आर्केओगिरी : एका परिपूर्णतेचा प्रवास
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
शुभा खांडेकर
  • ‘आर्केओगिरी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि त्यातील दोन चित्रं. लेखातील सर्व चित्रे ‘आर्केओगिरी’मधून साभार
  • Fri , 01 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama आर्केओगिरी ArchaeoGiri शुभा खांडेकर Shubha Khandekar

चित्रकला कौशल्याच्या सुमार दर्जामुळे तयार झालेली पोकळी पुरातत्त्वीय पुराव्याशी १०० टक्के इमान राखून असलेल्या समर्पक, नेमक्या कॅप्शन्सनी भरून काढली. आणि या भांडवलावर मी अभ्यासक्रम सुरू झाल्याच्या महिन्याभरातच माझे पहिले कार्टून फेसबुकवर टाकले! पुरातत्त्वज्ञांना हा approach अगदी नवीन होता. त्यांच्यात हास्याचे फवारे फुटले आणि माझ्यावर कौतुकाचा अक्षरशः पाऊस पडू लागला. आणखी कार्टून्स हवे अशी मागणी होऊ लागली. याने प्रोत्साहित होऊन मी दर शुक्रवारी एक नवीन कार्टून फेसबुकवर टाकू लागले. ‘गांधीगिरी’ किंवा ‘गुंडगिरी’च्या धर्तीवर ‘आर्केओगिरी’ हे नाव फेसबुकवर खुल्या मतदानातून सार्वमताने निवडले. चित्रांचा दर्जाही थोडाफार सुधारू लागला.ArchaeoGiri : A Bridge Between the Archaeologist and the Common Man’ या अभिनव पुस्तकाचा प्रवास कसा सुरू झाला, याची निर्मितीकथा सांगणारा लेख...

.............................................................................................................................................

‘आर्केओगिरी’ या संकल्पनेचे पहिले बीज माझ्या मनात नेस्पेरेन्नूब या तीस शतकांपूर्वी मरण पावलेल्या इजिप्शियन धर्मगुरूने रोवले.

नेस्पेरेन्नूबच्या मृतदेहाची, शुभ्र कापडाच्या ४० मीटर लांबीच्या पट्ट्यांमध्ये गुंडाळलेली ममी, सुसज्ज व अलंकृत अशा लाकडी शवपेटीत, लक्सर येथील एका पिरामिडमध्ये गेली सुमारे ३००० वर्षे शांतपणे विसावली होती. ही शवपेटी ब्रिटिशांनी १८९९ साली उचलून आणली व ब्रिटश म्यूझियममध्ये ठेवली. त्या काळी शवपेटी उघडून व त्यातील ममीवरच्या कापडी पट्ट्या उलगडल्याशिवाय आत काय आहे ते प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळणे शक्य नव्हते. पण असे केल्याने ती ममी कायमची नष्ट होत असे. हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावा कायमचा नष्ट होऊ नये यावर उपाय सापडला २००२ मध्ये. शवपेटीस बारीकसे भोक सुद्धा न पाडता, आतील ममी, त्यातला मृतदेह आणि इतर सर्व काही पूर्णपणे सुरक्षित ठेवून स्पष्टपणे पाहता यावे यासाठी म्युझियमच्या लोकांनी वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या CT Scan, supercomputing व 3D videography या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आणि नेस्पेरेन्नूबच्या शवपेटीवर पहिलाच यशस्वी प्रयोग केला. या कॅमेऱ्याने शवपेटीच्या बाहेर राहून आतले सुमारे १५०० scanned फोटो काढून, त्यांची व्यवस्थित जोडणी करून, मृत्युसमयी व ममी बनवतानाचा नेस्पेरेन्नूब बारीक सारीक तपशिलांसह हुबेहूब जगासमोर उभा केला. या अद्भुत, रोमांचकारी प्रयोगाबद्दलचा एक 3D चष्मा लावून पहायचा छोटासा माहितीपट, मूळ शवपेटी, त्यातील ममी व त्यातल्या माणसाची माहिती, शवपेटीवर सर्वत्र लिहिलेला मजकूर व त्याचा अर्थ, हे सर्व समजावून सांगणारा एक मार्गदर्शक वाटाड्या, भरपूर चित्रे, पोस्टर्स, audio visuals  अशा स्वरूपाचे प्रदर्शन ब्रिटिश म्युझियमच्या सहकार्याने मुंबईत प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियमने २०१२ मध्ये भरवले. त्यापूर्वी हेच प्रदर्शन जगभरात अनेक ठिकाणी फिरवण्यात आले होते.

