मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे
ग्रंथनामा - आगामी
सुनील कर्णिक
  • सुनील कर्णिक आणि त्यांची सहा पुस्तके
  • Fri , 02 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी सुनील कर्णिक Sunil Karnik डिंपल पब्लिकेशन्स Dimple Publication

ज्येष्ठ पत्रकार सुनील कर्णिक यांची सहा पुस्तके ९ फेब्रुवारी रोजी डिंपल पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहेत. हा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, मुंबई इथे होत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही पुस्तके प्रकाशित होत आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे. यातील ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती असून बाकीच्या ‘‘महानगर’चे दिवस, ‘सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी’, ‘मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’, ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’, ‘म्हाताऱ्या बायका काय कामाच्या’ या पाच पुस्तकांची पहिली आवृत्ती आहे. या सर्व पुस्तकातील लेख वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. या पुस्तकांपैकी ‘मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’ या पुस्तकातील हे एक प्रकरण.

.............................................................................................................................................

मराठी साम्राज्याचा कर्ता शहाजी किंवा शिवाजी नव्हे, तर मलिक अंबर आहे, असा भालचंद्र नेमाडे यांचा दावा आहे. ‘साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण’ या नावाची त्यांची एक पुस्तिका लोकवाङ्मय गृहाने नुकतीच प्रकाशित केली आहे, त्यात ते लिहितात -

‘आपण जर अस्मिताच शोधायला गेलो तर आपली अस्मिता इंग्रजांच्या आधीसुद्धा शुलर्श्रीीर्ळींश, वेगळी हिंदू अशी नव्हती. म्हणजे त्याच्या आधी आपण हिंदूंना मेनस्ट्रीम समजतो ते खरं नाही. आपले सर्वात मोठे दोन सम्राट - अशोक आणि अकबर - दोघेही हिंदू नव्हते. खरा इतिहास पाहिला तर मराठा साम्राज्राची स्थापना कुणी केली असेल तर फार तर आपण शहाजीपर्यंत जातो. शहाजीच्या मागे जाणं आपल्याला परवडत नाही. कारण शहाजीच्या आधी मराठी साम्राज्याचा कर्ता मलिक अंबर असतो. मलिक अंबरने प्रथम मराठ्यांना राष्ट्रीयत्वाचं भान आणून दिलं. उत्तरेकडच्या ‘हिंदुस्थानी’ मोगलांविरुद्ध दखनी मराठे संघटित केले, गनिमी कावा पहिल्यांदा यशस्वी रीतीने शोधून वापरला. शहाजीसारखे सरदार तयार केले. खंडागळे विरुद्ध जाधव, जाधव विरुद्ध भोसले, दरोडेखोर, लुटारू आणि पुंड असे परस्परांशी लढणारे सगळे दखनी मराठे एकत्र करणारा मलिक अंबर महाराष्ट्राच्या आपल्या मध्यवर्ती संस्कृतीत धरायचा नाही? एवढे कृतघ्न जर ‘हिंदू’ या कोटीमुळे लोक झाले तर ही कोटीच आपल्याला नको. कारण इथे सत्याच्या आग्रहाचा प्रश्न येतो.’

नेमाडे यांच्या लेखनाची नेहमीची वैशिष्ट्यं (अत्यंत वाचनीयता, सुस्पष्ट आणि रोखठोक मुद्दे, नव्या माहितीची रेलचेल, वेगळा दृष्टिकोन आदी) तर या पुस्तिकेत आहेतच, पण विशेष म्हणजे जागतिकीकरणाच्या मुद्द्याला मराठी लेखक सहसा हात लावत नाहीत. त्याचं विच्छेदन नेमाड्यांनी इतक्या सुरेख रीतीने केलं आहे की त्यांना दाद दिल्याखेरीज राहवत नाही.

जागतिकीकरणाबद्दलची आपली भूमिका नेमाड्यांनी आरंभीच अगदी सोप्या शब्दांत मांडली आहे -

‘जगातल्या सगळ्या लहान-मोठ्या समाजांना स्पर्श करणाऱ्या जागतिकीकरणासारख्या राक्षसी प्रक्रियांमधून काही उपयुक्त गोष्टीही आपोआप होऊन जातात. विशेषत: परंपरेतून चालत आलेल्या कुचकामी गोष्टी या निमित्ताने आपण तत्परतेने फेकून देतो आणि याला केवळ निमित्त झालेल्या बाह्य -परक्या- शक्तींना याचं श्रेय इतिहासकार देतात! दुष्ट प्रवृत्तींवर मात करण्याची आंतरिक शक्ती सगळ्या परंपरांच्या गाभ्यात असतेच. ती फक्त काही तरी निमित्ताची वाट पाहत असते. इंग्रजी संस्कृतीतून आपल्या सुधारणा घडल्या नाहीत, तर इंग्रजी वसाहतवादामुळे आपल्या पोटातून सुधारणा निर्माण झाल्या, हे महाराष्ट्रात प्रकर्षाने घडल्याचं आपण पाहत आलो. अधिक मोठ्या प्रमाणावर आता जागतिकीकरण याच प्रकारे कार्य करील. मात्र आपण आपल्या देशी भूमिकेवरून इंग्रजी प्रभाव पचवला, तीच देशी भूमिका जागतिकीकरणातही लावून धरली पाहिजे. कारण अशा परक्या प्रभावांच्या रणधुमाळीत आपली भाषा आणि संस्कृती टिकवून धरण्याचं देशीयतेशिवाय दुसरं कोणतंही शस्त्र मानवी इतिहासात सापडत नाही.’

