‘गंगा जमनी संस्कृती’चे समर्थक असणाऱ्या अमीर खुसरोंवर सहिष्णूता व समन्वयावर निष्ठा असणाऱ्या मुस्लिमेतराने कादंबरी लिहावी, ही भारतीय समाजाची व्यवच्छेदकता आहे!
ग्रंथनामा - झलक
सरफराज अहमद
  • ‘अमीर खुसरो’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Tue , 07 November 2023
  • ग्रंथनामा झलक अमीर खुसरो Amir Khusrow

लेखक मिलिंद जाधव यांची ‘अमीर खुसरो’ यांच्या जीवनावरील कादंबरी नुकतीच मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला लेखक व सामाजिक कार्यकर्ते सरफराज अहमद यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

भारतीय समाजाची सांस्कृतिक जडणघडण, त्याची वैशिष्ट्ये, परंपरा, तत्त्वज्ञान, लोकजीवन, भाषेचा विकास आणि त्याची संरचना यांचा मध्ययुगात अनेक मुस्लीम विद्वानांनी अभ्यास केला आहे. भारतातील धर्म व त्याआधारे विकसित झालेल्या तत्त्वज्ञानाचा पहिला मुस्लीम अभ्यासक म्हणून अल्‌ बेरुनीचा उल्लेख केला जातो. हा इब्ने खल्दुनच्या आधीचा तत्त्वज्ञान आणि इतिहासाचा अभ्यासक. त्याने भारतातील धार्मिक तत्त्वज्ञानाचे स्वरूप आणि त्याच्या व्याप्तीवर भाष्य केले आहे. जगभरात इब्ने खल्दूनच्या मांडणीवर प्रचंड चर्चा झाली, पण त्या तुलनेत अल्‌ बेरुनी मात्र कमनशिबी ठरला.

इब्ने खल्दूनने अरब समाजाला केंद्रस्थानी ठेवून जगाचा इतिहास लिहिला आहे. अरब समाजजीवनाच्या इतिहासाची माहिती देणाऱ्या खल्दूनच्या ग्रंथाची प्रस्तावना मूळ ग्रंथाहून अधिक नावारूपास आली. अरब समाजाच्या इतिहासाची गैरइस्लामिक निष्ठांच्या आधारे व्याख्या करणारा पहिला इतिहासकार म्हणूनही इब्ने खल्दूनचा उल्लेख करता येऊ शकेल. ‘कुरआन’ आणि ‘हदीस’प्रणित श्रद्धावादी, मौखिक इतिहासकथनाच्या संहितेला आव्हान न देता त्याने इतिहासलेखनाची समांतर पद्धत घडवली. अरबांच्या उत्पादनक्षमतेसह उत्पादन घटक, नैसर्गिक साधनसंपत्ती, त्यांचे स्त्रोत, श्रममूल्य, बाजारातील घडामोडी, अरब सावकारांची धोरणे, गुलामांची अवस्था, स्त्रीजीवन, समाजाच्या आणि टोळ्यांच्या निर्णयप्रक्रियेत स्थान नसलेल्या वर्गाची स्थिती, धार्मिक जीवन, पुरोहित वर्गाची रचना, विवाहसंस्था अशा अनेक मुद्द्यांवर खल्दूनने विस्ताराने लिहिले आहे.

अल्‌ बेरुनीने खल्दूनच्या आधी हीच पद्धत भारतात अवलंबली आहे. अल्‌ बेरुनी अकराव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात भारतीय उपखंडामध्ये आला होता. भारतातील वेगवेगळे धर्म, पंथ यांचा अभ्यास करण्यासाठी त्याने अनेक ग्रंथ धुंडाळले. ते वाचण्यासाठी भारतातील काही भाषा अवगत करून घेतल्या.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अल्‌ बेरुनीने भारतीय समाजाचा अभ्यास करताना हिंदू धर्माला अभ्यासाचा मुख्य विषय बनवले. त्याने हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला. अनेक संकल्पनांच्या मुळाशी जाऊन त्यांची उकल केली. अनेक धर्मग्रंथ हाताळले. वेदांपासून स्मृतींपर्यत सर्व ग्रंथ बारकाईने वाचले. हिंदूंच्या ईश्वरविषयक संकल्पनेपासून लोक-परलोक या शब्दांचा अर्थ लावण्यापर्यंत अल्‌ बेरुनीने चर्चा केली आहे. ती करताना त्याने अथेन्सचा सोलन, ग्रीसचा थिआस, कॉरिन्सचा पेरियाण्डर, मिलिट्सचा थेलिट्स, लॅकिडिमनचा किलोन, लसबोसचा पिटेकूस व लिंड्सचा क्लियोबोलस यांच्या व त्यांच्या उत्तरकाळात जन्मलेल्या तत्त्वज्ञांच्या तत्त्वज्ञानातील दाखले दिले आहेत.

