‘साप्ताहिक मनोहर’ माझा मित्र झाला. जीवाभावाचा मित्र. वयाने मोठा असलेला मित्र, ज्याचं बोट पकडून मी पुण्यात सेटल झालो… अनेक अर्थानं
ग्रंथनामा - आगामी
अविनाश कोल्हे
  • ‘कन्या झाली हो...’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 12 April 2025
  • ग्रंथनामा आगामी ‘कन्या झाली हो Kanya Zali ho अविनाश कोल्हे Avinash Kolhe

ज्येष्ठ कथा-कादंबरीकार अविनाश कोल्हे यांची ‘कन्या झाली हो...’ ही चौथी कादंबरी लवकरच संधिकाल प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या कादंबरीला कोल्हे यांनी लिहिलेली ही वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका...

.................................................................................................................................................................

एके काळी ‘अफाट खपाचं डार्लिंग विकली’ असलेल्या ‘साप्ताहिक मनोहर’ला कृतज्ञतापूर्वक अर्पण.....

मी जरी १९७३ साली पुणेकर झालो, तरी त्याआधीपासून मला वाचनाची गोडी लागली होती. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावला शिकत असताना ‘महाराष्ट्र टाईम्स’ची रविवार पुरवणी (साहित्य, कला, राजकारण) म्हणजे माझ्यासाठी मुंबई-पुण्यातल्या साहित्यिक-सांस्कृतिक घटनांकडे बघण्याची खिडकी! पुण्यात आल्यावर या खिडकीचं दार मोठं झालं. पुण्यातली वसंत व्याख्यानमाला, पुण्यातल्या ‘मॅजेस्टिक’ गप्पा, फर्ग्युसनची वाडिया लायब्ररी, त्याच्या शेजारी असलेलं ब्रिटिश कौन्सिलचं ग्रंथालय वगैरे मला उपलब्ध झाले.

खास उल्लेख करण्याजोगी बाब म्हणजे माझा मोठा भाऊ अशोक ‘साप्ताहिक मनोहर’चा वर्गणीदार होता. मी ते मन लावून वाचत असे. या साप्ताहिकाने माझं पुण्यातलं वास्तव्य आणि महाविद्यालयीन जीवन फार सुकर केलं. विदर्भातल्या खामगावहून थेट फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झालेला मी. तेव्हा अखिल पुण्यात माझा एकही मित्र नव्हता. ज्याची पहिली पिढी कॉलेजात दाखल होत आहे, अशा माझ्यासारख्या ब्राह्मणेतर मुलाच्या मनात ‘मनोहर’च्या वाचनामुळे कधीही न्यूनगंड निर्माण झाला नाही.

दत्ता सराफ ‘मनोहर’चे कार्यकारी संपादक होते. तेव्हा या साप्ताहिकाची टॅगलाईन होती- ‘अफाट खपाचं डार्लिंग विकली’. संपादकांनी कोठेही जरी असं म्हटलं नसलं, तरी ते पुण्या-मुंबईच्या तरुणाईचं साप्ताहिक होतं. त्याच्या नियमित वाचनामुळे मी पुण्यात फार लवकर रूळलो आणि रमलो.

मला साहित्य, नाटक, सिनेमांची फार आवड. ‘मनोहर’मध्ये मराठी नाटकांची समीक्षा करणारं ‘तिसरी घंटा’ हे सदर येई. त्याच्या १ एप्रिल १९७३च्या अंकात ‘सावल्या नसलेली माणसे’ या नाटकाच्या परीक्षणात उपशीर्षकातील वाक्य आहे- ‘समर्थ नाटके कुठे आहेत?’ (हा प्रश्न २०२५मध्येसुद्धा विचारता येतो). नाटकाबद्दल खास उल्लेख करावा असा मजकूर म्हणजे ‘प्रिय श्री. दत्ता सराफ’ म्हणत माधव वझेंचं ‘घाशीराम कोतवाल’बद्दल लिहिलेलं अनावृत दीर्घ पत्र.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘मनोहर’च्या मुखपृष्ठकथा हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. या मुखपृष्ठकथांतून माझ्यासमोर पुण्यातल्या तरुणाईचं जग उलगडत गेलं. मात्र एका मुखपृष्ठकथेनं मला जबरदस्त धक्का दिला होता. ‘धुंद आणि बेभान रात्रींची अति-स्नेह-यात्रा’ ही जानेवारी १९७३च्या अंकाची मुखपृष्ठकथा, उदय गोखलेने लिहिलेली. लोणावळाजवळच्या मळवलीला मुंबई-पुण्यातले तरुण-तरुणी कसे दोन-तीन दिवस-रात्र एकत्र आले, त्यांनी बियर-सिगरेटी-गांजा ओढला, मुक्त संभोग केला वगैरे माहिती या मुखपृष्ठकथेत होती.

