‘मानसिक आघात समजून घेताना’ हे डॉ. वृषाली राऊत यांचे पुस्तक आजच्या काळात महत्त्वाचे ठरते, कारण ते आपल्याला ‘आपल्या शत्रूं’ची ओळख करून देते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
रवि आमले
  • ‘मानसिक आघात समजून घेताना’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 18 August 2025
  • ग्रंथनामा शिफारस वृषाली राऊत Vrushali Raut मानसिक आघात समजून घेताना Manasik Aghaat Samajun Ghetana

आजूबाजूला मी माणसे पाहतो. घरात पाहतो. स्वतःही अनेकदा डोकावतो. आणि मग लक्षात येते की, आपण सारेच जखमी आहोत. जखमा मनावरच्या आहेत. काही आपण जपलेल्या. काही आपणहून झालेल्या. काही घाव दुसऱ्यांनी केलेले. काही वार तर असे की, ते का, कुणी, कसे हेच समजत नाही. अखेर राहते ते फक्त सोसणे.

अनेकदा हे सोसणे अडाणी, आंधळे असते. काय झाले आहे हेच समजत नसते. मुळात आपल्याला काही झाले आहे, हीच समज नसते. तेव्हा मग त्यावर काही उपाय असू शकतात, याची जाण असणे दूरची गोष्ट. हे अधिक वेदनादायी. अशा वेळी मेंदूचे यातनाघर होते. माणसे कोलमडतात, मोडून पडतात. आज अशी अनेक माणसे आपल्याभोवती आहेत. त्रासलेली, सुन्नावलेली, दबलेली, कोलमडलेली. काही त्या मार्गावरची. त्या मार्गावरचे टप्पे वेगवेगळे असतील. तीव्रता वेगवेगळी असेल, पण मानसिक व्यथा-वेदना, दुःख सोबतीला घेऊनच बहुसंख्य लोक जगत आहेत.

डॉ. वृषाली राऊत यांचे असेच झाले होते. कॉलेजात असताना, पुढे नोकरी करताना झालेल्या आघातांनी कोलमडून पडल्या होत्या त्या. पण मग सावरल्या. त्यांच्या शिक्षणाने, ज्ञानाने त्यांना सावरले. उभे केले. मोठे केले. आणि मग त्यातून आकारास आले त्यांचे ताजे पुस्तक - ‘मानसिक आघात समजून घेताना’.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आघात, इंग्रजीत ‘ट्रॉमा’. महामार्गांच्या कडेला दिसतात ती ‘ट्रॉमा केअर इस्पितळे’. अपघातात झालेल्या जखमांवर इलाज होतात तेथे. पण त्या असतात शारिरीक जखमा. मनावर झालेल्या जखमांचे काय? जीवनाच्या वाढलेल्या द्रुतगतीने मानसिक अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे.  ताणतणाव तर पाचवीला पुजलेले. साधे कामावर जायचे म्हटले तरी रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, बस-रेल्वेतील मरणाची गर्दी यांचा ताण.

अशात झालेली एखादी मानसिक जखमही जगण्याचा तोल बिघडवून टाकू शकते. एखादा धक्का मन-मेंदूची शतशः शकले करू शकतो. आणि सध्याच्या नकारात्मकतेने पछाडलेल्या वातावरणात या अशा धक्क्यांच्या, आघातांच्या शक्यता अधिक वाढलेल्या आहेत. तशा घटना आपल्याबाबत घडू शकतात, आपल्या प्रिय व्यक्तींबाबत घडू शकतात. अखेर आपल्या साऱ्यांचेच जगणे आज युद्धग्रस्त आहे.

युद्ध कोणतेही असो. त्यात समोर शत्रू कोण हे माहीत असणे आवश्यक असते.

सहाव्या शतकात सन त्सू नावाचा एक चिनी युद्धनितीज्ञ होऊन गेला. तो सांगतो, ‘‘आपण कोण आहोत आणि आपला शत्रू कोण आहे, याची ओळख तुम्हाला असेल; तर शंभर लढाया झाल्या, तरी त्याच्या परिणामांची चिंता करण्याचे कारण नाही. पण तुम्ही ना स्वतःला ओळखत असाल, ना शत्रूला जाणत असाल, तर मात्र प्रत्येक युद्धात तुमचा पराजय ठरलेलाच.’’

डॉ. वृषाली राऊत यांचे ‘मानसिक आघात समजून घेताना’ हे पुस्तक आजच्या काळात महत्त्वाचे ठरते, कारण ते आपल्याला आपल्या या ‘शत्रूं’ची ओळख करून देते.

मानसिक आघात म्हणजे नेमके काय, त्यांची कारणे, त्यांचे प्रकार, त्या-त्या आघातांना आपला मेंदू देत असलेला प्रतिसाद, त्याचे मन आणि देहावर होणारे परिणाम यांची तपशीलवार शास्त्रीय माहिती हे पुस्तक आपणांस देते. आघाताप्रमाणेच शोक - ग्रीफ - हा मन कुरतडणारा मोठा रिपू. त्यापासून कोण वाचले आहे? सर्वांनीच कधी ना कधी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि तरीही ‘शोकांतिका’ ही की, हा शोकही आपल्याला नीट माहीत नाही.

