‘सिनेमास्केप’ वाचताना लक्षात घेण्याजोगी आहे, आजच्या बदलत्या काळाची, विचाराची पार्श्वभूमी
ग्रंथनामा - आगामी
गणेश मतकरी
  • ‘सिनेमास्केप’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 02 March 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी सिनेमास्केप Cinemascape गणेश मतकरी Ganesh Matkari

चित्रपट अभ्यासक गणेश मतकरी यांचं ‘सिनेमास्केप’ हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसच्या वतीनं प्रकाशित होत आहे. या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगणारं लेखकाचं हे मनोगत...

.............................................................................................................................................

या पुस्तकाला ‘सिनेमास्केप’ हे नाव देण्यामागे दोन कारणं आहेत.

पहिलं हे की ‘सिनेमॅटिक’मध्ये ज्या पद्धतीचे लेख आहेत, त्याच प्रकाराला हे पुस्तक पुढे नेतं, त्यामुळे नावातलं साधर्म्य हे त्या दिशेचा निर्देश करणारं.

सिनेमावर लिहिण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला स्वतंत्र चित्रपटांची समीक्षा, मग ती मोठ्या लेखांमधून स्वतंत्रपणे करण्यात आलेली असेल, वा वृत्तसमीक्षा असेल, हा एक लोकप्रिय सर्वपरिचित प्रकार झाला. त्याखेरीज त्यासंबंधातल्या दिग्दर्शक, कलाकार अशा व्यक्तींविषयी लिहिणं, त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणं, हा एक भाग होऊ शकतो. किंवा कला म्हणून (अन् तंत्रज्ञान म्हणूनही) या क्षेत्रात जे बदल होत गेले, त्याबद्दल लिहिलं जाऊ शकतं. वैचारिक पातळीवर चित्रपटांनी शंभर-सव्वाशे वर्षांच्या कालावधीत जी मजल मारली आहे, ती क्वचितच इतर कोणत्या कलेनं मारली असेल. त्यामुळे त्या संबंधातलं सैद्धान्तिक लिखाण हा एक प्रांत आहे. इतरही आहेत.

मी वेळोवेळी यातल्या वेगवेगळ्या प्रकारांत लिखाण केलेलं आहे. ‘सिनेमॅटिक’मध्ये ज्या प्रकारचं लिखाण होतं आणि इथं ज्या प्रकारचं आहे, ते वरच्या विविध प्रकारांना काही प्रमाणात एकत्र आणणारं आहे. म्हणजे त्यात स्वतंत्र सिनेमांबद्दलचा काही भाग जरूर आहे, पण केवळ एकट्यादुकट्या चित्रपटाची समीक्षा हा या लेखांचा हेतू नाही. चित्रपटमाध्यम हे अनेक प्रतिभावान कलावंत आणि त्यांच्या विविध सामाजिक पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या, विविध विचारशैलींशी जोडलेल्या कलाकृतींमधून तयार होत असतं. स्वतंत्र चित्रपटाची घेतलेली दखल ही तो चित्रपट समजून घेण्यासाठी योग्यच असली तरीही एकूण कलाप्रांतात त्याचं स्थान काय आणि हे माध्यम कोणत्या दिशेनं कुठे निघालंय हे समजून घेण्यासाठी पुरेशी नसते. या पुस्तकातल्या लेखांमध्ये परस्परांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे साधर्म्य असणाऱ्या चित्रपटांचा एकत्रित विचार केला गेलेला आहे. हे साधर्म्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे. उदाहरणार्थ, काही लेखांमधून विशिष्ट चित्रप्रकार, शैली आणि त्यांच्या जडणघडणीबद्दलचा विचार आहे; काहींमधून भारतीय चित्रपटांमध्ये होत गेलेल्या बदलाबद्दल बोललं गेलंय; काहींमध्ये आपला चित्रपट आणि पाश्चिमात्य चित्रपट यांचा तुलनात्मक विचार आहे. याशिवाय इतर काही लेखांत चित्रपटांच्या बदलत्या स्वरूपाबरोबरच प्रेक्षक म्हणून आपली भूमिका आणि आपली जबाबदारी यांची नोंद घेण्यात आलीय.

‘सिनेमास्केप’ हे नाव देण्यामागचं दुसरं कारण आहे, ते त्या शब्दातून ध्वनित होणाऱ्या अर्थाशी संबंधित. चित्रपटाचा प्रांत, परिसर या दृष्टीनं हा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे. स्वतंत्र चित्रपटाबाहेर जाऊन एकूण चित्रपटसृष्टीचा घेतलेला आढावा या दृष्टीनं हे नाव लेखांमागची भूमिका स्पष्ट करणारं आहे, असं मला वाटलं.

