कित्येक संस्था वाचन शिकवण्यासाठी डिजिटल माध्यमाच्या वापराची प्रसिद्धी करण्यात अशा काही गुंग झाल्या आहेत की, त्यांना क्षणभर थांबून थोडा विचार करा, असं म्हणणंसुद्धा वादात पडल्यासारखं वाटतं
ग्रंथनामा - झलक
कृष्ण कुमार
  • ‘वाचनविचार’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 12 May 2023
  • ग्रंथनामा झलक वाचनविचार Vachan Vichar कृष्ण कुमार Krishna Kumar वाचन Reading पढ़ना ज़रा सोचना Padhna Zara Sochna

एनसीईआरटीचे माजी संचालक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कृष्ण कुमार यांच्या ‘पढ़ना, ज़रा सोचना’ या हिंदी पुस्तकाचा ‘वाचनविचार’ या नावाने साहिल कल्लोळी यांनी केलेला मराठी अनुवाद नुकताच ज्योत्स्ना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. पालक, शिक्षक आणि वाचनाविषयी आस्था असलेल्या सर्वांसाठी असलेल्या या पुस्तकातील हे एक प्रकरण...

.................................................................................................................................................................

वाचायला शिकल्यानंतर जलद गतीनं वाचायची इच्छा होणं, हे एका मर्यादेपर्यंत स्वाभाविक वाटतं. ही गोष्ट कोणत्याही कौशल्याच्या बाबतीत म्हणता येईल. सायकल चालवायला शिकल्यानंतर वेगानं चालवण्याची इच्छा होते. कौशल्य असेल तर आत्मविश्वास वाढतो, वेगामुळे तो अधिकच बळावतो.

पण वाचनाच्या बाबतीत एका टप्प्यानंतर हे खरं वाटत नाही. हा टप्पा निश्चित करण्यासाठी आपण एक प्रश्न विचारू शकतो की, वाचन हे केवळ एक कौशल्य आहे का? याहून चांगला प्रश्न म्हणजे, वाचन एक असं विशेष प्रकारचं कौशल्य आहे का, की ते शिकण्याचा हेतू केवळ नैपुण्य मिळवणं एवढाच नाही आहे? या प्रश्नाचं महत्त्व किंवा गरज आपल्याला एखाद्या भरभर वाचणाऱ्या मुलाचं किंवा मोठ्या माणसाचं वाचन ऐकून समजू शकतं. वर्गात खुशीनं उभं राहून भरभर वाचणाऱ्या मुलाला जर वाचून झाल्यावर एखादा प्रश्न विचारला, तर त्याला नुकतीच भरभर वाचलेली वाक्यं पुन्हा एकदा सावकाश वाचायची इच्छा होईल, कारण प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अर्थ समजणं गरजेचं असतं. हीच बाब वाचनाला एक वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य बनवतं आणि त्यात नैपुण्य प्राप्त करणं सायकल चालवण्यात नैपुण्य मिळवण्यापेक्षा वेगळं आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हे उदाहरण फक्त मोठ्यानं केल्या जाणाऱ्या वाचनाला लागू आहे का, अशी शंका उपस्थित होऊ शकते. मनात वाचणाऱ्या मुलालाही वेगानं वाचल्यावर अर्थबोध कमी होईल का? या प्रश्नाचा शोध घेतला, तर आपल्याला वाचनाचा वेग आणि वाचल्या जाणाऱ्या साहित्याचा प्रकार यातील संबंध दिसू लागेल. एखादी कथा वा कादंबरी मनात वेगानं वाचता येऊ शकते. जर का आपण विज्ञान किंवा भूगोलासंबंधी काही लेख वाचत असू, तर तो आपण वेगानं वाचू शकणार नाही. कविता किंवा नाटक वाचतानासुद्धा आपल्याला थोडं सावकाशच वाचावं लागतं.

हे आपल्याला सायकलीच्या उदाहरणावरून सांगायचं झाल्यास, कथेची तुलना एका गुळगुळीत रस्त्याशी, आणि भौतिकशास्त्रावरचा लेख किंवा कवी अज्ञेयजींच्या कवितेची तुलना एका चिखल आणि खड्डे असणाऱ्या कच्च्या रस्त्याशी केली जाऊ शकते. कितीही पट्टीचा सायकलस्वार असला, तरी त्याला कच्च्या रस्त्यावर सावकाश, विचारपूर्वकच पुढं जावं लागतं.

