‘बालभारती’साठी मुखपृष्ठं करताना...
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
आभा भागवत
  • आभा भागवत यांनी ‘बालभारती’साठी केलेली मुखपृष्ठं
  • Fri , 30 June 2017
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक ‌Book of the Week बालभारती Balbharti कुमारभारती Kumarbharti आभा भागवत Abha ‌Bhagwat

मागील वर्षी ‘बालभारती’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भल्या मोठ्या भिंतींवर अर्थवाही चित्रं काढताना ‘बालभारती’शी जवळून संबंध आला आणि एका नव्या विश्वाशी पुन्हा परिचय झाला. लहानपणी ‘बालभारती’ची पुस्तकं वापरताना झालेल्या संवादानंतरची ही पहिलीच वेळ होती. या वर्षी ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकांसाठी सार्थ मुखपृष्ठं करण्याची सुंदर संधी मिळाली आणि त्यासोबत काही लाख मुलांपर्यंत चित्रांच्या माध्यमातून पोहोचण्याची अनोखी भेट! माणसाच्या दृश्य संवेदना नकळत महत्त्वाची भूमिका निभावत असतात. आपल्याला जर संपन्न दृश्य अनुभव लहानपणापासूनच मिळाले तर सौंदर्यदृष्टीचा विकास उत्तम प्रकारे होऊ शकेल. ही समृद्धी मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी एक छोटासा मार्ग म्हणजे पुस्तकांची मुखपृष्ठं. आजही महाराष्ट्रात असे काही दुर्गम भाग आहेत, जिथं मुलांच्या हातात पाठ्यपुस्तकांखेरीज इतर कुठलीही पुस्तकं क्वचितच पडतात.

पाठ्यपुस्तकासाठी मुखपृष्ठाचा दोन अंगांनी विचार करता येतो. एक म्हणजे- पुस्तकात जे जे आहे त्याचं प्रातिनिधिक स्वरूप दिसावं यासाठी पुस्तकातील घटक वापरून केलेलं चित्र. आणि दुसरं म्हणजे- आतील आशय आधार म्हणून न घेता पुस्तकामुळे साध्य होणाऱ्या हेतूवर आधारित नवीन विचार चित्रातून व्यक्त व्हावा म्हणून केलेलं स्वतंत्र चित्र.

‘बालभारती’तील ज्येष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बोलून दुसऱ्या पद्धतीने काही मुखपृष्ठ करायचा निर्णय झाला. उपलब्ध वेळेचा विचार करता तीन मुखपृष्ठांची जबाबदारी घेणं शक्य होतं. त्याप्रमाणे सातवी मराठी, नववी मराठी व इंग्रजी अशी पुस्तकं निश्चित केली. पुस्तकाचं उद्दिष्ट, मुलांवर त्याचा होणारा परिणाम आणि संपूर्ण महाराष्ट्रात किती वैविध्यपूर्ण जीवनशैली जगणाऱ्या मुलांच्या हातात ही पुस्तकं जातात हे जाणून घेऊन काम सुरू केलं. सर्व मुलामुलींना त्यांच्या संदर्भकक्षेतून चित्राशी जोडलेपण वाटावं, असं आव्हानात्मक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं.

सातवीसाठी विषय निश्चित होता - ब्लू मॉरमॉन हे राज्य फुलपाखरू. निसर्ग समजून घ्यायची विशेष गोडी असल्यामुळे ब्लू मॉरमॉनची आधीपासूनच थोडी माहिती होती. काही तज्ज्ञ अभ्यासक आणि मित्रमैत्रिणींच्या मदतीनं अचूक माहिती शोधून काढली आणि विद्यार्थ्यांना आवडेल असा एक छोटा निबंध त्यावर लिहिला. ही माहिती पुस्तकातील क्यू आर कोड मार्फत वाचकांनाही उपलब्ध होऊ शकते. हे मुखपृष्ठ करणं चित्रकार म्हणून माझ्यासाठी अतिशय आनंददायी होतं. हिरव्यागार झाडीवर बसलेल्या या ब्लू मॉरमॉन नामक नीलपऱ्या वेगवेगळ्या बाजूंनी कशा दिसतात याचे संदर्भ शोधले. ब्लू मॉरमॉनची अळीसुद्धा फार देखणी असते म्हणून मलपृष्ठावर तिलाही जागा केली. सगळीच फुलपाखरं सगळीकडेच दिसत नाहीत. त्यांचे विशिष्ट अधिवास असतात. त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे ठराविक झाडांवर ती मकरंद पिण्याकरता बसतात. स्थानिक जैवविविधतेचं महत्त्व यातून अलगद मुलांपुढे ठेवावं असाही यात छुपा हेतू होता.

