उदाहरणार्थ त्यांचं ‘ते’ असणं...
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
वासंती दामले
  • ज्येष्ठ पत्रकार सईद नक़वी
  • Sat , 22 October 2016
  • वासंती दामले Vasanti Damle Vinod Mehta Saeed Naqvi विनोद मेहता सईद नक़वी Being the Other बीइंग द अदर

सईद नक़वी यांचं ‘बीइंग द अदर’ हे नवं पुस्तक त्याच्या शीर्षकामुळे कोड्यात पाडतं. विनोद मेहता व सईद हे ला मार्तीनेरसारख्या, ब्रिटिशकाळापासून उच्चवर्गीयांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शाळेत, एकाच वर्गात शिकले, हे मेहतांच्या ‘लखनौ बॉय’ या आत्मचरित्रातून कळलं होतंच. दोघेही यशस्वी व प्रसिद्ध पत्रकार! त्यांची आत्मचरित्रं वाचताना त्यांच्यातील साम्य इथंच संपतं हे लक्षात येऊ लागतं. विनोद मेहता पंजाबी, परंतु फाळणीपूर्वीच त्यांचे वडील भारतात, लखनौला येऊन वसले. फाळणीचा त्यांचा अनुभव, त्यावेळी असंख्य नातेवाईक घरात होते आणि त्यांची आपापसातील फाळणीविषयीची बोलणी एवढाच सीमित होता. ही बोलणीसुद्धा कानावर पडली तेवढीच, कारण विनोद तेव्हा लहान होते. त्यामुळे नंतरही सुखी व स्वच्छंदी आयुष्य घालवण्यापलीकडे त्यांच्या आयुष्याबद्दल इतर काही कल्पना नव्हत्या. त्या काळातील वातावरणाचा परिणाम म्हणून ते उदारमतवादी, मानवतावादी झाले. यात लखनौच्या संस्कृतीचा हिस्साही असणार, कारण तिथला हिंदूही सवयीनं आदाब व खुदा हाफिज करणार. सहजतेनं त्याला अनेक शेर मुखोद्गत असणार. अदब व उर्दू भाषा या  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक हिस्साच असणार. त्याचबरोबर त्यापैकी काही कट्टर हिंदू जातीवादी व धार्मिकही असणार. यात त्यांना काही विसंगत वाटणारही नाही, कारण ते तसं नसतंही. धर्म व संस्कृती या बाबी वेगळ्या असतात हे त्यांना माहीत होतं.

नक़वींचं घर उच्चवर्णीय- सय्यद. त्यांच्या घरातील रीतभात आजूबाजूच्या वातावरणाला साजेशी. सईद लिहितात की, धर्म मुसलमान पण संस्कृती जास्त हिंदू. उदा. त्यांच्या घरात गर्भवती असली की, जी गाणी म्हटली जायची त्यापैकी त्यांच्या आईचं सर्वांत आवडतं गाणं होतं- ‘ अल्लामिया हमरे भय्याको का दियो नंदलाल’. अवधच्या इतर स्त्रियांप्रमाणे त्यांच्या घरातील स्त्रियाही कायम साडीत असायच्या. त्यांचं कुटुंब इराणहून आलेलं शियापंथीय. पण त्यांच्या आजीच्या पिढीच्या स्त्रिया घरात अवधी बोलायच्या. फारफार तर नंतरच्या पिढ्या औपचारिक बोलताना उर्दूचा वापर करत. त्यांच्या कुटुंबातील, पर्यायानं अवधी कुटुंबातील संस्कृतीचं वर्णन सईद यांनी फार मनोहारी केलेलं आहे. मेहता व नक़वी यांच्या अवधी संस्कृतीचं वर्णन वाचताना, साऱ्या भारतातच असलेल्या संस्कृतीच्या वैविध्याचं सहज भान येतं.

