सावंत : ‘मासिकं ही फुप्फुसांसारखी असतात. ती भाषेचं रक्त सतत शुद्ध करतात’; रिंढे : ‘मराठीमध्ये वाचनसंस्कृती नाही, असं मला वाटतं’
ग्रंथनामा - मुलाखत
राम जगताप
  • जयप्रकाश सावंत, त्यांच्या ‘पुस्तकनाद’चं मुखपृष्ठ आणि नीतीन रिंढे, त्यांच्या ‘लीळा पुस्तकांच्या’चं मुखपृष्ठ
  • Tue , 25 April 2023
  • ग्रंथनामा मुलाखत पुस्तकनाद Pustaknad जयप्रकाश सावंत Jayprakash Sawant लीळा पुस्तकांच्या Leela Pustakanchya नीतीन रिंढे Nitin Rindhe पुस्तकांविषयीची पुस्तकं Book on Books

‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ संचालित साहित्य सम्राट न. चिं. केळकर ग्रंथालयाचा सतरावा ‘साहित्य साधना पुरस्कार’ ११ फेब्रुवारी २०२३ रोजी जयप्रकाश सावंत यांच्या ‘पुस्तकनाद’ आणि नीतीन रिंढे यांच्या ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकांना विभागून देण्यात आला. बदलापूरच्या ग्रंथसखा ग्रंथालयाचे श्याम जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार या दोन्ही लेखकांना देण्यात आला. एका ग्रंथालयाचा पुरस्कार एका ग्रंथालया उभारणाऱ्या व्यक्तीच्या हातून, दोन ग्रंथांविषयीच्या पुस्तकांना दिला जावा, हा एक दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. पुरस्कार वितरण समारंभानंतर या दोन्ही पुरस्कारविजेत्या लेखकांची ‘अक्षरनामा’चे संपादक राम जगताप यांनी मुलाखत घेतली. तिचे हे शब्दांकन…

.................................................................................................................................................................

राम जगताप – जयप्रकाश सावंत हे नाव अनुवादक म्हणून मराठीमध्ये अतिशय सुप्रसिद्ध, नामांकित झालेलं असलं तरी तुमचं हे स्वतंत्र असं पहिलं पुस्तक आहे. आणि तेही पुस्तक वाचनासारख्या दुर्लक्षित, उपेक्षित आणि अल्पसंख्य प्रकारातलं… वयाच्या सत्तरीत प्रकाशित झालेलं. तुमच्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आठ महिन्यांत प्रकाशित झाली आणि गेल्या दोन वर्षांत या पुस्तकाला मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे. आणि मला असं वाटतं की, व्यासपीठावर बसून मुलाखत देण्याची ही तुमची पहिलीच वेळ आहे. तर सावंत, कसं वाटतंय?

जयप्रकाश सावंत मी ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’मध्ये काम करायचो. तिथल्या ऑडिटोरियममध्ये काही कार्यक्रम असला की, त्याची ऑडिओ तपासणी करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे माझा आणि मायक्रोफोन, लाउडस्पीकरचा संबंध ‘हॅलो, हॅलो, माईक टेस्टिंग’ असं म्हणण्यापुरताच असे. मी स्वत:ला ‘बॅकस्टेज वर्कर’ समजतो. त्यामुळे मला व्यासपीठावर खरंच आवडत नाही, पण अशा काही वेळा येतात, त्या सहन करायला लागतात. असो.

या पुरस्काराचं आगळेपण मला सांगावंसं वाटतं. माझ्या ‘पुस्तकनाद’ या पुस्तकात सर्वांत जास्त म्हणजे तीन लेख ऱ्होहे लुईस बोर्हेस या एकाच लेखकावर लिहिले आहेत. हा अर्जेंटिनाचा अतिशय महावाचक आणि आम्हा सगळ्यांना आवडणारा लेखक. त्याचं एक वाक्य आहे –‘I have always imagined that paradise will be a kind of Library’ (मला नेहमी वाटत आलंय की, स्वर्ग म्हणजे एखादी लायब्ररी असणार.)

माझ्या या पुस्तकाला पहिला पुरस्कार सोलापूरच्या वाचनालयाचा मिळाला आणि आता हा तिसराही पुरस्कारही या ग्रंथालयाकडून मिळाला, हा एक आगळा योग वाटतो.

दुसरं वैशिष्ट्य असं की, हा पुरस्कार या ग्रंथालयाच्या वाचकांनी निवडलेला आहे, त्यासाठी निवड समिती नव्हती. हेही सुंदर आहे. आणि ‘बुक ऑन बुक्स’ हा साहित्यप्रकार पुरस्कारासाठी निवडणारी हे ग्रंथालय पहिलंच असेल. याची दखल इतरही संस्थांनी घ्यावी.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यांना माझ्यासोबत हा पुरस्कार मिळालाय ते नीतीन रिंढे आणि आजचे संवादक राम जगताप, आम्ही अनेक वर्षांपासून पुस्तकनादी किंवा समान व्यसनी आहोत. आम्ही बऱ्याच वेळेला पुस्तकांसाठी फुटपाथवरची दुकानं धुंडाळलेली आहेत. त्यामुळे हे माझ्याबरोबर असणं हाही एक चांगला योग आहे.