या प्रयोगाने सप्रमाण दाखवून दिले की, चाळीशीच्या नेस्पेरेन्नूबचा एक दात किडका होता. त्याच्या कवटीला असलेल्या खड्डयावरून त्याला क्षयरोग किंवा ब्रेन ट्युमर झालेला असावा असा संशय होता. तसेच, मृत्युनंतर ममी बनवणाऱ्यांनी कसा हलगर्जीपणा केला आणि त्यावर झाकपाक करण्यासाठी काय जुगाड केला याचाही पुरावा दिसत होता. नेस्पेरेन्नूबच्या एकेका मणक्यात, प्रत्येक हाडाच्या पोकळीत शिरलेल्या या कॅमेऱ्याने त्याचे कोणतेही गुपित खाजगी राहू दिलेले नव्हते!

तंत्रज्ञानाचा हा जादुई वाटावा असा अविष्कार पाहून मी प्रभावित तर झालेच, पण बेचैनही झाले. कशामुळे त्यावर नेमके बोट ठेवता येईना. अशा संभ्रमित अवस्थेत जी कविता स्फुरली ती कागदावर उतरल्यावर त्याचा उलगडा झाला.

नेस्पेरेन्नूब

काल मी दिवसाढवळ्या राजरोसपणे उचकटले तुझ्या शवपेटीचे झाकण

. . . केले तुझे वस्त्रहरण

खेचली फराफरा लक्तरे तुझ्या लाजेची जपलेली तीन सहस्रके झाकून

पहिला तुला पापणी न लवता उघडानागडा

अधाशीपणाने चाचपला तुझ्या कवटीतला खिळा, दातातला किडा

ओरपली जखम तुझ्या हरवलेल्या हृदयावरची

चघळल्या इतःस्ततः विखुरलेल्या खपल्या तुझ्या चटकमटक

शिरले तुझ्या हाडात माझे निर्ढावलेपण

मणकानमणका खरा कि खोटा पहिला तपासून

हसले तुझा अंत्यसंस्कार करणाऱ्यांच्या हलगर्जीपणावर फिस्स्स्कन

पहिली तुझी स्वर्गाच्या दारातली अग्निपरीक्षा गारेगार एसीत खुर्चीत बसून

तुझी घालमेल, चलबिचल, तुझे स्फोटक मौन

आले बाहेर देऊन एक ढेकर संस्कारशून्य

उतरवला काळा चष्मा अन ढोसली कॉफी शांतचित्तानं.

त्याचाच सूड घेतलास काय रे?

का शिरलास तीन हजार वर्षांनी, चोरपावलांनी बुलडोझरच्या ताकदीनं

माझ्या मनांत, मेंदूत, हृदयात, रक्ताच्या हरेक थेंबात?

का वळवळतोस माझ्या असंख्य केसांच्या जाऊन मुळात?

का उभे करतोस त्यांना पुन्हा पुन्हा?

किती काळ राहणार आहेस इथे? कधी जाशील निघून?

नको जाऊस प्लीज. राहा इथेच कायमचा.

मला आवडलास तू.

आपण मृत व्यक्तीस नखशिखांत झाकून त्याच्या व जगाच्या मध्ये एक भिंत उभी करतो, त्याच्या dignityचा मान ठेवून त्याला ऐहिक सुख-दुःखांपासून मुक्त करतो, यापुढे तुला त्रास देणार नाही असे मूक आश्वासन देतो. आपापल्या समजुतींप्रमाणे अंत्यविधी करून त्याला कायमचा निरोप देतो. दहन-दफन करतो, श्राद्ध करतो, समाधीवर फुले ठेवतो. शांततेत विश्रांती घे असे सांगतो. नेस्पेरेन्नूबच्या बाबतीतही हेच घडले. पण शांततेत विश्रांती घेणे त्याच्या नशिबात नव्हते. त्याचा किडका दात, संधीवाताने वाकलेला कणा, गायब झालेले हृदय, सर्व अवयवांचे पोटाच्या पोकळीत कोंबलेले गाठोडे, अंत्यविधीत झालेल्या घोडचुका – सगळे वेशीवर टांगलेले. त्याला हे आवडले असते का?