कुंती नावाचं सुंदर पांढऱ्या फुलांचं स्थानिक झाड या फुलपाखराला आवडतं. कुंतीच्या झाडाची संदर्भ छायाचित्रं शोधून तशीच चित्रात वापरायची ठरवली. पण नुसतंच झाडं, पानं, फळं, फुलपाखरं दाखवण्याचा पाठ्यपुस्तकाशी कसा संबंध जोडायचा हेही विचारात घ्यायला हवं होतं. मग पांढऱ्या फुलांच्या जागी छोटी छोटी पांढरी पुस्तकं दाखवली; जणू फुलपाखरं पुस्तकांतूनच मकरंद शोषून घेत आहेत. आतील पानावर तपकिरी रंगाच्या अनेक छटांनी तयार केलेली पार्श्वभूमी म्हणजे चिखल आहे. फुलपाखरं क्षार शोषून घेण्यासाठी चिखलावर तसंच शेणावरही बसतात, हा छोटासा बारकावा यातून पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.

चित्राची शैली पाहून काही मुलामुलींना या प्रकारे चित्र काढून बघावंसं वाटलं, तर त्यातूनही काही नव्या चैत्रिक गोष्टी ते शिकू शकतील. प्रचंड मोठ्या प्रमाणावर छपाई होणाऱ्या या पुस्तकांत प्रत्यक्ष केलेलं चित्र आणि छापलेलं चित्र यांत थोडा फरक जरी पडला असला तरी, चित्रात वापरलेल्या असंख्य रंगछटा, ब्रश स्ट्रोक्सचे बारकावे छान छापले गेले आहेत. चित्रकाराच्या हातून चित्र छपाईसाठी गेलं की, काही तांत्रिक बंधनांमुळे थोडा फरक पडतोच.

सातवीतल्या मुलांना या चित्रांतून वेगळंच काही वाटू शकतं. ते हळूहळू समजून घेईनच. काही शाळांतील मुलांनी मुखपृष्ठ आवडलं म्हणून मला पत्र पाठवल्याचं त्यांच्या शिक्षकांनी नुकतंच कळवलंय. आता खूप उत्सुकता आहे मुलांना वाटलेलं समजून घ्यायची.

नववीसाठी वेगळा विचार करणं गरजेचं होतं, कारण ती मुलंमुली काही लहान नसतात. त्यांना खरोखर काहीतरी नवं देणं हा हेतू मनाशी ठरवला होता. इंग्रजीच्या मुखपृष्ठावर भली मोठी पुस्तकं एकावर एक ठेवलेली आणि सर्वांत वरचं पुस्तक उघडलेलं दाखवलं. पुस्तकांच्या वर आकाशात उडत, पंख फुटलेली टीन एजर मुलगी आणि मुलगा उत्सुकतेनं पुस्तकांत डोकावून पाहताना दाखवली. त्यांच्या हातांच्या मुद्राही अभिव्यक्तीपूर्ण दाखवल्या. ही मुलं कोणी गोरी-गोमटी काल्पनिक मुलं नसून अगदी आपलीच वाटतील अशी साधे कपडे घातलेली, काळी-सावळी मराठी मुलं आहेत. त्यांच्या रंगीत पंखांत आलेलं बळ, उंच उडण्याची क्षमता असलेलं प्रत्येक मूल, पुढच्या शिक्षणासाठी असणारं इंग्रजी अभ्यासाचं अतुलनीय महत्त्व, इंग्रजी भाषेमुळे तयार होणारा मोठा अवकाश, आयुष्यात येणारी हिरवाई आणि तरीही इंग्रजीचं दडपण न वाटून घेता सहज शिकण्याची एक भाषा, अशा विविध विचारांना रंगा-रेषांत कैद करणं जमलं आहे का हे मुलं सांगतीलच. विद्यार्थ्यांना खरोखरच चित्रात स्वतःला पाहायला प्रोत्साहन मिळेल आणि आवश्यकतेप्रमाणे बदल करायला स्फूर्ती मिळेल अशी आशा आहे.

