डॉ. वृषाली रामदास राऊत यांचं ‘मानसिक आघात समजून घेताना’ हे पुस्तक नुकतंच न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगणाऱ्या लेखिकेच्या अनुभवपर प्रकरणाचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
शरीराला घाव बसला आणि जखम झाली की, ती डोळ्यांना दिसते, म्हणून त्यावर उपचार करणे शक्य असते. मनावर घाव बसल्यावर जी जखम होते, त्यावर उपाय कसा करणार? शारीरिक इजा आपल्याला माहिती आहेत, पण भावनिक इजा ज्यामुळे मनाला त्रास होतो. त्यावर उपचार कसा करायचा? भावनिक इजा कधी होते, हे कळते तरी का? भावनिक इजा समजून घेण्याअगोदर मनावर होणारा आघात समजून घेणे आवश्यक आहे.
‘आघात’ या मराठी शब्दासाठी इंग्रजीमध्ये ‘Trauma’ असा शब्द आहे. जेव्हा आपण आघात म्हणतो, तेव्हा इथे तीव्रता अपेक्षित आहे. अशी एखादी घटना ज्यामुळे मनाला तीव्र पद्धतीचा ताण जाणवतो. ज्यात जवळच्या व्यक्तीचा विरह, मृत्यू, अपघात तसेच स्वतःला झालेली शारीरिक इजा, अचानक नोकरी जाणे, लैंगिक छळ आणि बलात्कार यासारख्या घटना येतात. भूकंप, पूर आणि नुकतीच येऊन गेलेली करोना ही महामारीसुद्धा मनावर आघात करते.
२००८पासून ताण, निराशा, चिंता व भीती यांच्या सान्निध्यात राहून मी फार असुरक्षित राहायला लागले होते. राग चटकन यायचा. माझी संपूर्ण ऊर्जा ही अस्तित्व टिकवण्यासाठी पणाला लागायची. त्यामुळे लग्नाची आणि नात्याची भीती बसली होती. कोणत्याही नात्यात विश्वास फार महत्त्वाचा असतो. सातत्याने (परिस्थितीजन्य कारण असले तरी) नात्यातील अपयश, मानसशास्त्र या विषयाची माहिती असूनही मला काय होत आहे, याचे निदान न होणे आणि मदत न मिळणे, यामुळे अजून त्रास नको म्हणून मी परत नात्यात गेले नाही.
मला या काळात काही माणसे नक्कीच आवडली, तसेच माझा थंड प्रतिसाद बघून अनेकांनी प्रयत्न करणे सोडून दिले. मला अशा वेळी खूप समजून घेणारा पुरुष सहकारी हवा होता, पण ज्या आयटी उद्योगात मी काम करत होते, तिथे एवढा वेळ कोणाला होता? जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा विरह याने मानसिक आघात अनुभवलेल्या व्यक्तिला कोणतेही नाते जोडायला त्रास जातो. ते प्रणयाचे नाते असो किंवा सामाजिक बंधन.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
२०१५चे वर्ष सरत असताना मी स्वतःसाठी चारचाकी घेण्याचा निर्णय घेतला. याच महिन्यात आम्ही कोकणात फिरायला गेलो. तेथून परत आल्यावर बाबांना दवाखान्यात भरती करावे लागले. बीपीच्या गोळ्या न घेतल्यामुळे त्यांचा स्मरणशक्तीवर परिणाम झाला होता, पण सुदैवाने हे थोडक्यात निभले. डिसेंबर २०१५ला मी माझी चारचाकी विकत घेतली. आज हे लिहिताना मला आठवून छान वाटत आहे, पण त्या वेळेस मला त्याचा आनंदसुद्धा जाणवला नाही.