पुरातत्त्वीय पुराव्याखाली दबलेला माणूस व त्याचा दडपलेला आवाज, हा किडा नेस्पेरेन्नूबने माझ्या मेंदूत सोडला.

पुरातत्त्व या विषयाशी माझा संबंध दिल्ली विश्वविद्यालयात प्राचीन भारतीय इतिहास या विषयात एम. ए. करताना आला. इतिहासाच्या या काळाच्या अभ्यासासाठी पुरातत्त्वीय पुराव्यांचा पुष्कळ आधार घ्यावा लागतो. पण इथे प्रचलित असलेल्या मार्क्सवादी विचारसरणीमुळे हे पुरावे दुर्लक्षित राहतात, याची कुठेतरी अंधुकशी जाणीव होऊ लागली. हे पुरातत्त्वीय पुरावे म्हणजे काय, या कुतूहलापोटी मी या अभ्यासाकडे वळले. एम. ए. झाल्यानंतर Archaeological Survey of India च्या School of Archaeology मधून एक वर्षाचा डिप्लोमा केला. या एका वर्षात रामायण प्रकल्पांतर्गत अलाहाबादजवळ शृंगवेरपुर या ठिकाणी उत्खननाचा अनुभव, दीड महिन्यांचा भारत दौरा, लेखी परीक्षा व practicals अशा भरगच्च अभ्यासक्रमातून खूप शिकायला मिळाले, विषयाच्या प्रचंड व्याप्तीची कल्पना आली. यातच पुढे काहीतरी करून पाहावे, करता येईल असा आत्मविश्वास वाटू लागला.

यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये पीएच.डी.साठी दाखल झाले. प्रो. म. के. ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इनामगाव येथील जगप्रसिद्ध उत्खनन प्रकल्पात सलग तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर काही अपरिहार्य परिस्थितीमुळे मला ही करियर सोडून द्यावी लागली. उपजीविकेसाठी काहीतरी काम शोधणे तातडीची गरज होती. चाळीस वर्षांपूर्वी व्याकरणशुद्ध इंग्रजी लिहिता येणे हे एखाद्या दैनिकाच्या संपादकीय विभागात डेस्कवर नोकरी मिळवण्यासाठी पुरेसे होते. ती मिळवायला मला काहीच अडचण आली नाही. पुढील तीसेक वर्षे मी विविध वर्तमानपत्रांत व इतरत्र लेखन-संपादनाचे काम केले, पण शेवटपर्यंत पोटार्थीच राहिले. तीन वर्षांत जो आत्मविश्वास मला पुरातत्त्वाने दिला होता, तो तीस वर्षांच्या पत्रकारितेतून मी कमवू शकले नाही.

Academics करू शकले नाही याची जखम खोल होती, वेदना तीव्र होत्या. अनेक वर्षे त्याबद्दल वाईट वाटत राहिले. पण आज असे वाटते की, हा राजमार्ग बंद झाल्यामुळेच मला ‘आर्केओगिरी’ची आडवळणाची पायवाट खुली झाली. पत्रकारितेतून वेगळे संस्कार घडले; नजरेचा फोकस समान्य माणसावर स्थिरावला व या दोन्ही प्रवाहांच्या संगमामुळे पुरातत्त्व व सामान्य माणूस यांना जोडणारा ‘आर्केओगिरी’ नावाचा सेतू मला बांधता आला. तीस वर्षांपूर्वी हुकलेली नव्या-जुन्या गुरुजनांची शाबासकी मिळाली. कोणताही precedent नसलेले नाविन्यपूर्ण काम केल्याचे समाधान लाभले. आणखी काय अपेक्षा ठेवावी माणसाने?

नेस्पेरेन्नूब मला भेटला त्याच्या चार-सहा महिने अगोदर मुंबई विद्यापीठात पुरातत्त्वाचा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवण्यात येतो व त्याचे वर्ग दर रविवारी असतात असे ऐकले होते. आनंदाने व उत्साहाने तिथे मी नाव नोंदवले. पीएच.डी. करून जर माझी रीतसर करियर झाली असती तर जे लोक माझे विद्यार्थी असते, ते इथे माझे शिक्षक होते! त्यांच्याकडून हा विषय पुन्हा नव्याने शिकून तीस वर्षांतले updates अधाशासारखे खाऊन पचवले. जुन्याची उजळणी झाली व कित्येक नवीन गोष्टी पाहायला, शिकायला मिळाल्या. दोन वर्षांचा हा काळ अतिशय आनंदात गेला. कित्येक जुने सहकारी, गुरुजन व मित्र-मैत्रिणी पुन्हा एकदा जोडले गेले, तरुण पिढीच्या पुरातत्त्वाज्ञांशी मैत्री झाली. तसेच, या सर्व संचिताचा व पत्रकारितेच्या संस्कारांच्या संयोगाने याच काळात ‘आर्केओगिरी’ने आकार घेण्यास सुरुवात केली. 

