परकीय जीवसृष्टीशी संवाद साधता येईल का?
ग्रंथनामा - झलक
जयंत नारळीकर
  • ‘विज्ञानविश्वातील वेधक आणि वेचक’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 13 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक डॉ. जयंत नारळीकर विज्ञानविश्वातील वेधक आणि वेचक

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं ‘विज्ञानविश्वातील वेधक आणि वेचक’ हे नवंकोरं पुस्तक नुकतंच साकेत प्रकाशन, औरंगाबाद यांच्यावतीनं प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातील एक प्रकरण...

.............................................................................................................................................

‘परकीय जीवसृष्टीशी संवाद साधता येईल काय?’ या विषयावर वेळोवेळी चर्चा होत असते. ‘स्वत:वरून जगाची परीक्षा’ हे सूत्र त्याच्या मुळाशी आहे. आपल्या आकाशगंगेत १०० अब्जांहून जास्त तारे आहेत. त्यांपैकी १० टक्के सूर्यासारखे मानले, तरी आकडा दहा अब्जांच्या घरात जातो. आता अनेक ताऱ्यांभोवती ग्रह (अथवा ग्रहमाला) सापडले आहेत व त्यात पृथ्वीसारखं जीवसृष्टीला पोषक वायुमंडळ, पाणी, प्रकाश आदी असणारे ग्रहही असावेत, असं खगोलशास्त्रज्ञ सांगतात. खुद्द आपल्या जीवसृष्टीच्या मुळाशी असलेल्या डीएनए रेणूचे घटकरेणू आकाशगंगेच्या विविध भागांत ताऱ्यांदरम्यानच्या विस्तीर्ण प्रदेशात सापडत आहेत. अशा विज्ञानसंमत पुराव्यामुळे वरील प्रश्न विचारणं शक्य होतं. अर्थात यामागची भूमिका अशी की, जेव्हा ग्रहाचं पर्यावरण पोषक असेल आणि त्याला त्याच्या ताऱ्यापासून योग्य प्रमाणात ऊर्जा मिळत असेल, तेव्हाच जीवसृष्टी ग्रहावर नांदते.

एका दृष्टीनं परकीय जीवसृष्टीचं हे चित्र फारसं कल्पक नाही. आपल्याला माहीत असलेल्या एकमेव जीवसृष्टीवरून ते रेखाटलेलं आहे. एखादी वस्तू हरवली तर ती शोधताना प्रकाशित जागेतच पाहायला हवी; कारण अंधारात पाहणं शक्य नाही! यासंदर्भात आपल्या शोधावर सुरुवात करताना मर्यादा येत असली, तरी सुरुवात करताना सोपं आणि मर्यादित लक्ष्य असलेलं बरं.

प्रत्यक्ष अवकाश प्रवास अशक्यप्राय

आपण असं समजून चालू की, आपल्यापासून सहा प्रकाश वर्षं अंतरावर एक प्रगत जीवसृष्टी आहे. ‘प्रकाशवर्ष’ हा पल्ला प्रकाशकिरणं वर्षभरात सर करतात... म्हणजे सुमारे दहा हजार अब्ज किलोमीटर. ‘स्टार ट्रेक’सारखी टीव्ही मालिका पाहणाऱ्याला वाटेल की, आकाशयानातून अंतराळवीरांना शोधासाठी पाठवावं; पण शाळेतलं अंकगणित या सूचनेचा निकाल लावू शकेल. आपल्या तंत्रज्ञानात थोडी भर टाकली, तरी चंद्रापर्यंत जायला एक दिवस लागेल. पृथ्वी-चंद्र हे अंतर प्रकाश सव्वासेकंदात सर करतो. त्याउलट सहा प्रकाश वर्षं हे अंतर प्रकाश सहा वर्षांत पुरं करतो. एका वर्षात सुमारे तीन कोटी सेकंद असतात... म्हणजे सहा वर्षांत १८ कोटी. याचा अर्थ ही प्रगत जीवसृष्टी चंद्राच्या तुलनेत आपल्यापासून सुमारे १५ कोटी पटींनी लांब अंतरावर असेल. याचा अर्थ, आपल्या आजच्या तंत्रज्ञानावरून अंदाज बांधला, तर आपल्याला त्या ताऱ्यांकडं/ग्रहाकडं जायला १५ कोटी दिवस लागतील. म्हणजे जवळपास चार लाख वर्षं! जाऊन-येऊन आठ लाख वर्षं. इतका दीर्घ कालखंड आपले अंतराळवीर जिवंत कसे राहतील? जरी त्यांना गोठलेल्या अवस्थेत इतका काळ जिवंत ठेवता आलं, तरी ते परतल्यावर आठ लाख वर्षांनी त्यांना ओळखणारा कोण असेल?