२०१६ला माझे शारीरिक त्रास वाढले. त्यात ताणामुळे परत पीसीओडी आणि थायरॉईड झाला. मी अनेक वर्षे नियमित व्यायाम करत होते. त्यामुळे त्या क्षेत्रातील काही मंडळींशी मैत्रीपूर्ण संबंध होते. जेव्हा आपण स्वतः एखादी गोष्ट करू शकत नाही, तेव्हा तज्ज्ञाची मदत घ्यावी, यादृष्टीने मी पैसे भरून व्यायामाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. ज्याचा मला खूप फायदा झाला. २०१५मध्ये मी लॉन टेनिससुद्धा शिकले होते. कामाच्या ठिकाणी आव्हाने कायम होती. इतरांच्या मानाने वयाने लहान असलेली स्त्री पुरुषांना प्रशिक्षण कशी देऊ शकते, बदल कशी घडवून आणू शकते, याबद्दल काही लोकांना आकस होताच.
माझ्या पीएच.डी.ला विद्यापीठाकडून मंजुरी मिळण्यास वेळ लागत होता. ज्यांनी विश्वास देऊन मला नोकरी देऊ केली होती, त्यांना जाब विचारणारे होतेच. या दोन वर्षांत आईवडिलांची तब्येत बरीच सुधारली. आम्ही एकत्र राहत असल्याने कौटुंबिक आयुष्य अनुभवायला मिळत होते.
२०१६ साली आणखी एक गोष्ट घडली. सख्खा लहान भाऊ आणि सख्खा भाचा अचानक गेल्याने माझ्या आईला २००७पासून झोपेचा त्रास सुरू झाला. मी पुण्यात असल्याने माझी काळजी असणारच. ४० वर्षे सरकारी नोकरी करूनही आईला बीपी आणि शुगरचा त्रास नव्हता, पण या दोन घटना घडल्यामुळे आईला बीपीचा त्रास सुरू झाला आणि तिला अँटी अँझायटी गोळ्यांची सवय लागली. २००७ ते २०१६ या काळात गोळ्यांच्या सेवनामुळे तिच्या स्वभावावर तर परिणाम झालाच, पण तिच्या डोळ्यांवरही वाईट परिणाम झाला.
आईवडिलांच्या आंतरजातीय लग्नामुळे त्या दोघांना जो त्रास झाला, तो वेगळाच होता. माझ्या आईवडिलांची चांगली परिस्थिती असताना त्यांच्याकडून फायदा करून घेणारे सगळेच होते. माझ्या आईवडिलांना व्यवहार नक्कीच जमला नाही. एकेकाळी अत्यंत मानात राहणाऱ्या माझ्या आईवडिलांना मी फार असहाय अवस्थेत बघितले, जे निराशादायक होते. माझ्यासोबत असल्याने आईची अँटी अँझायटीची गोळी सुटली, तसेच तिच्या तब्येतीतही खूप सुधारणा झाली.
२०१७ची सुरुवात बरी झाली होती. वैयक्तिक आयुष्यातील एकटेपणा काही पाठ सोडायला तयार नव्हता. मी मनातले बोलून दाखवत नव्हते, हा माझा दोष होता. या आधी मानसिक आरोग्याच्या लोकांकडून आलेला अनुभव समाधानकारक नसल्याने त्याकडे परत गेले नाही.
भारतात एखाद्या व्यक्तीचे लग्न तीस वर्षांपर्यंत नाही झाले, तर त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टीसुद्धा वाईट म्हणून हिणवल्या जातात. लग्न नाही झाले म्हणून मी सावळी आहे, पैशाची लोभी आहे, जबाबदारी नकोय, समलैंगिक असेल, अशा गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. अशा दबावाला बळी पडून बहुतेक मुली लग्न करतात आणि ज्यांचे लग्न कोणत्याही कारणाने होऊ शकत नाही, त्यांना बदनाम करतात. जे त्या व्यक्तीच्या मानसिक शांतीवर आणखी परिणाम करते.
आईवडिलांचा आंतरजातीय प्रेमविवाह, घरातून मिळालेले स्वातंत्र्य यामुळे मी ठरवून लग्न करणे शक्य नव्हते. पण हेही तितकेच खरे आहे की, मागच्या पिढीच्या मानाने आमची पिढी तंत्रज्ञानात पुढे असली, तरी रूढी-परंपरांच्या बाबतीत मागासलेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानात नमूद काम करणारे माझे मित्रमंडळी, सहकारी जात-धर्म मानणारे होते, हे खेदाने करावे लागेल.