पत्रकार असताना डावी चळवळ, स्त्री चळवळ व पर्यावरणवादी चळवळीशी जवळचा संबंध आला. Practical काम कमी पण वाचायला भरपूर मिळाले. दिल्लीत शिक्षण घेत असतानाचा Marxist approachचा पाया भक्कम होता, त्यामुळे या चळवळी समजून घेण्यास मदत झाली. तीस वर्षांत गोळा केलेले हे गाठोडे घेऊन मी पुन्हा एकदा पुरातत्त्वाच्या अभ्यासवर्गात पाऊल टाकले. आणि मला वेगळेच काहीतरी दिसू लागले.

दैनिकांमध्ये काम करताना सर्वांत ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे वर्तमानपत्राचा सामान्य माणसावरचा अढळ फोकस. सम्राट अशोकाने अफगाणिस्तानपासून कर्नाटकापर्यंत व गुजरातपासून ओदिशापर्यंत उभारलेल्या शिलालेखांवर मोठमोठी पुस्तके लिहिता येतात व त्याला इतिहास अशी मान्यताही मिळते, पण वर्तमानपत्र हे mass media आहे, massesना वगळून वर्तमानपत्र काढता येत नाही. सामान्य वाचक हा पत्रकारितेचा पाया असतो व तो मेंटेन करावा लागतो. नव्याने पुरातत्त्व शिकताना मला ही तफावत प्रकर्षाने जाणवू लागली.

लोकचळवळीतला ‘लोक’ आणि mass mediaतला ‘masses’ हा कळीचा घटक पुरातत्त्वातून गैरहजर होता, त्याची अनुपस्थिती जाणवत होती, काहीतरी अपुरे आहे असे सतत वाटत होते. होती ती केवळ खापरे, नाणी, ताम्रपट, शिलालेख, मूर्ती, दागिने, अवजारे, विटा, विष्ठा . . .

पण हे सर्व इथे आले कसे? या सर्व वस्तू तयार करणारे व वापरणारे लोक, ते कुठे आहेत? ते या वस्तूंखाली दबलेले आहेत, त्यांचे आवाज दडपलेले आहेत, त्यांना मुक्त करा, बाहेर काढा, मोकळा श्वास घेऊ द्या, बोलू द्या, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या! असे काहीसे मंथन, बंडखोरी डोक्यात सुरू झाली, पुरातत्त्वीय पुराव्यात गाडल्या गेलेल्या सामान्य माणसाचा शोध सुरू झाला... आणि माझ्या हाकेला ओ देऊन अनेक माणसे मला खुणावू लागली, बोलवू लागली!

चोरपावलांनी मी इतिहास काळात प्रवेश करू लागले. रानावनांत, गल्लीबोळात फिरून लोकांचे निरीक्षण करू लागले. झाडाआडून, खांबामागून त्यांची कुजबुज, गप्पागोष्टी ऐकू लागले. त्यात गवंडी होते, सुतार होते, शिलालेख कोरणारे होते, शिकारी, व्यापारी, प्रवासी, कुंभार, सैनिक, न्हावी , बांधकाम मजूर होते...