ग्रीकमध्ये तत्त्वज्ञानाचा विकास झाला नव्हता, तेव्हाची ग्रीकवासियांची आणि आताची हिंदूंची मते, यामध्ये कोणते साम्य आहे, हे दाखवून दिले आहे. जगातील अनेक देशातील तत्त्वज्ञ आणि त्यांच्या सृष्टीच्या रचनेविषयीच्या विचारांची तुलनादेखील त्याने हिंदूंच्या परलौकीक विचारांशी करण्याचा प्रयत्न केला आहे.

अल्‌ बेरुनीच्या तुलना करण्याच्या पद्धतीकडे पाहिल्यास त्याच्या अभ्यासाचा आवाका लक्षात येऊ शकतो. एखाद्या विषयावर तो जगातील अनेक देशांमध्ये असणाऱ्या विविध विचारवंतांच्या मतांचा आणि त्यांच्या ग्रंथाचा आढावा घेतो.

त्यामुळेच अनेक इतिहासकारांचे याविषयी मतैक्य आहे की, अल्‌ बेरुनीनेच खऱ्या अर्थाने तुर्क विजेत्यांना आणि सुफींना भारतीय समाज, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली. त्याने केलेल्या अभ्यासाच्या आधारेच कालांतराने सुफींच्या प्रयत्नातून भारतात हिंदू-मुस्लिमांच्या सांस्कृतिक समन्वयातून ‘गंगा-जमनी संस्कृती’ची समृद्ध परंपरा आकारास आली.

अल्‌ बेरुनीने जन्मास घातलेली भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाची, त्याच्या अन्वयार्थाची परंपरा नंतर अनेक मुस्लीम विचारवंतांनी, इतिहासकारांनी आणि तत्त्ववेत्यांनी पुढे नेली. त्यामध्ये मिनहाजुल सिराज, फखरे मुदब्बीर, अमीर खुसरो, शाह राजू खत्ताल, सुफी बंदानवाज गेसूदराज, अकबर, अ. रहीम खानेखाना, दारा शुकोह वगैरेंचा समावेश होतो.

पण दुर्दैवाने या परंपरेविषयी आधुनिक काळात अभावानेच लिहिले जाते. मराठी भाषेत तर या विषयावर अपवाद वगळता लिखाण झालेले नाही. अशा निराशाजनक परिस्थितीत मिलिंद जाधव यांनी अमीर खुसरो यांच्यावर लिहिलेली ही कादंबरी प्रकाशित होत आहे. ही घटना आजच्या धर्मसंघर्ष शिगेला पोहोचलेल्या भारतीय समाजवास्तवामध्ये खूपच आश्वासक आहे.

सल्तनतकाळात मुस्लीम सत्ताधीश, त्यांच्या वळचणीला असलेला सरंजामी उच्चवर्ग, उलेमा यांच्या वर्तनातून वर्चस्ववादी मानसिकता जन्माला आली. त्यातून इस्लामला मध्ययुगीन सामाजिक, राजकीय संघर्षातून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या इस्लामचा जन्म शोषितांच्या पक्षपाती प्रतिनिधित्वातून झालेला होता, त्या इस्लामला राज्यकर्ते आणि अभिजनांच्या सन्मानार्थ राबवण्याची दांडगाई सत्तेने पोसलेल्या उलेमांकडून होत होती.

