मतचाचण्या अधिक विश्वासार्ह करण्याच्या गरजेचे आकलन वाढवण्यात प्रणय रॉय यांच्या निवडणूकविषयक कार्यक्रमांचा मोठा वाटा आहे!
ग्रंथनामा - झलक
सर डेव्हिड बटलर
  • ‘कौल लोकमताचा’चे मुखपृष्ठ
  • Fri , 06 December 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक कौल लोकमताचा Kaul Lokmatacha प्रणय रॉय Pranoy Roy दोराब सोपारीवाला Dorab Sopariwala एनडीटीव्ही NDTV

‘कौल लोकमताचा : भारतीय निवडणुकांची उकल’ हे प्रणव रॉय व दोराब आर. सोपारीवाला यांचे पुस्तक नुकतेच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. ‘The Verdict: Decoding India's Elections’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद पत्रकार सतीश कामत यांनी केला आहे. मूळ पुस्तकाला ब्रिटिश सामाजिकशास्त्रज्ञ आणि निवडणूकतज्ज्ञ सर डेव्हिड बटलर यांनी लिहिलेले हे प्रास्ताविक...

.............................................................................................................................................

ऑस्ट्रेलियाच्या वाटेवर असताना, १९६७ साली मी अल्प काळ भारतात थांबलो होतो. ते माझे भारताचे पहिले दर्शन. नुफिल्ड कॉलेजमधील एक अभ्यासक जगदीश भगवती यांनी दिल्लीच्या उपनगरात एका छोट्याशा अनौपचारिक स्नेहभोजनासाठी मला निमंत्रण दिले होते. काही मिनिटांतच मी आणि माझी पत्नी मेरिलिन यांचे एका बाबीवर एकमत झाले... आम्हाला सहभागी होण्याची संधी लाभलेले हे सर्वोत्तम बुद्धिवंतांचे संमेलन होते. याच भावनेचा पुनरुच्चार मी त्यापैकी एकाकडे केला, तेव्हा त्याची प्रतिक्रिया होती- “यात काहीच आश्चर्य नाही. देशातील सर्वांत हुशार अर्थतज्ज्ञांपैकी पाच जण येथे आहेत.’’

भारतीय राजकारणाशी माझे प्रेमप्रकरण त्यानंतर बऱ्याच वर्षांनी - म्हणजे १९८३ साली सुरू झाले. तरुण भारतीय अर्थतज्ज्ञ प्रणय रॉय यांचे एक पत्र मला आले. भारतीय निवडणुकीच्या अभ्यासाविषयी ते आणि त्यांचे सहकारी अशोक के. लाहिरी यांना माझा सल्ला हवा होता. तेव्हा ते दोघे ‘दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये होते. राजकीय क्षेत्रात काय करता येईल, हे माझ्या ब्रिटनमधील कामाच्या अनुभवापासून त्यांना शिकायचे होते. मला आठवते, मी त्यांना दिल्ली विमानतळावर भेटलो होतो आणि आजच रात्री आपण हैदराबादला जात आहोत, असे त्यांनी मला सांगितले होते.

त्या वेळी राज्य विधानसभेची निवडणूक होती. देशात प्रथमच या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जाणार होती. आम्ही या निवडणुकीचा अभ्यास करत होतो. निकाल हळूहळू जाहीर होत होते. पूर्ण निकाल जाहीर व्हायला दोन दिवस लागले. मात्र ब्रिटिश निवडणुकांच्या माझ्या अभ्यासाच्या आधारे, पहिल्या तीन निकालांनंतरच या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत होणार, असा अंदाज मी बांधला होता. सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या विरोधात मतांचा मोठा ‘हेलकावा’ (स्विंग) असल्याचे पहिल्या तीन मतदारसंघांतील निकालावरून स्पष्ट होत होते. ‘एकदिशीय हेलकाव्या’चे तत्त्व (प्रिन्सिपल ऑफ युनिफॉर्म स्विंग) भारतातही लागू पडू शकते, असा विचार माझ्या मनात येऊन गेला. स्थानिक निवडणूक अभ्यासकांनी मात्र याची नोंद घेतलेली मला दिसली नाही. माझे अंदाज खरे ठरले. अनेक चाचण्यांचे अंदाज खोटे पाडत, काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. निवडणुकीपूर्वीच्या काळात मी अनेक राजकीय नेत्यांना भेटलो होतो, पण कोणालाच हा निकाल शक्य वाटला नव्हता.

