अस्तित्वाला अर्थ देणारी गडकऱ्यांची नाटके
ग्रंथनामा - झलक
त्र्यं. वि. सरदेशमुख
  • राम गणेश गडकरी आणि त्यांची काही पुस्तके
  • Fri , 18 January 2019
  • ग्रंथनामा त्र्यं. वि. सरदेशमुख T. V. Sardeshmukh राम गणेश गडकरी Ram Ganesh Gadkari

२३ जानेवारी रोजी राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. त्यानिमित्तानं योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई इथं गडकऱ्यांच्या पन्नासाव्या स्मृतीवर्षानिमित्त झालेलं भाषण संपादित स्वरूपात. ‘संवाद’ या महाविद्यालयाच्या पत्रिकेतून…१ ऑक्टोबर १९६८.

.............................................................................................................................................

गडकऱ्यांची आठवण ५०  वर्षांनंतरही आपण का करतो? हा प्रश्न मला पुष्कळ दिवसांपासून पडला होता. गडकऱ्यांचे साहित्य तीन प्रकारचे आहे. ते त्यांनी गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी आणि बाळकराम या तीन वेगवेगळ्या नावांनी लिहिले. साधारण १९०९ - १९१९ या दहा वर्षांतले हे लेखन पछाडून टाकणारे आहे. 

त्यांचे समकालीन

१८८५ मधली राष्ट्रीय सभेची स्थापना ते १९२० मधला टिळकांचा मृत्यू हा आपल्या सांस्कृतिक राजकीय जीवनातील एक महत्त्वाचा कालखंड. या काळातील वाङमयीन कर्तृत्व म्हणजे हरिभाऊ, केशवसुत, श्री. कृ. कोल्हटकर, कृ. प्र. खाडीलकर, शि. म. परांजपे, बालकवी आणि गडकरी. हरिभाऊंच्या कादंबऱ्या, श्रीकृंचा विनोद व गडकऱ्यांची नाटके अजून समोर आहेत. गडकऱ्यांचे शिक्षण अर्धवट झालेले. किर्लोस्कर कंपनीत दारावर उभे राहून त्यांनी नाटकाच्या जगात प्रवेश केला. खाडीलकर-कोल्हटकर या वाग्भटांनी नाटकक्षेत्र गाजवलेले होते. त्यांच्या- गडकऱ्यांतले वेगळेपण कशात आहे? ते शोधले पाहिजे. त्यांच्यावर समकालीनत्वाची छाप आहेच, पण त्यांची स्वतःची अशी प्रकृती आहे, जिच्यामुळे ते आजही तगून राहिले आहेत. नाटकाचे प्रयोग पाहणे आणि नाटक वाचणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. श्रीकृंची नाटके वाचवत नाहीत, त्यांच्या नाटकातील विनोदातही कृत्रिमता आहे. विषय घेऊन नाटके लिहिण्याची यातायात त्यात जाणवते. खाडीलकर नाटकांतून राजकीय घडामोडींचे पडसाद देत. टिळक त्यांचे पुरुषोत्तम. त्यांच्या मृत्यूनंतर कृप्रंची प्रतिभा थंड झाली.

भाषा

‘एकच प्याला’, ‘पुण्यप्रभाव’ व ‘राजसंन्यास’ ही तीन नाटके गडकरी १९१६-१७ या काळात एकाच वेळी लिहीत होते. विषय, तो हाताळण्याची रीत आणि भाषा या बाबतीत ही तीन नाटके, त्यांच्याकडे सूक्ष्मपणे पाहिले म्हणजे गडकरी भाषेवर काही वेगळे प्रयोग करताहेत असे वाटते. सिंधू, धुंडीराज, रामलाल, तळीराम इ. पात्राद्वारे गडकरी जीवनातील नाट्यात्मता प्रभावीपणे मांडतात. पण त्याच वेळी त्यांची भावित-अभावित भाषा कुठे न्यायचे तेथे घेऊन जाते. एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारे भाषा हाताळणे ही साधी गोष्ट नाही.  

