तरंग अंतरंग - पर्यावरणाच्या प्रश्नांचं अचूक भान जागवणारं पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
वर्षा गजेन्द्रगडकर
  • ‘तरंग-अंतरंग’चं मुखपृष्ठ
  • Fri , 25 May 2018
  • ग्रंथनामा शिफारस तरंग-अंतरंग Tarang Antarang संतोष शिंत्रे Santosh Shintre

पत्रकार संतोष शिंत्रे यांचं ‘तरंग-अंतरंग’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. देशातील आणि जागतिक पातळीवरील पर्यावरणाची रोखठोक चिकित्सा करणाऱ्या या पुस्तकाचे परीक्षण

.............................................................................................................................................

भारतासह सगळ्याच विकसनशील देशांमधलं पर्यावरणीय वास्तव गेल्या अडीच-तीन दशकांपासून फार वेगानं बिघडत चाललं आहे. जागतिक आणि स्थानिक अशा दोन्ही पातळ्यांवरच्या प्रश्नांची गुंतागुंत आणि गांभीर्य जसजसं वाढत चाललं आहे, तशी भारतातली पर्यावरणाच्या प्रश्नांविषयीची राजकीय अनास्था आणि सर्वसामान्य नागरिकांची उदासीनताही वाढत चालली आहे. मात्र ही कोंडी फोडण्यासाठी जे मोजके मराठी अभ्यासक सातत्यानं आणि पोटतिडकीनं लिहीत राहिले आहेत, लेखनातून सामान्य माणसापर्यंत पर्यावरणाच्या प्रश्नांचं नेमकं स्वरूप पोचवत आले आहेत त्यापैकी संतोष शिंत्रे एक आहेत. ‘तरंग-अंतरंग’ हे त्यांचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तकही समकालीन पर्यावरणाची चिकित्सा करताना तुमच्या-माझ्या रोजच्या जगण्यातले अग्रक्रम अधिक निसर्गस्नेही करणारं आहे.

कोणे एकेकाळी मुख्यत: मानवी जीवनशैलीशी निगडीत असलेल्या निसर्ग-पर्यावरण या विषयाची व्याप्ती आता कित्येक पटींनी वाढली आहे. शास्त्र म्हणून अनेक विद्याशाखांना कवेत घेणारे या विषयाचे स्पष्ट आणि अस्पष्ट असे अनेक पदर आपल्या रोजच्या जगण्याला थेट छेद देत नसले तरी अप्रत्यक्षपणे ते माणूस आणि निसर्ग यांच्यातल्या नात्यावर घाला घालताहेत. या असमतोलाची किंमत आपण अनेक प्रकारे मोजतो आहोत. आरोग्यापासून उपजीविकेपर्यंत अनेक बाबींना निर्माण झालेले धोके याचेच निदर्शक आहेत. मात्र सामान्य माणसाची या बाबतीतली प्रवाहपतित अवस्था, उदासीनता आणि निष्क्रियता अधिक चिंताजनक आहे. ‘तरंग-अंतरंग’नं पर्यावरणाच्या अनेक समकालीन प्रश्नांचा वेध घेताना भारतातली निसर्ग-पर्यावरणविषयक राजकीय अनास्था आणि सर्वसामान्य नागरिकांची अलिप्तता यावरही बोट ठेवलं आहे.

या पुस्तकाचे एकूण चार विभाग आहेत. पहिल्या ‘तरंग’ या विभागात मुख्यतः भारतीय पर्यावरणविषयक घटना, निर्णय, प्रक्रिया यांच्याविषयीचं चिकित्सक भाष्य आहे. अर्थसंकल्पातल्या पर्यावरणासाठीच्या तरतुदींपासून व्याघ्रगणनेमागचं वास्तव, पर्यावरणविषयक जागतिक परिषदांचं फलित, जागतिक पर्यावरण निर्देशांकातल्या भारताच्या स्थानाची चिकित्सा, एन्व्हिरॉनमेंटल अमेंडमेंड बिलाचा भारतीय निसर्ग-पर्यावरणावर होणारा परिणाम अशा अनेक विषयांची परखड मांडणी या विभागात केली आहे. ‘अंतरंग’ या दुसऱ्या विभागात हरित राजकारणासारखी एखादी संकल्पना, तथाकथित व्यवसायसुलभतेचा निसर्गस्रोतांवर होणारा परिणाम, पुस्तकं आणि इ पुस्तकं यांचं पर्यावरणाच्या दृष्टीनं तौलनिक मूल्यमापन, पुणे शहरातली पर्यावरणीय कृतिशीलता अशा एरवी ढोबळमानाने माहीत असणाऱ्या विषयांचं सखोल विवेचन समाविष्ट आहे. तिसऱ्या ‘परिचय’ विभागात निसर्ग-पर्यावरणाच्या क्षेत्रात आश्वासक काम करणाऱ्या काही व्यक्ती, संस्था आणि समूह यांचा परिचय आहे. निसर्ग रक्षण-संवर्धनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल आणि आज या क्षेत्रावर आलेलं मळभ दूर होऊ शकतं, असा विश्वास त्यांच्या मनात जागवायला मदत होईल, अशी अपेक्षा आहे. चौथ्या ‘चिंतन’ विभागात मराठी साहित्य आणि पर्यावरण, पर्यावरण अभ्यासक दिलिप कुलकर्णी यांच्या लेखनातली वैचारिक मांडणी यांसह लेखकाची पर्यावरण पत्रकारितेची दोन दशकांची वाटचालही उमटली आहे.

या पुस्तकाचा मुख्य भर भारतीय उपखंडावर असला तरी जागतिक पातळीवरच्या पर्यावरणीय वास्तवाचं भान लेखकाच्या मनात सतत जागं असलेलं दिसतं. शिवाय पर्यावरण हा केवळ चर्चा-परिसंवादापुरता मर्यादित विषय नाही, हे लक्षात घेऊन भारतीय निसर्ग-पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी व्यापक जनाधार उभा करण्याची गरजही लेखकानं अधोरेखित केली आहे. पर्यावरणाच्या जागतिक प्रश्नांची झळ स्थानिक लोकसमूहांना कशी बसते आणि त्यांच्यापुढे अस्तित्वाचाच प्रश्न कसा उभा राहतो, हेही ‘तरंग-अंतरंग’नं स्पष्ट केलं आहे. निसर्गाचं शोषण करून केला जाणारा विकास हा निसर्ग आणि माणूस या दोहोंच्या भविष्यासाठी लाभदायक नाही, हे बजावून सांगताना पर्यावरण रक्षणाचं नाव पुढे करून आखलेली सरकारी धोरणं, कायदे प्रत्यक्षात अनेकदा निसर्ग-पर्यावरणाचा घास कसा घेतात, राजकारणी आणि धनदांडगे यांच्या युती निसर्ग ओरबाडून स्वतःचे खिसे कसे गबर करतात, चोरटा व्यापार, शिकारी यामुळे वन्यजीवांच्या हत्या कशा होतात, आणि विकासाच्या नावाखाली भारतीय निसर्गावर सातत्यानं घाले कसे घातले जातात, प्रभावी असलेले कायदे कडक अम्म्मल्बजव्नीच्य अभावी कसे निष्प्रभ होतात, याचाही उहापोह पुस्तकात अनेक ठिकाणी आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे आवश्यक आकडेवारी आणि पुरेशा संदर्भांची जोड देत लेखकानं आपली भूमिका मांडली आहे. वरवर पर्यावरणपूरक वाटणाऱ्या कायद्यातल्या तरतुदी किंवा धोरणं शाश्वत विकासाला कशी मारक आहेत, याकडे लक्ष वेधण्याचं काम ‘तरंग अंतरंग’नं केलं आहे आणि प्रस्थापित व्यवस्थांना जाबही विचारला आहे.

‘तरंग-अंतरंग’मधले बहुतेक सगळे लेख पूर्वप्रकाशित आणि वृत्तपत्रीय असले तरीही त्यात तात्कालिकता नावापुरती आहे. शिवाय आवश्यक तिथे लेखनोत्तर काळातल्या घटना/ बदल/ कृती लेखकानं आवर्जून नोंदवल्या आहेत. पर्यावरणाच्या प्रश्नांची साक्षेपी जाण, निसर्गविषयक संवेदनशीलता असूनही त्याच्या रक्षणासाठी समाजमन जागविण्याची गरज ओळखून वापरलेली रोखठोक, निर्भीड शैली आणि कृतिशीलतेचा आग्रह ही ‘तरंग अंतरंग’ मधल्या लेखनाची वैशिष्ट्यं आहेत.

प्रातिनिधिक मराठी साहित्यात आजवर उमटलेले पर्यावरण हा विवेचक लेख ही या पुस्तकाची विशेष जमेची बाजू म्हणावी लागेल. इंग्रजी राजवट भारतात स्थिरावल्यापासून म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीपासून २०१७ पर्यंतच्या म्हणजे जवळजवळ १५० वर्षांच्या कालखंडातल्या मराठी साहित्याचा लेखकानं निसर्ग-पर्यावरणाच्या संदर्भात धांडोळा घेतला आहे. कथा, कादंबरी, कविता यासारख्या लोकप्रिय साहित्य प्रकारांपासून पासून कोश आणि निसर्ग-पर्यावरणालाच वाहिलेल्या अलीकडच्या गंभीर लेखनापर्यंतचा मराठी साहित्याचा प्रवास निसर्ग-पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांनी उलगडून दाखवला आहे.

समकालीन पर्यावरणाची चिकित्सा करणारं हे पुस्तक पर्यावरण अभ्यासक आणि विद्यार्थी, निसर्गप्रेमी, माध्यम प्रतिनिधी, या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्वाचं आहे. उत्तम आशयाला मिळालेली उत्तम निर्मितीमूल्याची जोड लक्षात घेण्याजोगी आहे. त्यामुळे मुखपृष्ठ आणि मांडणी करणारे राजू देशपांडे आणि शेखर गोडबोले यांनाही श्रेय द्यायला हवं. वाचनाबरोबर कृतीला प्रेरणा देणाऱ्या या पुस्तकाला सुजाण मराठी वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असं वाटतं.

............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4414

............................................................................................................................................

लेखिका वर्षा गजेन्द्रगडकर पुणेस्थित असून सामाजिक, पर्यावरणविषयक आणि ललित लेखन करतात.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Fri , 25 May 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......