‘ठकीशी संवाद’ : ही ठकी नक्की कोण? कदाचित ती मर्त्यतेपासून मुक्त, स्वप्न-आठवणी-अपराधी भाव-द्विधा-भीती चिंता-व्याकूळता यापासून मुक्त, अशी अलेक्सा नामक अँड्रॉइड असावी!
ग्रंथनामा - झलक
वैभव आबनावे
  • नाटककार सतीश आळेकर आणि ‘ठकीशी संवाद’चे मुखपृष्ठ
  • Fri , 30 June 2023
  • ग्रंथनामा झलक सतीश आळेकरSatish Alekar ठकीशी संवाद Thakishi Sanvad वैभव आबनावे Vaibhav Abnave

प्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर यांचं ‘ठकीशी संवाद’ हे नवं नाटक नुकतंच पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या नाटकाला तरुण रंगकर्मी वैभव आबनावे यांनी लिहिलेली प्रस्तावना संपादित स्वरूपात... ही मूळ प्रस्तावना त्यांनी या नाटकाच्या इंग्रजी अनुवादासाठी ‘Alekar's Theatre of In-Betweenness : Brief Note Inspired by Thakishi Samvad’ या नावाने लिहिली आहे. तिचा हा मराठी अनुवाद त्यांनीच केलेला असून तो या नाटकाच्या मराठी आवृत्तीत छापलेला आहे.

..................................................................................................................................................................

सतीश आळेकरांच्या ‘ठकीशी संवाद’ या नाटकाच्या वरपांगी दिसणाऱ्या समकालीनतेचं आरेखन करायचं झाल्यास अनेक जागतिक चिन्हांची नावं सांगता येतील, जी या संहितेत सहज सापडतील. जसं की, कोविड-१९ महामारी, लॉकडाऊन, ग्रीन-रेड-ऑरेंज झोन्स, N95 मास्क्स, ऑक्सिमीटर, पीपीई किट्स, ॲमेझॉन डिलिव्हरीची पार्सल्स, व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्स, नेटफ्लिक्स, अम्युझमेन्ट थीम पार्क्स, पोस्ट-टुथ, एआय, बिग डेटा, सर्वेलन्स, अलेक्सा आणि कुठल्याही क्षणी येऊ घातलेला, एकाकी, सर्वव्यापी परंतु सामान्य मृत्यू.

या नाटकाच्या फसव्या समकालीनतेचे ‘राष्ट्रीयकरण’ करण्याचा मोहही एखाद्याला होईल आणि त्या दृष्टीने पूरक चिन्हांची अजून एक मालिकादेखील त्याला संहितेत सहज सापडू शकेल - २०१४नंतरचा भारत, मोदी-शहा, राजकीय ध्रुवीकरण, राज्यसंस्थेची दडपशाही, सततची भीती, बुद्धिप्रामाण्यवाद्यांच्या हत्या, अर्बन नक्सल, सायलेंट मेजॉरिटी, कोविडदरम्यान शहरांनी नाकारलेल्या स्थलांतरितांची जीवघेणी पायपीट आणि लोकशाहीची हुकूमशाहीकडे वाटचाल.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

अर्थात गेल्या दशकातील राष्ट्रीय घडामोडींची ही मालिका गांधींच्या (महात्मा, इंदिरा, राजीव) राजकीय हत्या, आणीबाणी, उदारीकरण आणि अथक क्रूरतेने (काश्मीर ते खैरलांजी) माखलेल्या स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा व्यापक संदर्भ जागवत राहते.

त्याही पुढे जाऊन कोणी या नाटकाच्या सांस्कृतिक स्थानवैशिष्ट्याची ऐतिहासिकता दर्शवणारी अजून एक नाममालिका संहितेत अधोरेखित करू शकेल - पुण्यातील स्पॅनिश फ्लू, शनिवार पेठ, कसबा पेठ, ओंकारेश्वर, मुळा-मुठा नद्या, राम गणेश गडकरी, शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर, विजय तेंडुलकर, दि. बा. मोकाशी आणि करगोटा (रेशीम धागा).