जर याच प्रसंगात वाचण्याची क्रिया घातली, तर आपल्याला अधिक चांगलं समजेल. कथा कितीही मनोरंजक असली तरी, जर आपल्याला ती वाचून झाल्यावर परीक्षा द्यायची असेल, तर आपण ती सावकाश वाचू. परीक्षा हे इथं केवळ एक रूपक म्हणून वापरलं आहे. जर आपण कोणा मोठ्या कथाकाराकडून कथा कशी लिहावी, हे शिकू इच्छित असू, तर आपण सावकाशीनंच वाचू, त्यातल्या लेखनकलेच्या वैशिष्ट्यांकडे लक्ष देत पुढे जाऊ.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

बऱ्याचदा असं होतं की, एकदा वाचलेली गोष्ट पुन्हा वाचताना पहिल्यांदा जितक्या वेगानं वाचली, तितक्या वेगानं वाचत नाही. पहिल्या वाचनात कथेचा शेवट जाणून घेण्याच्या घाईत अनेक छोट्याछोट्या गोष्टी आपल्या नजरेतून सुटून गेलेल्या असतात, पण दुसऱ्या वेळी या सर्व गोष्टींची आपल्याला मजा घ्यायची असते. सिनेमाच्या उदाहरणानं हे अधिक चांगल्या प्रकारे समजावता येईल. एखादा सिनेमा दुसऱ्यांदा बघताना आपल्याला अभिनय, संवाद, फोटोग्राफी आणि संगीतातील बारकावे अधिक चांगले लक्षात येतात. पहिल्यांदा बघताना आपलं सगळं डोकं सिनेमाची कथा आणि त्यातील ताण समजून घेण्यात व्यग्र असतं.

आता हे सगळं वाचायला शिकवण्याच्या बाबतीतही लागू केलं जाऊ शकतं. या संदर्भात सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, वाचायला शिकवण्यामध्ये ‘विचार करणं’ अंतर्भूत आहे का नाही! चिखल आणि खड्डे असणाऱ्या गल्लीतून सुसाट वेगानं सायकल चालवणारा एकतर स्वतः पडेल आणि सायकलीचं नुकसान करून घेईल, नाहीतर जपून चालणाऱ्या अन्य कोणा व्यक्तीला दुखापत करेल. वाचायला शिकवण्यामध्ये जर फक्त वाचन अपेक्षित असेल आणि विचार करणं अपेक्षित नसेल, तर त्यामुळे वेगवेगळे सामाजिक दुष्परिणाम घडणं अपरिहार्य आहे.

यामध्ये दुसऱ्याचं म्हणणं समजून न घेताच आपली प्रतिक्रिया देणं, वाचलेल्या मजकुराचा योग्य अर्थाऐवजी चुकीचा अर्थ समजणं, मजकुराचा मथितार्थ न समजणं, आणि वाचताना इतर दहा गोष्टींचा विचार करत राहणं, इत्यादी. हे दुष्परिणाम आधीही होत होते, पण आता त्यांचं प्रमाण वाढतं आहे, याचं कारण डिजिटल युगात एकाएकी प्रचंड वाढलेला वेगावरील भर.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वाचनाचे समकालीन संदर्भ खूप दुर्बोध आहेत. ही दुर्बोधता साधारणपणे संप्रेषण तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याद्वारे झालेल्या सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाशी जोडली जाते. पण वाचनाच्या संदर्भात जटिलतेचा आणखी एक स्रोत आहे. तो म्हणजे वाचनासंबंधी विकसित झालेलं शिक्षणशास्त्र. हे एका बाजूला वाचनाच्या प्रक्रियेवर झालेल्या शास्त्रीय संशोधनाचं, दुसऱ्या बाजूला शिक्षणासंबंधीच्या चिंतनातून शोधल्या गेलेल्या नव्या आयामांचं फलित आहे.

