आगामी नाटक वैश्विक आयाम देऊ शकणारं ठरू शकतं का नि त्यासाठी आपण आपला ‘शतकानुशतके चालत आलेला ‘कन्म्फर्ट झोन’ सोडू का, हा खरा प्रश्न आहे
कला-संस्कृती - नाटकबिटक
दत्ता पाटील
  • १ व २ जुलै रोजी श्रीरामपूर येथे झालेल्या ‘नव्वदोत्तरी मराठी नाटक : आशय आणि रूप’ या परिसंवादाच्या निमित्ताने एकत्र आलेले मराठीतील मान्यवर नाटककार, नाट्यसमीक्षक आणि लेखक. सर्वांत पुढच्या बाजूला लेखक दत्ता पाटील
  • Fri , 29 July 2022
  • कला-संस्कृती नाटकबिटक मराठी नाटक मराठी रंगभूमी विजय तेंडुलकर महेश एलकुंचवार सतीश आळेकर

सध्या तरी नाटक बघणाऱ्यांपेक्षा करणाऱ्यांची तीव्र निकड झालीये, असं चित्र दिसतंय. बघणारा वर्ग तसाही कायम मुंबई-पुण्यापुरता मर्यादित राहिलाय. इतक्या वर्षांच्या संक्रमणातून नाटक उर्वरित महाराष्ट्रात पोहोचण्याचं प्रमाण नगण्यच आहे. त्यामुळे ही प्रमुख शहरं वगळता अन्य शहरांमध्ये रंगभूमी ही संकल्पना अजूनही अतिशय भाबड्या पातळीवर आहे. छोट्या शहरात किंवा गावाकडे अजूनही ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ किंवा ‘नटसम्राट’च्या पलीकडे नाटक असतं, यावर विश्वास नाही. मराठी रंगभूमीवर वेगळी ठरलेली नव्वदनंतरची नाटकं मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांपलीकडे फार पोहोचलीच नाहीत. त्यामुळे या काळातील नाट्यलेखकांची नावं किंवा त्यांच्या कलाकृती या केवळ नाटक करणाऱ्या लोकांपलीकडे पोहोचलेल्या नाहीत. त्यावर चर्चाही फार घडताना दिसत नाहीत.

‘१९९०नंतरचे मराठी नाटक’ याविषयीचा हा लेख...

.................................................................................................................................................................

नाशिक जिल्ह्यातील चांदवडपासून अठरा किलोमीटरवर पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत खेडेगाव असलेलं आणि जागतिकीकरणानंतर शहरी जगण्याचे विविध तुकडे गावात आणून आज मोठ्या शहरी खेड्यात रूपांतरीत झालेलं एक गाव चौपदरी हायवेला खेटून वसलंय. त्या गावात साधारण सातशे वर्षे कलगी-तुरा ही लोककला परंपरा सुरू होती. सबंध परिसरात हे गाव कलगीतुऱ्यासाठी म्हणून प्रसिद्ध. गावात कलगीवाले आणि तुरेवाले हे दोन संप्रदाय होते. कलगी म्हणजे शक्ती आणि तुरा म्हणजे शिव. रात्र-रात्र हा खेळ चाले. सायंकाळच्या वेळी गावातल्या कुणा ग्रामस्थाचं निधन झालं, तर रात्री अंत्यविधी न करता सकाळी केला जाई. मग अशा वेळी त्या कुटुंबाला, नातलगांना रात्रभर ‘सोबत’ करण्यासाठी कलगीतुरेवाली मंडळी त्या घराच्या अंगणात वा शिवारात जायची आणि त्या शोकाला शक्ती आणि भक्तीमय कवनांची उंच लकेरीत गडद आध्यात्मिक लय द्यायची.

साधारण सारा देश जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर असताना आणि टीव्हीच्या आभाळभर सोडलेल्या लहरी पकडण्यासाठी गावातली तरुण आणि मध्यमवयीन सुशिक्षित मंडळी आपापल्या छतावरील अँटिना अधिकाधिक उंच नेण्यात व्यस्त होऊ लागल्याच्या सुमारास कलगीतुरेवाली मंडळी थकून संपू लागली होती. त्यांच्याकडील कवनांची हस्तलिखित बाडं अडगळीत जाऊ लागली होती. टीव्ही आणि नव्या रंगीत बाजारू संस्कृतीसाठी जागा करण्यासाठी घरातील वापरत्या वस्तू आणि परंपरा अडगळीत टाकण्याचं काम वेगानं चालू झालं. धुगधुगी असलेली कलगीतुरा परंपरा अखेरीस तीस वर्षांपूर्वी संपली.

तेव्हा साठ-सत्तरीत असलेली माणसंही गेली. शेती आणि कुटुंबसंस्थेत विखंडीकरण आलं. व्यापार आला. नव्या पिढीच्या हाती पैसा येऊ लागला किंवा पैसा येण्यासाठी नंतरची पिढी सतत व्यस्त राहू लागली. शहरी भौतिक जगण्याच्या ओढीतून मातीची घर काँक्रीटनं पोचारली जाऊ लागली. कलगी अथवा जागरण-गोंधळाच्या उंच लकेरींच्या अप्रतिम समूहगदारोळात गावच्या गल्लीगल्लीतून माणसात येऊन मजेत फिरणारे देव रथयात्रेनंतर आणि बाबरी पतनानंतर पुन्हा देवरूपात जाऊन नव्या माणसांनी नव्याने उभारलेल्या नवनवीन रंगीत मंदिरांमध्ये जाऊन बसले!

