सुधारकांची परंपरा टिकवून ठेवण्याचं कार्य करणाऱ्या महात्म्याचं दर्शन
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
प्रा. लतिका जाधव
  • ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (भाग २)’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 05 January 2018
  • ग्रंथनामा Granthanama शिफारस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन Mahrshi Vitthal Ramji Shinde रा. ना. चव्हाण R. N. Chavhan

‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (भाग २)’ या रा. ना. चव्हाण यांच्या पुस्तकाचं प्रकाशन २ जानेवारी २०१८ रोजी कोल्हापुरात झालं. या पुस्तकाविषयी...

.............................................................................................................................................

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (१८७३-१९४४) यांचं अलौकिक कार्य व कर्तृत्व अभ्यासकांना समजावं या दृष्टीनं हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. (कै.) रा. ना. चव्हाण यांनी शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक व राजकीय कार्यक्रमांसाठी केलेलं हे लेखन सूत्रबद्धपणे त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण यांनी एकत्र करून अभ्यासकांची सोय केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासात केवळ काही ओळींत शिंदे यांची भलावण केलेली दिसून येते. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाकडे जनसामान्य व अभ्यासक यांचं फारसं लक्ष वेधलं गेलं नाही असं वाटतं. प्रस्तुत पुस्तकातून चव्हाण यांनी सुबोध शैलीत लिहिलेले शिंदे यांच्यावरील लेख वाचताना त्यांच्या कर्तृत्वाला निश्चितच उजाळा दिला गेला आहे. एक प्रकारे चव्हाण यांनी आपल्यासाठी सूक्ष्मपणे महत्त्वाच्या अशा कालखंडाचा इतिहास नोंदवल्याची जाणीवदेखील जागी होते.      

या पुस्तकास डॉ. रणधीर शिंदे यांची अतिशय अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकात एकूण बावीस लेख व परिशिष्टात खूप महत्त्वपूर्ण असे संदर्भ जोडलेले आहेत. शिंदे यांच्या हस्ताक्षरातील पत्रव्यवहारदेखील परिशिष्टात दिला आहे. त्यामुळे कित्येकांना अज्ञात असलेला शिंदे यांच्या कर्तृत्वाचा आलेख या पुस्तकातून स्पष्ट होताना दिसतो.

अभ्यासकांना आजच्या काळात हे पुस्तक वाचून एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्मातील धार्मिक सुधारणा व धर्मचिकित्सा याविषयी होत असलेल्या घुसळणीचा ध्वनी-प्रतिध्वनी अनुभवता येईल. हिंदू धर्म चातुर्वर्ण्याच्या चौकटीत अडकलेला व स्त्रियांना कनिष्ठ लेखणारा अशी एकोणिसाव्या शतकातील हिंदू धर्माची वस्तुस्थिती होती. याविरुद्ध राजा राममोहन रॉय यांनी लढा सुरू केला. ते ‘सती प्रथेला आळा’ घालण्यात यशस्वी झाले. इथून ब्रिटिश अमदानीत अतिशय चिवटपणे कायद्यानं धर्मसुधारणा करण्याचा लढा समाजसुधारकांनी सुरू केला. हिंदू धर्मातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, ‘अस्पृश्योद्धाराचे धोरण’ महात्मा फुले यांनी स्वीकारलं. शिंदे यांनी वरील दोन समाजसुधारकांच्या धोरणांना पुढे नेण्याचं कार्य निष्ठेनं आयुष्यभर केलेलं दिसून येतं.

शिंदे यांनी विद्याव्यासंगातून आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला. त्यांना शिक्षणाची आवड होती. त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांच्यामुळे असं म्हटल्यास वावगे ठरू नये. शिंदे जेव्हा पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकायला आले, त्यावेळी ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर प्राचार्य होते. याविषयी पुस्तकात एक संदर्भ दिसतो, “आगरकर अज्ञेयवादी होते. मिल-स्पेन्सर यांचा आगरकरांवर प्रभाव होता. विठ्ठलरावांनी देखील मिल स्पेन्सर वाचले व तेही अज्ञेयवादी झाले. अज्ञेयवादावर त्यांनी एक निबंधही लिहिला होता. पण पुढे परंपरागत भागवत धर्माचे संस्कार बलवान ठरले.” (पृ. १९)

शिंदे यांचा त्याच काळात रानडे-भांडारकर यांच्या ‘प्रार्थना समाजा’शी संबंध आला. त्यांनी काळाची पावलं जाणून घेऊन पुरोगामित्वाकडे वाटचाल सुरू केली. १८९८ मध्ये त्यांना बी. ए.ची पदवी मिळाली. पुण्यातील समाजसुधारक, विचारवंत यांच्याशी ते जोडले गेले. धर्म हा त्यांच्या अभ्यासाचा विषय झाला. १९०१ मध्ये त्यांनी मँचेस्टर ऑक्सफर्ड येथे ‘कॉलेज ऑफ थिऑलाजी’मध्ये प्रवेश घेऊन सर्व धर्माचे तौलनिक अध्ययन व तौलनिक भाषाशास्त्र यांचं अध्ययन केलं. युरोपातील मिशनरी लोक दुर्बल व वंचित घटकांसाठी ज्या समर्पित भावनेनं कल्याणकारी योजना राबवताना त्यांना दिसले. ते बघून पुढे त्यांच्या जगण्याचं राष्ट्रीय उद्दिष्ट त्यांना ठरविता आलं, असं म्हणता येईल. त्यांना ब्राह्मो समाजदेखील त्याकाळात तितकाच महत्त्वाचा वाटत होता. परदेशात असताना त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्या ब्रिस्टलमधील समाधीला भेट दिली अशी महत्त्वाची नोंद चव्हाण करतात.

