राहुल देव बर्मन : लयीवर इतकं प्रभुत्व असलेला संगीतकार हिंदी चित्रपटसृष्टीत आढळत नाही! 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अनिल गोविलकर
  • राहुल देव बर्मन
  • Sat , 26 October 2019
  • दिवाळी २०१९ Diwali 2019 गायक-संगीतकार Singer-Musician राहुल देव बर्मन R D Burman

असं नेहमी म्हटलं जातं की, मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही. मोठ्या झाडाची मुळं, ती वाढ रोखून ठेवतात. अर्थात याला काही अपवाद नक्कीच सापडतात, आणि जेव्हा असे अपवाद समोर येतात, तेव्हा त्यांची झळाळी ‘अलौकिक’ अशीच असते. राहुल देव बर्मन यांना हे उदाहरण अत्यंत चपखलपणे लागू होतं. किंबहुना असं म्हणता येईल की, राहुल देव बर्मन आपल्या पित्याच्या (सचिन देव बर्मन) दोन पावलं पुढे गेले आणि हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झाले! 

राहुल देव बर्मन यांच्या कारकिर्दीची सुरुवात वडिलांच्या हाताखाली होणं क्रमप्राप्तच होतं. असं बऱ्याच वेळा ऐकायला मिळालं आहे की, सचिन देव बर्मन यांच्या काही चाली राहुल देव बर्मन यांनी बांधल्या होत्या. उदाहरणादाखल एक अनुमान मांडता येईल. ‘जाने क्या तुने कही’ आणि ‘दिये जलते हैं, फुल खिलते हैं’, या रचनांचे लयबंध सारखे आहेत. आणखी अशीच काही उदाहरणं देता येतील. मुद्दा असा की, वडिलांच्या संगीतरचनांमध्ये मुलाचा सहभाग विशेष होता आणि हेच वैशिष्ट्य पुढे अधिक विस्तारानं सिद्ध झालं. 

राहुल देव बर्मनच्या यांच्या संगीताविषयी काही विश्लेषणात्मक विधानं करता येतील - 

१) ध्वनींद्रव्याचा विस्तारित पट : आपल्या संगीतरचनेसाठी कच्चा माल म्हणून सर्व ध्वनिविश्व उपलब्ध आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. याच कारणानं अनेकदा त्यांच्या रचनांतले महत्त्वाचे घटक म्हणून ध्वनिपरिणामही वावरतात. उदाहरणार्थ, ‘आओ ना, गले लग जाओ ना’ (मेरे जीवन साथी) या रचनेतील धातूचा त्रिकोण, हे वाद्य कौशल्यानं वापरलेलं आहे. तसंच ‘हरे रामा हरे कृष्णा’ या गाण्यातील ‘मादल’ वाद्याचा उपयोग. आणखी एक उदाहरण. ‘शोले’ चित्रपटातील ‘मेहबुबा’ या गाण्यातील ‘क्लेव्हज’ या कांड्याच्या वाद्याचा समर्पक उपयोग! याचा संकलित परिणाम असा झाला की, न-स्वरी म्हणता येणारी वाद्यं वा ध्वनिउगम याला राहुल देव बर्मन यांची खास पसंती असायची. 

दुसरा मुद्दा, सुस्कारे वा दीर्घ नि:श्वास, श्वसनाचा ध्वनी, जोरदारपणे येणारे निरनिराळे हुंकार, घशातले किंवा घुसमटलेले आवाज, आवाज फाटत फाटत येणाऱ्या आरोळ्या, निरर्थक ध्वनीचा मुबलक वापर, या सगळ्यांचं आपल्या सांगीतिक कल्पनांमध्ये तर्कशुद्ध स्वागत असून त्यांचा सढळ वापर केलेला आढळतो. उदाहरणार्थ, ‘सपना मेरा टूट गया’ (खेल खेल में) हे गीत एका अंगानं संवाद तत्त्वावर आधारलेलं आहे, पण तरीही गाण्याची गीतात्मकता राखली आहे. असं गाणं हिंदी चित्रपट संगीतात विरळाच आढळते. 