स्त्रियाही मोकळेपणाने बोलत होत्या. सम्राट अशोकाने मांसाहार बंद करण्याचा फतवा काढला तेव्हा खानावळ चालवणाऱ्या एका माणसाच्या बायकोने त्याला काय सुनावले ते मी ऐकले. नवऱ्याला भंडावून सोडणाऱ्या एका हडप्पन बाईची कटकट मी ऐकली. सम्राट चंद्रगुप्ताच्या अंतःपुरात शिरून, त्याची महाराणी का रुसली ते पहिले आणि सम्राटाने तिची कशी मनधरणी केली ते ऐकले. मुलांनी अपेक्षाभंग केलेल्या बापांचा त्रागा ऐकला. चाकाचा शोध लावणाऱ्या माणसाच्या बायकोची प्रतिक्रिया बघितली. भारतात सासरी राहून कंटाळलेल्या एका सुकुमार ग्रीक राजकन्येची दर्दभरी कहाणी ऐकली. आर्यांच्या टोळ्यांनी सतत दोनशे वर्षे पुरातत्त्वज्ञांना कशी हुलकावणी दिली ते पाहिले. बाहेरून भारतात यावे की, भारतातून बाहेर जावे याबद्दलची त्यांची चर्चा ऐकली. कुठेतरी उनाडायला गेलेली एक नदी कशी एका कुटुंबवत्सल माणसाला गोत्यात आणते आणि बायको कशी मुलाबाळांसमोर त्याची कानउघाडणी करते हे मी (देवाशप्पथ, स्वतःच्या डोळ्याने) पाहिले! यातील काही माणसे धीटपणाने मला भेटू लागली, माझ्याशी बोलू लागली, माझ्याशी हितगुज, सल्लामसलत करू लागली!

सामान्य माणसांचा बराच गोतावळा जमला, त्यांचे अंतरंग कळू लागले. आश्चर्य म्हणजे, इतिहासाच्या पुस्तकांतून गायब असलेली ही माणसे हास्यविनोद करत होती, चेष्टा मस्करी, गंमतजंमत करत होती, दैनंदिन जीवनात विरंगुळ्याची साधने तयार करत होती. आता प्रश्न होता त्यांच्या या  मोकळेपणाला दाद देण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याचा. इथे माझ्या मदतीला धावून आली पत्रकारिता!

पत्रकारिता क्षेत्रात सामान्य माणसाचे सगळ्यात भक्कम प्रतिनिधित्व करणारा आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन हाच होता, याबद्दल दुमत असू नये. कुठेतरी ही लिंक जुळली आणि मला सापडलेल्या माणसांना वाचा फोडण्यासाठी कार्टून्स हेच योग्य माध्यम राहील, हा समज अभावितपणे मनात घर करू लागला. नकळत मी एका कार्टूनिस्टच्या भूमिकेत शिरले. माझे चित्रे काढण्याचे कौशल्य अतिसामान्य होते, पण मला सतत भेटणाऱ्या माणसांचे आवाज, त्यांचे जोक्स पुरातत्त्वाज्ञांपर्यंत पोचवण्यास मी अधीर झाले होते. वेड्या वाकड्या रेघोट्यांमधून ही माणसे मी कशीबशी उभी करू लागले. पाच-पन्नास रफ ड्राफ्टस फाडल्यानंतर एखादे छान नव्हे, पण भावना पोचवू शकेल असे चित्र तयार होऊ लागले. एका पाठोपाठ एक कार्टून्स मला सुचू लागली. चित्रकला कौशल्याच्या सुमार दर्जामुळे तयार झालेली पोकळी पुरातत्त्वीय पुराव्याशी १०० टक्के इमान राखून असलेल्या समर्पक, नेमक्या कॅप्शन्सनी भरून काढली. आणि या भांडवलावर मी अभ्यासक्रम सुरू झाल्याच्या महिन्याभरातच माझे पहिले कार्टून फेसबुकवर टाकले!

पुरातत्त्वज्ञांना हा approach अगदी नवीन होता. त्यांच्यात हास्याचे फवारे फुटले आणि माझ्यावर कौतुकाचा अक्षरशः पाऊस पडू लागला. आणखी कार्टून्स हवे अशी मागणी होऊ लागली. याने प्रोत्साहित होऊन मी दर शुक्रवारी एक नवीन कार्टून फेसबुकवर टाकू लागले. ‘गांधीगिरी’ किंवा ‘गुंडगिरी’च्या धर्तीवर ‘आर्केओगिरी’ हे नाव फेसबुकवर खुल्या मतदानातून सार्वमताने निवडले. चित्रांचा दर्जाही थोडाफार सुधारू लागला.