प्रोजेक्ट डिडॅलस

अर्थात मानव-अंतराळवीर निकटच्या भविष्यात तरी परकीय जीवांशी संपर्क साधू शकणार नाहीत; पण ‘ब्रिटिश इंटर प्लॅनेटरी सोसायटी’नं (BIPS) कागदावर तरी शक्य होईल, अशी योजना कार्यान्वित केली. (ते वर्ष होतं १९७३-७८8 दरम्यानचं. आज तशी योजना अधिक प्रगत तंत्रज्ञान विचारात घेऊ शकेल!) ‘प्रोजेक्ट डिडॅलस’ असं नाव असलेल्या या योजनेत बर्नार्डच्या ताऱ्याभोवती संभाव्य ग्रहावरील अनुमानित सजीवांशी संपर्क साधायचा होता. बर्नार्डचा तारा सुमारे सहा प्रकाश वर्षं अंतरावर आहे, तेव्हा तिथं प्रकाश सहा वर्षांत पोहोचेल. योजनेप्रमाणे अणुऊर्जा वापरून प्रकाशाच्या अष्टमांश वेगानं जाणारं अंतराळयान बनवायचं होतं. BIPS च्या लेखी असं यान बनवणं हे आधुनिक तंत्रज्ञानाला शक्य आहे. हे यान जायला ४८ वर्षं व परतायला ४८ वर्षं... म्हणजे साधारणत: १०० मानवी वर्षांचा कालखंड ते घेणार. यानात तरुण स्त्री-पुरुषांचा एक समूह असणार. त्यांची आपापसात लग्नं होऊन पुढं त्यांची प्रजाही लग्न करून बर्नार्ड ताऱ्याकडं सुखरूप पोहोचेल आणि नंतर ती पृथ्वीवरही परतेल! केवळ तंत्रज्ञानच नव्हे; तर मानवी जीवनाच्या विविध बाबींचा विचार करून ही योजना आखण्यात आली आहे. प्रकाशवेगाच्या अष्टमांशापर्यंत यान चालवत न्यायला इंधन किती लागेल? BIPSच्या लेखी जगातल्या अण्वस्त्रांचे संपूर्ण साठे जेमतेम पुरतील इतकं ! अर्थात, आत्मघातकी शेवटापासून सुटका झाल्याचा आनंद पृथ्वीवरच्या मानवांना लाभेल, ही एक जमेची गोष्ट नव्हे का?

रेडिओ संदेश

पण या मार्गानं आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळायला १०० वर्षं लागणार! त्याहून अधिक सुटसुटीत आणि बिनखर्चिक मार्ग म्हणजे सजीव असण्याची संभाव्य ठिकाणं निश्चित करून तिकडं रेडिओ-संदेश पाठवणं. जर प्रगत सजीव तिथं असले आणि आपला संदेश ‘वाचू’ शकले, तर बहुधा त्यांचे उत्तर येईल. आपला शोध साधारण १०-१५ प्रकाश वर्षं इतक्या अंतरापर्यंत मर्यादित ठेवला, तर २०-३० वर्षांत उत्तर यावं. यासाठी रेडिओ वेव्हलेंथ कोणती वापरावी? आणि संदेश कुठल्या भाषेत, कसा असावा?

