जादुई वास्तववादी शैलीतल्या अदभुत, उत्कंठावर्धक कथा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
आनंद थत्ते
  • ‘तथाकथित’ या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 21 July 2017
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Shifaras तथाकथित विजय तांबे आनंद थत्ते मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

विजय तांबे यांचे ‘सहजतेच्या त्रासाची सुरवात’ आणि ‘ज्याचा त्याचा’ हे दोन कथासंग्रह यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. ‘तथाकथित’ हा त्यांचा तिसरा कथासंग्रह.

विजय तांबे हे गेली २०-२५ वर्षे सातत्याने आणि निष्ठेने कथालेखन करत आहेत. ते बहुप्रसवा लेखक नाहीत. त्यांच्या कथा चोखंदळ वाचकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. २००७ ते २०१२ या काळातल्या पाच दीर्घकथा या संग्रहात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या सर्व कथा ‘नवअनुष्टुभ’, ‘मिळून आपण सारे’ आणि ‘चौफेर समाचार’ या नियतकालिकांतून पूर्वप्रसिद्ध झाल्या आहेत. 

या सर्व कथांची रचना सर्वसाधारण कथांप्रमाणेच आहे. म्हणजे आरंभ, मध्य, उत्कर्ष, कळस आणि शेवटी त्याचे यथायोग्य विसर्जन. एखाद ठिकाणी केलेला फ्लॅशबॅक तंत्राचा वापर सोडला तर कालाची गुंतागुंतीची रचना, सरमिसळ दिसून येत नाही. आणि तरीही या कथा प्रयोगशील आहेत. मग या कुठल्या पातळीवर प्रयोगशील आहेत असा प्रश्न साहजिकच पडतो.

तांबे यांच्या आधीच्या दोन्ही संग्रहांतील कथा वास्तववादी शैलीत आहेत. या संग्रहात मात्र त्यांनी त्याच्याशी फारकत घेतली आहे. ‘भीतीचा मॉल’ ही कथा सोडली तर इतर कथांमध्ये ‘जादुई वास्तववाद’ (Magical Realism) या तंत्राचा/शैलीचा वापर करण्यात आला आहे. ‘जादुई वास्तववाद’ म्हणजे काय? तर कथेत एखादी घटना किंवा कृती ही वास्तव नसते. ती त्याच्या पल्याड जाते. ती विलक्षण असते, चमत्कृतीपूर्ण असते. यातुशक्तीने भारलेली असते. कल्पक असते. पण या घटनेमुळे होणारे बदल, क्रिया-प्रतिक्रिया या वास्तवातील इतक्या बारकाव्यानिशी येतात की, तो सर्व पट वास्तव जगातील आहे असे वाचकाला वाटायला लागते. आणि त्या संपूर्ण काल्पनिक, जादुई, अदभुत, ज्ञात वास्तवाबाहेरील घटनेचा वाचक एक वास्तव घटना म्हणून स्वीकार करतो. या जादुई वास्तववादी तंत्राचा/शैलीचा वापर अतिशय प्रभावीपणे या कथांमध्ये केला आहे.

वास्तववादाने मराठी साहित्यसृष्टीत गेल्या काही दशकांत अशी एक दहशत माजवली आहे की, चांगल्या साहित्याचा ‘वास्तववादी असणे’ हा (च) जवळजवळ एकमेव निकष होऊन बसला होता. या समजुतीला या कथा जबरदस्त हादरा देतात आणि कल्पिताचे/जादुई गोष्टींचे कथनात्मक साहित्यातील महत्त्व खणखणीतपणे अधोरेखित करतात. याबद्दल विजय तांबे यांचे अभिनंदन.

या सर्वच कथांमधला आणखी एक गुणविशेष म्हणजे त्यांची वाचनीयता. आता पुढे काय, ही ओढ लागून राहते. कथा वाचत असताना आपली उत्कंठा सतत वाढत जाते. ती एका परमोच्च बिंदूपर्यंत वाढत जाऊन अखेर विसर्जित होते. यामुळे कथांची वाचनीयता वाढते.

वर्णन, निवेदन, संवाद आणि भाष्य या निवेदनाच्या चारही पद्धतींचा यथायोग्य वापर करण्यात आला आहे. ‘उठ मुली, दार उघड’ या कथेची मागणी वर्णन या कथन प्रकाराची आहे. वर्णनात्मक कथनपद्धतीची एक मर्यादा म्हणजे ती सहजपणे पाल्हाळिक होऊ शकते.  आणि कथा रेंगाळू शकते. पण या कथेत तसे होत नाही. वर्णने जेवढी आवश्यक तेवढीच येतात. अत्यंत नेमक्या शब्दात आणि ताकदीने येतात. आणि म्हणून कथानकाच्या गतीला खीळ बसत नाही.

या कथांची कथाबीजे कशी वेगळी आहेत हे देखील पाहण्यासारखे आहे. एखादी विलक्षण न पेलवणारी विद्या एखाद्याला दान म्हणून मिळाली तर तिचे ओझे त्याला सहन होत नाही. त्या विद्येच्या विलक्षणपणामुळे, त्या असह्य भारामुळे त्याचे सगळे आयुष्यच कसे भरकटते याचे यथार्थ चित्रण ‘अखून’ या कथेत येते. ही कथा  अखेरीस इच्छा-मरणाच्या मुद्द्यापर्यंत आणून सोडते.