अनेकांसाठी जागतिक वा राष्ट्रीय संदर्भ मालिकांपेक्षा स्थानिक नाममालिकेमुळे हे एक अस्सल ‘आळेकरी’ नाटक ठरेल. एखाद्याला हे जाणून कमाल वाटेल की, करगोटा नावाची क्षुल्लक विधी-वस्तू केवळ संहितेतील तीन पातळ्यांवरील (जागतिक-राष्ट्रीय-स्थानिक) मालिकांना एकत्र गुंफत नाही, तर अलेक्झांडरपासून अमित शाहपर्यंतच्या दिग्गज इतिहास-पुरुषांना स्पर्शून गेलेला, हा रेशमी धागा जागतिक इतिहासात मानाचे स्थान मिळवतो.

या नाटकातील निवेदक-नायकाच्या चालू संशोधनातून करगोट्याला मानववंशशास्त्रीय वैश्विकाचा (anthropological universal) दर्जादेखील बहाल करण्यात येतो, ज्याची प्रचिती निवेदकाच्या ‘प्रोफेशनल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’मधून येते.

अशा प्रकारे सगळ्या स्थळ-काळ निदर्शक संदर्भबिंदूंची जोडणी केल्यानंतर एखाद्याला आळेकरांच्या नाटकाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय पटलावर नेमकेपणे स्थित केल्याचे आणि त्याच वेळी नाटकाचे गूढ उकलणारी गुरुकिल्ली म्हणजे जागतिक-राष्ट्रीय-स्थानिक पातळ्यांना अलगदपणे एकत्र गुंफणारा रेशमी धागा हातात लागल्याचे समाधान मिळू शकते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

या तीन पातळ्यांबरोबरच लोकप्रिय हिंदी-मराठी गाणी आणि विमानातील प्रवाशांसाठीच्या अनाऊन्समेंट्सदेखील या नाट्यप्रवासात नाजूकपणे एकमेकांत गुंततात. अशी सगळी संदर्भ व्यवस्था लावल्यावर ‘ठकीशी संवाद’च्या रूपाने आपल्याला एकाच वेळी जागतिक परिस्थितीशी नाते सांगणारे, तरीही अस्सल भारतीय आणि मराठी मातीत घट्ट रुजलेले एक खरेखुरे समकालीन नाटक हाताशी लागल्याचे समाधान मिळू शकते.

मात्र हे समाधान अल्पजीवी ठरते. लवकरच लक्षात येते की, ही समग्र भासणारी संदभांची जंत्री नाट्य-संहितेच्या फसव्या आणि निसरड्या पृष्ठभागाला जेमतेम खरवडण्यापलीकडे जात नाही. या संदर्भाच्या जोडणीतून आपल्याला नाटकाच्या विषयाबद्दल जाणून घ्यायला फार तर मदत होते. पण त्या पलीकडे नाटकाच्या रूपाशयाशी भिडायला, आळेकर या विविध संदर्भाचे नक्की काय करतात, खास नाटकीय साधने वापरून ते या संदर्भांना कसे खेळते करतात, हे समजून घ्यायला, या जोडकामाची अजिबातच मदत होत नाही.

नेमके कशामुळे (कोणत्या ऐतिहासिक संदर्भांमुळे) आळेकरांचे नाटक समकालीन ठरते? या एकाच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न संदर्भांच्या जोडणीमध्ये अभिप्रेत असतो. ज्यामुळे आळेकरांच्या नाटकाच्या अतुल्य समकालीनतेचा अर्थ केवळ ‘इतिहासजन्य ससंदर्भता’ असा काढला जातो. आळेकरांच्या नाट्य-संहितेच्या व्यक्तिनिष्ठ, अधिभौतिक आणि तात्त्विक पातळीवरील समकालीनतेचा अर्थ संकुचितपणे केवळ वस्तुनिष्ठ, भौतिक आणि अनुभवजन्य पातळीवर लावण्यात येतो.

