यथार्थवादी भारतीय चित्रकलेच्या अभ्यासकाला या पुस्तकाची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही!
ग्रंथनामा - झलक
दीपक घारे
  • ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 01 September 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक दीपक घारे Deepak Ghare कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे रावबहादूर म. वि. धुरंधर

रावबहादूर म. वि. धुरंधर यांच्या ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या जे. जे. कला महाविद्यालयाचा सुरुवातीचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचं काल मुंबईत प्रकाशन झालं. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला समीक्षक प्रा. दीपक घारे यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित भाग.

.............................................................................................................................................

एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध आधुनिक सामाजिक, राजकीय विचारांच्या दृष्टीने महत्त्वाचा कालखंड मानला जातो. याच काळात वास्तुकला, चित्रकला अशा कलेच्या क्षेत्रांतही बरेच बदल घडून आले. कलाविचारांचा प्रभाव व भारतीय कलावंत व कारागिरांची एकोणिसाव्या शतकातील परिस्थिती यातून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची निर्मिती झाली. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून सुरू झालेल्या या कलापरंपरेचा १८९० नंतरचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर रावबहादूर म. वि. धुरंधर यांचं ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ हे आत्मकथन वाचायलाच हवं. यथार्थवादी भारतीय चित्रकलेच्या अभ्यासकाला या पुस्तकाची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे कलाविषयक मराठी आणि इंग्रजी लेखनात या पुस्तकाचा संदर्भ अनेकदा दिला जातो. चित्रकलेशी संबंधित समकालीन चित्रकारांचा, शिल्पकारांचा, तसंच जे.जे.मधील शिक्षकांचा यात उल्लेख आलेला आहे. शिल्पकार म्हात्रे यांनी विद्यार्थिदशेत केलेल्या ‘मंदिरपथगामिनी’ या शिल्पाची हकीकत त्यात आहे. जे. जे.मधला एकेचाळीस वर्षांचा प्रत्यक्षदर्शी आणि विश्वसनीय असा इतिहासच या आत्मकथनातून येतो.

लेखकांच्या जन्मापासून ते अखेरपर्यंतच्या सगळ्या घटना सांगणारं हे आत्मचरित्र नाही. आयुष्यातील बऱ्या-वाईट सत्यघटना सांगून आप्तेष्टांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा फक्त जे. जे.मधील कारकीर्दच लिहिण्याचा निर्णय धुरंधरांनी घेतला. जनरल नानासाहेब शिंदे यांचं ‘एका शिपायाचे आत्मवृत्त’ हे पुस्तक वाचून धुरंधरांना प्रेरणा मिळाली आणि ८ जानेवारी १८९० ते ३१ जानेवारी १९३१ पर्यंतची इत्थंभूत हकीकत धुरंधरांनी या आत्मवृत्तात मांडली. हे सर्व सत्य अनुभव आहेत असं धुरंधरांनी सुरुवातीच्या निवेदनातच सांगितलं आहे. या हकीकतीमध्ये जे. जे.चा अभ्यासक्रम, तिथलं वातावरण, तिथली कला-निर्मिती याबद्दल सविस्तर माहिती आहे आणि धुरंधरांची विद्यार्थिदशेपासून प्रतिष्ठित चित्रकारापर्यंतची होत गेलेली यशस्वी वाटचालही आहे. चित्रकलेवरील निष्ठा, कौटुंबिक जिव्हाळा आणि निवेदनातला प्रांजळपणा, यामुळे हे आत्मकथन रंजक आणि उद्बोधक झालं आहे.

शिवाय या आत्मकथनाला काही पत्रांची, छायाचित्रांची जोड दिलेली आहे. शेवटी तर अनेक समकालीन चित्रकारांची छायाचित्रं दिलेली आहेत. त्यातली काही प्रसिद्ध नावं सोडली तर इतरांची माहितीही आज उपलब्ध नाही. आत्मवृत्ताच्या दृष्टीनं या जंत्रीवजा संदर्भ साहित्याला फारसं महत्त्व नसलं तरी त्या काळचा दस्तऐवज म्हणून त्याला निश्चितच वेगळं महत्त्व आहे. अनुभवाची सत्यता आणि महत्त्वाच्या घटनांची, व्यक्तींची नोंद असाही एक उद्देश या आत्मवृत्तामागे दिसतो. धुरंधरांच्या या दृष्टिकोनामुळे या पुस्तकाला एक विश्वासार्हता प्राप्त झालेली आहे.

