‘चित्रभास्कर’ : चंदावरकरांच्या लेखनाचं भाषांतर करताना
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
आनंद थत्ते
  • ‘चित्रभास्कर’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 20 April 2018
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस चित्रभास्कर Chitrabhaskar भास्कर चंदावरकर Bhaskar Chandawarkar

‘चित्रभास्कर’ या पं. भास्कर चंदावरकरांनी लिहिलेल्या आणि अरुण खोपकरांनी संपादित केलेल्या ग्रंथाच्या ३ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या प्रकाशन समारंभात  अनुवादक आनंद थत्ते यांनी केलेल्या भाषणाचा संपादित गोषवारा. प्रस्तुत भाषण प्रथम ‘मायमावशी’ या त्रैमासिकाच्या मार्च २०१८च्या अंकात प्रकाशित झालं आहे.

.............................................................................................................................................

साधारण २०११-२०१२ च्या सुमारास जयप्रकाश सावंत यांनी भास्कर चंदावरकरांच्या लेखांचा अनुवाद करणार का, अशी विचारणा केली होती. पंडितजींनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं संकलन आणि संपादन करून पुस्तक करण्याची कल्पना होती. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कारण हे सर्व लेख सिनेमा, नाटक आणि त्यातलं संगीत या विषयीचे होते. या तीनही कलांविषयी मला आत्मीयता आहे आणि त्यात रसही आहे. पंडितजींचा या तीनही कलांमधला व्यासंग आणि सखोल अभ्यास याची कल्पना होतीच. त्यांच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीचं मराठीत केवळ एकच पुस्तक असावं ही काही चांगली गोष्ट नव्हती. पंडितजी परफॉर्मिंग आणि प्रॅक्टिसिंग कलावंत होते. शिवार त्यांचा तात्त्विकविचारही पक्का होता. प्रत्यक्ष कार्यरत राहिलेल्या कलावंताने संगीताविषयी तात्त्विक विचार मांडणं हे फारच महत्त्वाचं आहे. कारण प्रत्यक्ष कार्यरत राहिलेले असे कलावंत फारच कमी आहेत, जे संगीतीविषयी तात्त्विक मांडणी करू शकतात. संगीतात तर अशा लेखनाची वानवाच आहे. म्हणून मी अनुवाद करण्यास आनंदाने होकार दिला.

माझाकडे लेख आले आणि मी काम सुरू केलं. हे काम करताना दोन गोष्टीचं भान राखणं महत्त्वाचं होतं. एक म्हणजे पंडितजींच्या लेखनशैलीच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करणं आणि दुसरं म्हणजे सांगीतिक आणि तात्त्विक संज्ञा काटेकोरपणे वापरणं. ‘वाद्यवेध’मधलं त्यांचं लेखन आपण पाहिलं तर हे लक्षात येतं की, पंडितजींची भाषा ओघवती आहे. त्यात लालित्य आहे आणि पांडित्यदेखील आहे. त्यातला तात्त्विकभाग देखील अतिशय सहजतेनं आणि सुलभतेनं येतो. शास्त्रचर्चा या नावाखाली, केवळ अकादेमिक पंडितांनी केलेलं सांगीतिक लेखन किती रटाळ आणि क्लिष्ट असतं हे मी नव्यानं सांगायची गरज नाही. म्हणून पंडितजीसारख्या प्रत्यक्ष कार्यरत राहिलेल्या कलावंतानं केलेल्या संगीत विषयक लेखनाला विशेष महत्त्व येतं. कारण त्यांना त्या कलेचं मर्म कळलेलं असतं. या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून ‘चित्रभास्कर’मधल्या लेखांचं भाषांतर करताना त्यांच्या लेखनाला आणि शैलीला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे.

संगीताचा मी विद्यार्थी आहे. त्यामुळे अनुवाद करत असताना त्याचा मला खूप फायदा झाला. मला स्वतःला अनेक गोष्टी शिकता आल्या. माझ्या काही सांगीतिक धारणांना बळकटी मिळाली. काही गोष्टी नव्या परिप्रेक्ष्यात बघता आल्या. सिनेसंगीताची माझी जाण आणि कल्पना यांचं क्षितिज विस्तारत गेलं. याचं कारण म्हणजे या गोष्टीचं पंडितजींनी केलेलं विवेचन एकरेषीय नाहीये. ते अनेक सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांसकट येतं. आणि हे संदर्भ पडताळून बघताना त्या संदर्भांच्या प्रकाशात माझ्या डोळ्यावर असलेली अनेक झापडं गळून पडली. माझी बघण्याची दृष्टी आणि ऐकण्याचा कान दोन्ही समृद्ध होत गेले. भाषांतर करताना कित्येक वेळा चमकून थबकायला व्हायचं. लिहिलेला विचार नीट समजून घेताना असं लक्षात यायचं की, अरे, अशा दृष्टीनं आपण कधी विचार केला नव्हता. एखाद्या विषयाची नवीनच बाजू प्रकट व्हायची. कधी ऐतिहासिक माहिती मिळायची. कधी सामाजिक संदर्भात नवा पैलू समजायचा.

या संदर्भातली काही उदाहरणं सांगायची तर ‘मूकपटांच्या जमान्यातील नाद’ या लेखात ते लिहितात, व्यावहारिक गरजेचं अनौरस अपत्य म्हणून सिनेगीतांचा जन्म झाला. याची पार्श्वभूमी म्हणजे मूकचित्रपटांच्या जमान्यातले वादक/ गायक हे पहिले संगीत दिग्दर्शक, संवाद लेखक आणि उसना आवाज देणारे (प्लेबॅक सिंगर्स) होते. स्टॉक म्युझिक आणि कॅन्ड म्युझिकचं हेच उगमस्थान होतं.