या नाट्य-संहितेच्या रूपाशयाशी आणि नाट्यविचाराशी भिडण्यासाठी एक अत्यंत कळीचा प्रश्न उपस्थित करणे गरजेचे आहे - आळेकरांची नाट्य-संहिता नेमकी कशाला समकालीन आहे? आळेकरांच्या नाटकांशी परिचित असणाऱ्या कोणीही त्यांच्या समग्र नाट्यकृतींमधून ध्वनित होणारा रूपाशयाचा, समकालीनतेचा अनुनाद निःसंशयपणे अनुभवला असणार.

जाताजाता या अनुनादाविषयी एक गोष्ट नमूद करायला मला आवडेल. ‘ठकीशी संवाद’ या संहितेच्या आळेकरांनी केलेल्या एका नाट्यवाचनाला मी उपस्थित असल्याने त्याचे मंचन कसे होईल, प्रयोग कसा दिसेल, कसा ऐकू येईल, याचा काहीएक अंदाज मला आला. त्यापूर्वी मी जेव्हा ही नाट्य-संहिता वाचली होती, तेव्हाही स्क्रीनवरच्या लिखित शब्दांमधून आळेकरांचा आवाज मला अगदी स्पष्ट ऐकू आला होता.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

हा अनुभव मी या आधीही त्यांच्या इतर नाट्य-संहिता वाचताना घेतला होता. जणू एखाद्या पाश्चात्य अभिजात संगीताच्या स्कोर-शीटप्रमाणे आळेकरांच्या संहितेतील लिखित शब्दांमध्येच त्यांची उच्चारितता, त्यांचा नाद, लय, ध्वनी सामावलेला असतो.

त्याच वेळी एखाद्या अभिनित लेखनाप्रमाणे नटांनी उच्चारलेल्या शब्दांमधून लिखित संहितेच्या नेमकेपणाचा पुनर्प्रत्यय येतो. थोडक्यात, आळेकरांचा आवाज हा एकाच वेळी लिखित आणि ध्वनित, मुद्रित आणि अभिनित, कागदावर आणि मंचावर अशा दोन्ही रूपांमध्ये वावरत असतो. त्यामुळे हे उघडच आहे की, समकालीनतेचा प्रश्न हा केवळ ‘ठकीशी संवाद’ या नाट्य-संहितेपुरता मर्यादित न ठेवता, तो आळेकरांच्या समग्र नाट्यकृती डोळ्यासमोर ठेवून उपस्थित करावा लागणार.

आळेकरांचे नाटक हे कशाला समकालीन आहे? उत्तरादाखल मी एक गृहीतक सुचवत आहे. ते पुढीलप्रमाणे : आळेकरांचे नाटक हे आधुनिकतेतून उद्भवलेल्या एका सततच्या आणि अंतहीन भासणाऱ्या मधलेपणाला (interregnum) समकालीन आहे. यातून मी काय म्हणू इच्छितो, ते थोडक्यात सांगतो. एकीकडे परंपरागत जगाला नाकारताना, त्याचे उच्चाटन करताना आधुनिकता वर्तमान नामक एका अथांग विवराची निर्मिती करते. दुसरीकडे हे वर्तमान नामक विवर, एका ‘नव्या जगाने’ प्रकाशमान होण्याऐवजी, येऊ घातलेले ‘नवे जग’ कसे असेल, कसे असावे, या विषयीच्या संघर्षात्मक, परस्परविरोधी दृष्टींनी आणि हातून सतत निसटणाऱ्या नव्या जगाच्या अविरत शोधाने ग्रासून, काळवंडून जाते.

हे नवे जग उभारायचे कसे, कोणी आणि नेमके कशासाठी? परंपरेच्या जुन्या जगाचा अंत अंतहीनपणे होत राहतो, पण काही केल्या आधुनिकतेचे नवे जग दृष्टीक्षेपात येत नाही. ‘मधलेपण’ हे या झुलत्या, त्रिशंकू अवस्थेचे नाव. आळेकरांच्या नाटकात या मधलेपणाचा, या झुलत्या अवस्थेचा, या वर्तमान नामक विवराचा अनुभव येतो, जो एकाच वेळी ऐतिहासिक तरीही विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक संदर्भानी निबद्ध नसतो.