या पुस्तकाचा संदर्भ दृश्यकलेच्या इतिहासाच्या संदर्भात बरेचदा दिला जातो. आबालाल रहिमान, शिल्पकार म्हात्रे, सॉलोमन यांची कारकीर्द, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टवर आलेलं गंडांतर, दिल्ली डेकोरेशन यांबद्दलची माहिती या पुस्तकाच्या निमित्तानं प्रथम ग्रंथबद्ध झाली. जे. जे.चा अभ्यासक्रम, त्यात झालेले बदल याचीही माहिती धुरंधरांनी दिलेली आहे.

जे. जे.ची स्थापना कला आणि कारागिरीचं शिक्षण देण्यासाठी झाली. कालांतरानं चित्र, शिल्प विषयांना प्राधान्य देण्यात आलं आणि त्यातून व्यक्तिचित्रं, प्रसंगचित्रं, निसर्गचित्रं या प्रकारात प्रावीण्य मिळवणारे चित्रकार निर्माण झाले. धुरंधर शिकले, त्या काळात रेखांकनातील कौशल्य विकसित करण्यावर भर होता. त्यामुळे फ्री-हँड, पर्स्पेक्टिव्ह, शेडिंग फ्रॉम कास्ट (पुतळ्यावरून रेखांकन करणं), फॉलीएज (पानाफुलांचं रेखांकन करणं) असे विषय होते. या अभ्यासक्रमातून इमारतींच्या सुशोभिकरणाला लागणारं अलंकरणात्मक काम करणाऱ्या क्राफ्ट्समन्सची निर्मिती होण्याचीच शक्यता अधिक होती.

मानवी देहाची चित्रं काढण्याचा अभ्यास सुरुवातीला ग्रीक, रोमन पुतळ्यांवरून केला जात असे. नंतर लाइफ स्टडीसाठी मॉडेल बसवण्यात येऊ लागलं. कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी जे. जे.मध्ये न्यूड क्लास सुरू केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचं मानवी देहाचं चित्रण सुधारलं आणि त्याचा चांगला परिणाम एकूणच चित्रनिर्मितीवर दिसून आला. त्यानंतर म्युरल क्लास सुरू करण्यात आला. धुरंधरांनी या साऱ्या घडामोडींबद्दल लिहिलेलं आहे.

या पुस्तकातील लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा म्हणजे जॉन ग्रिफिथ्स आणि ग्लॅडस्टन सॉलोमन. बॉम्बे स्कूलच्या इतिहासात या दोघांनाही महत्त्व आहे. ग्रिफिथ्स यांनी केलेलं सर्वांत महत्त्वाचं काम म्हणजे विद्यार्थ्यांकडून करून घेतलेल्या अजिंठा चित्रांच्या प्रतिकृती. सुमारे बारा वर्षं हे काम चाललं होतं. पेस्तनजी बोमनजी यांचा या कामात मोठा सहभाग होता. धुरंधरांनी अजिंठा टूरचा किस्सा आपल्या आत्मवृत्तात सांगितला आहे. १८९५ मध्ये विद्यार्थ्यांची अभ्यास सहल अजिंठ्यास गेली होती. तेव्हा ग्रिफिथ्स यांनी धुरंधरांना अजिंठा गुंफांचा पॅनोरमा (विहंगम दृश्य) काढण्यास सांगितलं. टेकडीच्या कड्यावर जाऊन ते चित्र काढायचं होतं. ग्रिफिथ्स यांनी सोबतीला चार भालेवाले दिले होते. कडाक्याच्या थंडीत त्या एकांत जागी धुरंधरांनी तीन दिवस काम केलं. एके दिवशी दुपारी बारा वाजता वाघाची आरोळी ऐकू आली. धुरंधरांची भीतीनं गाळण उडाली आणि चित्र अर्धवट पुरं करून ते परतले. मुंबईला आल्यावर ग्रिफिथ्स त्यांच्यावर रागावले आणि कृतक कोपानं म्हणाले, “तुला वाघानं खाल्लं असतं, तरी काही कमी झालं नसतं! जा आता, मी ते पुरं करीन.” एवढं बोलून ते हसले.

