मराठी पुस्तकवाल्यांचा मूळ पुरुष
ग्रंथनामा - आगामी
सुनील कर्णिक
  • सुनील कर्णिक आणि त्यांची सहा पुस्तके
  • Fri , 02 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी सुनील कर्णिक Sunil Karnik डिंपल पब्लिकेशन्स Dimple Publication

ज्येष्ठ पत्रकार सुनील कर्णिक यांची सहा पुस्तके ९ फेब्रुवारी रोजी डिंपल पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहेत. हा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, मुंबई इथे होत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही पुस्तके प्रकाशित होत आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे. यातील ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती असून बाकीच्या ‘‘महानगर’चे दिवस, ‘सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी’, ‘मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’, ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’, ‘म्हाताऱ्या बायका काय कामाच्या’ या पाच पुस्तकांची पहिली आवृत्ती आहे. या सर्व पुस्तकातील लेख वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. या पुस्तकांपैकी ‘सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी’ या पुस्तकातील हे एक प्रकरण.

.............................................................................................................................................

१८०५ साली पहिलं मराठी पुस्तक विल्यम कॅरे नावाच्या इंग्रज गृहस्थाने बंगालमधल्या सिरामपूर गावी छापलं, या घटनेला यंदाच्या वर्षी २०० वर्षं पूर्ण झाली. मराठी पुस्तकांच्या दृष्टीने ही द्विशतक स्मृती इतकी मोलाची आहे की, त्या निमित्ताने मोठा मराठी महोत्सव राज्यभर साजरा व्हायला हवा होता. दोनशे वर्षांतली उत्तम पुस्तकं वाचकांना उपलब्ध करून देण्याची ही चांगली संधी होती. पण आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी ज्या जुजबी पद्धतीने चालतात, त्याला साजेसंच मराठी ग्रंथनिर्मितीचं हे महत्त्वाचं वर्ष रुखंसुखं वाया गेलं. नाही म्हणायला नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय विभागातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘ज्ञानगंगोत्री’ नियतकालिकाचा एक भरघोस विशेषांक यानिमित्ताने लवकरच प्रकाशित होत असून, त्यात श्री. बा. जोशी, ग्रंथपाल एस. आर. गणपुले, लिपीकार र. कृ. जोशी, मुद्रणतज्ज्ञ अरुण नाईक यांच्यासह अनेक नामवंत अगत्याने सहभागी आहेत, ही एक आवर्जून नमूद करण्याजोगी गोष्ट आहे.

पण मुळात हा विल्यम कॅरे होता कोण? त्याने बंगालमधल्या सिरामपूर गावी, इतक्या जुन्या काळी मराठी पुस्तकं लिहिण्याचा आणि छापण्याचा खटाटोप कसा काय केला? ते पहिलंच पुस्तक ‘अ ग्रामर ऑफ द मऱ्हाटा लँग्वेज’ या नावानं, मराठी व्याकरणावरचं असावं, याचं नेमकं कारण काय?

ती सगळीच हकिगत अतिशय नाट्यपूर्ण, चित्तथरारक आणि लक्षवेधक तर आहेच; पण एखाद्या ध्येयाने झपाटलेली माणसं किती कर्तृत्ववान ठरू शकतात आणि विस्मृतीच्या पडद्याआडूनही त्यांच्या पराक्रमाचं तेज कसं झळाळून उठतं, याचा उत्कृष्ट नमुना म्हणून विल्यम कॅरेच्या आयुष्राकडे आपण जरून नजर टाकायला हवी. खरं म्हणजे केवळ मराठीत नव्हे तर संपूर्ण भारताच्या ग्रंथविश्वाच्या दृष्टीने विल्यम कॅरेचं काम इतकं महत्त्वाचं आहे की त्याचं चिरंतन स्मारक महाराष्ट्रात व भारतात सन्मानपूर्वक उभं राहायला हवं. पण एक तर तो इंग्रज होता आणि दुसरी (अधिक वाईट!) गोष्ट म्हणजे तो ख्रिस्ती धर्मप्रचारक होता - या दोन कारणांनी त्याची उपेक्षा आजवर चालू राहिली असावी. पण त्याच्या अफाट कामाच्या तुलनेत असल्या लटक्या सबबी फारच हास्यास्पद वाटतात.

सुदैवाने १८९५ साली प्रसिद्ध झालेला कॅरेचा अनुवादित चरित्रग्रंथ आज काही ग्रंथालयांत उपलब्ध आहे. प्रा. अ. का. प्रियोळकरांनी ‘द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया’ या आपल्या १९५८ सालच्या संशोधनपर ग्रंथात कॅरेची दखल विस्ताराने घेतली आहे; आणि अलिकडे प्रसिद्ध झालेल्या ‘संक्षिप्त मराठी वाङमयकोशा’च्या पहिल्या खंडातही कॅरेची छायाचित्रासह छोटेखानी नोंद प्रसिद्ध झाली आहे. अशा ठिकठिकाणी विखुरलेल्या माहितीच्या आधारे विल्यम कॅरे नामक एका ग्रंथप्रसारकाची जी विलक्षण झपाटलेली जीवनकहाणी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. ती इथे थोडक्यात सांगितल्याशिवाय राहवत नाही.