जरी आळेकरांच्या नाटकात ‘नाटकाचं नाटकपण उघडं करणारे’ बोधात्मक (didactic) नाट्यपरंपरेतील संकेत उपयोजिले जात असले आणि जरी त्यांच्या नाटकातून अनुभववादाशी (romanticism) नातं सांगणारा शब्दांपलीकडचा, व्याकूळ करणारा अनुभव निर्माण होत असला, तरी आळेकरी ‘मधलेपणाचं’ नाटक हे खचितच बोधात्मक नाही, तसेच ते अनुभववादीदेखील नाही. ते एकाच वेळी अ-बोधात्मक (non-didactic) आणि तरीही अनुभववादविरोधी (anti-romantic) असं विभक्त मिश्रण (disjunctive combination) आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

कुठल्याही ठोस वा स्पष्ट इतिहासदृष्टीशिवाय वर्तमानाच्या संधिप्रकाशात भटकणं, हा या मधलेपणाचा अनुभव आहे. मृत्यूपश्चातच्या मुक्तीची, निर्वाणाची आस नाकारल्यानंतरही तिच्याविषयीच्या मागे उरलेल्या तळमळीचा हा अनुभव आहे. द्विधा आणि तळमळ, संपणं आणि तरीही संपतच राहणं, या दोन बिंदूंमध्ये लंबकासारखं गरगर फिरत राहण्याचा अद्वितीय नाट्यानुभव आळेकर निर्माण करतात.

असणं आणि नसणं, वास्तव आणि स्वप्न, प्रत्यक्ष आणि आभास, या ध्रुवांमध्ये गरगरण्याच्या, मधलेपणाच्या अनुभवाला आळेकर मूर्त नाट्यरूप देतात. एकमेकांत सरमिसळलेल्या या तिन्ही जोड्यांना तरीही पूर्णपणे एकमेकांत विलीन होऊ न देता, त्यांच्यामधला द्वंद्वात्मक ताण तोलून धरत आळेकर या निसरड्या मधलेपणाच्या अनुभवाला कालावधी बहाल करतात.

‘ठकीशी संवाद’ या नाट्य-संहितेत जिच्याशी आळेकर खेळतात, त्या प्रत्यक्ष आणि आभास या जोडगोळीविषयी काही म्हणून मी या चाचपडणाऱ्या मांडणीचा शेवट करतो. कोविड-१९ महामारी ही या नाटकाचा एक महत्त्वाचा संदर्भबिंदू आहे. या महामारीने आपल्या जगण्याचे वाढत्या वेगाने होणारे आभासीकरण क्रूरपणे उघडे पाडले. या प्रक्रियेत प्रत्यक्ष आणि आभास यांची केवळ फारकतच होत नाही, तर आभास हे प्रत्यक्षाचा पर्याय बनत जाते. यातूनच नाटकालादेखील नव्या आभासी व्यवस्थेला शरण जाणे भाग पडते.

अनेक जण ‘डिजिटल थिएटर’ नावाचे हे ‘न्यू नॉर्मल’ नवा नाट्यप्रकार वा नाट्यविधा म्हणून साजरी करतात. ‘इथे’ (here)पासून ‘आता’ (now) विलग होण्याच्या, इथेपणा (hereness)पेक्षा आतापणाला (nowness) मिळणाऱ्या प्राधान्याच्या, त्यामुळे नाटकाची पूर्वअट असणाऱ्या ‘इथे आणि आता’ ही जोडी विभक्त होण्याच्या पार्श्वभूमीवर ‘ठकीशी संवाद’ ही नाट्य-संहिता एक राजकीय हस्तक्षेप म्हणून वाचावी/ ऐकावी/ पाहावी लागणार.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

हा हस्तक्षेप नाट्येच्छा, म्हणजेच मर्त्य माणसांनी समोरासमोर प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आणि या भेटण्यातून अमर्त्य नाट्य-विचाराचा संसर्ग होण्याची इच्छा पुन्हा जागवू इच्छितो. जे आपल्या समोर मंचावर चालले आहे, ते प्रत्यक्ष घडते आहे का, जिथे प्रेक्षकांचे असणे अनिवार्य नाही, अशा एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर याचे थेट प्रक्षेपण होत आहे, याविषयी संशय निर्माण करून संहितेतच आळेकर खेळकरपणे नाट्यप्रयोगाच्या होणाऱ्या आभासीकरणाबद्दल आपल्याला जागृत करतात. तरीही ठकीच्या पात्राद्वारे ते प्रत्यक्ष आणि आभास यातल्या ताणाला नवे रूप देतात.

