‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ ही कादंबरी जे आपल्यासमोर घडते, पण त्याकडे आपण कळत-नकळत कानाडोळा करतो, त्याकडे सजग वृत्तीनं पाहण्यास प्रवृत्त करते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
युगंधर ताजणे
  • ‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 03 August 2024
  • ग्रंथनामा शिफारस विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर Vikram and Vetal @ Haibatpur देवेंद्र शिरुरकर Devendra Shirurkar

शेतकऱ्यांना वाली कोण, असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा ‘जाणत्या जनां’कडून जे उत्तर येतं, त्याला फारसा अर्थ नसतो. त्या उत्तरानं आतापर्यत केवळ तात्कालिक समाधान झालेलं दिसून येतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळून जितकी वर्षं झाली, त्यामध्ये भारतीय शेती आणि भारतीय शेतकऱ्याच्या पदरात मातीच पडली, हे सत्य नाकारता येत नाही.

जगभरामध्ये असे कित्येक देश आहेत, ज्यांच्याकडे शेतीसाठी पुरेशी जमीन नसताना, पाण्याची टंचाई असताना, त्यांनी शेती व्यवसायात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या देशांमधील शेतकरी आणि राज्यकर्ते यांच्यातील सुसंवाद त्यांची ध्येयधोरणं यांचं कौतुक करावं लागेल. भारतात मात्र केवळ नागड्या योजनांचा पाऊस आहे.

आजही शेतकरी, त्यांचे शेतीविषयक प्रश्न संपलेले नाहीत. त्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. त्याचा आकडा आपल्याला गांभीर्यानं शेतीविषयक धोरणांमध्ये बदल करण्याचे सुचवतो. मात्र दलाल राजकारणी केवळ निवडणुकांमध्ये विजयाचा गुलाल उधळण्यापुरताच शेतीचा विषय तोंडी लावतात.

या पार्श्वभूमीवर देवेंद्र शिरुरकर या पत्रकाराची ‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ ही कादंबरी डोकं झणाणून टाकते. त्यानं ज्या प्रकारे महाराष्ट्रातील राजकारण, त्या राजकारणाची खालावलेली पातळी, त्याचा शेती अन् शेतकऱ्यांवर कशा प्रकारे परिणाम झाला, याचे परिणामकारक चित्रण केले आहे.

आजवर राज्यातील बड्या राजकारण्यांनी आपला स्वार्थ साधत शेतकऱ्यांना ‘बळीचा बकरा’ कशा प्रकारे बनवले, याचे वेगळे दाखले देण्याची गरज नाही. काहीही झाले तरी आपलं घर, राजकारण अन् सत्ता कशी सुरक्षित राहील, याकडे लक्ष देत शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याचं काम सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेलं आहे.

या कादंबरीत हे सारं चित्रण कमालीच्या उद्वेगानं येतं. त्याला वेगळी धार आहे, धग आहे. त्या धगधगीत मात्र बिचारे शेतकरी पोळून निघाले आहेत. ज्यांना ‘जाणते राजकारणी’ म्हणतो, त्यांनी शेतकऱ्यांच्या हातावर काय ठेवलं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत, त्यांच्या शेतमालाला हमीभाव का मिळत नाही?

सहकारी कारखान्यांचे खाजगीकरण का आणि कसे झाले, दरवेळी तेच ते राजकारणी का निवडून येतात, आजवर महाराष्ट्रात शेतकरी संघटना किंवा दुसऱ्या तशाच एका विचारधारेच्या पक्षाचा मुख्यमंत्री वा बडा नेता का झाला नाही, शेतकऱ्यांच्या योजना नेहमीच का फसतात, शेतकरी राजकारण्यांच्या आवाहनाला का बळी पडतात, शेतकऱ्यांमध्येदेखील जातीचे राजकारण होते का, त्याला खतपाणी घातले जाते का, यासारखेच अनेक मूलभूत प्रश्न या कादंबरीतून समोर येतात.

कादंबरीचा नायक विक्रम शिंदे हा शेतकरी संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. व्यवस्थेनं त्याला नेता व्हावं, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. त्याच्या पाठीशी गावातील प्रतिष्ठित नागरीक अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण असणारे, शेतकरी संघटनेचे विचार जगण्यात उतरवलेले भानुदास पाटील आहेत. पत्रकार मित्र अनुराग आहे. दुसरीकडे सतत कोंडीत पकडणारे ‘महाराष्ट्रवादी पक्षा’चे आमदार आबासाहेब पाटील आहेत. ‘लोकशाही जनता पक्षा’चे दिनकरराव पाटील आहेत.

थोडक्यात, काय तर प्रस्थापित विरोधात नवखा विक्रम, अशी ही लढाई आहे. शेतकऱ्यांविषयी तळमळ असणाऱ्या विक्रमनं पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.

त्या निवडणुकीला आबासाहेबांचा मुलगा विश्वजित उभा आहे. आपल्यासोबत मुलालाही राजकारणात उतरवण्याचा त्यांचा मानस आहे. काहीही झालं, तरी राजकारणातील घराणेशाही ही लोकांच्या गळी उतरवण्याचा मोह हा भल्याभल्या राजकारण्यांना आवरत नाही. दोन तीन टर्म आमदार, खासदार होऊनही तुम्ही जनतेचा, गावाचा, शहराचा विकास करू शकत नसाल, तरी तुम्ही चौथ्यांदा, पाचव्यांदा निवडणूक कशी काय लढवता, असा प्रश्न मतदारांना पडत नाही.