पण सगळ्यात आनंद याचा वाटला की, हा पुरस्कार आम्हाला श्याम जोशी यांच्या हस्ते मिळाला. ते आमच्या तिघांसारखे स्वान्तसुखाय पुस्तकप्रेमी नाहीत. त्यांनी बदलापूरला दोन लाखांहून अधिक पुस्तकांचं ग्रंथालय उभं करण्याचं थोर काम केलेलं आहे. म्हणजे बोऱ्हेसच्या शब्दांत स्वर्गच निर्माण केलाय. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं हाही आनंदाचा योग वाटतो. खरं तर त्यांचं ग्रंथालयही बघायचंय आणि त्यांना भेटायची खूप इच्छा होती, पण कांदिवली आणि बदलापूर हे दोन ध्रुव आहेत. त्यामुळे खूप इच्छा असून जमलं नाही.

हे सगळे योग ज्यांच्यामुळे आले ते महाराष्ट्र सेवा संघ आणि न.चिं. केळकर ग्रंथालय, त्यांचे पदाधिकारी, कर्मचारी यांना धन्यवाद देतो. निखिलेश चित्रे हा आमचा पुस्तकनादी मित्र मध्यंतरी मला म्हणाला होता, ही माणसं खरोखर पुस्तकप्रेमी आहेत. ही गोष्ट आजच्या जगात दुर्मीळ आहे.

जगताप – आमचे मित्र नीतीन रिंढे पुस्तकाच्या बाबतीत थोडे ज्येष्ठ आहेत. त्यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक थोडं आधी म्हणजे पाच वर्षांपूर्वी आलंय. आजचा त्यांना मिळालेला हा पाचवा पुरस्कार आहे. महाराष्ट्र फाउंडेशन, औरंगाबादचा नाथ पै पुरस्कार, सोलापूरचा लोकमंगल पुरस्कार, नाशिकच्या सावाना ग्रंथालयाचा आणि हा आजचा… तर रिंढे, हे सगळं होईल याची तुम्ही कल्पना केली होती का? पुस्तक लिहिण्यासाठीसुद्धा इतका वेळ घेणाऱ्या माणसानं, इतक्या कमी कालावधीत घडलेल्या या सगळ्या प्रकाराची अपेक्षा केली होती?

नीतीन रिंढे या ग्रंथालयात येण्याची माझी ही तिसरी वेळ आहे. आता जयप्रकाश म्हणाले तसं, ही माणसं खरंच पुस्तकवेडी आहेत. तशी असल्याशिवाय तीन-तीन वेळा एका माणसाला बोलावणार नाहीत, तेही एकाच कारणामुळे की, त्याने ‘बुक ऑन बुक्स’ लिहिलं आहे. पहिल्यांदा मला पुस्तकांवर भाषण देण्यासाठी बोलावलं; दुसऱ्यांदा निखिलेश चित्रे, किशोर कदम आणि मी अशा आम्हा तिघांच्या गप्पांचा कार्यक्रम झाला, आणि आज परत आम्ही तिघं एकत्र. त्यासाठी मी महाराष्ट्र सेवा संघ, न. चिं. केळकर ग्रंथालय, या पुरस्काराचे कर्ते आणि या पुरस्काराची निवड करणारे वाचक यांचे आभार मानतो. वाचकांनी निवड करावी आणि त्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा, हीसुद्धा अभिनव कल्पना आहे. हे सगळ्याच बाबतीत युनिक असं उदाहरण आहे.

मला जेव्हा भंडारे यांचा फोन आला, तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो, ‘अहो, जुनं झालं ते पुस्तक. त्याला कुठे आता पुरस्कार देता?’ तर ते म्हणाले, ‘जरी पाच वर्षं झाली असली तरी आम्ही तो साहित्यप्रकार ठरवलेला आहे. त्यात तुमचं पुस्तक निवडलं गेलंय, त्यामुळे तुम्हाला पुरस्कार घ्यावाच लागेल.’

हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की, त्यानंतर माझी दोन पुस्तकं आली, त्यांना एकही पुरस्कार नाही. त्याचं एक कारण मला वाटतं असं असू शकतं की (आपण चांगलीच समजून करून घ्यावी, तशी मी करून घेतो), मोठ्या झाडाच्या सावलीत छोटी झाडं वाढत नाहीत. ‘लीळा पुस्तकांच्या’ला आधीच इतके पुरस्कार मिळालेले आहेत, त्यामुळे आता काही शिल्लक नाही. अर्थात हा विनोद होता. खूप आनंद वाटला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

हे लोक वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी धडपडताहेत, प्रामाणिकपणे प्रयत्न करताहेत, हे एकप्रकारे प्रवाहाविरुद्ध पोहणं आहे. मघाशी श्याम जोशीसर म्हणाले, वेड असल्याशिवाय या गोष्टी करता येत नाहीत. ते स्वत:ही वेडे आहेत. अशा वेड्यांना लोक हसतात, टिंगल करतात… ते सगळं सहन करावं लागतं. मात्र माझ्या घरून मला कधी शिव्याशाप मिळालेले नाहीत. माझी पत्नी इथं आहे, म्हणून मी असं म्हणतोय असं समजू नका. उलट कधी कधी ती म्हणते की, ‘मी निर्धास्त आहे. फुटपाथवरून चालतानाही तू फक्त रद्दीचीच दुकानं पाहतोस.’ इतक्या झपाटलेपणाने वाचनसंस्कृती वाढण्यासाठी प्रयत्न करणारी ही मंडळी आहेत. त्यामुळे यांच्याकडे मला पुन्हा पुन्हा यायला आवडतं.