गेल्या पन्नास वर्षांत शिक्षणाचा मनोवैज्ञानिक आणि सामाजिक संदर्भ सातत्यानं मनोरंजक आणि जटिल होत गेला आहे. आज आपल्याला मुलांच्या मानसिक विकासाबद्दल पूर्वीपेक्षा बऱ्याच चांगल्या प्रकारे समजतं; तथापि समजून घेणं आणि विचार करणं, या संदर्भातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल मतभिन्नता आहे.

एक महत्त्वाचा मुद्दा असा की, वाचन-लेखनासारख्या प्रक्रियांमधून जी मानसिक क्रियाशीलता तयार होते, ती किती प्रमाणात स्वयं-चिकित्सा करते? हल्ली याला ‘क्रिटिकल थिंकिंग’ किंवा चिकित्सक विचार असंही म्हटलं जातं. याचा अर्थ, स्वतःच्याच विचारांची चिकित्सा करणं. उदाहरणार्थ, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या संयोगातून पाणी तयार होतं, हे जर मला माहीत असेल, तर कुठं दुर्गंधीयुक्त पाणी पिताना हे आठवून माझ्या लक्षात येईल की, या पाण्यात नक्कीच वेगळा कोणता तरी वायू किंवा आणखी काहीतरी मिसळलेलं असणार.

चिकित्सक विचार म्हणजे आणखी काही नसून, मेंदू जागृत असल्याचं लक्षण आहे. एखाद्या वर्गात जर मुलं शिक्षकाचं बोलणं ऐकण्यात आणि त्याचा प्रत्येक शब्द लिहून घेण्यात व्यग्र असतील, तर याचा अर्थ शिक्षक मुलांच्या चिकित्सक बुद्धीच्या विकासाकडं लक्ष देत नाही आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

चिकित्सक विचारामध्ये एकाग्रता आणि मानसिक शांती आवश्यक असते, हे उघड आहे. त्याशिवाय नीट विचार करणं अशक्य आहे. खरं तर वाचायला शिकवताना या तत्त्वाचा अंतर्भाव करणं अवघड नाहीये, पण प्रत्यक्षात उलटच घडतं. याचं कारण आहे वेगाला दिलं जाणारं अतिमहत्त्व. शाळा, घर आणि समाज या वातावरणात सातत्यानं अधिकाधिक वेगानं गोष्टी करून घेण्यावर भर दिला जातो. सावकाश काही करणं, एखाद्या गोष्टीला पुरेसा अवकाश देणं आता जुनाट वाटू लागलं आहे. शिक्षकांसाठीही मुलांना हळूहळू समजावून सांगणं आणि रोज नवीन धडा पूर्ण न करणं अवघड झालं आहे. ते म्हणतात की, दर आठवड्याला परीक्षा घ्यावी लागते, मग सावकाशीनं शिकवून कसं चालेल?

डिजिटल यंत्रं आणि माध्यमांनी या परिस्थितीला आणखी एक नवीन आणि शक्तिशाली आयाम दिला आहे. वाचण्याच्या संदर्भात डिजिटल माध्यमं एका वेळी अनेकविध आकर्षणं उपलब्ध करून देतात. शिक्षण क्षेत्रात गेल्या दहा-पंधरा वर्षांत या माध्यमांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. कॉम्प्युटर आता शाळांसाठी अनिवार्य झाले आहेत आणि त्याच्याशी निगडित कौशल्य शिक्षकांना आणि मुलांना शिकवणं ही एक धोरणात्मक सामाजिक जबाबदारी मानली गेली आहे.

भारतासारख्या सामाजिक आणि आर्थिक विषमता असलेल्या समाजात कोणत्याही संसाधनांच्या वितरणावर प्रभाव पडतो. तेथे डिजिटल सुविधांचा विस्तार आणि वितरण, याविषयी भीती अगदी स्वाभाविक आहे. वाचनाच्या प्रश्नाच्या बाबतीत, या भीतीमधील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा ऊहापोह व्हायला हवा. यातील पहिली गोष्ट म्हणजे, डिजिटल माध्यमं उदा. इंटरनेट किंवा ई-पुस्तकं वापरून वाचन करणं आणि कागदावर छापलेलं पुस्तक वाचणं यात फरक आहे. मात्र तो फरक वाचनाच्या प्रक्रियेतला आहे, वाचून येणाऱ्या समजेबाबतचा नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वाचनाच्या इतिहासात डिजिटल माध्यम ही एक नवीन घटना आहे, त्यामुळे तिच्यावर आपल्याकडं खूप कमी वैज्ञानिक संशोधन होऊ शकलं आहे. आपल्याकडं एकूणच संशोधन खूप कमी होतं आणि याविषयी तर आणखीनच कमी आहे. पाश्चिमात्य देशांतदेखील डिजिटल माध्यमांच्या उपयुक्ततेपासून तिच्यातून मिळणाऱ्या बोधात्मक अनुभवाला वेगळं करून बघणारं संशोधन अपेक्षेनुसार कमीच झालं आहे. सध्यातरी या क्षेत्रात संशोधन आणि विवेचनापेक्षा, विवाद आणि मतभेदच अधिक आहेत.