गमावलेपणाच्या भावनेतून निर्माण होतो तो. त्या गमावलेपणाचे कलंकित (स्टिग्मटाईज्ड), धूसर वा अस्पष्ट (अँबिग्युअस), पूर्वानुमानी वा आगाऊ (अँटिसिपेटरी), वंचित (डिसएन्फ्रॅंचाईज्ड) असे प्रकार. या प्रत्येक प्रकाराची कारणे भिन्न आहेत. दुःख, राग, भीती, चिंता, गोंधळ, बधिरता, कृतज्ञता, आशा, ईर्ष्या, संताप, चीड, निराशा अशा विविध भावना त्यातून निर्माण होतात.

डॉ. राऊत सांगतात, शोक हा केवळ भावनिक नसून, तो शारीरिकसुद्धा असतो, हे आता सिद्ध झाले आहे. झोपेतील बदल, मायग्रेन, डोकेदुखी, अपचन, पाठदुखी, ऊर्जेतील बदल, सांधेदुखी, स्नायुदुखी अशा तक्रारी शोक असणारी व्यक्ती अनुभवते. थकवा, वजन वाढणे वा कमी होणे, मानसिक तणाव इथपासून विसरभोळेपणा, चित्र एकाग्र न होणे, अशा विविध समस्या शोकग्रस्त व्यक्तीस ग्रासतात. त्यांची तीव्रता वेगवेगळी असेल. त्यास दिला जाणारा प्रतिसाद वेगवेगळा असेल, पण तो असतो.

आपली माणसे आपली न राहणे वा आपल्यात न राहणे, या गोष्टी कोणास टळल्या आहेत? कधी आपल्या माणसांना मृत्यू ओढून नेतो, कधी परिस्थिती. कधी विरहाची व्यथा, कधी व्यभिचाराने दूरता. ज्यांच्या छातीतले हृदय धडधडत नसते, त्यांची गोष्ट निराळी. एरवी शोकाचा भोग प्रत्येकाच्याच वाट्याला येतो. त्याचा सामना तर करावाच लागतो. तो कसा करायचा, हे या पुस्तकातून समजते. विशेष म्हणजे हे केवळ पुस्तकी ज्ञान-विज्ञान नाही. ते ‘आधी सोसले, मग सांगितले’ अशा प्रकारचे आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

डॉ. वृषाली राऊत या मान्यवर समुपदेशक आहेत. अनेकांना त्या आधार देतात, त्यांच्या जगण्याला उभारी देतात. त्यांचे यापूर्वीचे ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ हे पुस्तक, त्यांचे ‘अक्षरनामा’वरील विविध लेख यांतून त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. पण काही वर्षांपूर्वी त्यांनाही मानसिक आघातांनी जखमी केले होते. शोकाने कोलमडून पाडले होते. हे सारे त्यांनी अत्यंत मोकळेपणाने या पुस्तकातून मांडले आहे.

वयाच्या विशीत होत्या त्या तेव्हा. त्या काळात वडिलांची नोकरी तडकाफडकी जाणे, अत्यंत प्रिय अशा लहान मामाचा अकस्मात मृत्यू, अशा काही घटनांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. मायग्रेनचा त्रास सुरू झाला. त्यातून शिक्षणावर परिणाम झाला. आत्मविश्वास हरपला. हसणे हरवले. आनंद संपला. ‘आयटी’ क्षेत्रातल्या नोकरीवर परिणाम झाला. वैयक्तिक आयुष्यात काही धक्के बसले… घसरवाटा अनेक होत्या. त्यावरून अवघ्या जीवनाची ‘चित्तरकथा’च व्हायची त्यांची, पण न घसरता त्या सावरल्या.

त्या काळात त्या मानसशास्त्राच्या विद्यार्थी होत्या. पुढे त्यातच त्यांनी पीएच.डी. केली. पण तेव्हा त्यांना मानसिक आघाताचा, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर - पीटीडीएस-चा जो त्रास होत आहे, तो कशामुळे, हे नीट समजावून सांगण्यासाठी कोणी नव्हते. तो त्रास त्यांचा त्यांनाच भोगावा लागला.

ती सारी कहाणी त्यांनी या पुस्तकात मांडली आहे. असे म्हणतात की, तुम्ही जितके ‘वैयक्तिक’ सांगाल, तितके ते ‘वैश्विक’ होत जाते. त्यांची ही वैयक्तिक कहाणी ही आज अनेकांची कहाणी आहे. तपशील वेगळे असतील. असणारच. पण आशयाच्या अंगाने ती अनेकांना आपली कहाणी वाटू शकते. त्या आघातांवर, शोकावर त्यांनी केलेली मात अनेकांना दिशादर्शक ठरू शकते.

शास्त्रीय माहितीला रुक्षतेचा शाप असतो. या पुस्तकाने त्यावर मात केली आहे ती लेखिकेच्या वैयक्तिक कहाणीने. ती वाचल्यानंतर वाचक जेव्हा पुढच्या पानांवर जातो. तेथे आघात आणि शोक हे सारे समजावून घेतो, तेव्हा ते मेंदूला भिडते.

कोविडोत्तर काळातील आजचे जग प्रचंड बदललेले आहे. वेग, तणाव, संघर्ष, मानवी संबंधांतील उसवलेपण हे सारेच वाढले आहे. या काळात आपणच आपले मन जपायला हवे. त्यासाठी या पुस्तकातील माहिती नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.

‘मानसिक आघात समजून घेताना’ : डॉ. वृषाली रामदास राऊत

न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे | पाने – १०८ | मूल्य - २०० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांची ‘परकीय हात’ आणि ‘प्रोपगंडा’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......