माझ्या अशक्त मनःस्थितीमुळेसुद्धा मी मैत्रीत आणि प्रेमात चुकीची माणसे निवडली. त्या लोकांनी माझा आत्मविश्वास आणखी घालवला. स्वत:चा बचाव नीटपणे करू न शकल्याने मी अनेक वेळा अन्याय निमूटपणे सहन केला. माझे शाब्दिक शोषणदेखील झाले.
माझे प्रतिमाहननही झाले आहे. बहुतेक वेळा स्त्री सहकाऱ्यांपेक्षा पुरुष सहकाऱ्यांकडून जास्त मदत मिळाली. स्त्रियांना कुवतीपेक्षा जास्त आणि कमी श्रमात पैसा आणि सत्ता मिळाली की, त्या किती खालच्या थराला जाऊ शकतात, याचा अनेक वेळा अनुभव घेतला. आपल्या पडत्या काळात आपले खरे व्यक्तिमत्त्व दिसते. कोण, किती आणि कशा प्रकारची तडजोड करतात, आयुष्याशी सामना करताना कोणत्या प्रकारचे मूल्य वापरतात आणि भावनिक लवचीकता म्हणजे नकारात्मक अवस्था अनुभवताना कशा प्रकारे आणि किती लवकर त्या अवस्थेतून बाहेर पडत सामान्य आयुष्य जगतात हे कळते.
२००७ हे वर्ष संपताना सुरू झालेल्या या मानसिक युद्धात माझ्या कोमल स्त्रीभावना कोमेजून गेल्या होत्या. मला आई व्हायची फार इच्छा होती, जी अर्थात अजून तरी अधुरीच आहे. निसर्गनियमानुसार ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या, ज्यात मातृत्व पण होते, त्या न झाल्याने त्याची कमी इतर उपलब्धींमधून भरून निघण्याचे माझे सर्व प्रयत्न व्यर्थ होते. अस्तित्वासाठी लढणाऱ्या समाजाला मी महत्त्वाकांक्षी वाटायचे. लोक समजुती करून तुमच्याशी वागायला लागतात, मात्र नक्की त्या व्यक्तीच्या मनात काय आहे, हे समजून घेण्यासाठी कोणाला वेळ आहे?
२०१७ला माझी पीएच.डी.ची तोंडी परीक्षा झाली आणि त्यात मी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. कामाच्या ठिकाणी माझे कौतुक झाले. माझ्यावर टाकलेल्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाले. ज्या ठिकाणी मी अडीच वर्षे काम करत होते, त्यांनासुद्धा आनंद झाला. मी जे काम करत होते, ते काळाच्या मानाने फार पुढे होते. त्या वेळेस ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य’ या विषयाचा लोकांना विटाळ होता. त्यामुळे अनेकांना माझा वावर आवडायचा नाही. २०१७मध्ये आत्मविश्वास जरा वाढला होता. माझ्या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या सामाजिक कार्यात मी सहभाग वाढवला. २०१८मध्ये माझ्या कामाबद्दल चर्चा व्हायला लागली. वर्तमानपत्रात छापून यायला लागले आणि एक डॉक्युमेंट्रीसुद्धा आली.
वैयक्तिक पातळीवर माझा संघर्ष सुरूच होता, जे काही होते तो सगळा वरचा दिखावा होता. मनातील एकटेपणा सुन्न करून टाकायचा आणि माझ्या आईवडिलांकडे बघून वाटायचे की, हे किती भाग्यवान आहेत. माझ्याच वाट्याला हे एकटेपण का आले असेल? एकटी स्त्री काम करते, आपल्याशी बोलते म्हणजे ती आपल्यासोबत दारूचा ग्लास घेऊन पलंगावर येईल, अशी अपेक्षा असणारे पुरुष काही कमी नव्हते. किती लोकांना टाळणार? जिथे कुठे जाईल तिथे अशी मंडळी भेटायचीच.