‘आर्केओगिरी’च्या वीसेक कार्टून्समध्ये स्त्रीवादी विचार किंवा सामान्य स्त्रीचा आवाज आहे. मोहम्मद गझनीवरचे कार्टून तर मार्क्सवादी विचारसरणीची थेट अभिव्यक्ती आहे. सोविएत रशियाची पडझड होत असताना सोविएत क्रांतीने प्रखर स्त्रीवादाला कसे दडपून टाकले आणि पुरुषांच्या सोयीच्या स्त्रीवादाचीच कशी पाठराखण केली याबद्दल eastern bloc मधील स्त्री कार्यकर्त्यांनी रान उठवले होते. प्रत्येक देशातून भरभरून लेख येत होते. पुरुष स्वतःच्याच सोयीसाठी स्वतःच्या एखाद्या कामगिरीला स्त्रियांचा विचार न करता क्रांतिकारक ठरवतो, हे ‘आर्केओगिरी’च्या नवाष्मयुगीन स्त्रियांनी दहा हजार वर्षांपूर्वीच ओळखले होते! इनामगावातला एक पुरुष, बुद्धिमान स्त्री आपल्या सोयीची नव्हे रे गड्या, अशी शिकवण त्याच्या छोट्या मुलाला देतो. अश्मायुगातली छोटीशी मुलगी मोठी झाल्यावर ती कोण होणार हे धीटपणाने सांगते. एक स्वयंपाक येत नसलेली हुशार सून आपल्या पुरातत्वज्ञ सासऱ्याला खुश करून सासूला शह देते. संपूर्ण महाभारत मुख्यतः पंजाब व आसपासच्या भागात घडलेले असताना महाराष्ट्रात जिकडे तिकडे ‘पांडव लेणी’ कशी काय आढळतात, याचा शोध ‘आर्केओगिरी’ घेते. बालसंगोपनात आजच्यासारखेच अश्मयुगातही नवरा-बायकोंचे खटके उडतात. या सर्व कार्टून्सना पुरातत्वीय पुराव्यांचा भक्कम आधार आहे आणि त्याचे संदर्भ देणारा मजकूर पुस्तकात दिलेला आहे.

पुराणातल्या देवादिकांच्या मिथक कथांना मात्र असा आधार नाही, तरी देखील ‘आर्केओगिरी’त त्यांचा समावेश केला आहे. त्याचे कारण असे की, अनेक तोंडाचा, हातांचा किंवा इतर अनैसर्गिक गुणविशेष असलेला देव जरी काल्पनिक असला तरी त्याची मूर्ती किंवा चित्र खरेखुरे वास्तव असते. देवाच्या त्या स्वरूपाची कल्पना करणारा व ती साकार करणारा कारागीर हाडामांसाचा माणूस असतो. ती मूर्ती देवाच्या नव्हे तर त्या कारागीराच्या अस्तित्वाचा डावलून टाकता न  येणारा प्रत्यक्ष पुरावा असतो. माणसाच्या कल्पनाशक्तीला शरण गेलेले देव ‘आर्केओगिरी’त हताशपणे आपली कैफियत मांडतात. गजाननाच्या भक्तीत पूर्णपणे बुडालेल्या भक्तांना ‘आर्केओगिरी’ निबिड जंगलात, हत्तींच्या कळपात घेऊन जाते. बुद्धावर सारखीच श्रद्धा असणारे दोन शिल्पकार आपापल्या शैलींद्दल बढाया मारतात.

सुमारे पंधरा लाख वर्षे पुरातत्त्व पिऊन पुरता झिंगलेला माझा कॉमन मॅन आता माझे ऐकेना. या बेवड्याला आवरण्याची ताकद माझ्यात नव्हती. भूतकाळातून फेरफटका मारून आता त्याला वर्तमानाचे वेध लागले होते आणि तिथे शिरकाव करण्यासाठी त्याने दारावर धडका देणे सुरू केले. दार फोडून माजलेल्या बैलासारखा सैराट सुटला आणि वर्तमानकाळात थैमान घालू लागला. सभा-संमेलनांत जाऊन पुरातत्त्वज्ञांना कानपिचक्या देऊ लागला. उन्नाओला जाऊन एका साधूच्या सांगण्यावरून खजिन्याचा शोध घेणाऱ्या पुरातत्त्वज्ञांची त्याने हजेरी घेतली. मोहेन्जोदडोची पोस्टरे पाहून चित्रपटगृहात घुसला व निर्माता-निर्देशकांचे वस्त्रहरण केले. देशाची फाळणी करणाऱ्यांना ‘वारशाची फाळणी कशी कराल?’ असा रोखठोक सवाल विचारला. अलीकडच्या सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीखाली फटाके फोडण्याचे सत्कर्मही त्याने केले... पण त्याचबरोबर प्रो. Walter Spink, डॉ शांती पप्पू व इतर महत्त्वाच्या पुरातत्त्वज्ञांच्या कार्याची ओळख वर्तमानकाळातील सामान्य माणसांना करून दिली. भूतकाळातले सामान्य लोक व वर्तमानकाळातले सामान्य लोक, यांचा एकमेकांशी परिचय करून देण्यासाठी हा खटाटोप केला.