ही ठकी नक्की कोण? कदाचित ती मर्त्यतेपासून मुक्त, स्वप्न-आठवणी-अपराधी भाव-द्विधा-भीती चिंता-व्याकूळता यापासून मुक्त, थोडक्यात ज्या ज्या गोष्टींमुळे विवरात भोवळ आणणारा, मधलेपणाचा अनुभव शक्य होतो, अशा सर्व गोष्टींपासून मुक्त अशी अलेक्सा नामक अँड्रॉइड असावी.

ठकीप्रमाणेच आपणही, जे डिजिटल थिएटर नावाच्या मायावी टेक्नो-स्वर्गात दंग आहोत, अशांना पुन्हा एकदा या मधलेपणाच्या अपरिहार्य अनुभवाला सामोरे जावेच लागणार. प्रश्न असा आहे - नाट्य प्रयोगादरम्यानचा प्रत्यक्ष शारीर भेटीचा अनुभव ठकीला (आणि आपल्यालाही) या मायावी टेक्नो-स्वर्गसुखातून जागे करणार का? या प्रत्यक्ष शारीर भेटीतून तिला (आणि आपल्यालाही) नाट्येच्छेची बाधा होणार का? या प्रत्यक्ष भेटीतून ठकीच्या शरीराची (आणि आपल्याही शरीरांची) शिवण उसवणार का? त्यातून तयार झालेल्या फटींमधून शरीरांना अमर्त्य नाट्य-विचाराची बाधा होणार का? आणि जर नजीकच्या (म्हणजे फार दूर नसलेल्या) भविष्यकाळात जर ठकीप्रमाणेच आपल्यालाही टेक्नो-अमर्त्यता प्राप्त झाली (जिची इच्छा अनेकांना आहेच), तर मर्त्य मानवी शरीरांशिवाय नाटक असू शकेल?

हेच दुसऱ्या प्रकारे विचारायचे झाल्यास, मर्त्य मानवी शरीरांशिवाय अमर्त्य नाट्य-विचार अस्तित्वात असू शकेल? हे प्रश्न ‘आ’ वासून समोर उभे ठाकलेले पाहिल्यावर आळेकरांचे नाटक शांतपणे सुचवते- ‘थोडे अजून थांबूयात. आपण अजूनही मधेच आहोत. मधलेणात या प्रश्नांची निश्चित उत्तरे कशी मिळणार? जोवर उत्तरे मिळत नाहीत, मधलेपणा संपत नाही, तोवर नाटकाचा हा खेळ खेळत राहायचे. मधलेपणाचा न पेलणारा कालावधी तोलून धरायचा.’

अशा प्रकारे नाट्य-संहितेच्या अभिवाचनातूनही आळेकर नाट्येच्छा आपल्यापर्यंत पोहोचवत राहतात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या पुस्तकात विषयांची विविधता आहे. साध्या विषयापासून ते ‘खाद्यसंस्कृती’तील ‘वादग्रस्त’, तसेच ‘त्याज्य’ विषयही आढळतात. लेखांचा ग्राफ साधेसुधे पदार्थ ते अनोखा, विलक्षण असा आहे…

खाद्यपदार्थ हे निव्वळ खाद्यपदार्थ नसतात, त्यांचे आपल्या जीवनातील अनेक गोष्टींशी साधर्म्य असते, हे बिर्याणी आणि संसार यातून ते स्पष्ट करतात. इब्राहीम अफगाण यांच्यासोबत हा चविष्ट प्रवास कुठेही कंटाळवाणा न होता मजेमजेत होतो. त्यांनी दिलेला एका खाद्यप्रेमीचा वचननामा प्रत्येकाने स्वीकारावा. त्याचे पालन करावे. त्यामुळे भारताची त्यातही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध होईल.......

आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे...

इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे.......