२०१५नंतर मी नात्यात गेले नाही. लग्नासाठी आलेल्या एका चांगल्या स्थळाला नकार देण्याचा अजूनही पश्चात्ताप होतो. माझ्या मनात काय सुरू आहे, हे मी दाबून ठेवले होते. ज्या ठिकाणी काम करत होते, तिथे चार वर्षे होऊन गेली, तरी ज्या पद्धतीने काम सुरू होते, त्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद नव्हता. माझी प्रसिद्धी काही लोकांना खुपत होती. एवढ्या मोठ्या पदावर काम करूनही मी पदाच्या किंवा त्याच्यासोबत येणाऱ्या लाभासोबत वाहवत गेले नाही.
२०१९ येईपर्यंत मला कामाचा कंटाळा आला होता. फेब्रुवारी २०१९मध्ये मी माझ्या कामाचा राजीनामा दिला. तोपर्यंत इतकी वर्षे वेगवेगळ्या ताणाखाली जगत मी दमून गेले होते. आपण ज्याला ‘बर्नआऊट’ म्हणतो तशी माझी अवस्था झाली होती. माझे दुःख हेच होते की, आपण इतरांच्या चांगल्या आरोग्यासाठी काम करतो, पण आपल्याला लोक अशी वागणूक का देतात?
आपले सामाजिक वातावरण कमालीचे बिघडले होते. सोशल मीडिया आणि इंटरनेटने आपल्या आयुष्याचा साचा संपूर्णपणे बदलून टाकला होता. २०१८मध्ये व्यायाम करताना पाठीला जी दुखापत झाली, ती त्रास देत असल्याने परत नाचावर बंधने आली. वेगवेगळ्या कार्यक्रमात जात असले, तरी मधल्या काळात काही गोष्टी प्रचंड बदलल्या होत्या त्या मला लवकर कळायच्या नाहीत. चाळीशी आल्यावर सर्व बाजूंनी एकटी असलेली मी अत्यंत गोंधळलेली होते. आई-बाबा सत्तरीला आले होते. माझे काही नाही झाले, तरी मी माझ्या सगळ्या सहकारी, तसेच मित्र-मैत्रिणींच्या लग्नात आणि नंतर मुले झाल्यावरही त्यांच्या आनंदात सहभागी झाले.
हेच घरच्यांच्या बाबतीत पण होते. तो माझ्या श्रीमंतीचा शो नव्हता, तर ज्या लोकांनी माझ्यासाठी काही केले त्यांच्यासाठी छोटीशी भेट असायची. कोणाकडून पैसे मागितले नाहीत. माझ्याकडे कमी असताना माझ्या गरजांवर नियंत्रण ठेवले. या मधल्या काळात जवळची माणसे किती बदलली, हे लक्षात यायला उशीर झाला.
पुण्यातील एकंदरीत वातावरणाचा कंटाळा आला होता, म्हणून नोकऱ्या मिळत असतानादेखील मी जुलै २०१९मध्ये नागपूरला पूर्णपणे शिफ्ट झाले. मला बाहेरदेशी जायची इच्छा होती. आईवडिलांना नागपुरात ठेवून मग आपण बाहेर जाऊ अशा इराद्याने मी नागपुरात परत आले. नागपुरात घर असल्याने कमी पैशांतसुद्धा निभावेल आणि थोडा आराम मिळेल, अशा आशेने मी काम शोधायला सुरुवात केली, पण मला काही नोकरी मिळेना.
त्याच्यावर कहर म्हणजे आमच्या बाजूला असणाऱ्या दारुड्या शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आम्हाला स्वतःचे घर सोडावे लागले. आई-बाबांनी ही बाब माझ्यापासून लपवून ठेवल्यामुळे माझे आणि आईवडिलांचे खूप भांडण झाले. आईने माझ्या सख्ख्या मामाला दिलेल्या घरावर त्याने वीस वर्षांपासून ताबा मिळवून ठेवला होता. अशा अनेक गोष्टी ज्या मनात दाबल्या गेल्या होत्या, त्या नागपुरात असताना बाहेर आल्या आणि अर्थात मी घरच्यांना जाब विचारला. (जो खरे तर आधीच विचारायला हवा होता). मी एकटीच खूप गोष्टी करत होते.