फाळणीचा परिणाम साहजिकच याही कुटुंबावर झाला, कदाचित जास्त झाला. जे कुटुंब स्थिर व घट्ट कौटुंबिक धाग्यानं बांधलं गेलं होतं ते अचानकपणे विभागलं गेलं आणि तेही फाळणीविषयी स्पष्ट आकलन न होता. ते स्पष्ट करताना नक़वी त्यांच्या नानीअम्माचं उदाहरण देतात. त्या कधी अवधच्या बाहेर गेल्या नाहीत. त्यांना पासपोर्ट हा प्रकारच समजायचा नाही. त्यांना हेही कळायचं नाही की त्यांच्या दोन मुलींनी परका देश- पाकिस्तान- राहण्यासाठी का निवडला? त्यांची इच्छा होती की, त्यांचं दफन मुस्तफाबादला व्हावं, पण त्या मुलींना भेटायला लाहोरला गेल्या असताना आजारी पडल्या. त्याच वेळी त्यांचा भारतीय पासपोर्ट संपला. ‘माझा भारतीय पासपोर्ट द्या’चा जप करत त्या वारल्या. त्यांना इकडं आणणं अशक्य होतं, त्यांचं तिकडंच दफन करावं लागलं. प्रथमपासूनच त्यांचा पाकिस्तानात मुलींचा विवाह करण्यास विरोध होता, पण मुंबईपेक्षा लाहोर जवळ आहे असं नकाशावर दाखवून त्यांना फसवण्यात आलं होतं. इतर अनेक पुस्तकांनीही फाळणीचं हे वास्तव मांडलं आहे.

कमलाबेन पटेल फाळणीनंतर कराचीत अपहरण केलेल्या स्त्रियांसाठी काम करत होत्या. त्याही हेच म्हणतात. के.ए. अब्बास आपल्या आत्मचरित्रात लिहितात की, त्यांच्या कुटुंबातील शिकलेल्या लोकांनी पाकिस्तानात जाणं मान्य केलं, कारण मुसलमानांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यानं पाकिस्तानात नोकरीत बढती लवकर मिळेल. पण अब्बासना ते म्हणाले, ‘घर विकणार नाही कारण निवृत्तीनंतर आपल्याच ‘भूमीत’ परत येणार.’ राही मासूम रझाही आपल्या गावातील मुसलमानांबद्दल हेच सांगतात. हे सर्व वाचताना वाटतं की, फाळणी ही काहींना लाभदायक असेल, परंतु असंख्यांची फसवणूकच झाली. अनेक कुटुंबं परत कधीच एकत्र येऊ शकली नाहीत. जमीन सुधारणा कायदा हा त्यांच्या दृष्टीतून त्यांच्यावर आणखी एक आघात झाला असं नक़वी यांचं म्हणणं आहे.

नक़वी यांनी जे वर्णन केलं आहे त्यावरून आपल्याला, ‘स्वत:च्या जगण्याच्या प्रेमात पडलेली जमात’ म्हणजे अवधी मुसलमान असं समजतं. त्यांची उर्दू भाषा, तिचे उच्चार, तहजीब इत्यादी. त्या लखनवी वागण्या-बोलण्यातलं मार्दव व अदबही टोकाची. दिवसभराचे त्यांचे उद्योग म्हणजे चटपटीत बोलत, शायरी पेरत, चतुर संभाषण करणं हेच असायचं. नक़वी म्हणतात, तसं सुखासीन आयुष्य व ऱ्हास यात फक्त एक बारीक रेषा असते. कुळे आणून द्यायची त्या पैशांवर यांची कालक्रमणा चालायची. नोकरी करण्याची मानसिकता वा योग्य शिक्षणाअभावी कुळकायदा झाल्यावर नक़वी यांच्या अनेक नातेवाईकांची परवड झाली.

स्वत:च्या संस्कृती व भाषेच्या आत्यंतिक अभिमानानं ज्या इंग्रजी शिक्षणाला आजवर विरोध केला, त्याच शिक्षणाची कास स्वातंत्र्यानंतर व जमीन सुधारणांमुळे उत्पन्न घटल्यानंतर नक़वी घराला धरावी लागली. सईद म्हणतात की, महाविद्यालयात त्यांच्याबरोबर आणखी दोन शिया विद्यार्थी होते. एक श्रीनगरचा व दुसरा बंगलोरचा. तेव्हा त्यांना जाणवलं की, लखनौचे शिया ही एक वेगळीच जमात आहे. त्यांच्या घरातच कधी नमाजी कट्टरपण नव्हतं. त्यासाठी ते सूफी संताच्या प्रभावाचं कारण देतात. त्यांच्या मते, सुफी संतांची अल्लाशी एवढी एकतानता झालेली असते की, नमाज, रोजे वा हजला ते बाह्य अवडंबर समजतात. 

