गोष्ट छोटी… पण, डोंगराएवढी!
ग्रंथनामा - झलक
मुकेश माचकर
  • ‘अक्कलझाड’ची मुखपृष्ठं
  • Sun , 06 November 2016
  • मुकेश माचकर अक्कलझाड Mukesh Machakar Akkalzad

‘अक्कलझाड’ हे मुकेश माचकर यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. लौकिकार्थाने बोधकथा, नीतीकथा, प्रेरक कथा, आध्यात्मिक कथा, दृष्टांतकथा अशा लेबलांखाली बसण्यासारख्या कथा या पुस्तकात आहेत. पण, त्यांचं रंजक गोष्ट असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. या पुस्तकाला माचकरांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश....

 

या कथा प्रथम फेसबुकवर अवतरल्या, तेव्हापासून एक प्रश्न अधूनमधून सतत विचारला जातो. या कथा तुमच्या आहेत का?

या कथा माझ्या आहेतही आणि नाहीतही, हेच त्यावरचं योग्य उत्तर आहे. ते अनेकांना समजत नाही. काहींना पटत नाही. काही मूळ लेखकांच्या वतीने श्रेयाच्या लढाया सुरू करतात. आज कोणी इसापची गोष्ट इसापचं नाव न घेता सांगितली, तर ही इसापची गोष्ट असल्याचं लक्षात आणून दिलं जातं, पण, मुळात इसापच्या अनेक गोष्टींच्या कथाकल्पना त्याने लुकमानकडून उचलल्या होत्या, त्याचं काय? ते अनेकांना माहिती नसतं, इतकंच. खरंतर, या पुस्तकातल्या सगळ्याच कथा पारंपरिक आहेत. कुठे ऐतिहासिक व्यक्तींच्या आयुष्यातल्या घटनांमधून बोध घेताना त्यांना दंतकथांचं रूप आलंय तर कुठे त्या सरळसरळ काल्पनिक, रचित कहाण्या आहेत. यातल्या ९० टक्क्यांहून अधिक कथांचं मूळ ठामपणे सांगता येत नाही. कारण, त्या अनेक प्रांत, भाषा, संस्कृतींच्या प्रदेशांमधून वाहात वाहात इथवर आल्या आहेत…

कथकानुसार आणि देश-काल-स्थितीनुसार त्यांच्या तात्पर्यात आणि मांडणीत फरक झालेला आहे… प्रत्येक कथकाने त्यांचा सांगाडा कायम ठेवून त्यांना आपल्या कल्पनेच्या हाडामांसातून आकाराला आणलं आहे… त्यामुळेच या कथा इथूनही पुढे जाणार आहेत…

माझ्या या गोष्टींची सुरुवात झाली ओशोमुळे. त्याच्या व्याख्यानांनी (आपल्याकडे आजकाल कोणाही बुवाबापूमाँबाबा, डबलश्री आणि ट्रिपलवेडगळांच्या निरर्थक बरळण्यालाही प्रवचन म्हणतात, त्यामुळे तो कर्मकांडलिप्त शब्द ओशोच्या सुंदर व्याख्यानांना वापरवत नाही) रोजच्या मॉर्निंग वॉकला सोबत करायला सुरुवात केली आणि त्याच्या व्याख्यानात पेरलेल्या खुसखुशीत शैलीतल्या, सोप्या भाषेत गहन, बहुपेडी आशय व्यक्त करणाऱ्या गोष्टींनी मन वेधून घेतलं. माझ्यातला 'गोष्टवाला दादा' जागा केला. लहानपणी गल्लीतली पोरंटोरं गोळा करून त्यांच्या कोंडाळ्यात मध्यभागी बसून मी त्यांना तासनतास हुकमी गोष्टी सांगायचो. काही रचलेल्या, काही ऐकल्या-वाचलेल्या. पण, त्या सगळ्यांना माझा टच देऊनच सांगायचो.