१९८४ साली होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निरीक्षण करण्यासाठी भारतात पुन्हा येण्याचे वचन या रोमहर्षक अनुभवानंतर मी प्रणय आणि अशोक यांना देऊन टाकले. ही निवडणूक झाली त्या वर्षांत देश तीन धक्कादायक अनुभवांतून गेला होता- सुवर्णमंदिरातील खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई, भोपाळमधील विषारी वायू दुर्घटना आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. जगभर हेडलाइन्स ठरलेल्या तीन सुन्न करणाऱ्या घटना एकामागून एक घडलेले हे अपवादात्मक वर्ष.

तोवर मी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांतील निवडणुकांचा अभ्यास केला होता. मात्र भारत अनेक दृष्टीने वेगळा होता. मुख्यतः त्यातील लोकसंख्येची व्याप्ती आणि भाषिक, वांशिक, तसेच धार्मिक गटांतील वैविध्य यामुळे. तरीही ब्रिटनमधील माझा अनुभव काही वेळा येथेही ज्या प्रमाणात प्रस्तुत ठरत होता, ते खरोखरीच लक्षणीय होते. उदाहरणार्थ, राष्ट्रीय स्तरावरील तसेच स्थानिक स्तरावरील भावनेच्या प्रभावाखाली प्रत्येक वेळी देशाचा कल कसे हेलकावे घेतो, याचा अनुभव येथेही काही प्रमाणात लागू होत होता.

१९८४तील निवडणूक स्पर्धेविषयी एका पुस्तकाचा प्रकल्प हाती घेण्याची कल्पना आणि त्यामागील प्रेरणा प्रणय रॉय यांची. ‘इंडिया डिसाइड्स’ असे नामकरण झालेल्या या प्रकल्पाचे स्वरूप १९८५पर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकांच्या निकालांची एकत्रित आकडेवारी आणि त्यावरील आमची तळटीप असे होते. आम्हीच ते प्रसिद्ध केले होते. पुढे ‘इंडिया टुडे’च्या सहकार्याने औपचारिकपणे पुस्तकरूपात ते प्रसिद्ध झाले.

त्या वेळी भारतीय लोकशाही तारुण्यावस्थेत होती. ती अस्तित्वात येऊन जेमतेम तीन दशके झाली होती. त्या वेळी देशात कार्यरत असे निवडणूक विश्लेषण शास्त्रज्ञ (सेफॉलॉजिस्ट) नव्हते. देशातील निवडणुकांचे निकाल एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, असा प्रयत्न कोणी केला नव्हता. किंबहुना निवडणुका म्हणजे तोवर बव्हंशी नेहरू-गांधी कुटुंबीयांच्या एकतर्फी विजयमालिका असल्यामुळे, ‘निवडणूक विश्लेषण शास्त्र’ ही संकल्पनाच देशात फारशी परिचित नव्हती. प्रारंभीचे पर्व हे ‘विद्यमान सत्ताधाऱ्यांप्रती ठाम विश्वासा’चे होते, नंतरच्या काळात ‘सत्ताधाऱ्यांप्रती रोषा’च्या उद्रेकाकडे लोकभावनेचा लंबक झुकला आणि पुन्हा मागे फिरला. प्रणय यांच्याकडे बुद्धिचातुर्य होते आणि माझ्या सूचनांच्या स्वीकाराविषयीचा खुलेपणाही. टेलिव्हिजनचे ते प्रारंभीचे दिवस होते. सर्वसामान्य लोकांपर्यंत सुगम भाषेत आणि तक्ते-चौकटींच्या स्वरूपात जटील माहिती पोचवण्यासाठी लागणारी तंत्रज्ञानस्नेही दृष्टीही त्यांच्याकडे होती. काँग्रेसच्या प्रगतीचा आलेख उंचावतच जाणार, असे मानण्याच्या त्या काळात, निवडणूक आकलनाच्या रूढ मापदंडांना प्रश्न विचारण्यास प्रणय नेहमीच उत्सुक असत.