मळवलीच्या या यात्रेमागे तेव्हा पुणेनिवासी असलेल्या आचार्य रजनीशांची प्रेरणा होती. ही स्नेहयात्रा आयोजित करण्यामागे मुंबईचा क्लॉड अल्वारिस नावाचा तरुण होता वगैरे माहिती मिळाली. (नंतर १९८५च्या आसपास याच अल्वारिसने प्रीतिश नंदीच्या ‘इलस्ट्रेटेड विकली’मध्ये ‘ऑपरेशन व्हाईट लाय’ अशी मुखपृष्ठकथा लिहून ‘अमूल’ दुधाच्या कारभारावर टीका केली होती).

‘मळवलीची स्नेहयात्रा’ ही मुखपृष्ठकथा वाचून मी नखशिखान्त हादरलो. तेव्हा मी अवघा सतरा वर्षांचा होतो. तेव्हाच्या पुण्याच्या भाषेत सांगायचं तर ‘ओठ पिळले, तर चारमिनारचा धूर बाहेर येईल’ इतका कोवळा!

याच अंकात ‘कुतूहल’ या सदरात ‘सल्लागार’ने ‘समलिंगाकर्षण ही मानसिक विकृती, वैद्यकीय सल्ला मोकळेपणाने घ्या!’ असं आवाहन केलं होतं. तेव्हा समलिंगी आकर्षण वगैरेबद्दल काहीही माहिती नव्हतं. २०२५ साली हे वाचताना गंमत वाटते. ‘समलिंगी आकर्षण ही विकृती नाही’ असं आजचं वैद्यकीयशास्त्र सांगतं.

‘मनोहर’च्या काही मुखपृष्ठकथांची शीर्षकं आजही आठवतात ‘तरुणींना हवासा वाटणारा पण न ‘सापडणारा’ बॉयफ्रेंड’, ‘मारुतीची शेपटी ते पदमा खन्ना = होस्टेल’ ही मुलांच्या होस्टेलबद्दलची कव्हर स्टोरी, ‘आधुनिक तरुणी : परंपरागत व्रतवैकल्ये’ (ही शिकलेल्या मुलींची द्विधा अवस्था टिपणारी मुखपृष्ठकथा), ‘रोडसाईड रोमिओ’, ‘शैक्षणिक क्रांतीची वाटचाल : अयशस्वी प्राध्यापक हटाव!’, ‘पिकनिक : एक सुहाना सफर’, ‘पोरींनी लाजणे पोरांना धमाल आवडते!’, ‘कुढणाऱ्या मुली, बागडणाऱ्या मुली, उंडारणाऱ्या मुली... गर्ल्स होस्टेल’.... अशा अनेक मुखपृष्ठकथांमुळे मला पुणं सापडत गेलं… आणि मी लवकर पुणेकर झालो.