अशा परिस्थितीमध्ये सुफींनी इस्लामला सामान्यांच्या जगण्याशी जोडण्याचे धाडस केले. शेतकऱ्यांच्या संघर्षात इस्लामच्या तत्त्वज्ञानातील सूत्रे वापरून सत्तेला आव्हान दिले. ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती, बख्तियार काकी, निजामुद्दीन औलीया, नसिरुद्दीन चराग दहेलवी या सुफींनी समतेच्या तत्त्वावर भारतीय समाज घडवण्याचा प्रयत्न केला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

समता आणि समन्वयाच्या या सुफी परंपरेतूनच अमीर खुसरो या कवी, विचारवंत आणि संगीततज्ज्ञ सुफीचा जन्म झाला. खुसरो हे हिंदूंशी समन्वय साधू पाहणारे ‘गंगा जमनी संस्कृती’चे समर्थक होते. त्यांच्या इतिहासावर मिलिंद जाधव यांच्यासारख्या सहिष्णूता व समन्वयावर निष्ठा असणाऱ्या मुस्लिमेतराने कादंबरी लिहावी, ही भारतीय समाजाची व्यवच्छेदकता आहे.

जाधव यांनी खुसरोंच्या जीवनातील घटनांना जोडून एक पट उभा करण्यापेक्षा त्या इतिहासातील वैशिष्ट्यांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. खुसरोंनी ग्रंथलेखनाच्या वेळेस केलेल्या चर्चा, समाजाच्या विविध घटनांवर केलेले भाष्य, राजकारणातील बदलांवर केलेली टीका, संगीतावरची त्यांची मते, सुफीवादाविषयीची त्यांचे लिखाण, याची दखल जाधव यांनी निरनिराळ्या प्रसंगांतून, संवादातून घेतली आहे.

समग्र खुसरो कोणत्याही एका पुस्तकात मांडता येत नाहीत, पण त्यांच्या नेमक्या वैशिष्ट्यांची चर्चा करून त्यांचे व्यक्तिमत्त्व उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न, या कांदबरीतून झाला आहे. या प्रतून मराठी साहित्यात खुसरोंच्या इतिहास व मूल्यांची भर पडते आहे, हे निश्चितच महत्वाचे आहे. 

अलीकडच्या काळात मुस्लिमांच्या राष्ट्रीयत्वाविषयी अनेक गफलती आढळतात. खुद्द मुस्लिमांनाही स्वतःच्या राष्ट्रवादाची मूल्ये ज्या परंपरांतून आकाराला आली, त्याचे भान राहिलेले नाही. सांस्कृतिक उपरेपणा पत्करण्यापेक्षा ऐतिहासिक परंपरांच्या आधारे राष्ट्राशी असलेले नाते अधिकाधिक घट्ट करण्याची संधी मुस्लीम समाजाला खुसरोंसारख्या प्रतीकांच्या माध्यमातून सहज घेता येईल.

खुसरोंनी स्वतःचे भारतीयत्व, इथल्या परंपरा, सामाजिक मूल्ये, धार्मिक श्रद्धा यांच्याशी समन्वयाचे धोरण ठेवून अधिकाधिक पक्के केले. हे करताना त्यांनी स्वतःचे धार्मिक तत्त्वज्ञान कुठेच वेठीस धरले नाही. पण त्याचा गैरअर्थ लावून सामाजिक संवाद तोडण्याचा कर्मठपणाही दाखवला नाही.

खुसरोंची कविता राष्ट्रनिष्ठेची इतरांपेक्षा निराळी आणि त्या अर्थाने अपारंपरिक भूमिका मांडते. मानवी समाजाच्या गरजा पूर्ण करणारी व्यवस्था व त्यातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि अधिकारांवर भाष्य करून त्या आधारे आदर्श समाज ही संकल्पना खुसरोंनी मांडली आहे.