आयटीमध्ये नोकरी सोडल्यावर कोणाशीही संबंध राहत नाहीत. त्यामुळे नागपुरात आणखी भयाण वाटायचे, अगदी आपण जगापासून तुटलो आहोत असे वाटायचे. या काळात मी माझ्या एका समुपदेशक मित्राशी बोलायला सुरुवात केली. त्यानेदेखील माझे ऐकून घेतले. माझ्या गेल्या वीस वर्षांत सहन केलेल्या आणि इलाज न झालेल्या जखमांनी त्रास द्यायला परत सुरुवात केली. नातेवाईक मी स्वतःहून बंद केले. मैत्रिणींची लग्ने झाली आणि त्यांना मुलेही झाली. ज्यांना लग्न न झालेल्या मैत्रिणी कचरा वाटतात अशांनासुद्धा मी आयुष्यातून बाहेर काढले. हा काळ प्रचंड बदलाचा होता. मी अंतर्बाह्य बदलत होते.
ज्या पद्धतीने २०१९ संपले ते निराशाजनक होते. माझी पाठदुखी प्रचंड वाढली होती. मला चारचाकी चालवायला आवडत नाही, कारण त्यामुळे प्रदूषण वाढते, म्हणून माझा त्याला विरोध आहे. ज्या पदावर मी काम करत होते, तेसुद्धा मी आईवडिलांच्या इच्छेखातर घेतले होते. २०१९ला आणखी भार नको म्हणून मी माझी चारचाकी विकली. या वेळी मी आणखी एका समुपदेशक मित्राला आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या, ज्यात मी बारावीत असताना जातीवरून माझे झालेले शोषण आणि त्या शोषणातून बाहेर पडलेली मी, हे पण होते.
या काळात मी एकटीच राहायचे. नागपुरात ओळखीचे लोक असले, तरी माझ्या वयाची माणसे त्यांच्या संसारात गुंग होती. नातेवाईकांशी संबंध जवळपास संपला होता. एवढी कटुता माझ्या आणि माझ्या आईवडिलांच्या वाट्याला का आली असावी, याचा विचार करत मी थकून जायचे. माझी लहान लहान कामे सुरू होती, पण माझ्या क्षमतेला साजेसे काहीही नव्हते. माझ्यापेक्षा कमी शिकलेली, साधारण असणारी बहुतेक मंडळी खूप चांगल्या ठिकाणी कामाला होती.
मला या सर्व गोष्टींचा आता राग यायला लागला होता. वर्षानुवर्षे माझ्याच दुःखात राहिल्याने मी सामाजिक भान आणि व्यवहार या दोन्ही गोष्टींपासून खूप दूर होते. माझे किती निर्णय चुकले, हे मला नागपुरात आल्यावर कळले. माझ्याजवळ कोणी का येत नाही? ग्रुप्समध्ये मला का सामील करून घेतले जात नाही? असा विचार करत ‘आपले’ असे कोणीच नाही, हे मला लक्षात आले.
आम्ही आमचे स्वतःचे घर सोडले आणि मी माझी चारचाकी विकली, याचा माझ्या आईवडिलांवर विशेष करून वडिलांवर खूप परिणाम झाला. माझ्यासोबत जे झाले ते माझ्या मुलीसोबत होत आहे, असे त्यांना वाटू लागले. त्यांचे मित्र आणि नातेवाईक या काळात आमच्याकडे आलेसुद्धा नाहीत. करोना सुरू झाल्यावर आम्ही तिघेही घरी राहत असल्याने बाबांना डिप्रेशनचा त्रास होतोय, हे माझ्या लक्षात यायला लागले. नागपुरात आल्यावर मला ज्या गोष्टी कळल्या त्या आईवडिलांनी आधी सांगितल्या असत्या, तर कितीतरी नुकसान टाळता आले असते. यावरून आमची खूप भांडणे व्हायची. जात आपल्या सामाजिक आयुष्यात किती महत्त्वाची ठरते, याचा साक्षात्कार मला नागपुरात आल्यावर झाला.
