जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!
ग्रंथनामा - झलक
रवींद्रनाथ पाटील
  • ‘तुरुंगरंग’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 23 March 2025
  • ग्रंथनामा झलक तुरुंगरंग Turungrang रवींद्रनाथ पाटील Ravindranath Patil

‘तुरुंगरंग’ हे माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबई उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. रवींद्रनाथ पाटील यांचं अनुभवपर पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

‘जेल’ या विषयावर मराठी भाषेमध्ये आजवर फारशी पुस्तकं लिहिली गेली नसावीत. माझ्या माहितीप्रमाणे, ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ हे ज्येष्ठ गांधीवादी आणि युवक क्रांती दलाचे (‘युक्रांद’) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे येरवडा जेलची यापूर्वीची अखेरची आठवण. या पुस्तकात डॉ. सप्तर्षी सरांनी १९७०च्या दशकातील त्यांचे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. म्हणजे तेव्हापासून आजपावेतो एकाही कैद्याला वाटू नये की, आपण जेलच्या अनुभवांवर आधारित एखादं पुस्तक लिहावं? एकाच्याही मनात हा विचार येऊ नये की, गजाआडची दुनिया आपण जगासमोर उलगडून दाखवावी ?

जेलमध्ये असताना मी बंद्यांना सांगायचो की, जामिनावर सुटल्यावर माझे अनुभव मी पुस्तकरूपानं मांडणार आहे. परंतु मला तेव्हा कुणी फार गांभीर्यानं घ्यायचं नाही. एकदा परमेश्वर ऊर्फ ‘देवा’ जाधव नावाच्या बंदी मित्रानं मला चिठ्ठीद्वारे कळवलं की, अनेक वर्षांपूर्वी एक आयएएस अधिकारी येरवडा जेलमध्ये आले होते. सुमारे सहा वर्षं ते आत राहिले. आपल्या बराकीत बसून ते विपुल लेखन करायचे. म्हणायचे, “बाहेर गेल्यानंतर मी एक मोठा ग्रंथ लिहिणार आहे.” परंतु ते जेलमधून सुटल्यावर ग्रंथ सोडा, वृत्तपत्रात त्यांचा साधा लेखही कधी प्रकाशित झाला नाही!

देवा माझा हितचिंतक होता आणि मला तो सावध करत होता. कदाचित त्याला हे सुचवायचं असावं की, जेलमधला उत्साह जेलबाहेर टिकून राहत नाही. असं का बरं होत असावं? नि आपण ते कसं टाळू शकतो? काळाच्या प्रवाहात मला समजलं की, त्यामागं दोन प्रमुख कारणं असावीत. एक म्हणजे, जेलमध्ये असताना बंद्याच्या मनात येणारे विचार हे ‘स्मशान-वैराग्या’सारखे असतात. ते फार काळ टिकत नाहीत. तिथं असताना बंद्याला काय वाटतं, याला त्याच्या जेलबाहेरच्या आयुष्यात काडीची किंमत राहत नाही. किंबहुना, बहुतांश बंदी जेलबाहेर पडतेवेळी आपले विचार तिथल्या तिथंच सोडून आलेले असतात. नि दुसरं व महत्त्वाचं कारण म्हणजे एकेकाळी आपण जेलमध्ये होतो, हे बाहेर आल्यावर मनुष्याला आठवावंसं वाटत नाही आणि इतरांना तर ते अजिबातच सांगावंसं वाटत नाही!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

देवा जाधवची चिठ्ठी वाचून माझा पुस्तक लेखनाचा उत्साह कमी झाला नाही. उलटपक्षी तो वाढला. कारण मला जाणीव झाली की, यापूर्वी भल्याभल्यांना जे शक्य झालं नाही, ते साध्य करण्याचा अट्टाहास मी उराशी बाळगून होतो नि त्या अट्टाहासापायी जेलच्या प्रांगणामध्ये आपले डोळे आणि कान उघडे ठेवून मी पुस्तकासाठी उपयुक्त माहिती गोळा करत होतो. वेळ मिळेल तेव्हा मी बंद्यांशी आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करायचो. बराकीमध्ये, जेलच्या पटांगणात, तिथल्या पिपरी वृक्षाच्या पारावर, रस्त्यात जाता-येता आणि वेळप्रसंगी अंघोळीच्या सिमेंटच्या रिकाम्या हौदावर बैठक मांडून मी गप्पा मारायचो. नि अशा चर्चांमधून जी माहिती गोळा व्हायची, तिचा मजकूर साठवलेला माझा ‘मेंदू’ सोबत घेऊन मी १९ मे २०२३ रोजी माझ्या वाढदिवशी जामिनावर बाहेर पडलो.