कॅरेचा जन्म इंग्लंडमध्ये १७ ऑगस्ट १७६१ रोजी झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने शाळा सोडली आणि तो शेतामध्ये काम करू लागला. पण त्याच्या प्रकृतीला ते काम झेपेना; तेव्हा त्याच्या वडलांनी त्याला एका चांभाराच्या हाताखाली नोकरी मिळवून दिली. हे चांभारकाम करत असतानाच त्याने मुलांसाठी शाळा सुरू केली, तसंच तो लॅटिन, हिब्रू आणि ग्रीक भाषा शिकला आणि चर्चच्या धार्मिक कामात रस घेऊ लागला. त्यातूनच पुढे त्याला मिशनरी म्हणून भारतात पाठवण्यात आलं.

भारतात तो ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम करू लागला खरा, आणि या कामाचा एक भाग म्हणून देशी भाषांमध्ये बायबलचा अनुवाद करण्याचं काम त्याच्यावर सोपवण्यात आलं. बंगालमधल्या सिरामपूर गावी राहून १८०० ते १८४३ या काळात त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने ग्रंथनिर्मितीचं आणि ज्ञानप्रसाराचं प्रचंड काम उभं केलं, ते थक्क करणारं आहे.

विल्यम कॅरेने बंगाली, उडिया, मराठी, हिंदी आसामी, कोकणी व संस्कृत या सात भाषांत देशी विद्वानांच्या मदतीने बायबलची भाषांतरं केली. परक्या देशात एखादी अनोळखी भाषा आत्मसात करणं हे मोठं अवघड काम असतं; पण कॅरेने त्या जुन्या काळीही सात भाषांवर प्रावीण्य मिळवलं होतं! त्याच्या संस्थेने चिनी-सिंहली भाषांसह एकूण बावीस भाषांतली पुस्तकं सिरामपूरमधून प्रसिद्ध केली. त्यासाठी त्यांनी लोहार शोधून लोखंडी टाइपांचे खिळे पाडले, देशातला टाईप तरार करण्याचा पहिला कारखाना उभा केला, चांगल्या प्रकारच्या कागदाचं उत्पादन करणारी कागद गिरणी सुरू केली, सर्व हिंदुस्थानात उत्तम असा ग्रंथसंग्रह जमवला, आणि केवळ धर्मप्रसाराची नव्हेत तर इतरही असंख्य पुस्तकं अत्यंत आस्थेने प्रसिद्ध केली! स्वत: कॅरे बंगालमध्ये शाळा चालवत होता; एवढंच नव्हे तर फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये बंगाली, संस्कृत आणि मराठी भाषांचा प्राध्यापक म्हणूनही काम करत होता! या कामासाठी त्याला दरमहा एक हजार रुपये मिळत आणि त्यातली बरीचशी रक्कम तो संस्थेला दान करत असे. १८०५ साली फोर्ट विल्यम कॉलेजातून मराठीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला गट उत्तीर्ण झाला. ते अर्थातच कॅरेचे विद्यार्थी होते.

या सर्व काळात स्वत:च्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात त्याला जो अपमान सोसावा लागला आणि त्याच्यावर जी संकटं कोसळली ती थरकाप उडवणारी आहेत. एकदा साथीच्या रोगात त्याचं पूर्ण कुटुंब आजारी पडलं आणि त्यात त्याचा छोटा मुलगा दगावला, तेव्हा त्याच्या अत्यंविधीसाठी स्थानिक माणसांनी मदत करण्याचं नाकारलं. या सर्व प्रकाराने कॅरेच्या पत्नीला वेड लागलं आणि तिला जन्मभर त्या अवस्थेत सांभाळणं कॅरेला भाग पडलं. तर १८१२ साली सिरामपूरला लागलेल्या भीषण आगीचं वर्णन त्याच्या चरित्रात पुढीलप्रमाणे आलेलं आहे -

‘या अग्नीने पुष्कळ टेप, कागद, छापलेली पुस्तके, ज्यास पुष्कळ वर्षे तयार करण्यास लागली असे हस्तलिखित ग्रंथ नाश पावले. ही आग तीन दिवस जळत होती. या आगीने सुमारे एक लक्षाचे नुकसान झाले. या अनर्थाचे वर्तमान विलायतेत कळल्याबरोबर तेथील लोकांस फार वाईट वाटले व पन्नास दिवसांच्या आत एक लक्ष रुपये वर्गणीने गोळा झाले.’

१ जून १८३४ रोजी, वराच्या त्र्याहत्तराव्या वर्षी सिरामपूरमध्येच त्याचं निधन झालं.

ज्ञानप्रसारासाठी झपाटून काम करणारी माणसं समाजाला किती मोलाचा ठेवा देऊन जातात याचं नमुनेदार उदाहरण म्हणून विल्यम कॅरे आणि त्याचं सिरामपूर गाव यांची कहाणी खरोखर विलक्षण आहे.        

(पूर्वप्रसिद्धी - ‘सकाळ : मुंबई मेट्रो’, २४ डिसेंबर ०५)

.............................................................................................................................................

सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १८० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4353

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......