निवडणूक विश्लेषण शास्त्राच्या अंगाने सांगायचे, तर ‘एकदिशीय हेलकावा’ ही ब्रिटनमध्ये लागू होणारी संकल्पना- एका छोट्या विभागातील मतांच्या हेलकाव्याची पुनरावृत्ती देशभर होण्याकडे असलेला कल- भारतात किती प्रमाणात लागू होते, हे दाखवून देण्यास पुस्तकाने साहाय्य केले. आकडेवारीतून हे समोर आले की, मतांच्या हेलकाव्यातील समानता ही सामान्यतः राज्यवार लागू होते, देशाच्या स्तरावर नाही. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण भारतातील कल परस्परविरोधी असू शकतात.

हा घटक महत्त्वाचा होता, कारण त्या काळात भारतीय निवडणुकांतील मतचाचण्या बव्हंशी अविश्वासार्ह होत्या, अर्थात दोराब सोपारीवाला यांचे पाऊल या क्षेत्रात पडेपर्यंत! मतचाचण्या अधिक विश्वासार्ह करण्याच्या गरजेचे आकलन वाढवण्यात प्रणय यांच्या निवडणूकविषयक कार्यक्रमांचा मोठा वाटा आहे, असे  म्हणणे ही अतिशयोक्ती ठरणार नाही.

आमच्या पुस्तकाच्या अनेक सुधारित आवृत्त्या आम्ही काढल्या. भारतातील टेलिव्हिजनवरील पहिला स्वतंत्र निवडणूकविषयक कार्यक्रम प्रसारित करण्यास मी त्यांना साहाय्य केले होते. स्थानिक स्तरावरील छोटे निकाल, हे देशव्यापी पटाचा भाग म्हणून कसे समजून घ्यायचे, हे लोकांपर्यंत पोचवण्यास मी त्यांना मदत करत असे. जटील अशा सांख्यिकी जंजाळातून लोकांना पचवता येईल, असे निष्कर्ष कसे काढायचे, याविषयी ब्रिटिश निवडणुकांवर भाष्य करताना जमा केलेल्या अनुभवाचा फायदा त्यांना करून देणे, हेही माझे एक काम होते.

जेव्हा जेव्हा मी दिल्लीला भेट दिली, तेव्हा ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ हे माझे वास्तव्यस्थान होते. पुस्तकातील सुधारणा, आगामी निवडणूक अभ्यासविषयक कार्यक्रम यांच्या आखणीच्या निमित्ताने आमच्या चमूमध्ये बैठकांची सत्रे होत. प्रणयबरोबर एकामागून एक लोकसभा निवडणुकांत काम करणे हा आगळावेगळा आनंद होता आणि परस्परांना शिकण्या-शिकवण्याची संधी. अर्थात माझ्यासाठी शिकण्यासारखे अधिक होते.

प्रारंभीच्या काळातील या भेटींनी पुसता न येण्यासारखा प्रभाव टाकला होता. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा दिल्लीला येऊ लागलो, निवडणूक मोहिमांतील चैतन्य आणि प्रणय, राधिका, तसेच एनडीटीव्हीतील उगवता चमू यांचा उत्साह अनुभवू लागलो. भारतातील टीव्ही पाहणाऱ्या जनतेची निवडणूकविषयक समजूत खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. भारतीय राजकारण काँग्रेस वर्चस्वाचे पर्व मागे टाकून खूप पुढे गेले आहे. समाजमाध्यमांचे राजकारण, स्त्री-मतदारांचा वाढता प्रभाव, नव्याने उदयाला आलेले लोकानुयायी नेते, असे अनेक नवनवे प्रवाह राजकारणात दाखल झाले आहेत. निवडणुकीचा हा आधुनिक व्यापक पट उलगडून दाखवण्याचा प्रणय रॉय व दोराब सोपारीवाला यांचा अत्यंत समयोचित असा प्रयत्न म्हणजे ‘कौल लोकमताचा’. अर्थात, १९८० आणि १९९०च्या दशकांत आम्ही जे रचनाबंध नोंदवले आणि स्पष्ट केले होते, ते आजही अप्रस्तुत झालेले नाहीत, असा माझा विश्वास आहे.

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील निवडणुकांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. या अनुभवासाठी मी प्रणय यांचा ऋणी आहे.

.............................................................................................................................................

‘कौल लोकमताचा : भारतीय निवडणुकांची उकल’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5150/Kaul-Lokmatacha

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......