अमेरिकन संशोधक मेरियन वुल्फ यांनी आपल्या स्वतःच्या तसंच इतरही काही लोकांच्या संशोधनाचा आधार घेऊन त्यांच्या, ‘रीडर, कम होम’ या अलीकडच्या पुस्तकात लिहिलं आहे, ‘‘असं आढळून आलं आहे की, छापील स्वरूपातील पुस्तकं किंवा इतर काही सामग्री यांच्या वाचनामुळे विकसित होणारी काही पायाभूत तत्त्वं डिजिटल माध्यमातून वाचल्यामुळे अधू राहतात. डिजिटल माध्यमाच्या आहारी गेलेल्या मुलांमध्ये समीक्षात्मक विचारांना चालना देणारी गंभीरपणे वाचायची क्षमता विकसित करणं अवघड जातं.”

असाच काहीसा निष्कर्ष, कथेच्या पात्रांशी एकरूप होणं, किंवा त्यांच्या अनुभवांशी जोडून घेणं, या क्षमतेबाबतही आढळतो. हे अगदीच शक्य आहे की, हा मुद्दा वाचनाच्या गतीवर आणि एकाग्रतेवर अवलंबून आहे, आणि डिजिटल माध्यमाद्वारे वाचन व प्रत्यक्ष पुस्तक वाचन यांना वेगळं करणारा हाच मुख्य फरक आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आजच्या वातावरणात अशा गोष्टींबद्दल अनेक जण शंका उपस्थित करतील किंवा सरळसरळ हा अपप्रचार आहे असं म्हणतील; हे अपरिहार्य आहे. सत्य समोर येण्यास बराच वेळ लागेल, आणि तोपर्यंत वाचनातील अनेक महत्त्वाच्या बाबी नाहीशा झालेल्या असतील. म्हणून मेरियन वुल्फ यांनी दोन समांतर नैपुण्य विकसित करण्याची शिफारस केली आहे.

माहिती मिळवण्यासाठी डिजिटल माध्यमांवर वाचन आणि साहित्यिक अनुभवासाठी, व बोधात्मक विकासासाठी पारंपरिक माध्यम, म्हणजे पुस्तकं हळूहळू लक्षपूर्वक वाचणं, हे दोन्ही गरजेचं आहे. डिजिटल माध्यमासाठी लागणारं कौशल्य, वेळ आणि पैसा यांच्यामुळे पारंपरिक माध्यमांची उपलब्धता आणि वापरावर परिणाम होऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. अशा आदर्श परिस्थितीची कल्पना आणि उभारणी या दोन्ही गोष्टी आजच्या परिस्थितीत खूप अवघड आहेत.

शिक्षण आणि अभ्यासक्रमाचे आदेश जरी कॉम्प्युटरच्या संबंधातील कौशल्यविकासासाठी माध्यमिक वर्गांना प्राधान्य देत असली, तरी बाजाराच्या प्रभावामुळे कॉम्प्युटरचं वर्चस्व प्राथमिक शिक्षणातदेखील वेगानं पसरत आहे. डिजिटल माध्यमांना देशाच्या विकासाचं प्रतीक बनवलं गेलं आहे. समाजात त्याच्या झगमगाटाचा प्रभाव सर्वदूर पसरला आहे. इंटरनेटचा प्रचार-प्रसार स्मार्ट फोनमुळंदेखील वाढत आहे. या माध्यमांमध्ये आणि बालसाहित्यामध्ये समतोल राखून मुलांना (पुस्तक वाचनासाठी) उत्तेजन देणं सोपं राहिलेलं नाही. कित्येक संस्था वाचन शिकवण्यासाठी डिजिटल माध्यमाच्या वापराची प्रसिद्धी करण्यात अशा काही गुंग झाल्या आहेत की, त्यांना क्षणभर थांबून थोडा विचार करा, असं म्हणणंसुद्धा वादात पडल्यासारखं वाटतं.

