटले आहे – ‘राबणाऱ्यांचं गर्वगीत मी गात राहिलो आणि महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात जगाकडे पाठ करून काम करत राहिलो.’

सुहास पळशीकरांचे श्रीकाराचे दोन शब्द या आत्मकथनाचे जणू ‘प्रीअॅम्बल’च म्हणावे. सुहास कुलकर्णींचे प्रकाशकीयही सामाजिक गतिस्थितीचे नेमके विश्लेषण करणारे आहे. संपतराव म्हणजे शेतकरी-कामगार पक्षाचा एकलव्य. तरीसुद्धा त्याने पक्षाची शोकांतिका आणि तिची कारणमीमांसा हातचे न राखता केली आहे. संघर्ष करणारा कधीच मोडून पडत नाही आणि पडला-झडला-तंटला तरीही पायांखालची पुण्यगंधा मृतिका घेऊन तो पुन्हा झेपावतो, वादळाला ललकारतो. वाकत किंवा रांगत नाही, हेच या आत्मकथनाचे सार म्हणावे लागते.

खरे तर बळिराजा धरणाचा प्रवर्तक व शिल्पकार ही संपतरावांची सर्वदूर पोहोचलेली ओळख, पण इथे या पानापानावर प्रगटलेला संपतराव हा न संपणारा आणि न विकणारा असा दीपस्तंभ आहे.

.............................................................................................................................................

भाई संपतरावांच्या ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4512/Mi-Lokancha-Sangati

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Sandesh pawar

Sat , 02 March 2019

धन्यवाद सर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......