२०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षी नागपुरात आल्यावर रिकाम्या वेळेत माझ्या दबलेल्या (कारण या भावनांचा सामना करायला कोणी शिकवले नव्हते.) नकारात्मक भावना बाहेर घाण पद्धतीने बाहेर यायला लागल्याने मला काय करावे, हे कळाले नाही. नोकरीत असताना रोजच्या कामात आपण सगळेच या गोष्टी नाकारत, दाबत पुढे जात असतो. गेल्या वीस वर्षांत आपण सगळेच जे कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडलोय, त्या सर्वांना जे सोसावे लागले, त्यासाठी आपले मेंदू आणि शरीर तयार नव्हते. वेगवेगळ्या कारणांसाठी आपण सगळेच रोजच्या चाकोरीबद्ध आयुष्यातून बाहेर पडून नक्की काय करतोय, याचा विचार करत नाही. त्रास व्हायला लागला तर दारू, सिगारेट आणि मेंदूला तात्पुरता आराम देतील, अशी औषधे घेतो.
या वेळीच मी फेसबुक वापरणे बंद केले. अर्थात मला वाटायचे की, हे फक्त माझ्यासोबत होत आहे. याच सुमारास मी ट्विटरवर लिहायला सुरुवात केली. २०२०ची सुरुवात विशेष नव्हती. याच वेळेस मार्चमध्ये कोरोना आला. सर्वच गोष्टी बदलल्या. मी घरी असल्याने निव्वळ टाईमपास म्हणून मराठीत लिहायला सुरुवात केली. नागपुरातील बदललेले वातावरण धक्कादायक होते. मला ते फार उशिरा जाणवले कारण मी छोट्या छोट्या बदलांकडे, लोकांच्या विचित्र वागण्याकडे नीट लक्ष दिले नाही. एखादी व्यक्ती आपल्याला कोणत्याही कारणाने नाकारत आहे, नाते ठेवायला इच्छुक नाही, ही गोष्ट मला लवकर कळायची नाही. मी एकटी असल्यामुळे मी समोरच्याशी स्वतःहून बोलायचे, जे फार नैसर्गिक होते. त्यामुळे व्हायचे तेच झाले. मी अनेक वेळा दुखावले जाऊनही, अपमानित होऊनदेखील नाते तोडायचे नाही. त्यामुळे त्या संबंधित गोष्टी सतत माझ्या स्वप्नात यायच्या. मी त्या स्वप्नांचा अर्थ समजून वागायला सुरुवात केली, तेव्हा आयुष्यात स्पष्टता येत गेली. मी स्वतःशी कित्येक वर्षं खोट बोलत राहिले.
करोना सुरू झाल्यानंतर सर्वच गोंधळले होते, ज्यात आमचे कुटुंबसुद्धा होते. घरी असताना मी ट्विटरवर मानसिक आरोग्यावर मराठीत लिहायला सुरुवात केली. ज्याला अनपेक्षितरीत्या चांगला प्रतिसाद मिळाला, ज्याने माझा हुरूप वाढला. आम्ही जिथे राहत होतो, त्या घरमालकाने आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आणि जून २०२०मध्ये आम्हाला पुन्हा एकदा घर सोडावे लागले.
या सर्व गोष्टींचा वडिलांवर सर्वांत जास्त परिणाम झाला. इतकी वर्षे पुण्यात राहून आम्हा तिघांनाही अशा वातावरणाची सवय नव्हती. उतरत्या वयात एवढा बदल सहन होत नाही, त्यात करोनाची भीती ज्याचा परिणाम माझ्या वडिलांच्या तब्येतीवर झाला. नवीन घरात शिफ्ट होताच माझ्या वडिलांची तब्येत खूप खालावली. याच काळात मी ट्विटर वापरणे बंद केले. यादरम्यान वैद्यकीय क्षेत्र किती भ्रष्ट आहे, याचा मी जवळून अनुभव घेतला.