बाहेर आल्यानंतर माझे सुरुवातीचे काही दिवस विलक्षण संभ्रमावस्थेत गेले. एकीकडे जेलचे नानाविध अनुभव डोक्यात थैमान घालत होते, तर दुसरीकडे दैना उडून गेलेल्या आपल्या संसाराची घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यात माझा निम्मा-अधिक वेळ खर्ची पडत होता. मग अशा परिस्थितीत पुस्तक लिहायला तरी कसं घ्यायचं? तेव्हा मला आठवण झाली ती माझ्या पहिल्या पत्रकार मित्राची.

१९९६ साली इंजिनिअरिंग करताना मी पुण्यातल्या एका स्थानिक केबल न्यूज चॅनलमध्ये पार्ट-टाईम पत्रकार म्हणून काम पाहत होतो नि त्या काळात माझा ‘तो’ मित्र प्रभात वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून नोकरी करत होता. आमच्यामध्ये तेव्हा बरीच गट्टी जमली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात आम्ही दोघंही एकमेकांच्या विस्मृतीत गेलो होतो. जेलबाहेर आल्यावर मला अचानक टेलेपथी झाली आणि मी त्याला गाठलं. सिंहगड रोडवरच्या एका उडपी रेस्तराँमध्ये त्याच्यासोबत, अर्थात वरिष्ठ पत्रकार उमेश घोंगडे यांच्यासोबत माझी ती भेट झाली नसती, तर स्वैर लेखनाच्या प्रसूतीकळा सोसूनदेखील कदाचित हे सुदृढ बालक (पुस्तक!) आजवर जन्मालाच आलं नसतं.

त्या दिवशी उमेशनं माझे विचार शांत चित्तानं ऐकून घेतले नि लगोलग मला सोबत घेऊन तो बाजीराव रस्त्यावरील लोखंडे तालमीच्या बोळात पोचला. तिथल्या ‘शक्ती टॉवर’च्या चौथ्या मजल्यावर माझी कॉम्रेड अरविंद पाटकरांसोबत मुलाखत पार पडली. हेच ते विख्यात ‘मनोविकास’ प्रकाशनाचे संस्थापक!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! परंतु पाटकर सर मला उद्देशून म्हणाले, “तुम्ही लिहा... मनसोक्त लिहा. तुमचे विचार अडवू नका. थांबवू नका... छान पुस्तक होईल.” माझ्यातल्या उदयोन्मुख लेखकाला तेव्हा विलक्षण उभारी मिळाली आणि आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक लिहिण्यासाठी मी सज्ज झालो.

जून २०२३पासून पुढले सहा महिने मी पुस्तक लेखनामध्ये स्वतःला गाडून घेतलं. मराठी टायपिंगची यापूर्वी मला फारशी सवय नव्हती. त्यात गेली अनेक वर्षं इंग्रजाळलेल्या विश्वात राहिल्यामुळे मराठी लेखनाचीही मला सवय राहिली नव्हती. माझ्या हस्ताक्षराचा बोजवारा उडालेला होता. मराठी भाषेतले पर्यायी शब्द सुचत नव्हते. सुयोग्य विशेषणं आठवत नव्हती. मुद्देसूद मांडणी करताना ओढाताण होत होती. त्यामुळं सहा महिन्यांत जितका काही मजकूर मी संगणकावर टाईप करून फायनल केला असेल, त्याच्या तिपटीनं लिखाण मी केवळ आवडलं नाही म्हणून ‘डिलीट’ मारलं असेल!

भालचंद्र नेमाडेंनी ‘कोसला’ ही विख्यात कादंबरी २४ ऑगस्ट १९६३ ते १० सप्टेंबर १९६३ या कालावधीत, म्हणजे केवळ १८ दिवसांत लिहून पूर्ण केली होती. माझं १८ दिवसांत एक प्रकरणदेखील लिहून व्हायचं नाही. आणि झालं तरी प्रकाशकांची कॉमेंट यायची, “यात बरंच संपादन करावं लागणार!” थोरामोठ्यांचा मोठेपणा समजण्यासाठी मोठेपणाच्या गावाला जाऊन पाहावं लागतं, हेच खरं.

असं करता करता एकदाचा पुस्तकाचा मसुदा तयार झाला, जो मी माझ्या पत्नीला (डॉ. कांचन पाटील) ६ जानेवारी २०२४ रोजी तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून सादर केला. अर्थात, त्या मसुद्यावरही संपादकीय संस्कार गरजेचे होते. ज्येष्ठ पत्रकार कै. वरुणराज भिडे पूर्वी आपल्या सहकाऱ्यांना सांगायचे, “पत्रकारानं नेहमी हनुमानाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा. शक्य असल्यास त्यानं बातमीचा अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणावा, जेणेकरून संपादकांना जी कुठली वनस्पती उपचारायोग्य वाटेल, तिचा वापर करता येईल.”