‘सिनेगीताचा मोठा वाद’ या लेखात तर अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यांचं निरीक्षण आहे की, देशातलं उच्चभ्रू संगीत हे त्या देशातील आम जनतेचं संगीत असेलच असं म्हणता येणार नाही. देशातील उच्चभ्रू संगीत आणि आम जनतेचं संगीत, हे दोन संगीतप्रकार दोन संपूर्ण वेगवेगळ्या संगीत परंपरांचे घटक असणं अशक्य आहे. कारण कुठलीही सांगीतिक संस्कृती आज आपली मूळ वैशिष्ट्यं जशीच्या तशी टिकवून ठेवली आहेत असा दावा करू शकत नाही.

५०-६० च्या दशकात सिनेगीतात ऑर्केस्ट्रा खूप मोठा झाला. अनेक वेगवेगळी वाद्यं वापरली जाऊ लागली. त्यासंबंधीचं मर्म उलगडून दाखवताना ते लिहितात- कमी वेळात जास्त परिणाम, अशी श्रोत्यांची आणि ध्वनिमुद्रण सुविधेची मागणी असते, तेव्हा वादक, संगीतकार यांना अनेक आवाज, अनेक वाद्य वापरण्याकडे वळावं लागतं. ५०-६० च्या दशकात हेच झालं.

‘वाद्यांचं गायन’ या लेखातील त्यांची निरीक्षणेही अशीच मनोज्ञ आहेत. ते म्हणतात, वाद्य आपलं भौगोलिक ठिकाण आणि संस्कृती यात अडकून पडत नाहीत. नव्या घराला म्हणजेच नव्या देशाला आणि तिथल्या संस्कृतीला अनुकूल असे अनेक बदल, सुधारणा त्या वाद्यात घडून येतात. एखादं हवाई किंवा आफ्रिकन वाद्य भारतीय संगीतात जितक्या सहजपणे स्वीकारलं जाईल, तितका त्या संस्कृतीतील एखाद्या गायकाचा आवाज स्वीकारला जाणार नाही.

भारतीय सिनेमातील शास्त्रीय संगीत किती शास्त्रीय आहे याविषयी त्यांचा स्वतंत्र लेखच आहे. या लेखात ते लिहितात, तुम्ही निसर्गवाद, वास्तववाद, नववास्तववाद, अतिवास्तववाद घ्या किंवा तुम्हाला हवा तो वाद घ्या, यातल्या प्रत्येक प्रकारच्या सिनेमाचं चित्रण कॅमेऱ्यानं होतं हा प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेलेला एक पायाभूत संकेत आहे. सिनेमा बघताना असं कुणीही विचारत नाही की, अरे बाबा, हा कॅमेरा कुठून आला? तसंच विशिष्ट उद्देशानं रचलेल्या ध्वनिरचनेच्या बाबतीत देखील हे कुठून आलं, कसं आलं असं कोणी विचारत नाही. सिनेमाचा साऊंड ट्रॅकसंगीत म्हणून ऐकणं हा देखील एकसंकेत आहे.

ऐतिहासिक/पौराणिक चित्रपटातील कोणत्या गोष्टी आपण स्वीकारतो आणि कोणत्या स्वीकारू शकत नाही याचा ऊहापोह करताना ते एक निकष देतात, मोजमाप देतात. ते म्हणजे स्वीकृतीची सामाजिक सांस्कृतिक मर्यादा. या ज्या मर्यादा आपण घालतो, त्यामुळे सिनेमातली कुठली दृक, श्राव्य आणि कालिक अंगं आपण स्वीकारू शकतो हे कळतं. साहजिकच ही मर्यादा जितकी व्यापक तितकी आपली स्वीकृती अधिक खुली होणार. यावरून अलीकडचे काही वाद बघता ते किती भेदक समकालीन भाष्य करतात, हे आपल्या लक्षात येईल.

हे भाषांतर करतांना एक विलक्षण गोष्ट माझ्या लक्षात आली. मी लहान असतानाची गोष्ट. माझे वडील पंडित अण्णासाहेब थत्ते हे माझे तबल्याचे गुरू. त्यांचे गुरू उस्ताद अमीर हुसेन खांसाहेब. माझे वडील खांसाहेबांचे ज्येष्ठतम शागीर्द होते. आमच्या घरी खांसाहेब यायचे तेव्हा कधी कधी ते मला मांडीवर बसवून शिकवत असत. म्हणायचे, ‘बेटा ऐसे बजाव, ऐसे मत बजाव.’ अरुण खोपकरांनी मला शिकवलं आणि त्यांना भास्कर चंदावरकरांनी. भाषांतर करताना मला असं वाटत होतं की, पंडितजी मला शिकवताहेत. म्हणताहेत हे असं बघ, हे असंही बघता येतं. असा विचार करून बघ, जमतंय का.

भास्कर चंदावरकरांना मी कधी भेटलो नाही. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं देखील नव्हतं. पण हे भाषांतर करत असतानाच्या दीड-दोन वर्षांच्या काळात मला त्यांचा स्नेहल सहवास लाभला. त्यांच्या निकटच्या सहवासात हे दिवस आनंदात गेले.

.............................................................................................................................................

लेखक आनंद थत्ते मराठी-इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अनुवादक आहेत.

thatte.anand7@gmail.com

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4288

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......