या साप्ताहिकातलं सुभाष भेंडेंचं ‘सूप आणि शँपेन’ हे साहित्यविश्वातील घटनांवर खुसखुशीत टिपण्णी करणारं सदर तर माझ्या खास आवडीचं. पुढे भेंडेंनी ‘ललित’मधून ‘अलाणे-फलाणे’ हे सदर लिहिलं. मात्र मला माझ्या साहित्यविश्वाच्या तेव्हाच्या अज्ञानापायी भेंडेंच्या सदरातील अनेक टोमणे समजत नसत. त्यांनी एकदा ‘आम्ही खर्डेघाशे… सारस्वत हरी’ असा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी नाडकर्णी, दळवी, तेंडुलकर, पिंगे, वरेरकर वगैरे सारस्वतांनी कशा साहित्यक्षेत्रातल्या जागा आणि सन्मान अडवून ठेवले आहेत, त्यामुळे शरदच्चंद्र चिरमुले, विद्याधर पुंडलिक वगैरे लेखक कसे नाराज असतात, यावर मस्त कोपरखळ्या मारल्या होत्या. तोपर्यंत मला ‘देशस्थ’ आणि ‘कोकणस्थ’ या ब्राह्मणांच्या दोनच पोटजाती माहिती होत्या. जीएसबी, कऱ्हाडे ब्राह्मण, देवरुखे ब्राह्मण वगैरे पोटजाती, त्यांच्यातल्या स्पर्धा, रागलोभ, हेवेदावे वगैरेंबद्दल मला काहीही माहीत नव्हतं.

माझ्यासाठी ‘मनोहर’चं खास आकर्षण म्हणजे देवयानी चौबळचं ‘चंदेरी चुईंगम’ हे सदर. तोपर्यंत मी सिनेमांबद्दल ‘मटा’ची रविवार पुरवणी, ‘रसरंग’ वगैरेमध्ये वाचायचो. ते लिखाण आणि देवयानी करत असलेलं लेखन, हे दोन ध्रुव होते. ऐन टॉपवर असलेल्या राजेश खन्नाला तिने ‘काला मांजा’ असं टोपणनाव दिलं होतं! ती करत असलेल्या सिनेमातल्या लोकांच्या पार्ट्यांची वर्णनं तर केवळ अप्रतिम! तिच्या लिखाणासोबत इतर कोठेही सहसा बघायला मिळणार नाहीत, अशी छायाचित्रं. एका छायाचित्रात उत्तान कपडे घातलेली रेखा एका मित्राच्या मांडीवर बिनधास्त बसलेली होती. झीनत अमानच्या छायाचित्राखाली ‘झीनत अमान याने के एक्सप्रेसो कॉफी’ असं छापलं होतं. (तेव्हा मला एक्सप्रेसो कॉफी ऐकूनसुद्धा माहिती नव्हती!).

एप्रिल १९७३च्या अंकात ‘चेतना’ या तेव्हा वादग्रस्त ठरलेल्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची दणदणीत मुलाखत होती. या मुलाखतीचं स्वरूप अफलातून होतं- ‘प्रश्न वाचकांचे.. उत्तरे बी. आर. इशारांची’. यात वाचकांनी अनेक प्रश्न विचारले होते. ‘हिंदी चित्रपटांवर बंदी घातली, तर तरुणांच्या वर्तनात सुधारणा होतील का?’ या प्रश्नावर ‘अजिबात नाही. दारूबंदी होती, तेव्हासुद्धा लोक दारू पित होते.’ असं उत्तर दिलं. ‘तुम्ही ‘न्यू वेव्ह’चे दिग्दर्शक आहात की ‘न्यूड वेव्ह’चे?, ‘ ‘चेतना’चं दिग्दर्शन करताना रेहानाच्या फाकलेल्या तंगड्यातून तुम्हाला नेमके काय दाखवायचे होते?’, ‘त्या दृश्याचे किती रिटेक घेतले?’ वगैरे इरसाल प्रश्नांना इशारांनी तशीच इरसाल आणि बेधडक उत्तरं दिली.

