नजूबाईंच्या लेखनाचा पाया मातृसत्ता-स्त्रीसत्ताक आहे. त्याला समतेचा आधार आहे.
ग्रंथनामा - झलक
सुशील धसकटे
  • नजूबाई गावित आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Thu , 20 September 2018
  • ग्रंथनामा Granthanama झलक नजूबाई गावित Najubai Gavit भिवा फरारी Bhiva Farari आदोर Aador नवसा भिलणीचा एल्गार Navsa Bhilneecha Elgar

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आणि ग्रंथाली वाचक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'बलुतं’च्या चाळिशी'प्रीत्यर्थ 'आत्मकथन' या साहित्यप्रकारास 'बलुतं पुरस्कार' सुरू करण्यात येत असून या वर्षीचा पहिलावहिला पुरस्कार कॉ. नजूबाई गावीत यांच्या 'आदोर'ला घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण आज, २० सप्टेंबर २०१८ रोजी मुंबईत 'बलुतं’ची चाळिशी' या एकदिवशीय संमेलनाच्या उदघाटन सत्रामध्ये करण्यात येत आहे. ११,००० रु. रोख, गोधडी आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यानिमित्तानं गावित यांच्याविषयी गतवर्षी ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झालेल्या लेखाचं हे पुनर्प्रकाशन.

.............................................................................................................................................

नजूबाई गावित या 'घरोट्या'तील लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या नाहीत. त्या पैठणी वा उच्च दर्जाची खादीची साडी नेसून लेखिका म्हणून मिरवणाऱ्या; मान-सन्मानावर डोळा ठेवून कोणी दुखवलं जाणार नाही असं 'सर्वमान्य' कोटीतलं लिहिण्याची काळजी घेणारी तथाकथित ‘करिअरिस्ट’ लेखिकाही नाहीत. की समाजावर 'उपकार' करायला निघालेल्या चळवळीतील स्वयंघोषित हौशी सामाजिक कार्यकर्त्याही नाहीत.

आहे ते दाबून आणि नाही ते रंगवून स्त्री-पुरुष संबंधांवर नकली बोल्ड पद्धतीनं लिहिणं; आपल्याकडील सामाजिक पर्यावरणाचा फार विचार न करता-ग्राउंड रिअॅलिटी जाणून न घेता लेखनात योनी-लिंग अशी बिनधास्त भाषा वापरणं, आपणही पुरुषांपेक्षा कमी नाही असा आविर्भाव दाखवत नकळत पुन्हा पुरुषी वळणाचं एकसुरी लिहून आपण कसे 'मॉडर्निस्ट' आहोत वगैरे असं दाखवण्याचा एक ट्रेंड आपल्याकडे स्थिरावताना दिसत आहे. नजूबाईंना अशी दिखाऊ 'मॉडर्निस्ट' पोझ घ्यायचं कारण नाही. त्यांनी ती कधी घेतलीही नाही. कारण त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून, समाजाच्या खालच्या समजल्या जाणाऱ्या समूहातून आलेल्या असल्यानं एकप्रकारे जगण्यातील समृद्धता त्यांच्या ठायी आहेच. त्यामुळे नजूबाई या सर्व ढोंगी साहित्यिक पर्यावरणापासून शेकडो मैल दूर आहेत.

मुळात आदिवासी समाजात स्त्री पुरुष नात्यांत जितका मोकळेपणा आहे, त्याच्या एकपटही मोकळेपणा स्वतःला उच्चकुलीन-सवर्ण-कल्चर्ड वगैरे समजणाऱ्या समाजात किंवा या समाजातील शिकलेल्यांमध्ये फार जाणवत नाही. त्यामुळे नजूबाईंच्या लेखनातील स्त्री-पात्रं स्वाभाविकच मोहाची दारू पिताना दिसतात, पुरुषाशी दोन हात करताना दिसतात, परिस्थितीशी संघर्ष करताना दिसतात, आपल्याला आवडणाऱ्या पुरुषाबरोबर पळून जाताना दिसतात. असं पळून गेलं की, त्यांचं लग्न करून द्यायचं, अशी रीत आदिवासी समाजात आहे. प्रत्यक्ष जगण्याच्या पातळीवरील हा पुरोगामीपणा स्वतःला शिक्षित, नागरी, शहरी समजणाऱ्या समाजात अभावानंच आढळतो. यावरून आदिवासींच्या तुलनेत आपले जगण्या-वागण्या-बोलण्याचे पुरोगामित्वाचे दावे किती वरवरचे, पोकळ आहेत, हे जाणवतं.

शिवाय उच्चवर्णातील स्त्रियांकडे असलेला वागण्या-बोलण्याचा-वावरण्याचा-दिसण्याचा-चेहराविहीनतेचा न्यूनगंड नजूबाईंकडे नाही. कारण त्या आदिवासी जमातीतून म्हणजे तथाकथित 'खाल'च्या समजल्या वर्णातून आलेल्या आहेत. खालच्या थरात स्त्रियांना वावरण्याचा जो मोकळेपणा आहे, बंदिस्तपणाचा काच 'वरच्यां'पेक्षा अधिक सैल आहे, तो वरची प्रत्येक पायरी चढताना संकुचित होत होत गेलेला दिसतो.