ही मंडळी आपला मुलगा, पुतण्या, बहीण, भाचा असं कुणाकुणाला उभं करतात आणि वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून निवडूनही आणतात. हे सारं कसं शक्य होतं आणि हे प्रत्येक वेळी कसं घडतं, याविषयी जाणून घ्यायचं असल्यास या कादंबरीच्या वाट्याला जावं लागेल. ही वाफाळत्या चहाचे घुटके घेत चवीनं वाचण्याची कादंबरी नाही.

तसं पाहिल्यास केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरता हा विषय सीमित नाही, तर भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेती अन् शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न किती गंभीर आहे, यावर ही कादंबरी भाष्य करते. ग्रामीण भागातील लोकजीवन, रीतभात, परंपरा, गावगाडा या साऱ्यांचे विलक्षण प्रभावी रेखाटन कादंबरीतून आपल्या समोर येते. भानुदास पाटील शेतकरी संघटनेच्या विचारांचा आहे. तो तसा का आहे, त्यामागील त्याची पार्श्वभूमी लेखकानं ज्या प्रकारे उलगडून सांगितली आहे, त्यातून कादंबरीची वातावरण निर्मिती लक्ष वेधून घेताना दिसते.

विक्रमची पहिली पंचायत समितीची निवडणूक त्या वेळी प्रस्थापितांचा झालेला जळफळाट, जातीवादानं वर काढलेलं डोकं, गाववेशीवर रंगलेल्या गप्पा, रानात होणारं शेतकऱ्यांच होणारं विचारमंथन कादंबरीतून आपल्यासमोर उलगडत जातं.

आपण ज्यांचा जयघोष करतो, ज्यांच्या नावानं हजारो कार्यकर्ते दिवस रात्र एक करतात, पण बड्या नेत्यांना शेतकऱ्यांपेक्षा आपली प्रतिष्ठा अन् सन्मान किती महत्त्वाचा असतो, याचे चित्रण वाचण्यासारखे आहे. केवळ कुण्या एका विशिष्ट विचाराच्या, धोरणाच्या नेत्यावर लेखकाचा रोख वा राग नाही. त्याचे केवळ एकच म्हणणे आहे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत कोण?

देवेंद्रची ही पहिली कादंबरी आहे, मात्र ती वाचल्यानंतर त्यात कुठेही नवखेपणा दिसत नाही. कुणाचीही भीडभाड न ठेवता सणसण करत ही कादंबरी आपली वेगळी वाट निर्माण करते. ठरलेल्या मुक्कामावर जाऊन ती पोचते. या प्रवासात मात्र आपल्या डोक्यात प्रश्नांचे हजार भुंगे सोडते. त्याच त्याच राजकारण्यांना मतदान करण्यात तुम्हाला काहीच कसे वाटत नाही, गेल्या पाच पिढ्यांपासून तेच जर मोठ्या आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद यांच्यावर वर्चस्व ठेवणार असतील, तर मग आपण फक्त गुलाल उधाळायचा का, त्यांच्या मिरवणुकांमध्ये नाचायचे का, असा प्रश्न लेखक धाडसानं विचारतो.

विक्रम आमदारकीची निवडणूक लढवायची ठरवतो. दोन टर्म आमदार असलेल्या आबासाहेबांसमोर विक्रम एक प्यादं असतो. आतापर्यंत आबासाहेबांनी जी आमिषं त्याला दाखवली, त्याला तो बळी न पडता त्यांना आव्हान देण्यास तयार होतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

विक्रम जीवाचं रान करून विधानसभेची निवडणूक लढवतो खरा, पण जनता त्याला कौल देते का, आबासाहेबाच्या वर्चस्वाला धक्का देते का अन् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी संघटनेच्या भानुदास पाटलांचा शब्द खरा करून दाखवते का, हे सारे प्रश्न देवेंद्रनं उभे केले आहेत.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. पुन्हा एकदा वेगवेगळ्या घडामोडींना वेग आला आहे. जे नेते गेल्या निवडणुकीत एकमेकांचे कौतुक करत होते, तेच आता एकमेकांवर शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. विविध योजनांचा पाऊस पडू लागला आहे. अशा कालावधीत ही कादंबरी वाचायलाच हवी, हे आवर्जून सांगावेसे वाटते.

या कादंबरीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला, त्यांच्या सद्यस्थितीला, त्यांच्यावर केल्या गेलेल्या अन्यायाला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘जगाचा पोशिंदा’ म्हणून समजल्या गेलेल्या बळीराजाची व्यथा नव्या परिमाणाच्या माध्यमातून मांडली आहे. ती जाणून घेण्यासाठी आणि वेताळरूपी राजकीय नेत्यांनी बळीराजाची जी गत केली आहे, ती समजून घेण्यासाठी कादंबरी वाचणं गरजेचं आहे.

नव्या पिढीलाही ज्या राजकारण्यांनी भुरळ घातली आहे, त्यांचा खरा चेहरा कादंबरीकारानं उघडकीस आणला आहे. केवळ कोणत्या वैयक्तिक आकसापोटी त्यानं हे केलेलं नाही. त्याच्या आरोपांना तर्काची जोड आहे. विश्लेषणात्मक मांडणी आहे. खूप सारे पुरावे आहेत. त्यामुळे ही कादंबरी कुण्या एका विशिष्ट विचारधारेची न राहत नाही. ही कादंबरी जे आपल्यासमोर घडते, पण त्याकडे आपण कळत-नकळत कानाडोळा करतो, त्याकडे सजग वृत्तीनं पाहण्यास प्रवृत्त करते.

.................................................................................................................................................................

‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ - देवेंद्र शिरुरकर

देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. , पुणे

पाने – ३००, मूल्य – ४५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक युगंधर ताजणे पत्रकार आणि वाचक आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......