या सदरांच्या जोडीला अशोकबाबूचं ‘चित्रचक्कर’ हे सिनेपरीक्षणांचं सदर, ‘ये है बम्बई मेरी जान’ हे ओ नीलचं सदर वगैरे अतिशय वाचनीय मजकूर असायचा. काही अंकांत तर इंग्रजी सिनेमांबद्दल लेख असायचे. मला अजून आठवतं ते ‘लास्ट टॅगो इन पॅरिस’ या मार्लन ब्रॅडोच्या चित्रपटाचं परीक्षण. तेव्हा मला नुकतीच पाश्चात्य चित्रपटांची आवड लागली होती. त्या संदर्भात अशी परीक्षणं फार गरजेची होती.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘मनोहर’च्या जवळपास सर्व अंकांच्या शेवटच्या पानावरचं ‘दोस्त हो’ हे एक प्रकारचं संपादकीय असायचं. ‘दोस्त हो’ नेहमी ठसठशीत पुरोगामी भूमिका घेत असे. याचे माझ्यावर संस्कार होत होते. ‘मंदिरांचे बांधकाम’ हा विषय आताप्रमाणेच तेव्हासुद्धा चर्चेत होता. ‘दोस्त हो’मध्ये ‘बांधकाम : मंदिराचे आणि मनाचे!’ या संपादकीयात यशवंतराव चव्हाण यांनी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार मूहुर्तप्रसंगी केलेल्या भाषणाचा सणसणीत समाचार घेतला होता. तसेच ‘झिंदाबाद! मुर्दाबाद!’ या ‘तरुण तुर्क’च्या सदरात ‘चातुर्वण्याच्या पुरस्काराचा धिक्कार असो!’ अशी खणखणीत पुरोगामी भूमिका घेतली होती. अशा वाचनामुळे माझी पुरोगामी भूमिका आकार घेत होती.

‘मनोहर’चा उल्लेखनीय भाग म्हणजे ‘संपादक महाशय’ हा वाचकांचा पत्रव्यवहार. फार पुढे वृत्तपत्र / नियतकालिकांतील वाचकांचा पत्रव्यवहार म्हणजे ‘A Nation talking to itself’ असं म्हणतात, हे समजलं. ‘संपादक महाशय’मध्ये व्यक्त होणारी तरुण-तरुणींची मतं मला वेगळ्या आणि आता माझं होत असलेल्या जगाचं दर्शन घडवत होते. ‘तरुणींना हवासा वाटणारा, पण न मिळणारा बॉयफ्रेंड’ या मुखपृष्ठकथेवरच्या पत्रव्यवहाराने मला समकालीन तरुणींच्या भावविश्वाचं वेगळं दर्शन घडवलं.

‘मनोहर’ने दिलेली ही जबरदस्त सामग्री घेऊन मी पुण्यामध्ये वावरत होतो. त्यामुळे मला फार लवकर माझा आवाज तर सापडलाच, पण तितक्याच लवकर चढायलासुद्धा लागला. पुण्यातल्या सुरुवातीच्या काळात मला जवळचे मित्र नव्हते. ‘साप्ताहिक मनोहर’ माझा मित्र झाला. जीवाभावाचा मित्र. वयाने मोठा असलेला मित्र, ज्याचं बोट पकडून मी पुण्यात सेटल झालो… अनेक अर्थानं.

‘कन्या झाली हो’ - अविनाश कोल्हे

संधिकाल प्रकाशन, मुंबई | पाने - २८० | मूल्य - ३२५ रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 01 May 2025

मनोरंजक लेख आहे. फक्त ते चातुर्वर्ण्य पद्धतीच्या नावाने बोंबललेलं खटकलं. पुरोगामी मंडळींनी फर्डिनांड लंडबर्ग या लेखकाचं हे पुस्तक वाचलेलं दिसंत नाही : https://en.wikipedia.org/wiki/America%27s_60_Families हे पुस्तक १९३७ साली प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकात अमेरिकेतील प्रभावशाली अशा साठ कुटुंबांची माहिती आहे. याच साठ कुटुंबांचा वैश्यवर्ण होतो. चातुर्वर्ण्य अमेरिकेतही चालतो. उगीच हिंदू धर्मास नावं ठेवण्यात काय अर्थ आहे ! तथाकथित पुरोगामी झोपा काढीत बसले आहेत.
असो.
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......