एकदा सहज एक गोष्ट फेसबुकवर शेअर केली आणि कोंडाळं जमू लागलं. गोष्टी सांगण्याचा चस्का लागू लागला. लोक ठरल्या वेळेला गोष्टींची वाट पाहू लागले. काही वर्षांपूर्वी मी याच माध्यमात शेवटच्या ओळींत धक्का देणाऱ्या लघुतम कथांचा 'धक्कथा' (हे मी ठेवलेलं नाव) हा फॉर्म हाताळून झाला होता. मात्र, ती संपूर्णपणे माझी निर्मिती असायची. इथे मूळ गोष्टी कुठूनकुठून ऐकलेल्या, वाचलेल्या होत्या. ओशोबरोबरच इंटरनेट धुंडाळून काही गोष्टी शोधू लागलो. काही नव्या गोष्टीही सुचू लागल्या. गौतम बुद्ध, बोधिसत्त्व, बोधिधर्म, महावीर, नानक यांच्याबरोबर डायोजिनिज, लुकमान, मन्सूर, राबिया, मुल्ला नसरुद्दीन, हसन, बायजिद, होतेई, गुरजिएफ, रयोकान यांच्यासारख्या विविध धर्मपंथपरंपरांमधल्या विभूतींचा परिचय झाला. मुल्ला नसरुद्दीनच्या विचारप्रवृत्त करणाऱ्या हास्यकथांनी तर मलाच फेसबुकवर मुल्ला माचकरुद्दीन बनवून टाकलं.

या गोष्टी सांगू लागल्यावर फेसबुकवर राजकीय, वैचारिक, सामाजिक मतभेदांमुळे दूर, फटकून राहणारे लोकही नव्याने जोडले गेले. मित्रांचे मित्र शेअरिंगच्या माध्यमातून जोडले गेले. त्यांच्याशी संवाद साधताना लक्षात आलं की, आजचा समाज गोष्ट हरवलेला समाज आहे. कथा खूप आहेत, गोष्टी नाहीत, अशी स्थिती आहे. आजीच्या कुशीत गोष्ट ऐकायला उत्सुक नातवंडं आहेत, गोष्ट सांगायला आजीही तयार आहे, पण, तिच्यापाशीही गोष्टी नाहीत. या गोष्टी सुरू झाल्यापासून आमच्या मुलांना गोष्ट सांगण्याचा प्रॉब्लेम उरला नाही, रोज तुमचीच गोष्ट सांगतो, असं सांगणारे अनेक मित्र भेटले. अनेकांची इंग्रजी माध्यमांत जाणारी मुलं मराठीत फक्त या गोष्टीच ऐकतात आणि त्यांना त्या आवडतात, असं त्यांच्या पालकांनी कळवलं. संकेत कुलकर्णी हा औरंगाबादचा मित्र त्याच्या ९० वर्षांच्या आजोबांना या गोष्टी वाचून दाखवतो आणि तेही त्या गोष्टींची वाट पाहतात, हे कळाल्यावर सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. या गोष्टींच्या ई-बुकचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करवून घेतलं. काल्पनिक शेत आणि काल्पनिक म्हशींवरून भांडून एकमेकांचं डोकं फोडायला उद्युक्त होणाऱ्या दोन मित्रांची गोष्ट आपण आपल्या खरोखरच्या दोन मित्रांना वाचून दाखवली आणि त्यांच्यातलं वितुष्टापर्यंत ताणलं गेलेलं भांडण मिटवलं, अशीही प्रतिक्रिया एका वाचकाने कळवली. ती फारच मौलिक होती.

लौकिकार्थाने बोधकथा, नीतीकथा, प्रेरक कथा, आध्यात्मिक कथा, दृष्टांतकथा अशा लेबलांखाली बसण्यासारख्या कथा आहेत. पण, मला त्यांचं रंजक गोष्ट असणं सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. वाचणाऱ्याला गोष्ट ही गोष्ट म्हणून आवडणं महत्त्वाचं, शिकवण मिळालीच, पोहोचलीच तर सोने पे सुहागा, इतक्या साध्या विचारातून या गोष्टी पुन्हा सांगतो आहे. आता हेच झेन आहे असं म्हणतात. असेलही.

