‘फत्ते शिकस्त’ अर्थात ‘शायिस्तेखानाची फजिती’
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘फत्ते शिकस्त’चं पोस्टर
  • Sat , 16 November 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie फत्ते शिकस्त Fatteshikast चिन्मय मांडलेकर Chinmay Mandlekar मृणाल कुलकर्णी Mrinal Kulkarni

शिवस्वराज्याला बळकट करणाऱ्या मावळ्यांची कथा ‘फत्ते शिकस्त’ या सिनेमातून पाहायला मिळते. मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यासाठी ‘फत्ते शिकस्त’ असा शब्द त्या काळी वापरला जात असे. ऐतिहासिक घटना, लोककथा आणि आख्यायिका यांच्या मिश्रणातून तयार झालेला हा मनोरंजक सिनेमा आहे. शिवकालीन घटना पडद्यावर उभ्या करताना त्यातलं सर्वांत मोठं आव्हान असतं ते काळाचं! तो काळ पडद्यावर उभा करण्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना यश आलं आहे. सिनेमा सुरू होतो तेव्हाच दिग्दर्शक आपली सिनेमामागची भूमिका स्पष्ट करतो. त्यामुळे सिनेमा पाहताना केवळ मनोरंजन हा हेतू ठेवायला प्रेक्षक मोकळा होतो.

‘शायिस्तेखानाची फजिती’ हा इतिहासातील धडा सर्वांना माहीत असेल. त्याच घटनेचं चित्रण हा सिनेमा करतो. तत्कालीन पुणे शायिस्तेखानानं ताब्यात घेतलेलं असतं. गोरगरीब जनतेवर त्याचं सैन्य अत्याचार करत असतं. हळूहळू तो राजगडावर चाल करून येत असतो. त्यासाठी करतलब खान याला हजारो सैन्य देऊन राजगडावर चाल करण्यास सांगतो. मात्र शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यात खान फसतो. त्यामुळे शायिस्तेखान संतापतो आणि शिवाजी महाराजांना संपवण्याचे नवनवीन डाव पेच आखत राहतो. पण सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही सफल होत नाही. याच हतबलतेचा फायदा घेऊन शिवाजीमहाराज गनिमी काव्यानं लाल महालात घुसतात आणि शायिस्तेखानाला पळवून लावतात. ही या सिनेमाची कथा आहे.

सिनेमाची भव्यता टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ग्राफिक्स आणि सेटचा उत्तम उपयोग केला आहे. त्यामुळे गड किल्ले, घनदाट जंगल यांचं पडद्यावरचं चित्र गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतं. भाषेच्या अनुषंगानं केलेले बदलही उत्तम जुळून आली आहेत. हिंदी आणि मराठी या दोन भाषेतील संवाद कथानकाला पूरक ठरतात. सिनेमाचं कथानक एकाच घटनेभोवती फिरतं राहतं. मात्र कथानकाच्या प्रभावी सादरीकरणासाठी त्याचा बखूबी वापर केला आहे. परिणामी एका रंजक कथेचा चांगला प्रयोग पाहायला मिळतो.

प्रत्येक पात्र जेव्हा समोर येतं, तेव्हा त्याला एक पार्श्वभूमी तयार केलेली आहे. त्यामुळे तानाजी, कोयाजी अशा मावळ्यांची चित्रणं दिग्दर्शक पूर्वार्धात अचूक मांडत जातो. यालाच पूरक ठरणारा उत्तरार्ध सिनेमाची लयबद्धता टिकवून शेवटाकडे जाताना उत्सुकता निर्माण करत राहतो. त्यामुळे कथानकाची पकड घट्ट होत जाते.

बाजीप्रभू देशपांडे, बहिरजी नाईक, यसाजी, तानाजी, सर्जेराव, नेताजी, कोयाजी अशा शूर मावळ्यांचे धाडसी पराक्रम दाखवण्यासाठी अनेक लोककथांचा आधार दिग्दर्शकानं घेतला आहे. त्यामुळे सिनेमाचा गाभा या पराक्रमी मावळ्यांच्या धाडसी लढाया ठरतो. लाल महाल मध्यवर्ती असला तरी गराडखिंड, विसापूर, लोहगड, कासरखिंड, सिंहगड, पावनखिंड अशा काही ठिकाणांचा सिनेमात उल्लेख येत राहतो. त्यामुळे पुणे आणि पुण्याशेजारील शिवकालीन घडामोडींचा ओझरता इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो.

चिन्मय मांडलेकर यांनी शिवाजीमहाराजांच्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. मृणाल कुलकर्णी नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसतात. अनूप सोनी, समीर धर्माधिकरी, अजय पुरकर, अंकित यांनीही चांगलं काम केलं आहे. मृण्मयी देशपांडे लक्ष वेधून घेते. कॅमेऱ्याचा वापर काही दृश्यात अप्रतिम केला आहे. पात्रांची ओळख करून देताना कॅमेरा नावीन्यपूर्ण पद्धतीनं हाताळला आहे. परिणामी दृश्याची भाषा अधिक प्रभावी ठरली आहे. त्याचबरोबर संवाद शैली, संगीत, पटकथा आणि तांत्रिक बाबी यामुळे सिनेमा परिणामकारक ठरतो.

दिग्पाल लांजेकर यांचा ‘फर्जंद’नंतर आलेला ‘फत्ते शिकस्त’ ऐतिहासिक घटनांची मनोरंजक पद्धतीनं आठवण करून देण्यात यशस्वी होतो.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा

जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.......

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (उत्तरार्ध)

जिब्लीचे जवळपास सर्वच चित्रपट पाहून झाले आहेत, पण त्यांच्याविषयी वाटणारं आकर्षण काही कमी होत नाही. जिब्लीपट पाहिल्यानंतर त्या आकर्षणाला उधाणच आल्यासारखं वाटतं. एकदा पाहिल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि प्रत्येक वेळी पाहू तेव्हा नवीन काहीतरी पाहतो आहोत, असंच वाटतं. केवळ मनोरंजनासाठी एक उत्तम निवड ठरतेच, पण त्यात जे वैचित्र्य आणि जी अद्भुतता आहे, ती पाहताना आपल्यातली सौंदर्यदृष्टीही जागी होते.......