ही परिस्थिती शिक्षणासाठी चांगली नाही, पण या परिस्थितीमुळे निर्माण झालेली भीती आणि घुसमट, यावर त्वरित उत्तर मिळणं शक्य नाही. (सध्या तरी) जे लोक मुलांसोबत काम करतात, ते तरी वाचन-समृद्ध वातावरण तयार करत असताना विचार करण्यासाठीदेखील पोषक वातावरणही तयार करण्याकडं लक्ष देऊ शकतील.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वाचनाच्या अभ्यासक्रमात थांबतथांबत वाचण्याला वाईट समजलं गेलं आहे. वाचन म्हणजे ‘मोठ्यानं वाचणं’ असं इथं मानलं आहे. अडखळत केलेलं वाचन ऐकणाऱ्यालाही खटकतं. आपण मोठ्यानं वाचण्याला थोडं बाजूला ठेवलं, तर वाचन करताना आपण वेग आणि प्रवाह यापेक्षा समजून घेणं, विचार करणं, यावर जास्त भर देऊ शकू. मुलांना मनात वाचू दिल्यानंतर किंवा एखादा लेख अथवा पुस्तक वाचून झाल्यानंतर, मग त्यावर काही प्रश्न विचारणं किंवा चर्चा करणं, हा मोह आवरला तर तो एक नवीन चांगला अनुभव असू शकतो.

शाळांमध्ये, तसंच इतरही संस्थांमध्ये, वाचल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीवर, मग ती कथा असो वा विज्ञान, चर्चा करणं, ही एक आवश्यक औपचारिकता बनली आहे. अशा चर्चांमुळे भाषेसंबंधी काही उद्देश साध्य होत असतीलही, पण ते साध्य करण्यासाठी इतरही मार्ग आणि संधी उपलब्ध आहेत. वाचनाचा उद्देश जर पुस्तक वाचायच्या सवयीचा विकास करणं असेल, तर दर वेळी वाचनानंतर चर्चा नसावी. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे, मुलांना तऱ्हेतऱ्हेची (वाचन) सामग्री उपलब्ध करून देणं आणि त्यांच्या वैयक्तिक (वाचन) आवडीनिवडींमध्ये विविधता कशी येईल हे बघणं.

या संदर्भात डिजिटल माध्यमांच्या आकर्षणातून मुलांना त्याचं व्यसन लागण्यापासून वाचवणं, हेच एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे. कॉम्प्युटरवर वाचणाऱ्या मुलाचं लक्ष सतत विचलित केलं जातं. मूल काहीतरी विशिष्ट माहिती शोधत असताना, त्याला आणखी काही माहिती उपलब्ध करून देणं हा डिजिटल अभ्यासाचा गुण मानला जातो.

कित्येक मुलं एकाच वेळी अनेक कामं करण्यात किंवा माहितीची वेगवेगळ्या पातळीवर तपासणी करण्यात कुशलदेखील होतात. पण या कौशल्याचं गुणगान करताना त्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या किमतीचा विचार करणंही गरजेचं आहे. डिजिटल माहिती तंत्रज्ञानाची ताकद आणि वेग, यामुळे विचार करणं आणि स्वतःचं मत बनवणं, यामध्ये काय अडचणी उभ्या राहतात, हा प्रश्न वाचन शिकण्याच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. या प्रश्नाला रद्दबातल करणं म्हणजे शिक्षणाच्या लोकशाही उद्देशांपासून खूप दूर जाण्याचं निमंत्रण देण्यासारखं आहे. मात्र डिजिटल माध्यमांकडं पूर्ण दुर्लक्ष करणं, हेसुद्धा योग्य असणार नाही.

‘वाचनविचार’ – कृष्ण कुमार, अनुवाद – साहिल कल्लोळी

ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे | पाने – ६४ (मोठा आकार) | मूल्य – २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......