मी श्याम जोशी सरांचा विद्यार्थी आहे. कल्याणच्या ‘ज्ञानमंदिर हायस्कूल’मध्ये नववी-दहावीला असताना ते माझे शिक्षक होते. जे मुख्य महत्त्वाचे विषय असतात, सतत आपल्या डोक्यावर आदळत असतात, आपल्याला त्यांचा प्रचंड ताण असतो, ते विषय सुदैवानं ते शिकवत नव्हते. त्यामुळे फारच मजा होती. त्यांच्याकडे चित्रकला विषय असायचा किंवा ते बऱ्याचदा मोकळ्या तासाला यायचे, आणि ते फक्त पुस्तकांविषयी बोलायचे. दहाव्या-अकराव्या वर्षांपासून पंधराव्या-सोळाव्या वर्षांपर्यंतचा काळ हा आपल्या घडणीचा असतो. तेव्हा आपल्यावर जे संस्कार होतात, ते पुढे आयुष्यभर टिकतात. मी आधीपासून थोडीफार पुस्तकं वाचत होतो, पण ती मिळायची नाहीत फारशी. बहुतेकांच्या घरात पुस्तकांचं वातावरण नसतं. माझ्याही घरामध्ये नव्हतं. पण या माझ्या शाळेत एका वर्गात पार्टीशन करून मागच्या बाजूला एक छोटी खोली तयार केलेली होती. तिथं पुस्तकांच्या पेट्या ठेवलेल्या होत्या. त्या अर्थात कुलुपबंद होत्या. ते पार्टिशन छतापर्यंत नव्हतं. मला काही ते चढून पलीकडे जाण्याचं धाडस व्हायचं नाही, पण आमच्यात काही अतरंगी मुलं होती. ते केवळ एक्साईटमेंटसाठी पलीकडे उड्या मारायचे, त्यांना पुस्तकांत स्वारस्य नव्हतं. पण ते पलीकडे गेले की, मी त्यांना एखादं पुस्तक घेऊन यायला सांगायचो. ती मी वाचायचो, असं मला आठवतं.

आता प्रश्नाच्या उत्तराकडे वळतो. पुस्तक लिहून होईल असंही मला वाटलं नव्हतं. आम्ही लोकवाङ्मयमध्ये असताना पुस्तकांबद्दल भरपूर गप्पा मारायचो. एक अड्डाच बनलेला होता. त्यात प्रकाश विश्वासराव, सतीश काळसेकर, पाशा पिंपळापुरे, नीतीन दादरावाला, निखिलेश चित्रे, राम जगताप असे आमचे अनेक मित्र तिथं असायचे. राम तेव्हा दै. ‘प्रहार’मध्ये गेला. तेव्हा तो असं म्हणाला की, आम्ही ‘बुकमार्क’ नावाची पुरवणी सुरू करत आहोत, त्यात पुस्तकांविषयीच्या पुस्तकांवर तुम्ही लिहा. म्हटलं, चालेल. पण मी आळशी असल्यामुळे मला दर आठवड्याला लिहिणं शक्य नव्हतं. त्यामुळे रामने मला सवलत दिली होती की, तुम्ही पंधरवड्यातून एकदा लिहा. म्हणजे महिन्याला दोन लेख. म्हटलं जमेल आपल्याला. मी सुरुवात केली, पण ते वेळापत्रक पाळणं मला जमलं नाही. कधी कधी मी तीन-तीन पंधरवडे लेख द्यायचो नाही, पण राम माझे लाड करायचा. म्हणायचा, ठीक आहे. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा द्या. असं करत करत दोन वर्षांत मी वीस-एकवीस लेख लिहिले. तेव्हा प्रकाश विश्वासराव लोकवाङ्मय गृहाचे प्रमुख होते. ते म्हणाले, तुझं ते लवकर पूर्ण कर, आपल्याला त्याचं पुस्तक करायचंय. तोपर्यंत पुस्तकाची कुठलीही कल्पना आमच्या डोक्यात नव्हती. असं ते सगळं गमतीगमतीतच झालं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मग त्याचं पुस्तक आलं. तेव्हा मी फेसबुकवर त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ टाकलं, आणि खाली दोनच शब्द लिहिले होते – ‘आलं एकदाचं’. मी त्यातून मोकळा झालो. मी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय की, महाराष्ट्रात वाचनसंस्कृती नाही. त्यामुळे हे पुस्तक काही फार वाचलं जाईल, याची मला फार अपेक्षा नाही, पण त्याच्या विपरीत अनुभव आला. त्यामुळे आनंद वाटला. समोर उन्मेष अमृते बसलेला आहे. तो त्या वेळी माझ्याशी भांडला होता की, असं नाहीये, तू इतकं नकारात्मक लिहू नकोस. त्याचं असं म्हणणं होतं की, आपण याच्याकडे सकारात्मक पद्धतीनं पाहिलं पाहिजे. ते बरोबर होतं, असं मला नंतर वाटलं. खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्या वर्षी ते ‘ललित’मध्ये होतं. पुरस्कारही भरपूर मिळाले. अजूनही तुमच्यासारख्यांना पुरस्कार द्यायची इच्छा होते, म्हणजे त्यात काहीतरी चांगलं असणार.