पूर्वी जेव्हा चित्रपटांबद्दल, खासकरून पाश्चिमात्य, वा जागतिक चित्रपटांबद्दल लिहिलं जायचं, तेव्हा वाचणाऱ्याच्या डोळ्यांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह असायचं, प्रश्न असायचा, तो आपण या सिनेमांबद्दल वाचलं खरं, पण आता हे बघायचे कुठे, हा. आज मी असं म्हणू शकेन, की हा प्रश्न फारसा उरलेला नाही.

मी लहान होतो, तेव्हा जागतिक सिनेमा पाहायचा, तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या फिल्म सोसायटीचे सभासद असणं आवश्यक असायचं. मी स्वत: शाळेत असताना वडिलांबरोबर प्रभात चित्र मंडळाच्या एका स्क्रिनिंगला जाऊन अकिरा कुरोसावाचा ‘राशोमॉन’ हा मास्टरपीस पाहिल्याचं मला आठवतं. पण अशी तुरळक स्क्रिनिंग्ज (तीही ओळख लावून अटेंड केलेली, कारण फिल्म सोसायट्याही अठरा वर्षांखालच्या मुलांना प्रवेश देत नसत, नाहीत.) सोडता चित्रपटगृहात लागतील ते, मी आठवी-नववीत असताना सुरू झालेल्या व्हिडिओ लायब्रऱ्यांमध्ये मिळतील ते आणि दूरदर्शन दाखवील ते, या पलीकडे चित्रपट पाहणं मनात येऊनही अशक्य होतं. गेल्या पंचवीसेक वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदललं आहे.

सॅटेलाइट टीव्हीवर आलेले मुव्ही चॅनेल्स, आधी डीव्हीडी आणि मग ब्रॉडबँड इंटरनेटवर सुरू झालेली पायरसी, अॅमेझॉन आणि आय ट्यून्ससारख्या माध्यमातून चित्रपट अधिकृतपणे विकत घेण्याची झालेली सोय आणि शेवटी नुकतेच सुरू झालेले नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओ हे वेब चॅनेल्स, या चार कलमी कार्यक्रमांतून हा प्रश्न पूर्णच निकालात निघाला आहे. शहरं सोडता ब्रॉडबँड आणि वेब चॅनेल्स अजून हव्या तितक्या कार्यक्षमतेनं काम करत नाहीत असं मी ऐकून आहे, पण ते चित्र हळूहळू बदलेल आणि पुढल्या चार-पाच वर्षांत सर्वसाधारण प्रेक्षकाला स्वत:ला अशिक्षित ठेवण्यासाठी काहीही एक्स्क्यूज उरणार नाही.

आता हे सांगताना एक निश्चित म्हणेन, की जे चित्रपट अधिकृतपणे उपलब्ध आहेत, आणि आज तसे खूप प्रमाणात आहेत, ते तसेच पाहावेत. चित्रपटगृहात लागलेला वा वेब चॅनेलवर असणारा चित्रपट पायरसीच्या मार्गानं मिळवला जाऊ नये. कलावंतांचा न्याय्य मोबदला चुकवणं हे कलाक्षेत्राला पुढे मोठ्या संकटात आणेल, जे टाळणंच योग्य होईल. आता जे चित्रपट आपल्याला अधिकृत मार्गानं उपलब्धच नसतील, त्यांची गोष्ट अर्थातच वेगळी.

मुद्दा हा, की पूर्वी जसं सिनेमाबद्दल वाचणं ही केवळ एक साहित्यिक हौस होती, तशी आता उरलेली नाही. वाचण्याबरोबर पाहणं, त्यावर बोलणं, लिहिणं हे आपल्याला हे माध्यम नीट समजण्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतं. चांगली गोष्ट ही, की आजचा तरुणवर्ग या चारही गोष्टी हिरिरीनं करताना दिसतो आहे. लिहिण्यासाठी त्याला सोशल नेटवर्क हे नवं माध्यम उपलब्धही झालंय, जे कसं वापरावं याबद्दलचा संभ्रम मात्र अजून अनेकांच्या मनात दिसतो आहे.