ज्ञानेश्वरांप्रमाणे खुसरो भूतदया सांगतात. डॉ. मुशिरुल हक यांनी यासंदर्भात काही महत्त्वाची निरीक्षणे मांडली आहेत. त्यांच्या मते, खुसरोंनी अवाजवी शस्त्रास्त्रे निर्मितीला विरोध केला होता. शस्त्रास्त्रे ही मानवी जीवनाच्या हितासाठी असावीत, इतरांवर धाक निर्माण करण्यासाठी किंवा नाहक युद्ध लादण्यासाठी त्यांचा वापर होऊ नये, असे खुसरोंचे मत होते. खुसरो तुकारामांप्रमाणे अनेक ठिकाणी समाजातल्या चुकीच्या गोष्टींविरोधात बंड पुकारतात.

जियाउद्दीन बरनी हा सल्तनत काळातला एक महत्त्वाचा विचारवंत होता. त्याने उच्चवर्गीय मुसलमानांना अत्याधिक महत्त्व दिले आहे. समाजातील वाईट गोष्टींची जबाबदारी मात्र खालच्या वर्गातल्या लोकांवर ढकलली. अमीर खुसरो यांनी बरनीच्या या विचारांना विरोध केला. त्याचे मुद्दे खोडून काढताना खुसरो लिहितात, ‘‘समाजातील वाईट गोष्टींसाठी गरीब आणि खालच्या वर्गातील लोकांना जबाबदार धरणे योग्य नाही. गरीब मजूर, लहान-मोठे व्यापारी आणि फेरीवाले दिवसभरातील काबाड कष्टानंतर रात्री झोपतात. समाजाची गरज पूर्ण करतात. बादशाह आणि अमीरांच्या सहाय्यकांनाही - हुजुरातीत हजर रहावे लागते. आपल्या पोटासाठी हे लोक सारी रात्र जागून काढतात. मात्र आश्चर्य असे आहे की, ते याला कर्तव्य समजतात आणि या कर्तव्यपूर्तीत जीवनाचा आनंद शोधतात. या कर्तव्यपूर्तीच्या आधारेच समाजात उच्चवर्ग व कनिष्ठ वर्गाची संकल्पना मांडली जावी.’’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

खुसरो समाजातल्या अखरेच्या स्तरातील शेवटच्या माणसाच्या जगण्याची दखल घेत. एके ठिकाणी खुसरोंनी मजुरांची बाजू घेऊन मालकांना खडसावले आहे. ते लिहितात, ‘मजुरांना मजुरी देताना त्याच्यावर आपण उपकार करत असल्याचे मालकांना वाटते. पण हे मजूर अमर्याद कष्ट सोसून तुमची कामे करतात. त्यामुळेच तुम्हाला आधिकाधिक नफा मिळतो हे विसरू नका.’

मध्ययुगातील सामाजिक संघर्षात समाजातल्या अभिजनांनी हिणवलेल्या वर्गाची बाजू घेऊन खुसरो लढत राहिले. त्यांच्यासारख्या चळवळ्या सुफी साधकांची चर्चा सातत्याने व्हायला हवी. भारतीय समाजाच्या सर्वकालिक सांस्कृतिक जडणघडणीसाठी या चर्चा गरजेच्या आहेत. 

अमीर खुसरो आणि जियाउद्दीन बरनी यांची एकमेकांच्या विरोधातली मते अनेकांना राजकारणासाठी खुणावत होती. पण खुसरोंनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी निष्ठेने आपल्या सुफी प्रेरणांच्या आधारे दरबारात राजकीय भूमिका मांडल्या. उलेमांचा एक गट त्यांच्या विरोधात गेला, तरी त्यांनी तमा बाळगली नाही.

प्रस्तुत कांदबरीतल्या बरनी आणि खुसरोंच्या भूमिकांचे चित्रण या ऐतिहासिक वास्तवावर आधारीत आहे. आणि या संघर्षाला नाहक तीव्र स्वरूप देणे लेखकाने टाळले आहे. त्यामुळे या कादंबरीची वस्तुनिष्ठता वाढली आहे. खुसरोंचा हा वेगळेपणा तत्कालीन समाजाचे वास्तव समजून घेतल्यानंतर अधिक ठळक होतो.