या कार्टून्सचे संकलन करून, सोबत संदर्भ स्पष्ट करणारा मजकूर घालून पुस्तक काढावे, अशा सूचना पुरातत्त्वज्ञांकडून येऊ लागल्या, त्याची फलश्रुती या पुस्तकात झाली.

भारताचा ऐतिहासिक वारसा अतिशय समृद्ध आहे यात शंका नाहीच. त्याचबरोबर हेही खरेच की, भारतीय, विशेषतः हिंदू लोक भूतकाळाबद्दल जितके हळवे अन भावूक आहेत, तितके जगात कोणतेही लोक नाहीत आणि भूतकाळास इतक्या गांभीर्याने घेणे कोणासही आवश्यक वाटत नाही. ही भारतीय लोकांची खासीयत म्हणावी लागेल. बऱ्याचदा हा भूतकाळ त्यांच्या कल्पनेतला, त्यांच्या सोयीचा असा रम्य व गोंडस असतो. राजकीय हेतूने प्रेरित काही लोक हाच भूतकाळ किती वाईट व लाजीरवाणा होता हे सिद्ध करण्याचा आटापिटा करतात. या दोन्हींच्यामध्ये ऐतिहासिक सत्य पिचून जातं, लोप पावतं. या दोघांची हे मान्य करायची तयारी नसते की, इतिहास हा एक शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्याचा गंभीर विषय आहे आणि त्यासाठी परिश्रम, चिकाटी, अलिप्तता व academic प्रामाणिकपणा आवश्यक आहे. मृत व्यक्ती आज आपल्यासमोर येऊन त्यांचे म्हणणे मांडू शकत नाहीत, याचा गैरफायदा घेऊन त्यांना स्वतःच्या सोयीच्या रंगांमध्ये रंगवणे चुकीचेच नव्हे तर आपल्या देशात घातकही आहे, हे आजचे धडधडीत सत्य आहे. बॉलीवूड व टीव्ही मालिका इतिहासाचा अव्यावसायिक (unprofessional) गैरवापर करून आगीत तेल ओतण्याचे काम सतत करताहेत. जनसामान्य ऐतिहासिक स्थळांवर पिकनिकसाठी जातात व तिथल्या पुरावशेषांचीबिनधास्तपणे विटंबना करतात. त्यांचे जतन करण्यासाठी ना पैसा उपलब्ध आहे ना मनुष्यबळ, ना इच्छाशक्ती. हे सर्व कार्टून्सच्या माध्यमातून मांडण्याची संधी मला ‘आर्केओगिरी’मुळे मिळाली.

आर. के. लक्ष्मण यांनी ‘The Tunnel of Time’ या त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले आहे - "For a long time I believed I was providing the readers with some comic relief in their dreary humdrum existence. The bespectacled Common Man in his checked coat had walked into my cartoons spontaneously, as if I had no hand in his creation. Equally effortlessly he became a silent spectator of events. moving with ease from drought-stricken villages to the airport to watch foreign delegations arriving...

In the course of time I was surprised to discover that my readers looked upon me not merely as a cartoonist who tickled their sense of humour, but as a profound thinker, a social reformer, a political scientist, a critic of errant politicians and so on..."

‘आर्केओगिरी’ ही माझी एकटीची नसून सर्वांची आहे. म्हणून ‘आर्केओगिरी’ हा शेवट नसून सुरुवात आहे असे मला वाटते.

ArchaeoGiri : A Bridge Between the Archaeologist and the Common Man - Shubha Khandekar

Kaveri Books, New Delhi, Pages - 184, Price - 450 Rs.

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - अॅमेझॉन इन

.............................................................................................................................................

लेखिका शुभा खांडेकर यांनी तीस वर्षं इंग्रजी पत्रकारितेमध्ये काम केले आहे.

shubhakhandekar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......