‘एव्हरीवन्ज अ क्रिटिक’ असं म्हटलं जातं आणि सोशल नेटवर्क आल्यापासून हे शब्दश: खरं झालेलं आहे. सोशल मीडिआचा फायदा हा आहे की आपण जे लिहितो, त्यावर लगेच प्रतिक्रिया मिळू शकते. शिवाय चित्रपटांमधले अनेक दिग्दर्शक, कलाकार, यांच्याशी इथं आपला थेट संपर्क होऊ शकतो. त्यांच्याशी बोलणं, आपली प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहचवणं, हे आजवर शक्य न झालेलं सारं आज होताना दिसतंय. खासकरून मराठी आणि काही प्रमाणात हिंदी चित्रपटक्षेत्राबाबत हे अगदीच खरं आहे. मात्र लिहिता तरुणवर्ग याचा हवा तसा, तितका फायदा न घेता, केवळ शेरेबाजी, पुरेसा विचार न करता घाईनं मत मांडणं, आस्वादापेक्षा झोडणं आणि आपल्या वाचकांकडून लाइकरूपी वाहवा मिळवणं, यालाच अधिक महत्त्व देताना दिसतो आहे. यामुळे सोशल नेटवर्कच्या चौकटीत तो थोडा अधिक लोकप्रिय होतो हे निश्चित! मात्र त्याची समज वाढण्याच्या दृष्टीनं या संधीचा फायदा झालेला दिसत नाही.

आजचा तरुणवर्ग केवळ प्रेक्षक नाही. त्यांच्यातले अनेकजण या क्षेत्रात काहीतरी करून पाहण्याच्या प्रयत्नात दिसतात. डिजिटल क्रांती हे यातलं एक महत्त्वाचं कारण आहे. फिल्म आता पुरती निकालात निघाली आणि त्याची जागा डिजिटल डेटानं घेतली. यामुळे चित्रपट या माध्यमात काही प्रमाणात लोकशाहीकरण झाल्याचं गेल्या काही वर्षांत दिसून आलं. फिल्म वापरली जात असे तोवर सामान्य प्रेक्षक आणि चित्रकर्ते यांच्या मध्ये एक मोठी दरी होती. हे माध्यमच इतकं खर्चिक होतं, की बहुतेकांना ते आपल्या अवाक्याबाहेरचं वाटायचं. त्यामुळे सिनेमाचा आणि सर्वसामान्य माणसाचा संबंध केवळ घटकाभरची करमणूक इतकाच होता. आज डिजिटल क्रांतीनं सिनेमा बनवणं सोपं झालंय. सोपं म्हणजे केवळ कलात्मक अंगानं नव्हे, तर खर्च, तंत्र, तंत्रज्ञान अशा सर्व बाजूंनीच. आज चांगल्या मोबाइल्सना टीव्हीवर ब्रॉडकास्ट करण्याइतपत चांगलं चित्रित करता येतं; कॅमेरे एकूणच स्वस्त झाले आहेत; प्रत्येकाच्या घरी असलेल्या संगणकावर संकलन करता येणं शक्य झालंय, या सगळ्यातून आजचा प्रत्येक प्रेक्षक हा संभाव्य दिग्दर्शक बनलेला आहे आणि आज प्रचंड संख्येनं शॉर्ट फिल्म्स बनणंही याच परिस्थितीकडे निर्देश करतंय. मात्र या क्रांतीचा फायदा आहे, तसा तोटाही. पूर्वी गोष्टी आवाक्याबाहेर असताना चित्रित झालेल्या प्रत्येक फूट फिल्मचा विचार होत असे. ती वाया जाऊ नये यासाठी प्रचंड प्रमाणात पूर्वतयारी केली जाई, ज्या दरम्यान कलाकृतीला आकार येत असे आणि एकूण परिणामात पुरेशी भर पडे. आता या इकॉनॉमीची गरजच उरली नसल्यानं नव्या होतकरू दिग्दर्शकांच्या कामात बऱ्याच अंशी एक विस्कळीतपणा येत चालला आहे. हे टाळायचं तर प्रत्येकानेच माध्यमाचा विचार पुरेशा खोलात जाऊन करणं ही आज गरज बनली आहे. हा विचार पुढे नेण्याच्या दृष्टीनं या लिहिण्याचा काही उपयोग होऊ शकला, तर आनंदाची गोष्ट आहे.

‘सिनेमास्केप’ वाचताना लक्षात घेण्याजोगी ही पार्श्वभूमी. आजच्या बदलत्या काळाची, विचाराची.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4391

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......