कलगीतुरा बंद झाल्याचंही कुणाला कळलं नाही. पण पाच वर्षांपूर्वी चमत्कार म्हणावा, अशी घटना घडली. जी जी घराणी या कलगीतुरा लोकपरंपरेत होती, तेथील नव्या शेतकरी पिढीनं स्थिरस्थावर होता होता चाळीशी ओलांडली आणि त्यातील एकानं स्वत:च्याच घरातील अडगळ काढत कलगीच्या कवनांची जीर्ण हस्तलिखितं शोधून काढली. धूळ झटकत त्या त्या घराण्यातील समवयस्कांना गोळा केलं आणि ठरवलं, की तीस वर्षांपूर्वी नष्ट झालेली ही गावाची कलापरंपरा पुन्हा सुरू करायची! आपापल्या शेती व्यवसायात कमालीचे व्यस्त झालेले असताना, हवं ते पुरेसं स्थैर्य प्राप्त झालेलं असताना आणि त्यानंतर आलेली संगणक युगातील नवी पिढी कमालीची बदललेली असताना हे उत्खनन का करावंसं वाटलं असेल त्यांना?

या परंपरेतून त्यांना पैसा नकोय, प्रसिद्धी नकोय किंवा काहीच हेतू नसताना दिवसभराची कामं आवरून सायंकाळी ही जीर्ण बाडं घेऊन लोप पावलेल्या चाली कधी बाहेर, तर कधी आपल्याच पेशीतून शोधत ढोलकी, तुणतुणे, खंजीरी, दिमडी घेऊन सिमेंट काँक्रीटच्या एखाद्या ओट्यावर बसून घरात सुरू असलेल्या रंगीत टीव्हीच्या आवाजावर मात करत २०१२-१३ या अतिशय आधुनिक काळात आपली लकेर पुर्वसुरींपर्यंत पोहोचवण्याचा हा अट्टाहास नेमका आहे काय?

ही परंपरा पुन्हा सुरू झाली आणि रात्री-अपरात्री निधन झालेल्या गावकऱ्यांच्या घराला, नातलगांना, स्नेह्यांना ती रात्र जागून काढण्यासाठी, ती रात्र भरभर पुढे जाऊन उजेड पडून अंत्यविधीपर्यंत सत्वर पोहोचण्यासाठी पुन्हा एक लय मिळाली. कलापरंपरांचं पुनरुत्थान करताना त्यांना नव्या संदर्भांसह पुढे घेऊन जाणं आणि जगण्याच्या लयीसाठी त्या परंपरांचा प्रसार करणं, हे ग्रामीण भागातील नव्वदोत्तर पिढीला कळतंय, ही फार महत्त्वाची सकारात्मक घटना आहे. कारण, विचार करता लक्षात येतंय की, आजच्या कमालीच्या शकलीकरणाच्या, भौतिक-वैचारिक भुलभुलैय्याच्या काळात जगण्याची लय हरवलीये आणि या उत्खननातून ती शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वरील ही केवळ एक घटना उदाहरणादाखल.

१९९०, २००० आणि २०१० या दशकात ज्या काही उलथापालथी झाल्यात अथवा सुरू आहेत, त्यात मराठी नाटकाचंही नेमकं काय झालं किंवा काय चालू आहे, याचा विचार करता नव्वदोत्तर काळात नाटक लिहिणाऱ्या पिढीमध्ये ते वरवर मान्य करत असतील वा नसतील, तरी वैचारिक गुंतागुंतीतून, अनाकलनीय गतीनं बदलणाऱ्या बाह्य स्थितीतून निर्माण झालेली जटिलता त्यांच्यात व्यापून राहिलेली आहे.

चित्रपट, टीव्ही वाहिन्यांनी, समाजमाध्यमांनी, इंटरनेटच्या जाळ्यानं एकुणातच बळकावलेल्या अवकाशात संवेदनशीलतेनं विचारपूर्वक ‘जागतिक’ नाटक लिहिणं, ही नाट्यलेखकांच्या दृष्टीनं अतिशय आव्हानात्मक बाब झाली आहे. या गदारोळात काही नाटककार परंपरागत कन्म्फर्ट लयीशी स्वत:चं लेखन बेमालूम कारागिरीतून साकारत जोडून घेतात, तर फार थोडे समकालातील अस्वस्थतेशी जोडून घेत अवगत असलेल्या परंपरागत लयीचा कन्फर्ट झोन आपल्या कलाकृतीतून झुगारत भाष्य करत राहतात.

आपण रंगभूमी म्हणून जी गोष्ट सातत्यानं बोलत असतो, ती पुणे, मुंबई थोडंफार नाशिक या परिघापुरती गृहित असते. बरेच नाट्यलेखक या शहरांमध्ये राहणारे असून, ते मांडत असलेल्या नाटक नावाच्या गोष्टींमधून समकाल कितीही आक्रमक किंवा धाडसाने किंवा प्रांजळपणे मांडत असले, तरी त्यांना संहितेतून त्यांना हवी असलेली ‘गोष्ट नीट सांगण्याची’ पद्धत नीट अवगत झालेली नाही, असे आवर्जून वाटते. गोष्ट सांगण्याची पारंपरिक किंवा नियमानं बांधील अशी कोणतीही पद्धत नसली, तरी ती सांगण्याची नवीन पद्धत तयार करण्याच धाडस फारच थोड्या कलाकृतींतून दिसतं.