या काळात मी पुण्यातील एका खासगी विद्यापीठात रुजू झाले आणि घरून काम करू लागले. काम सांभाळून बाबांच्या तब्येतीकडे बघणे प्रचंड कठीण गेले. पूर्ण प्रयत्न करूनही दुर्दैवाने बाबा ३० ऑक्टोबर रोजी गेले. हे अचानक झाले कारण त्यांची तब्येत सुधारत होती. माझ्याजवळच्या व्यक्तीचा हा तेरा वर्षांतील चौथा मृत्यू होता. वडील गेल्यानंतर आई आणि मी दोघींनी पंधरा दिवसांत नागपूर कायमचे सोडले. आमचा राहता फ्लॅट आम्ही भाड्याने दिला होता. या संपूर्ण काळात आईवडिलांसोबत दोन्हीकडचे नातेवाईक जे काही वागले ते शर्मनाक होते. या काळात माझ्या एका मित्राने केलेल्या मदतसाठी मी त्याची कायम ऋणी राहील. मुळात माझ्या आईवडिलांच्या आंतरजातीय विवाहाला असलेला विरोध वडिलांच्या मृत्यूपर्यंत राहिला. पुण्यात आल्यावर वातावरण बदलले.
मी परत लिखाणाला सुरुवात केली. मुख्य म्हणजे माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या मान्य करायला सुरुवात केली. २०२१मध्ये मी ३१ लेख, एक पुस्तक आणि अनेक सोशल मीडिया पोस्ट असे करत ७५ हजार शब्दांवर लिहिले. हे माझ्यासाठी एक प्रकारे भावनिक विरेचन ठरले. २०२१मध्ये विद्यापीठातील नोकरीतून बाहेर पडले. पहिल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आलेल्या अडचणींतून वेगवेगळ्या कारणांनी आपल्या समाजाचे मानसिक स्वास्थ्य किती खालावले आहे, याचा अनुभव घेतला. मी अजूनही न केलेल्या गोष्टींची शिक्षा भोगत आहे, याची प्रचिती वारंवार आली.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
पहिल्या पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद हा खरेच सुखावणारा होता. एवढा संघर्ष करून माझ्या कामाला एका प्रकारे ओळख मिळाली. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता. लिखाणामुळे वर्षानुवर्षे माझ्या मनातील साचलेल्या गोष्टींना वाचा फुटली.
डिसेंबर २०२१मध्ये अनेक वर्षे मी PTSDचा त्रास सहन करत आले आहे आणि मानसशास्त्राची विद्यार्थी असूनही मला मदत मिळाली नाही, हे पहिल्यांदा मी जाहीरपणे सोशल मीडियावर सांगितल्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात काही परदेशी लोकसुद्धा होते. या विषयावर लिहावे असे माझ्या मनात होते, पण २०२२मध्ये नवीन नोकरी, त्यानंतर आईला आणि मला झालेला करोना, त्यामुळे लिहायला डिसेंबर २०२२ उजाडले. अर्थात हे सर्व लक्षात यायला फार उशीर झाला आणि यादरम्यान माझ्या आयुष्यातील सर्वांत मोलाचा काळ वाया गेला.
तारुण्याचा काळ जो व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असतो, त्या काळात मानसिक आघात अनुभवल्याने माझ्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर न पुसणारे परिणाम झाले आहेत. या सर्व काळात मी सतत भीतीच्या छायेत वावरले. ज्या दुर्दैवी घटना वारंवार घडल्या, त्याची भीती मनात खोलवर रुजल्यामुळे आत्मविश्वास कमालीचा कमी झाला. पुढे काय होईल, या भीतीने चिंता सतत सोबत राहिली. काही वर्षे डिप्रेशनमध्ये गेली.
या आघातामुळे आयुष्य अधांतरी राहिले. एक धक्का पचवून कुठेतरी स्थिर व्हायच्या आत दुसरा धक्का असे करत हे भयानक चक्र गेली वीस वर्षे सुरूच राहिले. जुलै २०१९ ते मे २०२२ या काळात नागपूर आणि पुणे मिळून मी सात वेळा घर बदलले आहे. यात पैशांचे नुकसान झाले ते वेगळे. या काळात मला आवश्यक मदत मिळाली असती, तर कदाचित माझ्या कुटुंबाचे आणि माझे आयुष्य वेगळे राहिले असते. PTSDमुळे माझ्या आयुष्याचे जे नुकसान झाले, ते इतर कोणाचे होऊ नये हा निर्धार करून मी यावर पुस्तक लिहायचा निर्धार केला.
‘मानसिक आघात समजून घेताना’ – डॉ. वृषाली रामदास राऊत
न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे | पाने – १०८ | मूल्य – २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment