साडेमाडे नेमाडे
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
संपादक अक्षरनामा
  • भालचंद्र नेमाडे
  • Sat , 28 April 2018
  • ग्रंथनामा जागतिक पुस्तक दिन World Book Day २३ एप्रिल 23 April Bhatchandra Nemade

२३ एप्रिल हा जगभर ‘जागतिक ग्रंथ दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं हा विशेष लेख.

काही महिन्यांपूर्वी कादंबरीकार, समीक्षक आणि कवी डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्य अकादमी या राष्ट्रीय पातळीवरील साहित्यसंस्थेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर महाराष्ट्रातल्या काहींना असुरी आनंद झाला. त्यांनी आपल्या भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खाजगीत, प्रसारमाध्यमांकडे आणि सोशल मीडियावर व्यक्त केल्या. त्या पार्श्वभूमीवर नेमांड्यांविषयी...

.............................................................................................................................................

मराठीच्या अभिजाततेची चर्चा चालू असताना आणि त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने साहित्य अकादमीकडे पाठवलेला असतानाच २०१५ साली डॉ. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ‘ययाती’कार वि. स. खांडेकर, ‘विशाखा’कार कुसुमाग्रज आणि यंत्रयुगाचा पुरस्कार करणारे विंदा करंदीकर या त्रिमूर्तीनंतर नेमाडे यांना ज्ञानपीठ या भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, हे अतिशय उचित झाले. नेमाडे यांच्यामुळे मराठीतील ज्ञानपीठ त्रिकोनाला चौथा कोन मिळून तो समभूज कोनात बदलला.

नेमाडे यांना ज्ञानपीठ जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांच्याविषयी आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. सलमान रश्दी यांनी ‘ग्रम्पी ओल्ड बास्टर्ड’ असा उल्लेख करत नेमाडे यांच्याबद्दल ट्विट केले आणि वादंगाला तोंड फुटले. गंभीर मुद्दा होता\आहे तो नेमाडे यांच्याविषयी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप यावर तेव्हापासून सुरू असलेल्या चर्चेचा. त्यावरून नेमाडे हे अनेकांचे प्रात:स्मरणीय तिरस्काराचा विषय आहेत, हे सिद्ध होते.

वारेमाप पूर्वग्रह आणि अनेकांच्या द्वेषाचे धनी असलेले नेमाडे हे मराठी साहित्यात तरी एकमेव असावेत. ही गोष्ट खरी आहे की, नेमाडे आपल्या फटकळ बोलण्याने अनेक मराठी साहित्य-सारस्वतांचा अहम् सतत दुखावत असतात. ‘कथा हा वाङ्मयप्रकार नाही’, ‘साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे’, अशा शेरेबाजीने ते मराठी साहित्य शारदेच्या अंगणात अधूनमधून बॉम्बस्फोट करत असतात. लेखक म्हणून आपले दुकान बंद होण्याची भीती नेमाडे यांना नसली तरी मराठीतल्या बहुतांश साहित्यिकांना असते. त्यामुळे त्यांच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्यांना नेमाडे पचनी पडत नाहीत.

नेमाडे यांच्याविषयी साहित्याच्या आणि साहित्याबाहेरच्या जगात ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ आहे, ती याचमुळे. यातून वाद, टीका, कौतुक, हेटाळणी आणि द्वेष याच गोष्टी नेमाडे यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. अलीकडच्या काळात त्यांना अजून जोर आला आहे. ‘नेमाडेपंथी दहशतवाद’, ‘नेमाडे यांचाही लेखकराव झाला’ यासारखी टीका तर त्यांच्यावर वीस-पंचवीस वर्षांपासूनच केली जात आहे. त्यातून त्यांच्या कादंबऱ्याही सुटलेल्या नाहीत.

२०१० साली नेमाडे यांची ‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीची यथायोग्य आणि यथाशक्ती समीक्षा करण्यात कुणालाही यश आलेले नाही. नेमाडे यांच्या नावाचीच कावीळ झालेली असल्याने ते शक्यही नाही.

‘हिंदू’ या भारतीय जनमानसाला व्यापून टाकणाऱ्या संकल्पनेची पुनर्तपासणी करून तिची पुनर्मांडणी करणाऱ्या ‘हिंदू’ चतुष्ट्यमध्ये नेमाडे यांनी जो व्यापक पट उभा केला आहे, तो केवळ आणि निव्वळ स्तिमित करणारा आहे. पण हिंदूकडे आपली वैयक्तिक मते, राग-लोभ, पूर्वग्रह, संस्कार यापलीकडे जाऊन पाहू शकेल असा आवाका मराठी समीक्षकांकडे नाही. ‘‘‘हिंदू’ धर्म नावाच्या चमत्कारिक चीजेला विविध अंगांनी भिडणाऱ्या आणि अभ्यासाचा पाया आणि वास्तवाची चौकट न सोडता सिद्ध झालेली ही कलाकृती सध्या तरी एकमेवाद्वितीय म्हणावी लागेल’’, असे लोकव्यवहाराचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणतात.