प्रयोगशीलता

गडकऱ्यांच्या नाटकावरील समीक्षेची बरीच गफलत झालेली आहे. खांडेकर त्यांच्या जीवनदर्शनानेच मोहीत होतात, तर फडके त्यांच्या नाटकांना चमत्कृतीजनक घटनांची उतरंड म्हणतात. त्याचा भाषेचा झगमगाट प्रेक्षकांना बधिर करतो असे त्यांना वाटते. वस्तुतः गडकरी शब्दांनी नाट्य फुलवतात. ‘ऑब्जेक्टीव को रिलेटीव’चे तत्त्व त्यांच्या भाषावैशिष्ट्यात जाणवले पाहिजे. अनुप्रासाचा सुंदरपणा तोही अर्थ न बिघडवता उलट अर्थ वाढवणारा. हे मुद्दाम केलेले प्रयोग आहेत. प्रवेशांची पुनरावृत्ती वगैरे नवीन नाट्यप्रयोगांचा ब्रेख्तने सांगितले म्हणजे आपल्याला विचार करावा वाटतो, पण गडकऱ्यांनी केलेले प्रयोग आपण डोळसपणे पाहात नाही. पाल्हाळ, कृत्रिम प्रसंग, भलत्या ठिकाणी विनोद वगैरे गडकऱ्यांचे दोष आहेत खरे पण हे सर्व एका प्रयोगशीलतेतून येतात असे वाटते. विनोदाच्या ठिकाणी फार्सचाही उपयोग त्यांना करून बघायचा असतो. ’टॉमफुलरी ते ट्रॅजिक’ सर्व प्रकार ते वापरून पहातात. उदा. ‘भावबंधना’तील पहिला प्रवेश. मूळ गंभीर विषयाचा फार्स अवास्तव असेल. हे प्रयोग जमले असतील असेही नाही. पण प्रयोग करण्याची कुवत असलेला हा एकमेव नाटककार होय.

खलनायक

नायकात खलत्व आणि खलनायकात सत्-असत् संघर्ष, स्थिर-शांत जीवनाचा तवंग विस्कटलेला. जीव व वस्तुमान यांच्यातील अचाट गुंतागुंतीमध्ये व्यथेचे केंद्र - त्यावर उतारा कोणता? गडकऱ्यांच्या खलनायकांचा यादृष्टीने विचार करण्यासारखा आहे. कमलाकरापेक्षा जयंत स्वतःचा जास्त आत्मनाश करतो. कमलाकराच्या दुष्टपणाला प्रयोजनच नाही निदान या जन्मात तरी. वृंदावनही तसाच, घनश्यामचाही तोच नमुना. हे खलनायक नाहीत तर नायकच आहेत. या नाटकांचे विषय गडकऱ्यांच्या जीवनातून आलेलं आहेत असे वाटते.

लेखनामागे तीव्र वेदना. मनोभंगाची (प्रेम), अपमानशल्याची. त्यातून अस्मितादाहाचे प्रकटन. (The pain of existence) वैयक्तिक जीवनानुभवाच्या प्रतिक्रिया, कवितेत प्रेमभंगाची व्यथा तर नाटकात मानभंगाची. या दाहाने माणसाच्या मनोवृत्ती आडवाटा धरतात, फसगतीला जातात, आत्मघाताकडे नेतात, यातून खलप्रतिमांची निर्मिती. प्रेमभंग (जयंत), मानभंग (घनःश्याम, वृंदावन) त्यांनी अनुभवले आहेत. या सर्व पात्रांतून गडकरी स्वतःला पसरून ठेवतात. आपल्यात त्यांचे वा त्यांच्यात आपले रूप पाहतात. ही ‘मिररिंग’ची प्रक्रिया त्यांच्या नाटकांतून जाणवते. मराठी वाङमयात हा खेळ नवीन आहे. त्यासाठी वेगळी भाषा येते, अलंकारिकता, प्रतीकात्मकता इ. गोष्टी येतात.