या जागतिकीकरणाची दोन गाजलेली उदाहरणं नेमाड्यांनी दिली आहेत. पहिलं आहे सालमन रश्दी या प्रसिद्ध लेखकाचं. ‘रश्दींचं डोकं उडवणाऱ्याला लाखो डॉलरांचं जे बक्षीस इराणी धर्मवेड्यांनी ठेवलं आहे... त्यामुळे बिचाऱ्याला पेपरांशिवाय आणखी कुठे तोंड दाखवण्याची सोय राहिलेली नाही. म्हणजे लेखकाच्या अस्तित्वावरच जागतिकीकरणाचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो हे यावरून दिसतं.’ असं नेमाड्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी दिलेलं दुसरं उदाहरण आहे गुजरात दंगलींचं. ‘जगभर व्यापारी जाळं असलेले हे गुजराती लोक कुठल्याही अर्थाने हिंदू किंवा मुसलमान नाहीत. पयंतु गेल्या काही वर्षांत जुनाट धार्मिक संघटनांनी जागतिक पातळीवर हे लोक बांधून त्यांना स्थानिक पातळीवर सुटं सुटं करून टाकलं. परदेशातून कोट्यवधी रुपये गुजरातकडे पोहोचतात, हे जसं कच्छच्या भूकंपात उघड दिसलं, तसं दंगे घडवणाऱ्या धार्मिक संघटनांना आर्थिक पाठबळही नक्कीच पोहोचलं असणार. सतत नमतं घेणारा हा समाज एकदम इतका हिंसक होऊ शकतो, याचं मूळ या स्थानिक एकोप्याची केंद्रं नाहीशी करून टाकणाऱ्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहे. जागतिकीकरणामुळे दूरदूरचे समाज जवळ येतात, हे अगदी खरंआहे. यामुळे अर्थात जवळजवळ नांदणारे समाज मात्र एकमेकांना दुरावतात. टीव्ही, इंटरनेट, कॉम्प्युटरांवर अमेरिका आणि आफ्रिका मला जास्त जवळ आली. पण शेजारच्या वस्तीचा माझा संबंध पूर्वी होता तितकाही राहू नये अशी ही अवस्था आली. यातून प्रचंड नरसंहाराची शक्यता निर्माण होते. गुजरातच्या दंगली या पूर्वीसारख्या तात्पुरत्या नक्कीच नसणार. त्या लवकर संपतील असं समजायलाही काही तार्किक पाठबळ नाही. फार काय, हा नरसंहार उद्या मुंबईत, कोल्हापुरातसुद्धा केव्हाही सुरू करता येईल. अशी परिस्थिती वाढत जाईल. बहुसांस्कृतिक समूहांनी एकत्र नांदण्याचं काव्य नव्या जागतिक लोंढामाध्यमांमुळे संपुष्टात आलं आहे.’

आजच्या प्रसारमाध्यमांमुळे प्रचंड फोफावलेल्या माहितीच्या कचऱ्याविषयी नेमाड्यांनी लिहिलंय, ‘तिकडे दूर काय चाललं आहे हे आपल्याला माहिती होणं, याच्याइतकी ज्ञानक्षेत्रातली दुसरी विकृती नाही... जागतिकीकरणाच्या गरजेतून येणाऱ्या या माहितीच्या कचऱ्यामुळे आपल्या जवळच्या गोष्टींचं ज्ञान असायची गरज उरली नाही. तिकडच्या विशेषत: अमेरिकेतल्या फॅशन्स, फॅड, सवयी, संगीत, रीतिरिवाज या गोष्टी कशासाठी माहिती हव्यात? उदाहरणार्थ, युरोडॉलरची माहिती अशासाठी हवी की, आपल्या रुपयाचं या नाण्याशी काय मोल आहे एवढ्यासाठीच. आपल्या गोष्टींच्या संदर्भातच तिकडच्या गोष्टी माहिती असणं जास्त आवश्यक आहे. सारांश, या सगळ्या माहितीच्या कचऱ्याने आपण आपल्याच भूमीतून परागंदा होतो, असं काही तरी घडतं. यातूनच मग खोटी राष्ट्रीयता जास्त मिरवण्याचे प्रकार सुरू होतात. आपण सोडून दुसरे समाज राष्ट्रप्रेमात कमी पडतात, असा भ्रम वारंवार निर्माण करणं भाग पडतं. मी माझ्या मुलाला कॉम्प्युटरच्या क्लासला घालायचं आणि गरीब दुष्काळी प्रदेशातल्या लोकांनी त्यांची अर्धशिक्षित मुलं लष्करात जवान म्हणून भरती करारची. मी फक्त राष्ट्रगीत मोठ्याने म्हटलं की माझी राष्ट्रीयता पक्की सिद्ध झाली. गरीब सैनिक तिकडे चकमकीत मारले गेले की ‘जरा आंख में भर लो पानी’ म्हणून मी गदगदून मोकळं व्हायचं.