खुसरोंनी त्यांच्या आयुष्यात अनेक सत्तांतरे पाहिली. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय स्थित्यंतरे अनुभवली. त्यातून होणाऱ्या इष्ट-अनिष्ट बदलांचेही ते साक्षीदार ठरले. पण त्यांनी सुफी मूल्यांवरची आपली निष्ठा ढळू दिली नाही. समाजात समता आणि समन्वय निर्माण करण्याची आपली भूमिका बदलली नाही.

खुसरोंना राजकारणातल्या बदलांचा फटकाही बसला, पण त्यांनी राजकीय परिस्थितीप्रमाणे स्वतःत बदल घडवला नाही. राजा बदलला म्हणून त्याची भाटगिरी करणे खुसरोंना कधीच जमले नाही. सत्तेचा घटक म्हणून जगताना सामान्य माणसांशी असलेले नाते खुसरोंनी दिवसागणिक नव्या उंचीवर नेले. सत्ताबदलाचे प्रसंग आणि त्या वेळची खुसरोंची भूमिका या कादंबरीत अतिशय समर्पक पद्धतीने मांडलेली आहे.  

खुसरोंनी आयुष्यभर प्रेमासाठी इश्काची काफिरी करताना कुणाचीही तमा बाळगली नाही. त्यांची एक कविता या मुद्द्यांच्या स्पष्टीकरणासाठी अधिक समर्पक आहे.

‘काफिरे – इश्कम मुसलमानी मरा दरकार निस्त

हर रगे मन तार गश्ता, हाजते जुन्नार नीस्त।

अज सरे बालीने मन बर खेज ऐ नादाँ  तबीब

दर्द मन्द इश्क रा दारो- बखैर दिदार नीस्त।

मा व इश्क यार, अगर किब्ला, गर दर बुतकदा,

आशिकान दोस्त रा बकुफ्रो-ईमां कार नीस्त।

खल्क मी गोयद के खुसरो बुत परस्ती मी कुनद

आरे-आरे मी कुनम बा खलको-दुनिया कार नीस्त।’

(मी प्रेमाचा काफीर आहे. मला मुसलमानीची आवश्यकता नाही. माझे प्रत्येक अंग (रग) तार बनले आहे. मला जाणव्याचीही गरज नाही. हे बालिश वैद्या माझ्या समोरून उठून जा. ज्याला प्रेमाच्या वेदना लागल्या आहेत, त्याचे उपचार प्रियकराच्या दर्शनाशिवाय अन्य काहीच नाही. आम्ही आणि प्रेयसीचे प्रेम आहे. काबा असो वा मूर्तींचा गाभारा, प्रेयसीच्या प्रियकाराला पाखंड आणि श्रद्धेशी कोणतेच काम नाही. जग म्हणते खुसरो मूर्तीपूजा करतोय. होय, होय मी करतो. मला दुनियेशी कोणतेही सरोकार नाही.)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मध्यकाळामध्ये भारतात राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात होती की नाही, हा वादाचा विषय आहे. प्रादेशिक रचनेवरून स्वतंत्र भौगोलिक ओळख अनेक प्रदेशांनी प्राप्त केली होती. त्यावरून त्या प्रदेशाशी सांस्कृतिक निष्ठा जपणारा वर्गही मध्ययुगात अस्तित्वात होता. भारतीय समाज हा अशाच भौगोलिक ओळखीवर उभा होता. त्यावरच त्याच्या राजकीय व सामाजिक निष्ठांनी जन्म घेतला होता.

खुसरो वंशाने परकीय असले तरी जन्माने भारतीय होते. त्यांचे पिता तुर्क आणि आई भारतीय होती. खुसरो आजन्म भारतात राहिले. त्यांच्या भूमिका ज्या भौतिक परिस्थितीत घडल्या, ती भारतीय होती. त्यामुळे त्यांच्या साहित्यात जे अभिव्यक्त झाले, ज्याचे पडसाद उमटले ते भारतीय होते.