वैज्ञानिकांनी अनेक पर्याय विचारात घेऊन शेवटी २१ सेंटिमीटर लांबीच्या रेडिओलहरींना शोधकार्यासाठी प्राधान्य दिलं. या लहरी हायड्रोजन अणूच्या विद्युतभाररहित रूपातून स्वाभाविकरीत्या बाहेर पडतात आणि त्या संपूर्ण आकाशगंगेत असल्यामुळे आपल्याप्रमाणे परकीय सजीवांनाही माहीत असणार. अर्थात त्यांचं अंकगणित आणि मोजमापाचं एकक वेगळं असेल; पण ज्या लांबीला आपण ‘२१ सेंटिमीटर’ म्हणतो ती लांबी वेगळ्या मापकात त्यांना परिचित असणार. त्यामुळं ते जर ‘परकीय सजीवां’चा शोध लावण्यासाठी आपल्या प्रमाणेच रेडिओ-लहरी वापरत असतील, तर आपल्याप्रमाणेच या लांबीला प्राधान्य देतील. हा एक फायदा! दुसरा फायदा म्हणजे, या लहरी लांब पल्ले गाठू शकतात. वाटेत त्यांचं शोषण बहुधा होत नाही आणि तिसरा फायदा म्हणजे या लहरींभोवती गोंगाट कमी असल्यानं त्यांच्याद्वारे पाठवलेला संदेश स्पष्ट कळू शकेल.

अर्थात, वरील दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात पृथ्वीवरची कुठलीही विद्यमान भाषा अयोग्य ठरते. परकीयांशी संपर्क साधायचा असेल, तर गणित आणि विज्ञान यांची भाषा सोईची असते. उदाहरणार्थ आपण (मोर्स कोडसारखं माध्यम वापरून) जर खालील संख्यांचा अनुक्रम पाठवला : २, ३, ५, ११, १३, १७, १९ तर यापुढची संख्या कुठली? अविभाज्य संख्यांची माहिती असलेला सजीव ताबडतोब कळवेल ‘२३’ हे उत्तर!

अशा सांकेतिक पद्धती वापरून संदेश पाठवले जातात व त्यातून गणित आणि विज्ञानातली तथ्यं कळवता येतात. खगोलातल्या गोष्टींची माहितीही देता येते. जर परकीय सजीव आपल्या इतका प्रगत असेल तर उलट संदेश पाठवेल. हे संदेशाचं आदान-प्रदान कुठून व्हावं?

रेडिओ-दुर्बिणी आकाशातल्या रेडिओ-स्रोतांकडून येणारे प्रारण गोळा करतात. त्या रेडिओ-संदेश प्रक्षेपणासाठीही वापरता येतात. असे काम करणारी सर्वांत मोठी दुर्बीण अरीसिबो, पोर्टोरिकोमध्ये आहे. तिच्या ‘डिश’चा व्यास ३०० मीटर आहे. पृथ्वीच्या पोटात खोदून ही डिश बसवली आहे. इथून संदेश पाठवले; पण त्यांची उत्तरेही आलीत का? ती कुठल्या उपकरणात मिळणार?

उत्तर आलं तर ते रेडिओ-लहरींच्या गोंगाटात दडलेलं असेल. ज्याप्रमाणे घरगुती टीव्ही सेट १००-१००० चॅनल वापरतो, तसे या उपकरणात दशलक्ष चॅनल असतात आणि त्यातून येणारा गोंगाट ‘ऐकणारा’ संगणक असतो. सर्व चॅनल एकाच वेळी तपासता येतात आणि अमुक एका चॅनलमधल्या गोंगाटात एक सिग्नल दडला आहे, असं संगणकानं सांगितलं, तर त्या चॅनलवर आपलं लक्ष केंद्रित करून त्याची सखोल परीक्षा करता येते. अद्याप ओळखू येईल असा संदेश मिळालेला नाही! पण तो जेव्हा केव्हा येईल, तेव्हा तो क्षण मानवाच्या इतिहासात अतिमहत्त्वाचा ठरेल; कारण विश्वात आपण एकटे नाही, याची पहिल्यांदा जाणीव करून देणारा तो क्षण असेल. या शतकात हा क्षण येऊ शकेल! निदान आपण तशी आशा बाळगू या!

.............................................................................................................................................

डॉ. जयंत नारळीकर यांच्या या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4442

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......