जगताप – सावंत, तुम्ही आतापर्यंत फक्त हिंदीतून मराठीमध्ये अनुवाद केले आणि तेही अतिशय मोजके. तुमच्याकडून अनुवाद करून घेणं, त्यातही स्वतंत्रपणे लिहून घेणं, हे अतिशय कठीण, जिकिरीची आणि एव्हरेस्ट सर करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांना हे शक्य झालं, त्या ‘ललित’च्या संपादकांनी असं काय गारुड केलं की, त्याला फशी पडून तुम्ही दोन वर्षं सलग सदर लिहिलं?

सावंत थोडा वेगळा प्रकार झाला. मला स्वतंत्र लिहायची वगैरे फार इच्छा होती असं नाही. बऱ्याच वेळेला अनुवादाच्या संदर्भात काहीतरी लिहून दे म्हणून सांगितलं जायचं, तेव्हा मी म्हणायचो की, मी फक्त ‘प्रॅक्टिसिंग’ अनुवादक आहे. मला काही सैद्धान्तिक जमत नाही. ‘ललित’च्या एक विशेषांक होता अनुवादित साहित्यावर. त्याचे अतिथी संपादक विलास खोले होते. ते म्हणाले, तुम्ही अनुवादित कथेवर लिहा. मी त्यांना म्हणालो, ‘अहो, माझा कसलाच अभ्यास नाही. मी नुसते अनुवाद करतो.’ ते म्हणाले, ‘तुम्हाला जमेल’. त्यांनी मला खूपच भरीला घातलं. तेव्हा मी वीणा मुळे यांच्या ‘अनुवाद सूची’वरून कुठल्या कुठल्या भाषांतून मराठीत कथांचे अनुवाद झालेत, त्याची एक सूची तयार केली. आणि त्यावर बेतून एक लेख तयार केला. तो मला स्वत:ला फार काही आवडला नव्हता, पण खोले म्हणाले की, तुम्ही विषयाला धरून लिहिलंय.

काही दिवसांनी भाषांतरित साहित्यावर ‘ललित’चाच विशेषांक काढायचं ठरलं, त्या वेळी खोले परत म्हणाले, तुम्ही भाषांतरित साहित्यावर काहीतरी लिहून द्या. माझी पुन्हा तीच अचडण होती. पण या वेळेला मी ठरवलं की, काहीतरी करूया. म्हणून मीच त्यांना विषय दिला की, भाषांतराची समीक्षा सुरुवातीच्या काळात कशी झाली? मग मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे ‘विविध ज्ञानविस्तार’सारखी त्या वेळची मासिकं शोधून काढली. त्यात जी समीक्षा बघितली, त्याने मी खरोखर थक्क झालो. आज मराठीत भाषांतरित साहित्याची तशी समीक्षा होत नाही. पुस्तकाचा गोषवारा येतो, पण त्यात भाषांतरकाराने काय केलंय, याबद्दल काहीच नसतं. पण ‘ज्ञानविस्तार’मध्ये ग.स. भाटे (रोहिणी भाटे यांचे वडील) यांनी भाषांतरित पुस्तकांची पंचवीस-पंचवीस, तीस-तीस पानांची समीक्षा केली आहे. त्यांनी कितीतरी प्रकारे भाषांतराचा विचार केला आहे. भाषांतरित पुस्तकाचं मूळ भाषेतलं स्थान काय, ते मराठीत आणण्याइतकं महत्त्वाचं आहे का, ते जेव्हा मूळ भाषेत प्रकाशित झालं, त्या वेळेला देशातली परिस्थिती कशी होती, आणि मग भाषांतरात काय काय केलेलं आहे, चुका काय आहेत…

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

मग मी त्याच्यावर एक लेख लिहिला. तो मात्र मला स्वत:लाही आवडला आणि खोल्यांनाही. नंतर मला नेमाडे सरांनी सांगितलं की, अरे, तुझा तो लेख फार चांगला झालाय. मग मला असं वाटलं की, आपल्याला काहीतरी लिहिता येतंय. मी मुळात फारसा आत्मविश्वास नसलेला माणूस आहे. त्यामुळे आपल्याला लिहिता येईल, असं मला कधी वाटलं नव्हतं. दरम्यानच्या काळात मी प्रकाशकांची बरीच पुस्तकं वाचत होतो. त्यात फार सुंदर किस्से मिळायला लागले. म्हटलं याच्यावर आपण काहीतरी लिहू या. मग मी ‘ललित’च्या शुभांगी पांगेबाई आणि अशोक कोठावळे यांना विचारलं. त्यांनी तो छापला. एक लेख झाल्यावर ते म्हणाले, आपण याचं सदरच करू. पण मला लिहायला फार वेळ लागतो. म्हणून मी त्यांना दोन महिन्यातून एक लेख लिहिण्याचं कबूल केलं. अशा रितीनं ‘ललित’मध्ये ‘पुस्तक-गजाली’ हे सदर सुरू झालं. ते मी दोन वर्षं चालवलं. मग एक दिवस कोठावळेच म्हणाले की, बरेच लेख झालेत, आपण याचं पुस्तक करू.