अर्थात दुसऱ्या बाजूनं बोलायचं झाल्यास एक महत्त्वाचा आक्षेप नोंदवला पाहिजे. सारे ध्वनी म्हणजे ‘विश्वची माझे घर’ या वृत्तीमुळे एकतर वडिलांच्या चालीचे नकाशे बिनदिक्कतपणे वापरणं आणि कौशल्यपूर्ण असलं तरी अगदी उघडंवागडं संगीतचौर्य. या बाबत जे आक्षेप घेतले जातात, ते मात्र साधार आहेत. एक वेबसाईट आहे, ज्यावर राहुल देव बर्मन यांनी कुठल्या पाश्चात्य गाण्यावर आधारित हिंदी गाणं रचलं आहे, याचे ढळढळीत पुरावे आहेत! 

२) परिणाम साधणं हेच पहिलं उद्दिष्ट : तत्काल म्हणजे महत्त्वाचं वा अर्थपूर्ण संगीत विधान करण्याआधीच परिणाम साधणं, याला सर्वांत पहिलं महत्त्व होतं! बहुदा याच विचारापायी राहुल देव बर्मन यांनी तारतेच्या ध्वनिपरिणामावर लक्ष केंद्रित करून संगीत रचना मार्ग थोडा सुकर करून घेतला. अतिउच्चस्वरी गायन आणि आघातपूर्ण ठळक लयबंध यांच्याशी त्यांचं संगीत निगडित आहे, हे प्रथम मान्यच करायला हवं. ‘द ट्रेन’, ‘कारवाँ’, ‘अपना देश’, ‘शालिमार’ इत्यादी चित्रपटांतील वातावरण अशाच ध्वनींनी भरलेलं आहे. परिणाम साधणं याच वृत्तीत बहुदा ‘हे विश्वची माझे घर’ याचा आढळ सापडतो. याचाच दुसरा भाग म्हणजे, रागदारीत गाणी बांधताना रागतत्त्व बाजूला सारणं. चाल महत्त्वाची आणि त्यासाठी मग काहीही प्रयोग करायला मागे-पुढे न बघणं.  

३) अनेक पातळ्यांवर होणारी संगीतरचना : त्यांच्या संगीतशैलीचा आणखी एक बारकावा म्हणजे अनेक वेळा रचनेचे लयबंध समोर न येता गीताच्या गतीतून प्रत्ययाला येतात. उदाहरणार्थ, ‘चुनरी संभाल गोरी’ (बहारो के सपने), ‘चुरा लिया है तुमने’ (यादों की बारात) अशा गीतांत लय प्रत्ययाला येते, ती शब्दांच्या घनतेमुळे… चरणाला किंवा छंदाला मिळणारी गती अबाधित राहिल्यामुळे. 

स्वरसंहती तत्त्वावर आधारलेल्या भारतीय संगीतासारख्या पद्धतीत एका वेळेस एक स्वर व एकानंतर दुसरा, असं पायाभूत वळण असतं. या लक्षणास कमी-अधिक प्रमाणात पण निश्चितपणे बाजूला सारण्यात आलं. ‘दैया ये मैं क्या कहू’ (कारवा) या गीतामध्ये मोजक्या वाद्यांद्वारा नेमक्या मात्रांचा, पण भारतीय न वाटणारा लयबंध समोर ठेवला जातो. मुखडा प्रथम ‘सा’ स्वरावर, नंतर ‘पंचम’ स्वरावर आणि मग ‘ल, ला’ इत्यादी निरर्थक ध्वन्यक्षरांसहित सादर होतो. पुढे काही आरोळ्या ऐकायला मिळतात. जरी कडवं बदललं तरी सुरावट तशीच राहते. परिणाम असा की, सुरावटीतील बदल जाणवतो. भारतीय संगीतशास्त्र ‘षड्ज-पंचम’ भावाला फार महत्त्व देतं, पण तरीही असा वापर विरळाच ऐकायला मिळतो. 

४) साधी, गुणगुणण्यासारखी गाणी : ‘घर आज घिर आये’ (छोटे नवाब), ‘शर्म आती है मगर’ (पडोसन) ही या प्रकारची उत्तम गाणी आहेत. कमालीची नाजूक, मृदुमधुर म्हणता येणारी रचनाशैलीदेखील त्यांनी आत्मसात केली होती. ‘बिती ना बिताई रैना’ (परिचय), ‘नाम गुम जायेगा’ (किनारा) किंवा ‘दो नैना और’ (मासूम) ही आवाहक रचना स्वरधुनीचा भार न होता उभी केली आहेत. अशा प्रकारच्या गाण्यात राहुल देव बर्मन यांनी कवीच्या कवितेला आणि आशयाला जरादेखील धक्का लावलेला नाही, पण तरीही चाल बांधताना तालाचा वैविध्यपूर्ण उपयोग केलेला आढळतो. जेणेकरून गाण्यात नावीन्य आढळेल.