पारंपरिक अडगळीतील लय अंगीकारणं, या कृतीकडे केवळ रोमँटिसिझम म्हणून हिणकसपणे न बघता त्यातून आपल्याला गवसलेली नवी समकालीन गोष्ट किंवा जुनी प्राचीन, पण समकालाला सहज भिडणारा प्रवाह निसर्गत: घेऊन आलेली गोष्ट मांडली, तर संज्ञापनातील अडथळे दूर होऊ शकतील, असे वाटते. नक्की माहीत नाही, पण नव्वदपूर्व काळ हा तत्कालीन नाट्यलेखकांसाठी ‘नाटककार’ म्हणून साधारण पुढील काही दशके स्थिरावण्याचा, प्रस्थापित होण्याचा काळ होता. नव्वदोत्तर लेखकांच्या पिढीमध्ये हा प्रस्थापित होण्याचा रोमँटिक विचार नसेलच, असे अजिबात नाही. परंतु, बदलत्या राजकीय, सामाजिक आणि एकुणच जागतिकीकरणानंतर भौतिक साधनांचं बोट धरून आलेल्या गुंतागुंतीच्या वैचारिक लाटेनं नव्वदोत्तर नाट्यलेखकांच्या वैचारिक शकलीकरणाला सुरुवात झाली.

एव्हाना विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’नं, सतीश आळेकरांच्या ‘महानिर्वाण’नं, महेश एलकुंचवारांच्या ‘युगान्त’नं, नंतर जयंत पवारांच्या ‘अधांतर’नं पुढील काही दशकांचा नाट्यलेखनाचा रस्ता कसा असेल आणि त्यास मिळणारा नाट्यगृहापलीकडचा प्रतिसाद कसा असेल, हे जणू अधोरेखित करून ठेवलंच होतं!

त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली. नव्वदोत्तर नाट्यलेखकांना समकालाशी भिडण्याचं चिंतनशील भान आणि बळही मिळालं. पुण्या-मुंबईत राहणाऱ्या या नव्वदोत्तर नवीन लेखकांना त्यांच्या त्यांच्या होडीसह या नव्या उसळत्या समुद्रात ढकलताना काठावर साक्षात ही सर्व ज्येष्ठ मंडळी खमकेपणानं उभी राहिली, ही बाब फार महत्त्वाची. (हे भाग्य या शहराबाहेरील गावाकडच्या नाट्यलेखकांना मिळालं नाही किंवा गावाकडे, छोट्या शहराकडे नवे नाट्यलेखक काय विचार करताहेत, याकडेही कथित मुख्य प्रवाहाचं लक्ष फार नव्हतं, हा भाग वेगळा.)

ही कृती करताना नव्या लेखकांनी ‘प्रस्थापित’ होण्याचा रोमँटिसिझम जराही बाळगू नये, ही अपेक्षा या थोर लेखकांची होती. कारण, हे स्वप्न पाहण्याची चैन येथून पुढच्या कमालीच्या गतिमान नव्या भासणाऱ्या गदारोळपूर्ण जगात कोणालाही परवडणारी नसेल, हे त्यांना माहीत असावं. मग नव्या लेखकांच्या या पिढीपैकी काहींनी बंडखोरपूर्ण सुरुवात करत, पुढे मात्र प्रेक्षकानुनयी प्रवाह निवडला. अर्थात, ते गैर आहे असं अजिबात नाही. कारण, सिनेमांचा भडिमार, टीव्हीची शेकडो चॅनल्स आणि सर्व काही एका क्लिकवर देणारं इंटरनेट, या करमणूक कोलाहलात मराठी नाटकापर्यंत खेचून आणणारे नवे प्रेक्षक ‘तयार’ करणं हेही त्यांना आवश्यक वाटलं. नाटक निर्मिती हा अपवाद वगळता व्यवसायाचा भाग राहिलेला नाही. नाटकं व्यवसाय करतात. पण नाटक करणं हा सरसकट व्यवसाय राहिलेला नाही. सध्या तरी नाटक बघणाऱ्यांपेक्षा करणाऱ्यांची तीव्र निकड झालीये, असं चित्र दिसतंय. बघणारा वर्ग तसाही कायम मुंबई-पुण्यापुरता मर्यादित राहिलाय.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

इतक्या वर्षांच्या संक्रमणातून नाटक उर्वरित महाराष्ट्रात पोहोचण्याचं प्रमाण नगण्यच आहे. त्यामुळे ही प्रमुख शहरं वगळता अन्य शहरांमध्ये रंगभूमी ही संकल्पना अजूनही अतिशय भाबड्या पातळीवर आहे. छोट्या शहरात किंवा गावाकडे अजूनही ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ किंवा ‘नटसम्राट’च्या पलीकडे नाटक असतं, यावर विश्वास नाही. मराठी रंगभूमीवर वेगळी ठरलेली नव्वदनंतरची नाटकं मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांपलीकडे फार पोहोचलीच नाहीत. त्यामुळे या काळातील नाट्यलेखकांची नावं किंवा त्यांच्या कलाकृती या केवळ नाटक करणाऱ्या लोकांपलीकडे पोहोचलेल्या नाहीत. त्यावर चर्चाही फार घडताना दिसत नाहीत. त्यामुळे तिथला प्रेक्षक नाटक समजून घेण्याच्या दृष्टीने शिक्षित झालाच नाही, असं विधान करता नाही येणार. कारण, खेड्यापाड्यात इंटरनेट आणि टीव्हीचं जाळं पसरलंय. त्याला यू-ट्यूबवर, गुगलवर हवं ते मिळू शकतंय. तो ते कशा पद्धतीनं घेतो, हा प्रश्न असू शकतो.