जगताप – ‘पुस्तकनाद’च्या प्रस्तावनेत ‘आईचं कपाट हळूहळू ‘आकरेकून’ त्यात मी माझी पुस्तकं लावायला लागलो,’ असं एक वाक्य आहे. ‘आकरेकून’ म्हणजे काय? हा शब्द मी तरी कधी ऐकला नाही.

सावंत इथे जे मालवणातले लोक असतील त्यांना हा शब्द समजेल. ‘आकरेकनं’ म्हणजे बळकावणं. आम्ही बीडीडीच्या चाळीत राहायचो. आईनं वडिलांकडून काचेचं कपाट घेतलं होतं. (ते अजून माझ्याकडे आहे. मलाच आता सत्तर वर्षं झाली, त्याच्या आधी घेतलेलं.) ते खूप सुंदर आहे. ते माझं पहिलं पुस्तकांचं कपाट. आई त्यात चांदीच्या किंवा स्टिलच्या कप-बशा किंवा अत्तरदाणीत ठेवायची. मी हळूहळू जशी पुस्तकं जमवायला लागलो, तसतसा मी त्यातला एकेक कप्पा घेत गेलो. मग आईनं मला ते पुस्तकांसाठीच दिलं.

जगताप – ‘लीळा पुस्तकांच्या’ हे तुमचं पुस्तक वाचल्यावर पाश्चात्त्य देशांत वाचनसंस्कृती कशा प्रकारे रुजलेली आहे, याचं लख्ख दर्शन होतं. आणि या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना तुम्ही मराठीतल्या वाचनसंस्कृतीचाही आलेख काढलेला आहे. आपल्याकडे जे काही आहे, त्याला वाचनसंस्कृती म्हणायचं का?

रिंढे त्या प्रस्तावनेत मी जे म्हटलं, ते अजूनही माझं मत आहे- महाराष्ट्रात वाचनसंस्कृती विकसित झालेली नाही. पण मलाच एक शक्यता वाटत होती की, हे पुस्तक फारसं वाचलं जाणार नाही किंवा त्याची फार दखल घेतली जाणार नाही. ती मात्र खोटी ठरली. वाचकांनी बऱ्यापैकी वाचलं आणि खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मी परवा विनू अब्राहम नावाच्या मल्याळी लेखकाबद्दल एक छोटीशी फेसबुक पोस्ट लिहिली. त्याची २००८ साली एक कादंबरी छापून आली. ती सध्या मल्याळममधली बेस्टसेलर आहे. तिच्या आतापर्यंत म्हणजे १४ वर्षांत दोन लाख प्रती संपल्या. ज्यांची मातृभाषा मल्याळम आहे, त्यांची संख्या साडेतीन कोटी आहे, आणि ज्यांची दुसरी भाषा मल्याळी आहे, अशांची संख्या एक कोटी आहे. म्हणजे खरे मल्याळी भाषक साडेतीन कोटी आहेत. आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ तेरा-चौदा कोटी आहे आणि त्यातल्या मराठी भाषिक लोकांची संख्या साडेआठ कोटी आहे. म्हणजे मल्याळीपेक्षा जवळजवळ तिप्पट. मल्याळी भाषेत एखाद्या लेखकाची कादंबरी लोकप्रिय ठरते, तेव्हा तिच्या दोन लाख प्रती जातात. मराठीतला लेखक जेव्हा बेस्टसेलर होतो, तेव्हा त्याच्या पुस्तकाच्या किती प्रती जातात? पाच हजार? दहा हजार? माझं एक वेळ सोडून द्या, पण विश्वास पाटील, विश्वास नांगरे-पाटील, किंवा पूर्वीपासूनचे बेस्टसेलर लेखक पु.ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या किती प्रती संपल्या असतील? पु.ल. देशपांडे १९५०-६०पासून लिहीत होते. त्यांच्या पुस्तकांच्या इतक्या वर्षांत पन्नास हजार किंवा एक लाख संपल्या असतील. हा फरक पाहिल्यावर लक्षात येईल की, इथं वाचकांची संख्या कमी आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

दुसरी गोष्ट म्हणजे वाचनसंस्कृती म्हणजे काय? त्यात कोणकोणत्या गोष्टी येतात? वाचक संख्येनं जास्त असलेच पाहिजेत. पण मुळात आपल्या समाजात वाचन ही गोष्ट किती महत्त्वाची आहे? ती कोणकोणत्या कारणांसाठी महत्त्वाची मानली जाते, हे जर तपासलं तर वाचनसंस्कृती आहे की नाही हे समजतं. हे तपासण्याच्या सामाजिक शास्त्राच्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. वाचक कसा ‘डिफाईन’ करायचा याच्याही काही पद्धती आहेत. आपण छंद म्हणून वाचतो, हौस म्हणून वाचतो, एखाद्या विषयाचं ज्ञान करून घ्यायचंय म्हणून वाचतो, वेळ घालवायचंय म्हणून वाचतो, अशी वेगवेगळी कारणं असतात. वाचन ही एखाद्या समाजाची गरज जेव्हा बनते, त्या वेळी तिथं वाचनसंस्कृती विकसित व्हायला लागते. एखाद्या समाजाची म्हणजे बहुसंख्य समाजाची. साडेआठ कोटी मराठी भाषा बोलणारे लोक आहेत, त्यातले पाच लाख लोक वाचत असतील, तर इथं वाचक तयार झालेला नाही, असा अर्थ होतो. त्यामुळे महाराष्ट्रात वाचनसंस्कृती नाही.