ते ज्या धर्मात जन्मले, तो धर्म इस्लाम भारतीय नसला, तरी त्याचा लावलेला अर्थ मात्र भारतीय समाजवास्तवावर आधारित होता. यामुळेच त्यांच्या साहित्यात भारताविषयी असीम प्रेमाच्या भावना आढळतात. खुसरोंनी भारताच्या गौरवाचे गीत गायले. त्यांनी फारसीत लिहिलेल्या अनेक कवितांमध्ये भारताच्या अनेक रूपांना, त्याच्या वैशिष्ट्यांना अधोरेखित केले आहे. त्यांनी भारताच्या गौरवार्थ लिहिलेल्या कवितांमध्ये वापरलेल्या प्रतिमा, दिलेली उदाहरणे, उपमा आधुनिक राष्ट्रविषयक काव्यलेखनाच्या खूप पुढच्या आहेत. 

उदाहरणादाखल त्यांच्या भारतावरच्या काही कविता पाहता येतील. एका शेरमध्ये ते लिहितात-

‘हस्त मेरा मौलीद व मावा वतन’

(हिंद माझी जन्मभूमी आणि माझा देश आहे.)

दुसऱ्या एका कवितेत खुसरो म्हणतात-

‘किश्वरे हिंद बहिश्ते बर जमीन’

(भारत पृथ्वीवरील स्वर्ग आहे.)

एका कवितेत ते म्हणतात, 

‘दीं ज रसूल आमदाहे काई ज मरा दीन’

(देशप्रेम करणे माझ्या धर्मनिष्ठेचा (इमानचा) भाग आहे.)

यासाठी खुसरोंनी प्रेषितांच्या ज्या वचनाचा संदर्भ दिलाय, त्यात प्रेषितांनी म्हटलंय- ‘हुब्बुल वतन मन उल इमां’ अर्थात देशाशी प्रेम करणे इमानचे (श्रद्धेचं) एक अंग आहे.

खुसरोंचे दिल्ली शहरावर खूप प्रेम होते. ते सहसा दिल्ली सोडून बाहेर जात नसत. पण ज्या वेळी जात, तेव्हा अस्वस्थ होत. दिल्लीत परतल्यानंतर त्यांना प्रेषित युसूफ यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर जितका आनंद झाला होता, तितकाच आनंद आपण अनुभवल्याचे खुसरोंनी लिहून ठेवले आहे. गयासुद्दीन बल्बनचा मुलगा बुखरा खानसोबत एकदा ते लखनउला गेले होते. त्या वेळी दिल्लीच्या आठवणींनी त्यांचे मन व्याकूळ झाले होते.

एकदा खुसरो त्यांचे मित्र अमीर हाकीम खान याच्यासोबत व्यापारासाठी दिल्लीहून अवधला निघाले होते, पण रस्त्यातच त्यांना दिल्लीच्या आठवणींनी अस्वस्थ व्हायला लागले. ते लहान मुलांसारखे रडू लागले. हे पाहून हकीम खानने त्यांना दिल्लीला परतण्याची परवानगी दिली. तेव्हा खुसरोंनी आपले अश्रू पुसले. आणि भावनावेगात ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. या अनुभवावर त्यांनी एक कविता लिहिली आहे. त्यात म्हणतात,

‘बा अज्म ए सफर अनान कुशादूम कूं नाबा जदीद गान कुशादूम

बा लष्कर ए शाह कुच बर कुच दर गिरीया हमी शुदम बहर ए कुच’

खुसरोंनी दिल्लीला मक्का आणि मदिना शहरांहून अधिक प्रेम केले. शहरातील जामा मसजिदीला ते ‘फैज ए इलाही’ (अल्लाहची कृपा) म्हणत. कुतूब मिनारविषयी खुसरो लिहितात, ‘या मिनाराला पाहून चंद्राने आपली टोपी काढून टाकली आहे.’ त्या काळातील ‘हौज ए शम्सी’ या पाण्याच्या हौदाविषयी खुसरो लिहितात, ‘याचे पाणी जर हजरत खिजर यांनी पिले असते, तर ते अमृत संजीवन देणाऱ्या झऱ्यालाही विसरले असते.’ हजरत खिजर यांच्याविषयी सुफींमध्ये अनेक कथा प्रचलित आहेत. त्यांनी अमृत संजीवनी असणाऱ्या झऱ्याचे पाणी प्यायले होते. त्यामुळे ते चिरंजीव असल्याचे म्हटले जाते. दिल्लीतल्या रहिवाश्यांविषयी खुसरो म्हणतात,

‘मर्दुम ए ओ जुम्ल ए फरिश्ता सरीश्त

खुशदिल व खुश होए चो अहले बहीश्त’

(ते फरिश्त्यांच्या चारित्र्याचे आहेत आणि स्वर्गात राहणाऱ्या लोकांप्रमाणे प्रसन्न असतात.)