रंगमंचावरचं नाटक त्याच्यापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा दुबळी आहे आणि तरीही प्रयत्नपूर्वक पोहोचवलंच, तर तिथं नाटक सादरीकरणाला आवश्यक असणारी साधनसामग्री जवळजवळ नाहीच! मग रंगभूमीकडे व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून पाहणारे लेखक हे वर उल्लेखलेल्या शहरांपलीकडे घडले नाहीत. ते बव्हंशी नागरी व्यवस्थेतले किंवा खेड्यातून नगरात स्थलांतरीत झालेले आहेत.

तेंडुलकर, एलकुंचवार, सतीश आळेकर, श्याम मनोहर, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, जयंत पवार यांच्यापर्यंतच्या नाटककारांनी समग्र भानातून आपापलं एक सूत्र पकडत समाजाच्या जाणिवा तळापर्यंत ढवळून टाकण्याचं काम केलंय. मग आजची स्थिती काय आहे?

आजची बरीच नाटकं वरवर समाधानकारक, चैतन्याचा आभास निर्माण करणारी, परंतु गिमिकली, प्रेक्षकशरण आणि मंचीय क्षमता किंवा मर्यादांचा विचार करून लिहिलेली आहेत. सतत संशोधन करून, सामाजिक जाणिवेतून, माणूसपणाची चिकित्सक मांडणी करून, जबाबदारीनं समकालाचं, देशीवादाचं भान ठेवून लिहिणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. नावं घ्यायची झाली तर राजकुमार तांगडे, आशुतोष पोतदार, प्राजक्त देशमुख, अरुण मिरजकर यासारखे मुंबई-पुण्याच्या बाहेरील छोट्या शहरातून आलेले गांभीर्यानं सक्रीय प्रयोगशील, चिंतनशील लेखक प्रायोगिक रंगभूमीच्या ‘मुख्य प्रवाहा’त कार्यरत आहेत.

तरीही, ज्या प्रमाणात गावागावाकडून, छोट्या शहरांकडून कवितांचे तांडेच्या तांडे सर्वत्र येताना आपल्याला दिसतात, त्या प्रमाणात नाटक लेखनाकडे फार कुणी वळत नाही. याचं कारण नाटक हा मुळातच सामूहिक कलाप्रकार आहे. आपल्या जगण्याशी संबंधित प्रश्न अथवा आपलं सद्यस्थितीतलं जगणं गावाकडच्या नाट्यलेखकानं नाटकाद्वारे लिहिलं जरी, तरी त्यासाठी लागणारी साम्रगी आणि प्रशिक्षित तंत्रज्ञ, कलावंत यांची मोट बांधण्याची व्यवस्था त्याच्याकडे नाही! (छोट्या शहरात ती मोट बांधण्याचे प्रयत्न मात्र होतात, नाही असं नाही. पण ती मोट बांधणं काय जिकिरीचं असतं, हे जालन्याचे राजकुमार तांगडे, जळगावचे शंभू पाटील, कणकवलीचे वामन पंडित, नाशिकचा सचिन शिंदे, भुसावळचे अनिल कोष्टी यांना विचारा!)

गावपातळीवर अगदीच जत्रेत, स्नेहसंमेलनात केलंच कुणी, तर तेही फारच हौशी पातळीवर! त्यातून नाटकाबाबत अभिरुची समृद्ध होण्याची कणभरही शक्यता नाही. गावागावाकडे शाळा, विद्यालये किंवा महाविद्यालयात दरवर्षी काही घडत असेल, तर शहरातून नव्या सिनेमांच्या गाण्यांवर पाच वर्षांच्या मुलांपासून साठीतल्या महिला पुरुषांपर्यंत सर्वांना नाचायला शिकवणाऱ्या डान्सक्लासवाल्याकडून ‘गॅदरिंग’मध्ये नृत्याचे कार्यक्रम बसवून घेणे! त्यावर गावाकडच्याही एकेक शाळा किमान दीड-दोन लाख रुपये खर्च करताना हल्ली दिसतात! तेवढ्या झपाट्यानं शहरातलं नाटक मात्र गावाकडे पोहोचलं नाही. तेवढा खर्चही करायची श्रीमंत संस्थांची तिकडे तयारी नाही. बोहाडे, तमाशे जवळपास संपले आहेत.

आमच्या गावालाही टीव्हीवर रामायण सुरू व्हायच्या एक वर्ष आधी शेवटचाच बोहाडा झाला. त्यानंतर तो संपला. दरवर्षी गाणाऱ्या रामाचं पार्ट मनोभावे करणारा गोड गळ्याचा टेलर, सीतेचं पार्ट करणारा देखणा मारवाडी युवक, हनुमानाचं सोंग दणक्यात निभावणारा मुस्लीम वस्तीतला पठाण, तीन रात्र रोज पहाटेपर्यंत संबळ व पिपाणीवर शंभर प्रकार अथक वाजवत बोहाडा दणदणून टाकणारे वादक हे वारं एका क्षणात संपलं.

संबळवरच्या तालावरून आता कोणतं सोंग येतंय, हे न बघताही ओळखता यायचं. कारण, त्या संबळच्या तालांना राम, रावण, मायावी साधू, हनुमान, जांबुवंत, सुग्रीव, शूर्पनखा यासारख्या व्यक्तिरेखांची नावं कित्येक शतकांपासून दिली गेलेली होती, ते संपलं! पण पुढे काय? याची गावाकडेही फार पर्वा केली गेली नाही. कारण, तोवर जागतिकीकरणानं गावाकडची नवी पिढी उंदरांच्या शर्यतीत पळायला निघून गेली आणि उरलेली पिढी आपापल्या घरांच्या कच्च्या भिंतींवर चढून बाहेरून टीव्हीच्या अँटेना आकाशाला टेकवण्यात गढून गेली. काही मोजके लोककलाप्रकार शहरात गेले, त्यातून रंगभूमीला नवनवे आयाम मिळत गेले. परंतु, रंगभूमीचं अधिक केंद्रीकरण होत गेलं. (मला तर गावाकडून नाशिक शहरात शिकायला येऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर समजलं की, नाटक शिकवणारी महाविद्यालयेही असतात म्हणून!)