आयुष्याच्या एका अवघड वळणावर या कथा भेटल्या नसत्या तर माझ्या आयुष्याची कथा वेगळी झाली असती. त्या अवघड काळात आप्तेष्टांसोबतच ओशोने आणि या कथांनीही मला सोबत केली. अल्लाद आयुष्याच्या पुढच्या टप्प्याला नेऊन सोडलं. त्यांचा मला नादच लागला. त्यांनी मला गुंतवून ठेवलं. रोज सकाळी वॉकवरून आल्यानंतर थेट कथा उतरवायला बसणं, ती फेसबुकवर पोस्ट करणं आणि नंतर तिचा प्रतिसाद तपासणं, हे माझंही व्यसन बनून बसलं. कथा डोक्यात घोळत असली की वास्तवातले सगळे व्यवहार धूसर व्हायचे. माझं हे तंद्रीगुंग गुंतलेपण माझी पत्नी, खरंतर सर्वार्थाने सहधर्मचारिणी असलेल्या अमिता दरेकर हिने नेहमीच्या सवयीने समजून घेतलं  आणि शुद्ध बेरोजगारीच्या काळातल्या या रिकामटेकड्या उद्योगातही मन:पूर्वक साथ दिली, हा तिचा मोठेपणा. आपण आणलेला गोड व्यत्ययही आपल्या बधिरावस्थेतल्या बाबाला या वेळेत डिस्टर्ब करू शकत नाही, हा घोर अपमान किमया आणि अनया या माझ्या अनुक्रमे शाळकरी आणि प्लेग्रूपकरी लेकींनी फारसा मनावर घेतला नाही, त्याबद्दल त्यांचेही आभार मानायलाच हवेत. सुबोध जावडेकर, अवधूत परळकर, मुग्धा कर्णिक, सुनील तांबे, कविता महाजन, गजू तायडे, विद्याधर दाते यांच्यासारख्या ज्येष्ठ मित्रांनी या उद्योगाचं कधी कौतुक केलं तर कधी कानपिचक्याही दिल्या. मृण्मयी रानडे या जिवलग मैत्रिणीने या गोष्टींवर शेवटची नजर टाकून दिली. प्रदीप म्हापसेकर, प्रमोद गणेशे आणि विनोद तिडके या मित्रांनी ई-बुकच्या उपक्रमात मोठं साह्य केलं. मुग्धा कोपर्डेकर आणि इंद्रायणी साहित्यच्या टीमने अत्यंत वेगाने आणि आपलेपणाने छापील पुस्तक आकाराला आणायला मदत केली. या सर्वांबरोबरच या गोष्टींची रोज आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि त्या पोस्ट होताच तात्काळ पोस्टमॉर्टेम करणाऱ्या, दिलखुलास तारीफ करणाऱ्या आणि अतिशय जिव्हाळ्याने त्यांचं पुस्तक आणाच, असा आग्रह धरणाऱ्या पहिल्या धारेच्या सर्व वाचकांचेही आभार.

ज्याने 'नावं ठेवल्या'वाचून माझा एकही उपक्रम पूर्ण झाला नसेल, त्या सन्मित्र प्रवीण टोकेकरने नेहमीप्रमाणे झटक्यात या पुस्तकाच्या शीर्षकाचं 'अक्कलझाड' लावून दिलं, त्याचे आभार.

सागर आणि मुग्धा कोपर्डेकर या दाम्पत्याने नेहमीच्या प्रकाशन-व्यवहारातील ठोकताळे बाजूला ठेवून हे पुस्तक प्रकाशात आणण्याचं धाडस केलं आहे. त्यांच्या धाडसाला यश लाभो आणि हे पुस्तक हातात घेणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या जगण्याच्या धामधुमीत विरंगुळ्याचे, निखळ मनोरंजनाचे आणि जमल्यास अंतर्मुख करणारे दोन क्षण मिळोत, आपला वाचनाचा वेळ सार्थकी लागला, असं समाधान मिळो, एवढीच अपेक्षा.

अक्कलझाड (भाग १ व २) – मुकेश माचकर, इंद्रायणी साहित्य, पुणे, पाने – १०४ (प्रत्येकी), मूल्य – ९० रुपये (प्रत्येकी)

‘अक्कलझाड’ हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

https://goo.gl/V64Myp

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......