राष्ट्रीयतेचं असं कॅथार्सिस करवून देणाऱ्या मोठमोठ्या समारंभांचं आयोजन, ढोंगी पद्धतीचे रिवाज आपल्यात वाढत चालले आहेत. आपल्या स्वार्थी वृत्तीवर राष्ट्रीयतेच्या कल्हया अधूनमधून देणं आवश्यक झालं आहे.’

आपले मुद्दे पटवण्यासाठी नेमाड्यांनी इतक्या छोट्यामोठ्या मर्मभेदक हकिगती सांगितल्या आहेत की त्या मुळातूनच वाचायला हव्यात. उदाहरणार्थ, ही एक करुण कहाणी वाचा -

‘दोन महिन्यांपूर्वी अहमदनगरहून भंडारदरा धरणाकडे आम्ही सुमती लांडे, रंगनाथ पठारे वगैरे एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. आणि त्या धरणाच्या पलिकडे काय आहे ते पाहावं असं आम्हाला वाटलं. आपण नेहमी समोरून धरण पाहतो. डोंगर वगैरे तिकडून दिसतात. लांबून आतपर्यंत पाहायला गेलो तर तिथे पायथ्याशी रतनगड किल्ल्याखाली एक वस्ती आहे. तिथे शंकराचं मोठं सुंदर देऊळ आहे. एके काळी ते शक्तिपीठसुद्धा असेल. तिथे आमची गाडी गेल्याबरोबर गावातले पाच-दहा लोक जमा झाले. एकाच्या अंगावर तापाने फणफणलेलं लेकरू होतं. तो त्या लेकराचा बाप आम्हाला काकुळतीने विचारत राहिला की, ‘तुमच्याकडे काही गोळ्या आहेत का?’ आम्ही विचारलं, ‘कसल्या गोळ्या? कशाकरता?’ तर ‘मुलाला ताप आलाय. इथे डॉक्टर नाही. सरकारी डॉक्टर कधी तरी येतो.’ घरी पुन्हा दुसरा मुलगा आजारी पडला होताच. औषधी नसल्या तरी समाधान म्हणून कसल्याही गोळ्या चालतील. आम्हाला अत्यंत लाज वाटली. सुमतीबाईंकडे चॉकलेटं होती तीच त्याने घेतली. आजारी मुलांसाठी. त्या गावात आजही डॉक्टर जात नाही. आणि हे कशामुळे झालं, तर नगर जिल्ह्यातले हे सगळे माजलेले साखर शेतकरी कारखानदार आहेत, त्यांना उसासाठी भरपूर पाणी पाहिजे होतं. त्यांच्यासाठी त्यांनी इथली संपन्न खेडी डोंगरात हटवून धरणाला जागा केली. मग तिथली शेती, जमिनी, कुरणं, सगळं धरणाखाली गेलं. विहिरी गेल्या. आता तिथे ना शेती, ना पिण्याचं पाणी, ना नळ, ना रस्ते, ना डॉक्टर, अशा गरीब लोकांच्या जिवावर आपलं आधुनिकीकरण करारला निघाले साखर कारखानदार. आपल्या दिखाऊ प्रगतीमागे अशी, आजारी मुलांना औषधं नसलेली अशी खेडी असतात.’

नेमाड्यांचं हे सुबोध, सुरेख पुस्तक हिंदी-इंग्रजीसह सर्व भाषांमध्ये अवश्य अनुवादित व्हावं इतकं मोलाचं आहे.

.............................................................................................................................................

मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १८० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4352

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

mahesh jore

Mon , 05 February 2018

या लेखात नेमाड्यांच्या पुस्तिकेतला मजकूरच ९५ टक्क्यांहून अधिक आहे. मग हे कर्णिकांच्या पुस्तकातले प्रकरण म्हणण्यापेक्षा नेमाड्यांच्या पुस्तिकेतले अंश म्हणायला काय हरकत आहे? कर्णिकांच्या अपुऱ्या समजेचे दर्शन घडवणारी पाच-सहा वाक्ये तेवढी मधे त्यांनी लिहिलेली आहे. अन्यथा नेमाड्यांचाच मजकूर जास्त.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......