मुळात सांगायचा मुद्दा असा की, मुंबई-पुण्यानंतर नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर यासारखी शहरं वगळली तर, नाटक अन्य जिल्ह्यांमध्ये अगदी अभावानंच पोहोचलंय. तालुका पातळीवर तर काहीच नाही! मुळात नाटक कसं पहायचं असतं, इथूनच सुरुवात करावी लागणार आहे. जी काही कविता, कथा लिहिणारी गावाकडची मंडळी आहेत, त्यांनाही हे माध्यम लेखनासाठी कधी हाताळावंसं वाटत नाही. का नाही, याचाही शोध घेतला पाहिजे. अगदी मागे अतुल पेठेंनी गावागावांत ‘नाटकभान’ नावाच्या काही कार्यशाळा घेतल्या. तसे उपक्रम व्यापक स्वरूपात राबवले जाण्याची गरज आहे. नाट्यसाक्षरता सर्वत्र तयार झाल्याशिवाय प्रयोगशीलताही व्यापक होणार नाही. प्रयत्न सुरू नाहीत असं नाही. परंतु, त्यातून ‘पुढे जाणं’ घडत नाही, हा मोठा प्रश्न आहे.

महत्त्वाचा चिंतनीय भाग म्हणजे, नवीन लिहिणाऱ्यांमध्ये असलेला अभ्यासाचा अभाव आणि परफॉर्मन्सच्याच अनुषंगानं केलं जाणारं लेखन. अलीकडच्या काही ‘गाजलेल्या’ एकांकिका पाहिल्या, तर उगाचच भाषेत आणली जाणारी कृतकता, सतत काहीतरी ‘घडलंच’ पाहिजे, या हट्टातून केल्या जाणाऱ्या गिमिक्स, एकूण ‘विचारा’चा अभाव आणि संवादांना क्षणाक्षणाला दिलेला लाहीबाज तडका! विशेष म्हणजे प्रेक्षकांना शांतपणे परिणामकारक अनुभूतीच्या तळापर्यंत घेऊन जाणारं लेखन बाजूला ठेवत ऐकू येणाऱ्या जल्लोषाचा आणि सिनेमॅटिक मांडणीचा निकष लावत, अशा कलाकृतींना सर्वोत्कृष्ट ठरवणाऱ्या संयोजकांना, परीक्षकांनाही जबाबदारीनं नव्या रंगभूमीकडे पाहण्याची गरज आहे. नाट्यलेखन हा स्वतंत्रच आविष्कार आहे. तो दिग्दर्शकशरण नसायला हवा अथवा प्रेक्षकशरणही नसायला हवा.

गेल्या दशकभरात धार्मिक आणि जातीय उन्मादाच्या काळात एका अतिशय विचित्र संक्रमणातून आपण जात असताना समकालीन लेखकांचं या काळाकडे नीट लक्ष नाही. हे दुर्लक्ष जाणतेपणातून असेल, तर ते भ्रष्ट असावेत किंवा करमणूकप्रधान असावेत किंवा नाटक हे केवळ चार घटका करमणुकीचं साधन त्यांना वाटत असावं. हे दुर्लक्ष अजाणतेपणातून असेल, तर ही बाब त्याहून अक्षम्य आहे! माझ्यावर सातत्यानं सोशल मीडियातून, अन्य माध्यमांतून जातीय, धार्मिक आणि सांस्कृतिक उन्मादाचा भडिमार होत असतानाही मी नाटक लिहिताना या भडिमाराच्या परिणामातून ‘सेल्फ सेन्सॉरशिप’ लादून घेत रुचेल तेवढंच लिहीत असेल, तर ते अक्षम्य आहे.

समाजमनावर खोलवर परिणाम करून अनिष्टाविरुद्ध उभं राहण्याचं बळ देणाऱ्या नाटकांवर कायमच संस्कृतीरक्षकांचे, सत्तेचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हल्ले झाले. हे हल्ले करण्याची प्रवृत्ती मुळापासून बंद होईपर्यंत आणि ही वृत्ती पुन्हा कधीच उसळून येऊ नये, यासाठीही नाटक लिहित राहावं लागणार आहे. हे करताना आपल्याला छोट्या शहरांकडे, गावागावांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. सर्वकालीन पाणी टंचाईच्या प्रखर दु:खाला समकालीन एका पाणीटँकरपुरतं उत्तर घेताना सबंध आयुष्यच पणाला लावलेल्या संपूर्ण गावाचं एका रात्रीचं जगणं मी ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकातून मांडलं होतं. पाण्याचा टँकर प्रचंड संघर्षानंतर येणार आहे, ही बातमी मिळाल्यापासून ते प्रत्यक्ष तो टँकर येईपर्यंत त्याची गावाबाहेरच्या माळावर ३६ तास वाट पाहत बसलेल्या पन्नास घरांच्या गावाची ही गोष्ट, मी लहानपणी भोगलेल्या पाणीटंचाईतूनच आली आहे. या प्राचीन प्रश्नाला समकालीन उत्तर शोधण्याचा हा माझा प्रयत्न होता. मला वाटतं, हे सूत्र फार महत्त्वाचं आहे. हे उकरत राहणं, स्वत:ला उपसत राहणं फार महत्त्वाचं आहे.