हिंदी चित्रपट संगीतात पारंपरिक ताल वापरताना किंवा पाश्चात्य ताल वापरताना प्रचंड वेगळेपण आणलेलं दिसतं. आणि तदनुषंगानं बोलायचं झाल्यास राहुल देव बर्मन यांच्यासारखा कालस्तरावरील लयीवर इतकं प्रभुत्व असलेला संगीतकार हिंदी चित्रपट संगीतात आढळत नाही (रेहमान जमेस धरून!) 

५) शास्त्रोक्त संगीत : आतापर्यंत आपण जी चर्चा केली, त्यावरून हा संगीतकार शास्त्रोक्त राग-ताल पद्धतीला धरून रचना करील, ही कल्पनाच अवघड आहे. मात्र असं लक्षात येतं की, विशिष्ट रागचौकटीपासून दूर सरकूनदेखील रंगाचं एकसंधपण आपल्या चालीस देण्याची प्रशंसनीय क्षमता त्यांच्याकडे होती. ‘रैना बिती जाये’ (अमर प्रेम) ही रचना या संदर्भात ऐकावी. एकप्रकारे राग जणू सारा वेळ पार्श्वभूमीवर तरळत राहतो, पण त्याला राग म्हणून स्वातंत्र्य दिलं जात नाही. मुखडा ‘गुजरी तोडी’ रागावर तर अंतरा ‘खमाज’ रागावर आहे, पण तरीही गीत म्हणून त्यात कुठेही बाधा येत नाही. ‘रोझ रोझ डाली डाली’सारख्या रचनेत राग यमन आणि ताल त्रिताल वापरून शास्त्रोक्त राग सादरीकरण आहे, परंतु संयमित भावनावेग आणि फक्त आविष्कृत शास्त्रोक्त बाज थोडासा पातळ करून चांगला कामी लावला आहे. 

६) जनसंगीताच्या प्रकारांना दिलेली नवीन रूपं : जनसंगीतकोटीतील काही प्रकारांची संगीत रूपं आपल्या रचनांमधून नव्यानं निश्चित करत होते का? ‘आओ ना, गले लग जाओ’ हे प्रेमगीत आहे, पण यातून नाजूक, मृदू भावना व्यक्त होते असं म्हणणं अवघड आहे. ‘सपना मेरा टूट गया’ हे अश्रू कोंडणारं गीत असेल अशी अपेक्षा निर्माण होते, पण प्रत्यक्षात संगीत आणि संगीत आविष्कार यांचं हुशार सूचन करणारं, संवादात्मक, उद्गारवाचक यांनी सजलेलं सादरीकरण आहे!

‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ (इजाजत) या गाण्यात त्यांच्या प्रयोगशीलतेचा आणखी एक पैलू अधोरेखित होतो. संबंध कमकुवत होत आहेत आणि स्मृती प्रबळ होत आहेत, यांचं अंतर्मुख कथन, या गाण्यातून सादर होतं. सुरावट सरळ जातं, पण लयबंध तिरकस जातो. म्हणूनच ही रचना आपल्याला अस्वस्थ करते. खरं तर ही अप्रतिम कविता आहे आणि जर कविता म्हणून वाचन केलं तर त्यातील आशय अतिशय संदिग्ध आहे. वास्तविक अशी शब्दरचना गाण्याच्या दृष्टीनं अवघड म्हणावी लागेल, परंतु तरीही त्यातील सांगीतिक शक्यता धुंडाळून संगीतकारानं सुंदर गीत सादर केलं आहे. 

एकंदरीत राहुल देव बर्मन यांचं संगीत रचनाकाराच्या संभवनीय सर्जनशीलतेच्या दर्जाविषयी खात्री पटवणारं आहे. त्यांची संगीत संवेदनशीलता आधुनिक वाणाची होती. भारतीय कलासंगीतापासून दूर जात असताना पुन्हा पुन्हा त्या परंपरेकडे वळून बघणारी होती!

.............................................................................................................................................

लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.

govilkaranil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......