त्याचे इतर परिणाम म्हणजे इथं ग्रंथालयं चालत नाहीत, पुस्तक विक्री व्यवस्थित होत नाही. ग्रंथालयांची सदस्यसंख्या कमी होत चालली आहे. पुस्तकं विकली जातात, किती विकली जातात आणि कोणती विकली जातात, हे जर आपण शोधलं, तर आपल्याला कळेल की, वाचकांची इयत्ता काय असते.

जगताप – चांगले वाचक जसे चांगल्या पुस्तकांच्या शोधात असतात, तसं चांगली पुस्तकंसुद्धा चांगल्या वाचकाच्या शोधात असतात. असा तुमचा कुठला अनुभव आहे का, की तुम्हाला अनपेक्षितपणे खूप चांगलं पुस्तक मिळालं… हे तुम्हाला खूप वर्षांपासून हवं होतं किंवा ज्याच्याबद्दल तुम्ही खूप वर्षं केवळ ऐकून होतात…

सावंत असे अनुभव येतात. प्रियोळकरांचे दोन अनुभव मी माझ्या पुस्तकात सांगितले आहेत. बसमधून त्यांनी खाली उतरवणं, मग त्यांनी घोडागाडी केली, तिथं त्यांना पुस्तकवाला भेटला आणि त्याने त्यांना अतिशय दुर्मीळ पुस्तक दिलं. हे योग असतात आणि ते बऱ्याच लोकांच्या आयुष्यात येतात. पुस्तकं हुकण्याचेही योग असतात. काही माणसांना ‘ग्रीन फिंगर्स’ असतात. त्यांनी काहीही पेरलं तरी ते उगवतंच. तशी नीतीनला ‘बुक फिंगर्स’ आहेत. त्याला कुठेही पुस्तक सापडतंच. हॅरी मेलॉस नावाच्या लेखकाची ‘असॉल्ट’ नावाची एक खूप सुंदर कादंबरी आहे. आपण पुस्तकं खूपदा वाचायचा प्रयत्न करतो, पण आपल्याला वेळ होतोच, असं नाही. पण ‘असॉल्ट’ मात्र मी काढून केव्हाही वाचतो. ही कादंबरी मी सतीश काळसेकरांच्या नावावर एशियाटिक लायब्ररीमधून घेऊन झेरॉक्स करून ठेवली होती. अगदी अलीकडे मला ती मिळाली. पण त्या वेळेला मी ती सतत शोधायचो. त्या वेळेला ‘फ्लिपकार्ट’, ‘अ‍ॅमेझॉन’ वगैरे नव्हतं.

तेव्हा मी आणि नीतीन ‘पीपल्स बुक हाऊस’मध्ये भेटायचो. एके दिवशी मी लवकर निघालो. नेहमीप्रमाणे हुतात्मा चौकातल्या पुस्तकवाल्यांकडे नजर टाकली आणि पुढे गेलो. माझ्यानंतर तिकडे नीतीन गेला आणि त्याला तिथं ‘असॉल्ट’ची हार्डबाउंड प्रत मिळाली. काही वेळेला अशी पुस्तकं हुकतातसुद्धा.

प्रदर्शन हा आपल्या आयुष्यातला खूप सुंदर भाग आहे. करोनाकाळात आम्ही प्रदर्शनं खूप ‘मिस’ केली. प्रदर्शनात एकाच वेळेला खूप पुस्तकं पाहून एखाद्या फुलांच्या ताटव्यात गेल्यासारखं वाटतं. मग तेव्हा पुस्तकं नाही मिळाली तरी चालतं. एकदा मी एका प्रदर्शनाला गेलो आणि खूप कंटाळून निघालो असताना थोर विचारवंत इसाया बर्लिनच्या पत्रांचा संग्रह समोर दिसला. जणू तो माझ्याचसाठी होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

इथं सगळे वाचकच आहेत, म्हणून मला थोडं वाचनसंस्कृतीबद्दलही बोलायचंय. पुस्तकांची पाचशे प्रतींची आवृत्ती जात नाही, हे आपल्याला खेदकारक वाटतं. मला त्याहीपेक्षा एक भयानक गोष्ट वाटते. ती म्हणजे आपल्याकडची मासिकं जवळजवळ अस्तित्वात राहिलेली नाहीत. मासिकं ही इतकी सुंदर गोष्ट आहे. मी अनुवादाकडे कसा वळलो, तर माझी प्रकाश विश्वासरावांशी, काळसेकरांशी ओळख झाली. मग मी ‘पीपल्स बुक हाऊस’मध्ये जायला लागलो. त्या वेळेला तिथं हिंदीतली जवळजवळ साठ-सत्तर नियतकालिकं यायची. आता मी प्रवास करू शकत नाही, फोर्टमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे मला फार दु:ख होतं. पण मी जेव्हा जायचो, तेव्हा तिथं मला ‘कथादेश’, ‘हंस’, ‘ज्ञानोदय’, ‘पहल’, ‘वसुधा’ अशी सुंदर मासिकं पाहायला मिळायची. अर्थात हिंदी मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा तीन-चार राज्यांत बोलली जाते. नीतीन म्हणाला, तसं आपल्याकडे एवढे कोटी लोक आहेत, पण आपल्याला एक मासिक टिकवता येत नाही. आता मला परवडत नाही, पण एकेकाळी तुटपुंजा पगार असूनही मी तीन-चार मासिकांचा वर्गणीदार असायचो.