नववी कुमारभारतीच्या मराठी पुस्तकाचं मुखपृष्ठ अजून वेगळ्या विचारानं करायचं होतं. गोंड चित्रशैलीत चित्रकार वर्षानुवर्षं एक सुंदर चित्र काढतात - हरणाच्या शिंगांतून आलेलं झाड. ही कल्पनाच किती सुंदर आहे! हीच कल्पना थोडी अभिजात पद्धतीने मांडायची असं ठरवलं. गोंड शैली चित्राकरता न वापरता वेगळ्या पद्धतीनं चित्र काढायचं ठरवलं. अंगावर ठिपके असणारं, वास्तववादी चित्रणाच्या खूप जवळ जाणारं, डौलदार हरीण मागे वळून पाहताना दाखवून त्याच्या शिंगांतून छानसं झाड आलेलं आहे. झाडाच्या फांद्याही डौलदार दिसाव्यात म्हणून टोकाकडे थोड्या वलयाकार वक्र केल्या. या झाडाला हिरवी आणि लाल पानं आहेत. हे झाड फळाफुलांनी न बहरता पुस्तकांनी बहरलं आहे. ही पुस्तकं कोऱ्या पानांची आहेत, कारण प्रत्येक मूल स्वतःच्या आवडी-निवडीप्रमाणे, गतीप्रमाणे स्वतः काहीतरी त्यातून घडवणार आहे, यावर विश्वास ठेवणारं हे चित्र आहे. 

विद्यार्थ्यांना पुस्तकांबद्दल विशेष गोडी वाटावी, मुखपृष्ठाच्या चित्रांतून व्यक्त होणाऱ्या आशयाबद्दल उत्सुकता वाटावी आणि त्यातून विचारांना प्रोत्साहन मिळावं यासाठी वेगळी चित्रं करण्याचा प्रयत्न केला आहे. जिथं पुस्तकं आणि चित्रं दोन्हीही दुर्मिळ आहेत, अशा भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा विचार विशेषत्वानं करून काहीतरी वेगळं समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्हीकडील मुलामुलींना ही मुखपृष्ठ आवडतील अशी आशा वाटते.

हरणाच्या शिंगातून झाड हे माझं लाडकं चित्र आहे आणि आत्तापर्यंत अनेक ठिकाणी भिंतींवर मी ते काढलं आहे. ते पाहून खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया मुलं देतात. एक मुलगा म्हणाला होता, "अरे, आता या हरणाला सावली शोधायला कुठे जायलाच नको की!" एका मुलीनं उत्स्फूर्तपणे चित्रातल्या हरणाला शेजारचं गवत तोडून चारा म्हणून खाऊ घातलं. एकजण म्हणाला, "हरणाने बिया खाल्यामुळे शिंगातून झाड आलं असेल बहुदा." अशा असंख्य नव्या प्रतिक्रियांची मीही वाट बघते आहे. चांगलं, आशयघन चित्र ही मुलांच्या सर्जनशीलतेला घातलेली प्रभावी साद असते. त्यातून तयार होणारी कल्पक वलयं खूप ओलावा निर्माण करतात आणि त्यातच रुजतात सर्जनाची बीजं!

लेखिका चित्रकार आहेत.

abha.bhagwat@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Fri , 30 June 2017

निव्वळ अप्रतिम!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......