.............................................................................................................................................

रविशकुमार या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

नजूबाईंचं लेखन भाषेच्या दृष्टीनं फार 'पॉलीश' केलेलं नसल्यानं कोणाला ते आवडणारही नाही. परंतु आदिवासी 'मावची' बोलीचा आविष्कार, शब्द, वाक्यं, त्यांचं जगणं, त्यांचं अनुभव विश्व, त्यांच्यातील ताणतणाव, आदिवासी संस्कृती, अस्सल देशी भान अशा कितीतरी गोष्टी यातून कळत जातात. म्हणजे मराठीला अपरिचित असं भावविश्व-अनुभवविश्व नजूबाईंच्या लेखनातून येतं. शिवाय कुठे डिप्लोमॅटपणा नाही. जे आहे ते नितळ. अल्पशिक्षित असल्या तरी पुस्तक करताना तीन-तीन, चार-चार वेळा त्याचं पुनर्लेखन केल्याशिवाय पुस्तक छापायची घाई त्यांनी केली नाही, ही गोष्ट लेखक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे.

जेमतेम चौथी शिकलेल्या नजूबाई या आदिवासी-दलित-शेतकरी-कष्टकरी सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीतील सच्च्या आणि लढाऊ कार्यकर्त्या आहेत. 'अब्राह्मणी साहित्य व कला महासभा' स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता. अतिशय साधं राहणीमान, चेहरा उन्हातान्हात काम करून रापलेला, आवडो न आवडो स्पष्ट बोलणाऱ्या. दोन तीन पुस्तकं येऊनही जाणीवपूर्वक कसलीही 'पोझ' घेणं नाही. पुस्तकांबद्दल विचारलंच तर म्हणतात- "मी जे समाजाकडून घेतलं, तेच मी समाजाला परत केलं. त्यात माझं असं काय होतं? ते आता समाजाचं झालंय. आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर अजून खूप काम करायचं बाकी आहे, आणखी लढे उभे करायचे आहेत."

नजूबाईंनी खेडोपाडी, वाडीवस्ती, पाडे, डोंगर माळरान पिंजून उन्हातान्हात, पावसापाण्यात रस्त्यांवर उतरून अनेक आंदोलनं केली आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यातही त्यांचा सहभाग होता. खऱ्या अर्थानं नजूबाई या रणरागिणी आहेत. आपल्याकडे गोदूताई परुळेकर, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अशा काही स्त्रियांनाच 'रणरागिणी' म्हणायचा प्रघात आहे की काय कळत नाही. सारखी सारखी यांचीच चर्चा केली जाते. माध्यमांना तर यांच्याशिवाय दुसऱ्या 'बहुजन' स्त्रिया दिसतच नाहीत.

असं असलं तरी कुठल्याही विद्यापीठीय चर्चाविश्वाच्या, तथाकथित अभिजन-बहुजन स्त्रीवादी चर्चाविश्वाच्या वर्तुळाबाहेर त्यांना ठेवलं गेलं. मराठी साहित्याच्या, लेखकांच्या, समीक्षकांच्या, माध्यमांच्या, (फुले ?)-आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या दलित चर्चाविश्वाच्या दृष्टीनं नजूबाई ‘आदिवासी आणि दलित’च राहिल्या. त्यांच्या लेखनाची चर्चा करावी असं कोणाला वाटलं नाही, की या बाईला बोलावून त्यांची भावना जाणून घ्यावी, असंही कोणाला वाटलं नाही. वाटत नाही.

नजूबाईंची ‘भिवा फरारी’ ही आदिवासी स्त्रीनं लिहिलेली भारतातील पहिलीच कादंबरी आहे. त्या अर्थानं त्यांचं महत्त्व अधोरेखित होतं. 'तृष्णा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. यातील 'अदोर' हा भाग स्वतंत्रपणे इंग्रजीमध्ये आलाय. एक कथासंग्रह आहे. नजूबाईंच्या लेखनाची प्रेरणा प्राच्यविद्यापंडित शरद पाटील हे आहेत. त्यामुळे या लेखनाचा पाया हा मातृसत्ता-स्त्रीसत्ताक हा आहे. त्याला समतेचा आधार आहे.

बहिणाबाई चौधरी, दुर्गाबाई भागवत, कमल देसाई, गौरी देशपांडे (काही पुस्तकं), मेघना पेठे (‘आंधळ्याच्या गायी’), नजूबाई गावित असे सन्माननीय अपवाद केले तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात मनावर घेऊन वेळ खर्चून वाचावं... पुन्हा पुन्हा वाचावं... अशी आश्वासक स्थिती नाही. ती व्हावी अशी अपेक्षा पल्लवित करू या.

............................................................................................................................................

नजूबाई गावित यांच्या ‘नवसा भिलणीचा एल्गार’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

............................................................................................................................................

लेखक सुशील धसकटे तरुण कादंबरीकार आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.

hermesprakashan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......