गेल्या काही वर्षांत ‘अंतर्नाद’ बंद पडलं, ‘शब्द’ जवळ जवळ बंद पडलं. ‘युगवाणी’ आणि ‘मायमावशी’ चालू आहेत, पण त्यांना आपण खूप समाजात पसरणारी मासिकं म्हणू शकत नाही. एकेकाळी ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ ही मासिकं मोठ्या प्रमाणात वाचली जायची. मी आता पंचाहत्तर वर्षांचा आहे, मी लिहून लिहून किती लिहिणार? पण जी कविता-कथा लिहिणारी तरुण मुलं आहेत, ती कशी लोकांपर्यंत जाणार? आम्ही ‘वाङ्मयवृत्त’मध्ये कवितेसाठी प्रयत्न केले. दर अंकात एक बाहेरचा आणि एक तरुण कवी यांच्या कविता द्यायचो. या तरुण लेखकांना आता कुठे व्यासपीठ राहिलं आहे?

फिक्शन हे कुठल्याही साहित्याचं सामर्थ्य आहे. मी त्या वेळेला ‘हिंदी नियतकालिकांचं अदभुत जग’ या नावाचा एक लेखही लिहिला होता. जवळजवळ ३०-४० मासिकं मी तेव्हा नियमितपणे पाहायचो. त्या लेखात मी एक वाक्य लिहिलं होतं की – ‘मासिकं ही फुप्फुसांसारखी असतात. ती भाषेचं रक्त सतत शुद्ध करतात. अशुद्ध रक्ताचा निचरा करतात.’ ताजं साहित्य वाङ्मयीन मासिकांतूनच मिळालं नाही, तर मग फक्त दिवाळी अंकातच वाचणार? आपण वर्षातून एकदा वाचन करतो का?

जगताप – हिंदीत ‘प्रकार मासिकाचा आणि आकार पुस्तकाचा’ अशा प्रकारची अनेक नियतकालिकं प्रकाशित होतात. ‘बहुवचन’, ‘पहल’ या नियतकालिकांचे अंक २०० पानांच्या पुढे असतात. हिंदीतली ही ‘नियतकालिक-संस्कृती’ मराठीत का रुजली नसावी, असं तुम्हाला वाटतं? अलीकडच्या काळात तुम्ही अनेक संस्था, पुरस्कार समित्या, वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आणि संस्थात्मक पद्धतीच्या कामांमध्ये गुंतलेले आहात. संस्थात्मक पातळीवर आपण कुठे कमी पडतोय का? किंवा संस्थात्मक पातळीवरील काही उणीवा याला जबाबदार आहेत का? तुम्हाला काय वाटतं?

रिंढे या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी जयप्रकाश सावंत यांनी जो मुद्दा मांडला, त्याला पूरक अशा दोन गोष्टी सांगतो. आजच सकाळी आमच्या महाविद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो विद्यार्थ्यांशी बोलत होते. त्यांना एका मुलानं प्रश्न विचारला की, आम्ही काय वाचलं पाहिजे? त्यावर ते म्हणाले की, मासिकं वाचायला सुरुवात करा. कारण मासिकात फिक्शन, नॉन-फिक्शन अशा वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असतं. त्यातून त्याला जे आवडतं ते तो वाचेल. तिथून मग पुस्तकाकडे वळेल. सुरुवातीला वाचनाची सवय लागण्यासाठी, वाचनाचे संस्कार होण्यासाठी मासिकं खूप चांगली असतात, असा मुद्दा मावजो यांनी मांडला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हे झालं फिक्शनबद्दल. पण मागे अशोक शहाणे म्हणाले होते की, प्रत्येक भाषेत दैनिकांनंतर साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं अशी नियतकालिकं असतात. काही गोष्टी या आठवडाभरानं छापल्या जातात, काही पंधरवड्यानं, काही महिन्यानं… ही नियतकालिकं सावकाश एखाद्या विषयाबद्दलचं आपलं आकलन वाढवत नेण्याचं काम करत असतात, असं शहाणे यांचं म्हणणं होतं. आणि ते खरं आहे. पण ते सगळं हरवलं आपल्याकडे.