गयासुद्दीन बल्बनच्या काळात मंगोलांनी दिल्लीवर हल्ला केला होता. त्या वेळी खुसरोंचा आक्रोश अनेकांनी अनुभवला होता. त्यांनी या हल्ल्याचे वर्णन अस्मानी संकट, कयामत, राजकीय पाखंड अशा शब्दांत केले आहे.

‘वाकिया ए अस्त ऐं या बलाकज आस्मान आमद पदीद

आफत अस्त ऐं या कयामत कज जहान आमद पदीद

राह दर बुनियादे आलम दाद सेल ए फितना ए रा

रख्न ए का मसाल दर हिंदुस्तान आमद पदीद’

सय्यद सबाउद्दीन अ. रहमान लिहितात, ‘खुसरो त्यांच्या ‘नुह सिपेहर’ या मसनवीत मोठ्या सहृदयतेने हिंदू बुद्धिजीवी परंपरेचा उल्लेख करतात. खुसरो म्हणतात, रोममधून तत्त्वज्ञानाने मोठी झेप घेतली. पण हिंदूमध्ये तत्वज्ञानाचा इतिहास कमी समृद्ध नाही. त्यांच्याकडे तर्कशास्त्र, नक्षत्रविद्या, वक्तृत्वशास्त्र, गणिताचा मोठा वारसा आहे.

खुसरोंनी ब्राह्मणांच्या प्रतिभेवर ‘बरहमने हस्त के दर इल्म व खुर्द दफ्तर ए कानून अरस्तू बदरद’ हा शेर लिहिला आहे. याशिवाय हिंदूच्या श्रद्धांविषयी जे लिहिले आहे, ते अतिशय महत्त्वाचे आहे. मुसलमानांसाठी तौहीद (एकेश्ववाद)ला इस्लामच्या अनुयायीत्वाची ‘आधारशिला’ मानले जाते. एकेश्वरवादात कसलाच हस्तक्षेप मुसलमान मान्य करत नाहीत. खुसरो हिंदू-मुसलमानांना एक करू इच्छीत होते. त्यासाठीच त्यांनी स्वधर्मीयांना हिंदूंचा सनातन धर्म एकेश्वरवादीच असल्याची खात्री पटवून देत होते. खुसरोंनी हिंदूंच्या ईश्वराच्या संकल्पनेला इस्लामी एकेश्ववादाशी जोडून त्यांच्यातील संघर्ष संपवण्याचा प्रयत्न केला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

खुसरोंना अनेक भाषा ज्ञात होत्या. त्यांनी हिंदवीप्रमाणे फारसीतही काव्यरचना केली. तुर्की आणि फारसी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. या दोन भाषांव्यतिरिक्त खुसरोंनी हिंदवी भाषेत काव्यरचना करून त्याचे रूपच बदलले. हिंदवी भाषेला समृद्ध करण्यात खुसरोंचा मोठा वाटा आहे. डॉ. परमानन्द पांचाल म्हणतात, ‘‘ते अरबी आणि तुर्कीचे पंडित होते. त्यांना खडीबोलीचा वारसा मिळाला होता. फारसी त्यांच्या घरची दासी होती. संस्कृतवर त्यांना अधिकार होता. भारतातील अनेक भाषांचा त्यांना परिचय होता. बंगाल, अवध, मुल्तान, देवगिरी येथे राहून त्यांनी भारतातल्या अनेक भाषांची माहिती मिळवली होती. खुसरो असे पहिले कवी होते, ज्यांनी सर्व भारतीय भाषांचा अभ्यास केला होता.”