ग्रिफिथ्स यांची दुसरी आठवण अशीच भावपूर्ण आहे. सकाळच्या वर्गात शिक्षकांनी कामात दिरंगाई केल्याबद्दल तक्रार केल्यामुळे ग्रिफिथ्स जरा जास्तच रागावून धुरंधरांना बोलले होते. त्याचा ‘सांत्वनरूपी उ:शाप’ म्हणून ग्रिफिथ्स दुपारच्या वर्गात आले आणि धुरंधरांच्या मागे येऊन उभे राहिले. ‘दॅट्स व्हेरी गुड’ असं कामाचं कौतुक करत बरोबर आणलेलं लिओनार्दो दा व्हिंचीचं चरित्र वाचायला देत म्हणाले, ‘हे काळजीपूर्वक वाचून पाहा, म्हणजे काम करण्याची निरंतर स्फूर्ती येऊन तुझा अभ्यास वाढेल.’ ग्रिफिथ्स सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना दिलेल्या निरोप समारंभाच्या वेळी ग्रिफिथ्स भावनावेगानं बोलू शकले नाहीत, सर्वांची अंत:करणं भरून आली आणि विद्यार्थिनी तर रडूच लागल्या असं धुरंधरांनी नमूद केलं आहे. धुरंधर रावबहादूर झाल्यानंतर ग्रिफिथ्स यांनी जे पत्र लिहिलं आहे, तेही सौहार्दपूर्ण आहे.

सर्वच इंग्रज अधिकारी चांगल्या स्वभावाचे होते असं नाही. इंग्रज अधिकाऱ्यांमधील हेवेदावे, संशयी वृत्तीचे नमुनेही धुरंधरांनी दिले आहेत. कलाशिक्षक व चित्रकार आगासकरांनी सेसिल बर्न्स यांचं उत्तम व्यक्तिचित्र केलं. त्यासाठी सिटींग देऊन सुधारणा करण्याच्या मिषानं बर्न्स यांनी ते चित्र ब्रशनं निकामी करून ठेवलं. शिवाय एक हिंदी चित्रकार आपलं व्यक्तिचित्र प्रदर्शनात ठेवत आहे, हे कमीपणाचं समजून बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात ते लावलं जाणार नाही अशी बर्न्स यांनी व्यवस्था केली. स्वत: सॉलोमन यांनाही ब्रिटिश शासनातील संबंधितांच्या राजकीय डावपेचांचा त्रास झाला. पण धुरंधरांचं आत्मकथन वाचून शेवटी संस्कार उरतो तो कलामंदिराचा आणि त्यात व्रतस्थपणे आणि आत्मीयतेनं काम करत राहिलेल्या कलाशिक्षकांचा.

सर्वांत अधिक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन. त्यांच्या काळात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. भारतीयत्व जपणारी कलाचळवळ मुंबईत सुरू झाली ती प्रिन्सिपॉल सॉलोमन यांच्यामुळे. जे. जे.च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या म्युरल्सच्या कामामुळे जे. जे.ला नाव मिळालं. वेम्बले, लंडन येथील प्रदर्शनात इंडियन रूम भारतीय कलाकृतींसह सादर करून भारतीय कलेचा पाश्चात्त्यांना परिचय करून दिला गेला तो सॉलोमन यांच्याच काळात. या निमित्तानं सॉलोमन यांनी ‘रिव्हायव्हल ऑफ इंडियन आर्ट’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं.

सॉलोमन यांच्यावर संकटंही अनेक आली. प्रशासकीय आणि धोरणात्मक अशा दोन्ही प्रकारची ही संकटं होती. १९२१ मध्ये स्कूल ऑफ आर्ट दुसरीकडे हलवून ती जागा लिलावात काढावी असा मुंबई सरकारचा प्रस्ताव होता. या विरोधात स्कूल ऑफ आर्टची बाजू मांडण्यास धुरंधरांनी सर्वतोपरी मदत केली आणि हा प्रस्ताव हाणून पाडण्यात आला. १९३२ मध्ये थॉमस रिपोर्टचा आधार घेऊन स्कूल ऑफ आर्ट बंद करण्याचा घाट घालण्यात आला, पण नामदार जयकर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभा बोलावण्यात येऊन हा निर्णय लोकांनी सरकारला मागे घ्यायला लावला.