१९०४ मध्ये ते शिक्षण व विविध यात्रा करून हिंदुस्थानात परतले. इथं आल्यावर त्यांनी कोणतीही सरकारी नोकरी स्वीकारली नाही. त्यांच्या मते ब्राह्मोसमाज व सत्यशोधक समाज तत्त्वत: भिन्न नव्हते. त्यांनी महात्मा फुले यांच्या समतावादी तत्त्वांचा पुरकार केला. ब्राह्मोसमाज हा अखिल भारतीय म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला. सर्व धर्मांचं ऐक्य, स्वतंत्रता, देवाचं ऐक्य, मानवांची समता व ऐक्य हे मुद्दे ब्राह्मो समाजाला पायाभूत होते म्हणून महर्षी वि. रा. शिंदे ब्राह्मसमाजी झाले. महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यानच्या काळात अस्पृश्यतेच्या निवारणासाठी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी संघर्ष केला. त्यांचे तत्कालीन महत्त्वाचे काम म्हणजे त्यांनी जगातील व भारतातील उदारधर्मविषयक चळवळीची व संस्थांची माहिती संग्रहित करणारी ‘थिईस्टीक डिरेक्टरी’ (१९१२) केली.

महर्षी शिंदे यांना जातिव्यवस्थेमुळे दलितांचं जगणं हलाखीचं झालं आहे याची जाणीव होती. त्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांनी १९०६मध्ये मुंबई इथं ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना केली. त्याअगोदर १८५१-५२ मध्ये महात्मा फुले यांनी ‘अतिशूद्रांना शिक्षण देणारी मंडळी’ म्हणून संस्था सुरू केली होती. महात्मा फुलेंच्या या शाळेचा पुढे सरकारी शाळेत समावेश करण्यात आला. महर्षी शिंदे यांनी ही शाळा व नाना पेठेत सात एकर जागा घेऊन ‘अहिल्याश्रम’ ही संस्था उभारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वानंतर या कार्याची गरज उरली नाही, हे लक्षात घेऊन पुढे १९२३ मध्ये या संस्थेतून ते मुक्त झाले. त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नावर सखोल अभ्यास व चिंतन करून ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ लिहिला.

देशाच्या राजकारणाचं चित्र स्पष्ट होत होते, त्यावेळी त्यांनी ‘राष्ट्रीय मराठा संघ’ स्थापन केला. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकून ‘गांधी-नेहरूप्रणित काँग्रेसमध्ये जाण्याविषयी त्यांनी बहुजनांना सुचवलं. महात्मा गांधीचं नेतृत्व जाणून घेऊन ते स्वातंत्र्यलढ्यातही सामील झाले. १९३२ मध्ये त्यामुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षादेखील भोगावी लागली.

महर्षी शिंदे यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या नोंदी या लेखसंग्रहातून रा. ना. चव्हाण करताना आढळतात. शिंदे यांनी स्थापन केलेल्या वाई ब्राह्मसमाजाविषयी केलेला पत्रव्यवहार या पुस्तकात छापला आहे, तोही महत्त्वाचा आहे. चव्हाण यांना महर्षींचा सहवास व साहचर्य लाभल्यामुळे त्यांच्या जीवनकार्याचा अन्वयार्थ मांडण्यात साक्षेप दिसून येतो.

चव्हाण यांनी आपल्या लेखांतून महर्षींचा मराठा समाजाबद्दल असलेला रोखठोकपणादेखील व्यक्त केला आहे. शिंदे अखेरपर्यंत ब्राह्मोसमाज व सत्यशोधक समाज यांच्या तत्त्वांना महत्त्व देत होते. त्यांच्या रूपानं व्रतस्थ जीवन जगणाऱ्या विचारवंत व सुधारकांची परंपरा टिकवून ठेवण्याचं कार्य करणाऱ्या महात्म्याचं दर्शन हा लेखसंग्रह घडवतो.

या पुस्तकाच्या वाचनातून तत्कालीन सुधारणावादी, धार्मिक व राजकीय घटनांचं स्पष्टीकरण होतं. या पुस्तकाची परिशिष्टं अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट करताना दिसतात. पुस्तक निर्मितीसाठी संपादकांनी परिश्रम घेतले आहेत.

.............................................................................................................................................

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (भाग २) - रा. ना. चव्हाण,

संपादक व प्रकाशक - रमेश चव्हाण, पुणे, मूल्य – ४५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4340

.............................................................................................................................................

लेखिका प्रा. लतिका जाधव वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स इथं अध्यापन करतात.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.         

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......