अशा वातावरणात वाढलेला लेखक पुढे पत्रकारितेचा व्यवसाय स्वीकारतो आणि समाजाला सन्मुख जाऊ लागतो तेव्हा त्याला अनेक प्रश्न पडतात. जेव्हा धार्मिक दंगली घडतात तेव्हा त्याला त्या दंगलींच्या मुळाशी जावंसं वाटतं. तसं तो जातोही. त्यासाठी तो पुस्तकं वाचतो, दंगलींच्या जागांना भेट देतो. तो म्हणतो की, जिन्नांनी पाकिस्तानची मागणी केली, पण मुसलमानांना स्वतंत्र भारतात योग्य स्थान मिळावं यासाठी खेळलेली ती एक खेळी होती. आयेशा जलाल व अब्दुल कलम आझादांच्या पुस्तकाचा त्यासाठी ते आधार देतात. ते म्हणतात की, शेवटी जिन्नांपेक्षा पटेलच फाळणीला उत्सुक होते. त्यामुळे जिन्ना व मुस्लीम लीगपेक्षा, काँग्रेस व नेहरू-पटेलच फाळणीला जास्त जबाबदार आहेत. आजच्या हिंदुत्वाचा उदयही यामुळेच झाला आहे. इतिहासकार प्रा. बिपनचंद्र या युक्तीवादाशी असहमत होते. त्यांच्या मते धर्माचं राजकारण एकदा सुरू केलं की, त्याचा अंत आपल्या हातात नसतोच. मुस्लीम लीग व जिन्नांच्या राजकारणाचा अंत फाळणी हाच होता.

नक़वींनी मुरादाबादपासून ते २००२च्या दंगलींचा अभ्यास केला. त्याचा सविस्तर अहवाल या पुस्तकात दिला आहे. तो वाचनीय आहे. या दंगलींचा अभ्यास करताना त्यांना जाणवतं की, लहानपणापासून ते स्वत: अथवा त्यांच्या कुटुंबाला कधी भारतात परकं वाटलं नाही. अगदी फाळणी झाल्यावरही नाही. कारण फाळणीची मीमांसा करताना ते म्हणतात की, मुस्लीम लीग व पाकिस्तानला पाठिंबा देणारा वर्ग तालुकदार व जमीनदार यांचा होता. त्यांना स्वत:चं उच्च सामाजिक स्थान व जमीनजुमला अबाधित ठेवायचा होता. आजही पाकिस्तानच्या सत्ताधारी वर्गात हेच बहुसंख्येनं आहेत. नक़वींच्या मते, सामान्य मुसलमानांना गंडवण्यात आलं. (याची असंख्य उदाहरणं आहेत.) फाळणी नंतरही ते त्यांचं जीवन नेहमीसारखंच, म्हणजे इथंच त्यांचे पारंपरिक उद्योगधंदे सांभाळत जगत आले. पण हळूहळू दंगलींमुळे आपण ‘ते’ आहोत (त्याला नक़वी ‘other’ म्हणतात), अशी भावना व असुरक्षितता मुसलमानांच्या मनात येऊ लागली. नकवी म्हणतात, ही परकेपणाची भावना माझ्यासाठी लोकांच्या डोळ्यात मी पाहिली व त्याचं मला अपार दु:ख झालं.

हे पुस्तक नक़वीचे आरोपपत्र नाही तर कैफियत आहे. त्यासाठी स्वत:ची बाजू पटेल अशा युक्तीवादांसह त्यांनी मांडली आहे.

मेहता आणि नक़वी यांची पुस्तकं चित्तरंजक व माहितीपूर्ण आहेत. नक़वींनी स्वत:च्या बालपणाची माहिती सविस्तर दिली असली तरी नंतरच्या खाजगी आयुष्याविषयी फार काही लिहिलेलं नाही. मेहतांनी आवश्यक तेवढं लिहिलं आहे. मात्र गुगलवर दोघांवर बरीच माहिती आहे. दोन्ही पुस्तकं वाचनीय आहेत. (मेहतांचं दुसरं पुस्तक  ‘एडिटर अनप्लगड’हेही पत्रकारीतेविषयीच आहे.) पत्रकारितेच्या जगात आलेली ही दोन्ही पुस्तकं वाचनीय व विचारणीय आहेत. 

बिइंग द अदर : द मुस्लिम्स इन इंडिया - सईद नक़वी, अलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली, पाने - २५६, मूल्य - ५९९  रुपये.

 

लेखिका मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.

vasdamle@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......