खुसरोंनी ‘नूह सिपेहर’ या ग्रंथात त्याची माहिती दिली आहे. खुसरोंच्या या भाषा अभ्यासाची माहिती देताना पांचाल यांनी त्यांची एक कविता उद्‌धृत केली आहे. त्यात खुसरो लिहितात,

सिंधी लाहोरी कश्मीर कबर

घुर समंदरी तिलंगी, गुजर

माअबरी गौरी बंगाल अवद

देहली पैरान्श अन्दर हमह हद

ईन हमह हिंदवी स्त अय्यामे-कुहन

आम्मह बकार अस्त बहर गुनह सुखन

भारतातील विविध भाषांची माहिती दिल्यानंतर खुसरो हिंदी भाषेची फारसीशी तुलना करतात,

लफ्जे हिन्दवी कम अज फारसी कम

हिंदवीचे शब्द दर्जाच्या बाबतीत फारसीपेक्षा कमी नसल्याचे मत मांडणाऱ्या खुसरोंनी संस्कृतविषयीदेखील शेर लिहिले आहेत-.

संस्कृत नाम जी अहदे कुहनश

आम्मह दारह खबर अज कुन मकुनश

प्राचीन काळापासून या भाषेचे नाव संस्कृत आहे. ही भाषा खूप गोड आहे. सामान्यजनांशी याच्या व्याकरणाचे बारकावे चर्चिले जात नाहीत, अशी खंतही खुसरोंनी व्यक्त केली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मिलिंद जाधव यांनी या कादंबरीमध्ये निजामुद्दीन औलीया आणि खुसरोंच्या सहसंबंधांविषयी दिलेली माहिती, उभे केलेले काही प्रसंग महत्त्वाचे आहेत. धार्मिक कर्मठता नाकारून सुफींनी हिंदूंशी सामाजिक संवाद वाढवण्यावर भर दिला. खुसरोंची भूमिका, त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात निजामुद्दीन औलीया यांचे मोठे योगदान होते. त्यांच्यामुळेच खुसरो सातत्याने समन्वय व सहिष्णूतेच्या भूमिकेतून कविता, गीते आणि मसनवीसारख्या काव्य प्रकारातून लिहीत राहिले.  

खुसरोंचे पिता मीर सैफुद्दीन लाचीन हेदेखील निजामुद्दीन औलीयांचे शिष्य होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने निजामुद्दीन औलीयांकडून दीक्षा घेतली होती. खुसरोंची प्रतिभा, त्यांच्या कविता आणि सुफी निष्ठेमुळे निजामुद्दीन औलीया यांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. याच प्रेमापोटी निजामुद्दीन औलीयांनी एकदा म्हटले होते, ‘‘जर शरीयतमध्ये परवानगी दिलेली असती, तर मी माझ्या कबरीत खुसरोंनाही दफन करण्यासाठी मृत्युपत्र लिहून ठेवले असते.’’

निजामुद्दीन औलीया यांचे हे विधान खुसरोंचे त्या काळातील महत्त्व अधोरेखित करणारे आहे.  निजामुद्दीन औलीया आणि अमीर खुसरोंच्या चर्चा, त्यांनी अनेक बाबतीत एकमेकांना सहाय्यभूत ठरेल अशी घेतलेली भूमिका, निजामुद्दीन औलीयांच्या प्रेरणेने दक्षिणेत वाढलेली चिश्ती सुफी चळवळ याविषयी मराठीत स्वतंत्र संशोधन व्हायला हवे.

अमीर खुसरोंवरील ही कादंबरी इतिहासातल्या अशा विविध दुर्लक्षित पैलूंची चर्चा खुली करण्यास सहाय्यभूत ठरू शकेल. सुफींच्या कार्यपद्धती, त्यांनी घडवलेल्या विचारधारेच्या अभ्यासासाठी ही कादंबरी अभ्यासकांना प्रेरित करेल असा विश्वास वाटतो. खुसरोंसारख्या भारतीय समाजाचा, त्याच्या राष्ट्रप्रेमाचा प्रवक्ता असलेल्या सुफीवर ही महत्त्वाची कादंबरी लिहिल्याबद्दल मिलिंद जाधव यांचे आभार आणि अभिनंदन

‘अमीर खुसरो’ - मिलिंद जाधव

मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

मूल्य – ३६० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......