नव्या नाटककारांनी हा एकूणातला बदल टिपणं गरजेचं आहे. त्यावर नाटक केलंच पाहिजे असं नाही. पण या बदलाकडे सूक्ष्मपणे पाहिलं पाहिजे. एकूणात आलेलं सध्याचं एकमेकांविषयीचं कमालीचं अविश्वासाचं वातावरण फार धोकादायक आहे. अत्याधुनिक विज्ञान युगाचे, सर्वसमावेशकतेचे कमाल गोडवे गात असतानाच अचानक सुरू झालेला सनातन कोलाहल नाटककारांना अव्हेरून चालणारच नाही. शेती, पाणी, भक्तीपरंपरेचे बदललेले आयाम, बदलती गावं, त्यातून समाजाचे बदलते स्वरूप, गावाकडील उद्ध्वस्त होत चाललेला किंवा केला जाऊ लागलेला कृषक समाज, त्याची विस्कळीत कुटुंबव्यवस्था आणि या सगळ्या प्रश्नांचे शहरांवर, महानगरांवर पडणारे प्रचंड प्रभाव आणि या प्रभावातून भिरभिर झालेला प्रचंड संख्येनं असलेला विखंडित वर्ग एका विशिष्ट छताखाली आणण्याचे सुरू असलेले प्रयत्न आणि या प्रयत्नांना मिळू लागलेले यश, या सगळ्या गदारोळातही माणसातील खोलवरच्या चांगुलपणाशी सुरू असलेलं पारंपरिक माणूसपणाचं सूक्ष्मसं संगीत - या सगळ्या भवतालाकडे दुर्लक्ष करून लिहिता कसं येईल? दुदैवानं या कोलाहलाकडे नव्या नाटककारांचं नीट लक्ष नाही! आणखी टाळाटाळ केली, तर पुढील दशकांना देण्यासारखं आपल्याकडे काहीच उरणार नाही.

प्राचीनतेतील कथित समृद्धीचे दाखलेच्या दाखले अचानक वर्तमानात दिले जाऊन आपलं वर्तमान आणि भविष्य त्याच प्राचीन कालबाह्य बॅकड्रॉपवर रचण्याची उत्सुकता असलेली यंत्रणा, जेव्हा त्यासाठीच जोरकसपणे कार्यरत असताना दिसू लागते, तेव्हा तुम्ही त्याच प्राचीनतेतून घेतलेली जगण्याची कसदार शाश्वत मूल्ये या गदारोळात हरवण्याची शक्यता वाढत जाते. अशा वेळी याच मूल्यांच्या आधारे तुम्ही घेत असलेला ‘वर्तमान नि भविष्याचा’ अदमास आणि त्यासाठी तुम्ही यार करत असलेल्या व्यवहार्य वाटा हे सगळंच धूसर व्हायला लागतं. आपण या क्षणी अशा धारदार पात्यावर उभे आहोत की, ‘तडक तिथून निघण्याचे’ वा ‘तिथंच वस्ती स्थापन करण्याचे’ - दोन्हीपैकी कोणतेही मनसुबे रक्तबंबाळ करणारे ठरतील.

अशा वातावरणात उद्याचं नाटक कसं असेल, उद्याचं गाणं कसं असेल, उद्याचं चित्र कसं असेल, कविता कशी असेल, कथा कशी असेल याचं चिंतन करताना आपण आजवर केलेल्या कामातून उद्याच्या या साऱ्या कलांचं स्वरूप कसं असेल, याचा अदमास घेण्याचा अधिकार आपणास आलाय, असं म्हणणं जरा धारिष्ट्याचं ठरेल. मुळात या कलांच्या भविष्यकालीन परिस्थितीचा अदमास घेताना वा त्यावर चिंतन करताना किंवा कसं असावं, या अपेक्षा ठेवताना गेल्या तीन ते चार दशकांपासून सुरू झालेला आणि ठाण मांडून बसलेला अंतहीन वाटणारा भव्य असा वर्तमान काळ आपल्या सभोवताली लांबलचक पसरलाय. आजचं नाटक असा विचार करतानाही मला चार दशकांचा नि पुढील काही दशके न संपू शकणारा हा ‘आज’ विचारात घ्यावा लागतो. हा जो तीन-चार दशकांचा स्थिरचित्त वर्तमान काळ आहे, तो अगदीच मुंगीच्या पावलांनी पुढे सरकतोय. म्हणूनच एकाच वेळी आपण अनेकविध पद्धतीच्या रंगभूमीशी जोडले गेला आहोत.

हा सगळा प्रचंड भव्य वर्तमान जोखताना, समजावून घेताना मागे मागे खोदत जावं, तर सध्याचा मरणकल्लोळ सारखा कानावर पडून पुन्हा पुन्हा वर्तमानात घेऊन येतोय. वाटायला लागतं की, तीसेक वर्षांत फार तर स्थिर राहण्याचे प्रयत्न होऊ शकतात, पण ‘पुढे’ फार जाता येत नसतं. पंचवीस-तीस वर्षे एका जागी स्थिर राहण्यासाठीही दमेदम होईस्तो वल्हे मारावी लागताहेत, इतका विरुद्ध दिशेचा प्रवाह वेगवान आहे. नाटककार म्हणून मला एक लखलखीत लिहून त्यावरच दिवस काढता येणार नाहीत. मला या काळाच्या प्रचंड अवरोधात किंवा निर्वातात ठाम स्थिर नि म्हणूनच एका निश्चित जगण्याची शाश्वती देणारी मानवी मूल्ये माझ्या कलाकृतीतून द्यावी लागतील. नाटकाशिवाय कवितेतून, गाण्यातून, हलगीतून, डफातून, कथा-कादंबऱ्यांमधून.