जारणमारण विद्या, करणी, मूठ मारणे इत्यादी काळ्या जादूच्या कृतींचा वापर  आपल्याला त्रास देणाऱ्या, आपले वाईट करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी, त्याचे नुकसान करण्यासाठी, त्याला वेदना देण्यासाठी, तळपट करण्यासाठी केला जातो हे सर्वश्रुत आहे. ‘तिठ्यावरचा तोडगा’ या कथेत एखादा सहृदयी माणूस या विद्येचा उपयोग करताना जे करतो त्याने आपण आश्चर्याने थक्क होतो. या कथेत आणखी एका तंत्राचा वापर केला आहे. कथेतला निवेदक कथा सांगता सांगता मधेच कथेची रचना, कथेचे रूप यावर भाष्य करतो. या तंत्रामुळे वाचक कथेच्या संमोहातून, त्यातल्या ताणतणावाच्या वातावरणातून बाहेर येतो आणि अलिप्तपणे विचार करू लागतो. एलिएनेशनचे तंत्र या कथेत चांगले वापरले आहे.

‘तथाकथित’ ही एक समर्थ, प्रदीर्घ रूपककथा आहे. आपल्या समाजाचा एक उभा छेद घेतला तर त्याला प्रतिरूप असे समांतर प्राणी /जंगल विश्व या कथेतउभे केले आहे. सामान्य माणूस, नेता, पुढारी होण्याची आणि सत्तेची  आकांक्षा असणारी दुसऱ्या फळीतली माणसे, कुठल्याही गोष्टीचे विक्रीयोग्य मालात रूपांतर करून पैसा कमावण्याची हाव असणारी माणसे, ही सगळी रूपे आपल्याला या कथेत बघायला मिळतात. उत्तम रीतीने रचलेली ही कथा अतिशय सूक्ष्म बारकाव्यानिशी निवेदकाने उभी केली आहे.

‘भीतीचा मॉल’ ही या संग्रहातील एकच कथा वास्तववादी शैलीत आहे. प्रत्येक बाबतीत मूल्यवर्धन (Value Addition) शोधणे, त्याचा हव्यास करणे, अगदी सामान्य बाबतीतदेखील स्वतःचे काहीतरी वेगळेपण असावे यासाठी आटापिटा करणे अशी वृत्ती मॉलसंस्कृतीने निर्माण केली आहे. त्याचे अगदी टोकाचे रूप आपल्याला या कथेत दिसते. इतके की इतर वेळी  बुद्धिवादी असणारी माणसे कुठल्या थरापर्यंत अंधश्रद्ध होतात याचे प्रभावी दर्शन या कथेत होते. अडचणी येऊन आपले दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये, भविष्यातील अनिश्चितता यांनी घाबरूनच तर माणसे अंधश्रद्ध होतात. आपले सगळे नीट व्हावे, त्रास होऊ नये यासाठी माणसे कशी टोकाची कृती करतात याचे दर्शन या कथेत होते.

‘उठ मुली , दार उघड’ या कथेचे कथाबीज गुंतागुंतीचे आहे. स्त्रीप्रधान व्यवस्थेतील पुरुषाचे वागणे पुरुषप्रधान व्यवस्थेतील पुरुषापेक्षा वेगळे असणार. त्या व्यवस्थेत ते नॉर्मल असते. पण पुरुषप्रधान संस्कृतीचे संस्कार असल्याने त्यातील पात्रांना ते समजून घेणे कठीण जाते. वाचकालाही हा धक्का आहे. स्त्रीवादी भूमिका हा कथाबीजाचा एक प्रमुख भाग आहे. अस्पर्श जंगलात माणसाने प्रवेश/अतिक्रमण करून त्याची वाताहात करू नये. पर्यावरणाचा समतोल बिघडवू नये. माणूस स्वतःच्या घमेंडीत निसर्गाला आव्हान देतो, तेव्हा निसर्ग त्याला प्रतिसाद देत नाही, पण जेव्हा ईर्ष्या नसते तेव्हा तो प्रतिसाद देतो. हा या कथाबीजाचा दुसरा महत्त्वाचा भाग. गूढरम्य निसर्गवर्णन आणि चमत्कृतीपूर्ण घटनांची रेलचेल असलेली ही कथा शेवटी ज्या वास्तवाचे भान देऊन जाते, ते फारच परिणामकारक आहे.

या कथांमधला निवेदक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो अत्यंत संवेदनशील आहे. आधुनिक विचारसरणीचा आहे. त्याचे सामाजिक भान सजग आणि तीव्र आहे. तो विज्ञानवादी आहे, तरीही त्याला अदभुताची ओढ आहे. इतकेच नव्हे तर तो अदभुतात रमणारा आहे. तो सामान्य माणसांच्या दुःखांकडे सहृदयतेने बघतो. समाजातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल तीव्र नापसंती असलेला आहे आणि या गोष्टी तो अतिशय बारकाव्यांनिशी नोंदवतो. स्त्री-पुरुष संबंधांची जाण आधुनिक आहे. मनोव्यापारांचे सखोल आकलन आहे. कल्पित आणि वास्तव यांची बेमालूम सरमिसळ करून जादुई वास्तववादाची शैली तो अनुसरतो.

अशा तऱ्हेच्या निवेदकाची निर्मिती हे विजय तांबे यांचे योगदान आहे. असा समर्थ कथासंग्रह दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

जाता जाता : विजय तांबे यांच्याकडून आता मी (आणि सगळे वाचक) कादंबरीची अपेक्षा करतोय! त्याबद्दल आगाऊ शुभेच्छा!

तथाकथित – विजय तांबे

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे
पाने - १९२ , मूल्य – २२० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3737

.............................................................................................................................................

लेखक मराठी-इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अनुवादक आहेत.

thatte.anand7@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......