सॉलोमन आणि धुरंधर यांच्यातलं नातं दृढ होत गेलं, ते या कसोटीच्या आणि आनंदाच्या प्रसंगांत धुरंधरांनी मनापासून जी साथ दिली त्यामुळे. १९१९ मध्ये प्रिन्सिपॉल म्हणून सॉलोमन प्रथम आले तेव्हा धुरंधर या माणसाशी आपलं कितपत जुळेल याविषयी साशंक होते. पण लवकरच दोघांचं गोत्र जुळलं आणि सहकारी, सल्लागार, सहृदय आणि कलावंत या नात्यानं धुरंधर आणि सॉलोमन यांच्यात प्रेमादराचं वेगळं नातं निर्माण झालं. धुरंधरांनी जी पत्रं छापली आहेत, त्यांत सॉलोमन यांनी लिहिलेल्या पत्रांची संख्या सर्वाधिक आहे. या पत्रांमधून कधी अधिकारी या नात्यानं विनंतीवजा सूचना आहेत, कधी सल्ला विचारलेला आहे, कधी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. रावबहादूर किताब मिळाल्यानंतर पाठवलेल्या अभिनंदनाच्या पत्रात चारच ओळी आहेत, पण त्यातून धुरंधरांबद्दलची आपुलकी शब्दाशब्दातून व्यक्त होते. सॉलोमन आणि धुंरधर यांच्या व्यक्तिगत संबंधांइतकीच सॉलोमन यांना भारतीय कलेबद्दल आपुलकी होती आणि भारतीयत्व जाणून घेण्याच्या दृष्टीने धुरंधर हे महत्त्वाचा दुवा होते, हेही इथं लक्षात घ्यायला हवं.

धुरंधरांनी आपल्या आत्मकथनामध्ये अंबिका या त्यांच्या कन्येचा उल्लेख केला आहे. अंबिका धुरंधर या जे. जे.मध्ये विद्यार्थिनी होत्या आणि स्त्री चित्रकार म्हणून त्या नावारूपाला आल्या. १९३१ मध्ये पदविका अभ्यासाम पूर्ण करून त्यांनी परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला. जे. जे.मध्ये धुरंधरांच्या काळात शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या फारच कमी होती. धुरंधरांच्या वर्गात तीन विद्यार्थिनी होत्या. मिस कामा, नाझर व डायमलर. या तिघीही ‘मठ्ठ डोक्याच्या’ होत्या आणि शिक्षक व विद्यार्थ्यांकडून त्या करेक्शन व काम करवून घेत असं धुरंधरांनी नमूद केलं आहे! या व्यतिरिक्त एक अत्यंत खटपटी विद्यार्थिनी म्हणून मिस बाईआई पालनकोट हिचा उल्लेख येतो. धुरंधरांच्या काळातल्या कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या स्त्रिया मुख्यत: दोनच. अंबिका धुरंधर आणि अँजेला त्रिंदाद.

धुरंधर यांनी पेंटिंग्जव्यतिरिक्त दिनदर्शिका, पोस्टर्स, पुस्तकांची-मासिकांची मुखपृष्ठं यासाठीही चित्रं केली. राजा रविवर्मा यांच्याप्रमाणे धुरंधरांची चित्रं मुद्रित स्वरूपात घरोघरी पोचली. रेल्वेसाठी त्यांनी पोस्टर्स केली. या पुस्तकात धुरंधरांनी संपादक मित्रांचा परिचयदेखील दिला आहे. त्यात शं. वा. किर्लोस्कर, ‘विविधवृत्त’ साप्ताहिकाचे रा. का. तटनीस, ‘विसमी सदी’चे संपादक महंमद अल्लारखीया शिवजी यांचा समावेश आहे. या सर्वांसाठी धुरंधरांनी आपली चित्रं दिली. ग्रिफिथ्स यांच्या ‘मोनोग्राम ऑन कॉपर अँड ब्रास पॉटरी’ लेखासाठी धुरंधरांनी जवळपास शंभर चित्रं काढली होती. सी. ए. किंकेड यांच्या ‘डेक्कन नर्सरी टेल्स’, ‘टेल्स ऑफ किंग विामादित्य’ या पुस्तकांसाठी त्यांनी चित्रं काढली. ‘मेघदूत’, उमर खय्यामच्या रुबाया यांसाठीही धुरंधरांनी चित्रं करून दिली. पुस्तकात शेठ पुरुषोत्तम विश्राम मावजी यांचा उल्लेख आला आहे. धुरंधर यांनी शेठ मावजी यांना जे. जे.च्या ग्रंथालयातील पुस्तकं वाचायला दिली असा सेसिल बर्न्स यांनी वृथा संशय घेतला होता तो किस्साही पुस्तकात आहे. या शेठ मावजींसाठी धुरंधरांनी पौराणिक विषयांवर शेकडो चित्रं काढली व शेठजींनी ‘सुवर्णमाला’ या मासिकात ती प्रसिद्ध केली. धुरंधरांचं हे उपयोजित कलेतील काम स्वतंत्रपणे अभ्यासावं इतकं महत्त्वाचं आहे. त्या काळात अभिजात कला आणि उपयोजित कला असा भेद केला जात नव्हता. धुरंधर हे महाराष्ट्रातील उपयोजित कलेच्या क्षेत्रात काम करणारे आद्य चित्रकार म्हणावे लागतील.

‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’मध्ये आलेला जे. जे. आणि पर्यायानं बॉम्बे स्कूलचा आलेला इतिहास पाहिला आणि म. वि. धुरंधर यांचा चित्रकार, कलाशिक्षक म्हणून झालेला व्यक्तिगत प्रवासही पाहिला. आज आपण जेव्हा हे पुस्तक वाचतो तेव्हा त्याबद्दल काय वाटतं? एकतर त्याची रचना, पुस्तकाच्या शेवटी दिलेली छायाचित्रं, पत्रव्यवहार आणि गौरवग्रंथात असावीत तशी धुरंधरांच्या चाहत्यांनी केलेली पद्यरचना हा घाट आता कालबाह्य झालेला आहे. पण या घाटामुळे ग्रंथबद्ध झालेली माहिती ही धुरंधरांचा काळ, त्यांचे समकालीन चित्रकार आदी समजून घेण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. धुरंधरांनी साऱ्या घटना तारीखवार आणि नेमकेपणानं दिलेल्या आहेत. त्यामुळे एक संदर्भग्रंथ म्हणून त्याचं मोल मोठं आहे. अन्यथा ग्रिफिथ्स, सॉलोमन अशा महत्त्वपूर्ण व्यक्तींची माहिती, त्यांची छायाचित्रं अन्यत्र कुठे मिळाली असती? त्या काळच्या कलाशिक्षणाचा एक दस्तऐवज म्हणून त्याचं महत्त्व वादातीत आहे.

धुरंधरांची भाषा आजच्या काळाच्या तुलनेत थोडीशी भाबडी, आदबशीर आणि लीन वाटली तरी त्यातल्या भावनेच्या ओलाव्यामुळे ती आपल्याला चटकन भावते. धुरंधर हे बालगंधर्वांच्या युगातले असल्यानं बालगंधर्वांच्या भाषेची इथं आठवण होते. धुरंधर यांच्या अंगी विनोदबुद्धी असल्यानं त्यांच्या निवेदनात रंजकता आली आहे. स्वत:च्या फजितीचे प्रसंगही त्यांनी निर्मळपणे सांगितले आहेत. धुरंधरांच्या व्यक्तिमत्त्वातला भारदस्तपणा आणि आब त्यांच्या या आत्मकथनाच्या शैलीत पुरेपुर उतरलेला आहे.

हे पुस्तक वाचत असताना आपण व्हिक्टोरियन संवेदनशीलतेवर पोसलेल्या, ब्रिटिशांच्या वासाहतिक साम्राज्यातल्या स्वप्निल जगात वावरत आहोत असं वाटत राहतं. आपण आपल्या कलानिर्मितीत मग्न राहावं, कलासक्त राज्यकर्त्यांची मर्जी संपादन करावी आणि समाजात चित्रकार म्हणून मान्यता मिळवावी इतकंच उद्दिष्ट या काळातल्या चित्रकारांसमोर होतं. भोवतालचं जग झपाट्यानं बदललं तरी धुरंधर मात्र या जगातच कायम राहिले. ‘कलामंदिर...’ हा त्याचा बिनतोड पुरावा आहे.

या पुस्तकाची इतक्या वर्षांमध्ये नवी आवृत्ती निघालेली नव्हती. विस्तृत टिपांसह आता ती प्रकाशित होत आहे.

.............................................................................................................................................

‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4521/Kalamandiratil-Ekechalis-Varshe

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......