मीही असाच एक अस्ताव्यस्त अनुभवांचा द्रोणागिरी पर्वत मनोविकास प्रकाशनाच्या पुढ्यात आणून टाकला होता. आणि त्यातून ‘संजीवनी बुटी’ शोधण्याचं अतिशय जटिल काम प्रकाशक आशिश पाटकर, विख्यात लेखक व समाजसेवी डॉ. अरुण गद्रे आणि संपादक विलास पाटील यांनी पार पाडलं आहे. आणि डॉ. गद्रे सरांचे तर आभार मानावे तितके थोडेच आहेत. ते एक सर्जनही आहेत नि सर्जनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही ते सुपरिचित आहेत. त्यामुळे त्यांनी आवश्यकतेनुसार माझ्या लेखनाची ‘शल्यचिकित्सा’ही केली आणि वेळप्रसंगी मला दिलखुलास दाद देखील दिली. किंबहुना मी तर म्हणेन की, माझ्यासारख्या साहित्य क्षेत्रातील धोंड्यातील ‘नको असलेले’ भाग त्यांनी काढून टाकले आणि माझ्यामधला लेखक घडवला.

सदर पुस्तक ‘मनोरंजनातून प्रबोधन’ या माध्यमातून समाजापुढं मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. ज्यांनी आजवर जेल पाहिलेलं नाही आणि जेलमध्ये जाण्याची ज्यांची इच्छा नाही, अशा सर्वांना हे पुस्तक घरबसल्या जेलच्या दुनियेची सफर घडवेल. जेलच्या कोंडवाड्यामध्ये कैदी जगतात कसे, वागतात कसे, रमतात कसे (हो, ते रमतातही!) याचं रसभरीत वर्णन या पुस्तकात वाचायला मिळेल.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

पुस्तकात खऱ्या खुऱ्या घटनांची, कथानकांची नि आख्यायिकांची रेलचेल बघायला मिळेल. वाचकांना जणू वाटेल की, आपण केवळ एक पुस्तक वाचत नसून गजाआडचं विश्व प्रत्यक्ष अनुभवतो आहोत, सहासष्ट एकर परिसरात पसरलेल्या येरवडा जेलच्या सुमारे बेचाळीस बराकी आणि दोन-अडीचशे खोल्यांमधलं बंद्याचं आयुष्य आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत.

परंतु कैद्यांचं आयुष्य उलगडून दाखवणं, हाच केवळ या पुस्तकाचा हेतू नाही. ते फक्त एक निमित्त आहे - वाचकांचं मनोरंजन करण्याचं आणि जेलच्या विश्वाची तोंडओळख करून देण्याचं. मुख्य हेतू तर यावर ऊहापोह करण्याचा आहे की, माणूस मुळातच गुन्हेगार का होतो आणि समाज म्हणून आपण त्याला गुन्हेगारी विश्वात जाण्यापासून कसं परावृत्त करू शकतो! आणि वाचकांना हेही दाखवून देण्याचा प्रयत्न आहे की, जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

या पुस्तकाच्या जडणघडणीमध्ये विविध क्षेत्रांतील अनेक धुरिणांचं भरीव योगदान आहे. या साहित्य-यज्ञामध्ये माझं झाडून सारं कुटुंब समिधा अर्पण करत होतं. सर्वजण या पुस्तक-घडणीच्या प्रवासामधले माझे सहप्रवासी होते.

आणि हो, या जगरहाटीमध्ये मी माझ्या बंदी-मित्रांना कसं विसरू शकतो? तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, ‘फोडिलें भांडार । धन्याचा हा माल । मी हमाल । भारवाही ।।’ या पुस्तकाचे खरे ‘धनी’ अर्थात लेखक तर येरवडा जेलमधले ते कैदी आहेत, ज्यांचा आवाज जेलच्या निर्जीव भिंती ऐकू शकत नाहीत आणि ज्यांची परवड डोळ्यांवर पट्टी बांधलेली न्यायदेवता पाहू शकत नाही. या पुस्तकातल्या भावना त्या व्यक्तींच्या आहेत, ज्यांना जगण्याचे कुठले मूलभूत हक्क व अधिकार असतात, हे मान्य करण्याइतपत आमची लोकशाही अद्याप प्रगल्भ झालेली नाही. अशा सर्वसामान्य बंद्यांच्या अंतर्मनातला आवाज गुरुवर्य मच्छिंद्रनाथांच्या प्रेरणेनं जेलबाहेरच्या समाजापर्यंत पोचवण्याचा हा माझा प्रांजळ प्रयत्न.

‘तुरुंगरंग’ - अ‍ॅड.. रवींद्रनाथ पाटील

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - ४३२ | मूल्य - ४९९ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 24 March 2025

आयशप्पत, कसलं भारी प्रकरण आहे. कैदी म्हणून तुरुंगात जायचं आणि तिथलं वर्णन नंतर करायचं. मला आठवतं त्याप्रमाणे केवळ तुषार नातूंनी असं वर्णन केलंय. ते इथे आहे : https://jaisejyachekarm.blogspot.com/2013/12/blog-post_22.html
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......