मूल्यांची अग्निपरीक्षा

गडकऱ्यांची नाटकं पाहिली तर त्यांना पातिव्रत्याचे ऑब्सेशन आहे असे वाटते. पण त्याचे ते विडंबनही करतात. या मूल्यांचा गाभा राहतो की नाही हे पाहणे त्यामागे असावे. त्यांना निष्ठावंत प्रणय, इमानी मैत्री, पातिव्रत्य, संन्यास, त्याग, मातृभक्ती... अंतःशक्तींची मूल्ये महत्त्वाची वाटत, त्यातून येणारी अंतर्द्वंद्वे दाखवणे हे मराठी नाट्य साहित्यात प्रथमच होते. वृंदावनची प्रतिकात्मक भ्रष्टता आणि ‘माझी असहायता हीच माझी शक्ती आहे’ हे वसुंधरेचे उद्गार यातून गांधीवादाचेच पूर्वदर्शन जणू काही होते. एका परिने वसुंधरेचे काम सोपे होते, तिला फक्त वृंदावनशीच झुंजायचे होते. पातिव्रत्याप्रमाणेच मातृभक्ती हेही गडकऱ्यांचे आवडते तत्त्व. ‘तू आईसारखी आहेस’ असं नवऱ्यालाही वाटतं आणि वसुंधरा दिनार, भूपाळ व वृंदावन यांची आई होते. सुधाकरही रामलालला सिंधूविषयी म्हणतो, ‘माझी मानलेली आई गेली’. स्त्रीमध्ये ही जी सृजक, संरक्षक प्रेमळ मातृशक्ती आहे तिची श्रेष्ठता गडकरी अनेकदा दाखवतात.               

अस्तित्वविचार, दुःखसंवेदना

एकंदरच गडकऱ्यांच्या नाटकांमधुन मनुष्याच्या जीविताविषयी, दुःखाविषयी भान दिसते. मनुष्याला आपले अस्तित्व वेदनेने जाणवते. ‘आय सफर; देअरफोर आय अॅम’. दुःखानुभवाने जीवनाची जाणीव होते हा अस्तित्वाविषयीचा विचार गडकऱ्यांच्या नाटकांमधून दिसून येतो. व्यक्तिमूलक जाणीव, तिला आपण अस्मिता म्हणू, ही महत्त्वाची गोष्ट त्यांच्या नाटकांतून दिसते. व्यक्तीची जाणीव वस्तूजातानेही होते. मी आणि न मी यातून व्यक्तिमूल अस्तित्वाचे आणि नास्तित्वाचेही भान होते. गडकरी हे भान, ‘अवेअरनेस’ अनेकदा दाखवतात प्रेम आणि मरण इतक्यांदा, इतक्या वेगवेगळ्या प्रकारे येते त्यातून हे भान दिसून येते. ‘मरणाचे स्मरण असावे’ असे रामदास म्हणतात, ते जीवनाचा अर्थ लागावा म्हणून. दुःख हे एका अर्थाने मरणच असते. ‘क्षणाक्षणाला जनन मरण’ हा मराठी कवितेतही नवाच विचार होता. त्या जाणिवेमुळे जीविताला ‘पर्सेप्शन’ येईल. सुधाकर, वृंदावन, घनःश्याम या त्याच्या तऱ्हा आहेत, सिंधू त्यातून थोडी वेगळी. अस्तित्व तिने जसेच्या तसे घेतले आहे, काही टाळायचे नाही. ती बोलत नाही. अस्तित्वाचा अर्थ दुःखातूनच येत असतो हे गडकऱ्यांना दाखवायचे आहे. आजच्या नव्या जाणिवेला दुःखाचे भान असणे आवश्यक आहे. मूल्यांच्या मांडणीतून गडकरी काही वेगळ्याच विषयाला हात घालतात असे मला वाटते. यादृष्टीने गडकऱ्यांच्या नाटकाचा हा त्रोटक विचार मांडला आहे.

.............................................................................................................................................

'संपूर्ण गडकरी खंड १ ते २' या पुस्तकाची खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

https://tinyurl.com/ycqo37j6

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......