धर्म नावाच्या गोष्टीला थेटपणे भिडणारी ही कादंबरी भारतीय समाजजीवनातील स्त्रीशोषणाच्याही अनंत पैलूंचा वेध घेते. विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रियांचे शोषण एकाच वेळी किती पातळ्यांवर होते, याविषयी आजवर एकाच काय पण सर्व ग्रामीण साहित्यिकांना सांगता आले नाही, ते नेमाडे यांनी ‘हिंदू’च्या पहिल्याच भागात नेमकेपणाने सांगून टाकले आहे. पण ते समजून न घेता ‘हिंदू’ला स्त्रीविरोधी, दलितविरोधी ठरवण्यात काहींनी आघाडी घेतली आहे. नेमाडे यांना ठोकूनच काढायचे एवढाच एककलमी कार्यक्रम राबवायचे ठरवल्यानंतर यापेक्षा वेगळे काही घडूही शकत नाही.

‘हिंदू’चे तीन भाग अजून प्रकाशित व्हायचे आहेत. पण पहिल्याच भागाने त्यांना ज्ञानपीठाचा  दावेदार केले होते. त्यानुसारच हे घडले असल्यामुळे नेमाडे यांना मिळालेला पुरस्कार ही अजिबात अनपेक्षित किंवा धक्कादायक बातमी नव्हती. पण तसे मराठी साहित्यातील धुरंधर किती मनमोकळेपणाने मान्य करतील तर ना! ‘सतत वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहू पाहणारे आहेत नेमाडे’ असे ‘लेबल’कार ‘नेमाडे यांनी हा पुरस्कार दिल्लीत लॉबिंग करून मिळवला आहे’, असा आरोप करण्यापर्यंत काहींची मजल गेली होती.

‘कोसला’ या सलग तीन पिढ्यांमध्ये प्रभाव टिकून असलेल्या कादंबरीने नेमाडे यांना ‘विसाव्या शतकाला सर्वोत्कृष्ट कादंबरीकार’ असा बहुमान दिला. ‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार असा प्रवास केलेल्या नेमाडे यांनी कादंबरी या वाङ्मयप्रकाराचीही समीक्षा केली आहे, मोजक्याच पण वेगळ्या कविताही लिहिल्या आहेत. त्यांनी ‘देशीवादा’ची मांडणी केली, तशीच साहित्य अकादमीसारख्या संस्थेत सक्रिय राहून संस्थात्मक कामही केले आहे.

चांगला लेखक आपल्यानंतर चार-दोन चांगले लेखक घडावेत, यासाठी प्रयत्नशील असतोच. नेमाडे यांच्या कादंबऱ्यांनी आणि त्यांच्या इतर लेखनाने तशी सोय करूनच ठेवली आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या, त्यांना प्रमाण मानणाऱ्या ‘नेमाडेपंथीय’ नावाच्या लेखकांच्या दोन पिढ्या मराठी साहित्यात काही चांगले पायंडे पाडू पाहात आहेत.

खरे म्हणजे नेमाडे यांची चिकित्सा त्यांच्या लेखनावरून केली जायला हवी. पण त्याविषयी न बोलता त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले म्हणजे मूळ मुद्दा बाजूला पडतो आणि गदारोळ उडतो. तोच उडवून देण्यात सध्या अनेकजण धन्यता मानत आहेत. पण त्यांची ही बोंबाबोंब अरण्यरुदन ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. या साऱ्या प्रकारावर नेमाडे नेहमीप्रमाणे शांत राहत आले आहेत. आणि हेच या टीकाखोरांच्या पोटशूळामागचे खरे कारण आहे. नेमाडेविरुद्धच्या बोंबाबोंब आंदोलनामुळे नेमाडे यांचे साहित्यातील योगदान आणि ‘हिंदू’ची यथोयोग्य समीक्षा या गोष्टी बाजूला पडल्या आहेत.

वैयक्तिक दुगाण्या झाडायला अभ्यासाची, व्यासंगाची गरज नसते. ते सप्रमाण सिद्ध करायला मात्र कष्ट करावे लागतात. तो न करता सारमेय संप्रदायाचा कित्ता गिरवणे हा सोपा पर्याय असतो. त्यातून आपला आवाज मोठा होता असला तरी ते स्वत:चेच चारित्र्यहनन करण्यासारखे असते. नेमाडे यांच्या विरोधकांकडे नेमक्या याच तारतम्याची वाणवा आहे.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Ranveer bhalepatil

Wed , 07 November 2018


vishal pawar

Sat , 05 May 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......