त्यासाठी मला काय करावं लागेल? मला १९९०पासूनचा अदमास घेताना १९९०पासून पुढे सतत नीट भान ठेवून ‘वर्तमानातच’ किंवा ‘समकालातच’ जगता आलं पाहिजे. आज कविता लिहितानाही माझ्या कवितेचा २०००मधील प्रारंभ हा समकालाचाच प्रारंभ वाटायला हवा. तो भूतकाळ म्हणून मला फेकता येणार नाही. मला ‘काय तीच तीच जुनी मढी उकरून काढता? नव्या जगाचं लिहा’ अशी कुणीही संभावना केली, तरी मानवाच्या निर्मितीपासून, बुद्धापासून, वेद पुराणांपासून, रामायण महाभारतापासून, चार्वाक, अशोकापासून, सातवाहनांपासून, ज्ञानोबा-तुकोबापासून, शिवाजीमहाराज, स्वातंत्र्यपूर्वकाळ, स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक, जातीय, वर्गवाद, धर्मवाद इत्यादी चळवळीपासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत विस्तारलेल्या काळाचा पट सतत ध्यानात ठेवला पाहिजे.

मुळात त्यामुळे वर्तमान काळाचा पैस खूप मोठा आहे. मागील पंचवीस किंवा पस्तीस वर्षांएवढ्या प्रचंड आकाराचा हा ‘आज’ आहे. (नाटकवाल्यांच्या वर्तमानाचा पसारा तर शंभर वर्षांहून अधिक असतो. नवीन येताना, नवं स्वीकारताना ही जुनी भिंत न नाकारण्याचं अनोखं वरदान मराठी रंगभूमीला लाभलंय. तिच्याबद्दल कमालीचं प्रेम, द्वेष, मतभेद, स्वीकार, नकार इत्यादी भावना एकाच वेळी नांदत राहतात.) त्यामुळे आजचं नाटक-उद्याचं नाटक, आजची कविता-उद्याची कविता, आजचं सांस्कृतिक विश्व-उद्याचं सांस्कृतिक विश्व यावर बोलताना, विचार करताना हा सुमारे तीन साडेतीन दशकांचा काळ विचारात घ्यावाच लागतो. महाराष्ट्रातील आगामी काही दशकातील सांस्कृतिक विश्व कसं असेल, हा विचार करताना मागील कोणतेही धागे तोडून टाकता येणार नाहीत.

उलट मला या मागील पंचवीस-तीस वर्षांनी आणखी मागे मागे काही शतकं, काही सहस्त्रकं किंबहुना पृथ्वीच्या निर्मितीपर्यंत खोदत जाण्याची ताकद द्यायला हवी, असा मी विचार करेन. खरं तर पृथ्वीच्या निर्मितीपासूनच्या सबंध काळाचा आजवरचा एक मोठा पट आत एखाद्या अवकाशासारखा कायमचा व्यापून राहू लागतो, तेव्हा वर्तमानात नाटक लिहिताना त्या रचनेस कालातीत आयाम मिळण्याच्या शक्यता वाढतात.

मला वाटतं आगामी काही वर्षात आपल्या सांस्कृतिक क्षेत्राला यशापयशाच्या पातळीवर वैश्विक आयाम मिळू पाहण्यासाठी दारं किलकिली होऊ शकतील. वैश्विक आयाम म्हणजे काय? आपली नाटकं परदेशात सादर होणं? आपली नाट्यपदं परदेशी जाऊन गाणं? परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय माणसांना रिझवणं? हे तर वर्षानुवर्ष सुरू आहे. परंतु, या पलीकडे जाऊन आपल्या जगण्यातून आलेल्या नाट्यरचना या जगातील प्रत्येकास त्यांच्याच जीवनशैलीचा, त्यांच्याच जगण्याचा, त्यांच्याच मानवी संस्कृतीचा सारांश वाटणं, हे जास्त महत्त्वाचं आहे.

कुठल्याशा प्रांतातील भाषा, रूढी इत्यादी ओलांडून एखादी कलाकृती जगातील प्रत्येक कानाकोपऱ्याला ‘आपली’ वाटू लागते, तेव्हा मानवी मुळाकडे, माणूसधर्माकडे जाण्याच्या तीव्र सूप्त इच्छेचे ते काही प्रमाणातलं फलद्रुपीकरण असतं. आपलं लेखन, आपली कला वैश्विक होणं फार कठीण. आजार मात्र हे पटकन् वैश्विक होतात आणि प्रत्येक राष्ट्रास हळूहळू ते आपल्याच जीवनशैलीचा भाग वाटून, ते त्यांच्या राष्ट्रातील शंभर वर्षांपूर्वीच्या रोगाच्या साथीच्या इतिहासावर चर्चा करू लागतात. मात्र सांस्कृतिक क्षेत्रातील योगदाने ही वैश्विक होण्यास काही शतके निघून जातात. आगामी नाटक वैश्विक आयाम देऊ शकणारं ठरू शकतं का नि त्यासाठी आपण आपला ‘शतकानुशतके चालत आलेला ‘कन्म्फर्ट झोन’ सोडू का, हा खरा प्रश्न आहे.

आपण जरा मागे जाऊन विचार करू. १९९० नंतर २००० नवे सहस्त्रक उगवताना नीट सेटल झालेला संगणक आणि टीव्ही हा आगामी पंचवीस वर्षात भारतीय जनतेच्या शरीर आणि मनाचा एक महत्त्वाचा अवयव बनणार, हे तेव्हाच निश्चित झालं होतं. संगणकीय एररमुळे सबंध जग ढवळून निघू शकतं, हे ‘वाय टू-के’ नावाच्या जागतिक समस्येमुळे तेव्हा उगवणाऱ्या नव्या पिढीच्या ध्यानात आलं होतं. पुढील अडीच दशकातलं जग प्रगतीचा आलेख उंचावतानाच दुसऱ्या बाजूला न भूतो अशा संकटांना सामोरे जाणार आहे, याची चाहूलही आपल्याला खरं तर लागली होती.

अमेरिकेतील ट्वीन टॉवरवरील हल्ल्यानं या सहस्त्रकातील पहिलं वर्ष सुरू झालंय. संगणक युग आणि विज्ञानातील स्तिमित करणाऱ्या शोधांमधून आयटीच्या युगाचा छोट्या शहरांपर्यंत प्रसार होऊ लागला होता. मोबाईल युगही तेव्हाच सुरू झाले. उच्च मध्यमवर्ग ठसठशीतपणे उदयास आला, ज्याच्या हातात मोबाईल फोन्स दिसू लागले.

एकूणच उत्कंठावर्धक सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवल्यावर पुढील कमालीच्या गतीला साजेसं राहण्याकरता नवी पिढी सज्ज झाली होती. हवेतून बरोबर आपल्याला शोधून मोबाईल खणखणवणाऱ्या किंवा पेजरची कंपणं कमरेला देणाऱ्या अंतराळातून येणाऱ्या अदृश्य लहरी आगामी दोन दशकांत सतत आपल्यावरच लक्ष ठेवून असतील, याची कुणकुणही लागली होती. त्या कुतूहलानं शहारून गेलो होतो आपण. दोन टॉवर्समध्ये विमानं घुसताना नि ते जागतिक व्यापार प्रगतीची उत्तुंग प्रतीकं असलेले डोलारे क्षणार्धात जमीनदोस्त होतानाही उगवत्या पिढीसोबत आपण नाटकातील माणसांनीही जमेल तितक्या वेळेला इंटरनेटवर पाहिलं. हे बघता येण्यानंही शहारून गेलो होतो आपण.

हे येणारं जग आपल्याकरता प्रचंड गुंतागुंतीचं असणार आहे, याचीही चाहूल लागली होती. या अशा अनिश्चित परंतु, तो विचार करायलाही फार फुरसत न देणाऱ्या कमालीच्या व्यामिश्र जगात आपलं पाऊल पडतंय आणि पुढील अडीच तीन दशके आपलं नाटक पर्यायानं सांस्कृतिक जग कमालीचं स्वरूप पालटलेलं असेल, याचा केवळ अदमासच तेव्हा घेता आला. नंतर नकळत आपणही सांस्कृतिक जगणं जगताना या प्रचंड गतीचा कधी एक भाग होऊन गेलो, कळलंही नाही. ही प्रचंड गती उच्च तंत्रज्ञानानं युक्त असेल, भरपूर गॅझेट्स असलेली असेल, जगातील प्रत्येकाला व्हर्च्युअली जोडून टाकलेली असेल, असं वरवर वाटलं असलं, तरी हे नवं तंत्र नाट्य क्षेत्रात महान क्रांती आणणारं ठरलंय की, कलागुणांच्या केवळ सहजसोप्या सुलभ प्रसाराचंच साधन ठरलंय? याचा विचार करता, आपलं खरं उत्तर आपल्याला मिळतं! यावरच आपलं उद्याचं नाटक कसं असेल, याचा अदमास घेता येऊ शकतो.

शेवटी हे सगळं नैराश्य, आजचं वातावरण यांना छेद देणारी एक पणती प्राचीन पडक्या मंदिरात तेवताना दिसते आहेच. तिच्याकडे पाहून वाटतंय की, पुढील तीन दशकातील आपलं नाटक या गेल्या अडीच-तीन दशकांच्या वाटचालीतून समंजस झालेलं असेल. आज भेदरून गप्प बसलेली सांस्कृतिक विश्वातील माणसं पुढे मात्र स्वत:ला, इतरांना, स्वत:च्या कलाकृतीला नि सत्तेला निर्भीड प्रश्न विचारणारी असतील. नव्या काळाच्या प्रचंड गतीतही एक वैश्विक स्थैर्य देता येऊ शकतं, याचं भान गवसलेलं असेल.

जातपात, धर्म यासह सर्व विषमतांना भेदून माणूसपणाच्या अंतिम सत्याकडे पुढच्या पिढीला या युद्धातूनही रस्ते शोधत घेऊन जाण्याचा आत्मविश्वास आपल्याला गवसलेला असेल. ‘धर्माधर्मातील माणूसपणाला जागवणारी चिरंजीव मूल्ये एकत्र होऊन तयार व्हावा विशाल प्रवाह,’ अशा आशयाचे संवाद, कविता लिहिण्याचं धैर्य एकवटायला सुरुवात झालेली असेल. थिएटर्समध्ये गजबजाट होऊ लागेल. नवनव्या कल्पनांवर रचलेल्या नाटकांचा, कथांचा थिएटरबाहेरच्या जीवनशैलीत रात्री निजताना सांगितल्या जातील नाटकातील सुरस गोष्टी. नव्या कोवळ्या पिढीला नि नाटकातील मूल्यांवर गप्पा झडायला प्रारंभ होईल. आगामी नव्या दशकसमूहांच्या भल्या सकाळी-वाटीभर साखर मागायला आलेल्या प्रत्येक शेजाऱ्याशी! कदाचित!

‘मुराळी’ मासिकाच्या जुलै २०२२च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......