वाचनसंस्कृती नष्ट झाली, त्याचा हा एक भाग आहे. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर. आपण असा विचार केला की, महाराष्ट्रात अशा प्रकारची मासिकं चालवणाऱ्या अशा दहा संस्था आहेत. त्यांच्या काय काय गरजा असतात? एक म्हणजे त्यांना चांगलं साहित्य पाहिजे. दुसरं म्हणजे त्यांच्याकडे वितरणव्यवस्था पाहिजे. आणि वर्गणीदारांचा व वाचकांचा प्रतिसाद पाहिजे. या तिन्हीही पातळ्यांवर मासिकांना फार त्रास होतो. तूही संपादनं केलेली आहेस, मीही केलेली आहेत. चांगलं साहित्य मिळवण्यासाठी किती यातायात करावी लागते! मुळात आता चांगलं लिहिणारे लोकच कमी होत चालले आहेत. लिहिणारे खूप आहेत, पण चांगलं लिहिणारे कमी असल्यामुळे त्यांच्याकडून पाठपुरावा करून लिहून घेणं, हे फारच कष्टाचं काम असतं. दुसरं असं की, वर्गणीदार नाहीत. ‘अनुष्टुभ’चं काम मी पाहायचो. आमच्या वर्गणीदारांची संख्या अडीचशेपर्यंत खाली आली होती. आता आम्ही ‘मराठी संशोधन पत्रिके’चं काम करतो. आमचे साडेतीनशे-चारशे वर्गणीदार आहेत. त्यांच्याकडूनसुद्धा दरवर्षी आठवणीनं वर्गणी मिळवली तर, नाहीतर मग ते नुसते कागदावर राहतात.

वर्गणीदार नसतील तर विक्रीच्या काहीतरी यंत्रणा असल्या पाहिजेत. तिथं हजार-होन हजार प्रती विकल्या जातील. तशी विक्री केंद्रं नाहीत. त्यामुळे आता फक्त ‘युगवाणी’, ‘प्रतिष्ठान’ अशी साहित्यसंस्थांची मासिकं ‘समाज प्रबोधन पत्रिका’ अशी अ‍ॅकडेमिक स्वरूपाची मासिकं येतात. त्यांना संस्थेचं पाठबळ आहे, म्हणून आर्थिक नुकसान होत असलं तरी त्या संस्था ही नियतकालिकं चालवू शकतात. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत त्या चालवतील. नंतर तेही बंद होईल, अशी परिस्थिती आहे.

संस्था चुकत असतील, किंबहुना चुकतात, त्यांच्या काही मर्यादा आहेत, असं आपण मानलं तरी तो वेगळा आणि व्यापक विषय आहे. संस्था कशा प्रकारे चालवल्या पाहिजेत, त्यांची उद्दिष्टं काय असली पाहिजे, त्याकरता साधनं कशी गोळा केली पाहिजेत, त्यांनी आपल्या संसाधनांची सोय कशी करावी आणि उपक्रम राबवावेत, या पातळीवर त्यांच्या समस्या आहेत. त्यातला एक भाग म्हणजे मासिकं. हा भाग बाजूला ठेवला तरी इतर ज्या समस्या आहेत, त्यांचा संबंध थेट आपल्याशी, वाचकांशी, समाजाशी आणि संस्कृतीशी आहे. ते जास्त गंभीर आहे. मला वाटतं, त्याबाबतच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती आलेली आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

जगताप – तुम्ही हिंदी साहित्य खूप वाचता. उदय प्रकाश यांच्यासारख्या जागतिक पातळीवरच्या हिंदी लेखकाचे अनुवाद तुम्ही मराठीत केले आहेत. तुमचा पहिला फिक्शनचा अनुवाद हा उदय प्रकाश यांच्या कथेचा होता. त्यानंतर तुमचे त्यांच्या कथांच्या अनुवादांचे दोन संग्रह प्रकाशित झाले. उदय प्रकाश यांच्या साहित्याचं काय वेगळेपण तुम्हाला जाणवतं किंवा दिसतं?

सावंत आधी उदय प्रकाशांचा संबंध कसा आला, ते सांगतो. मी ‘पुस्तकनाद’ हे माझं पुस्तक चौघांना अर्पण केलंय, त्यातलं एक नाव आहे, प्रकाश विश्वासराव. ते प्रकाशक आणि पुस्तकनिर्मितीच्या क्षेत्रातले म्हणून अनेकांना माहीत असले, तरी ते खूप चांगले वाचकसुद्धा होते. एके दिवशी ते ‘इंडिया टुडे’चं वार्षिकी घेऊन आले. तो अंक माझ्यासमोर ठेवत म्हणाले, ‘बघा यार, हे लोक काय लिहितात!’ त्यात उदय प्रकाश यांची ‘वॉरन हेस्टिंग का सांड’ ही कथा होती. कुठल्या तरी ग्रंथालयात एक चित्र आहे. त्यात वॉरन हेस्टिंग, त्याची बायको आहे आणि मागे एक दासीसारखी मुलगी आहे. उदय प्रकाशांनी अशी कल्पना केली की, ती दासी म्हणजे वॉरन हेस्टिंगजची मैत्रीण होती. त्यांचे प्रेमसंबंध होते. मग त्यांनी ही कथा कुठल्या कुठल्या अदभुत पातळीवरून फिरवली आहे. ती वाचून मी थक्क झालो. त्याआधी मी एक अनुवाद केला होता, विष्णू खरे यांच्या मुलाखतीचा. मग मी उदय प्रकाशांची पुस्तकं ‘हिंदी ग्रंथ रत्नाकर’मध्ये जाऊन आणली. त्यांच्या सगळ्या कथा वाचून काढल्या.

उदय प्रकाश यांच्या कथांमध्ये अत्यंत अस्वस्थ करणारं वास्तव असतं. ‘असहनीय यथार्थ’ असं त्याला म्हटलं गेलंय. ते अतिशय साध्या, कुठल्याही अलंकार नसलेल्या शैलीत सांगतात. शिवाय त्यांची चिंतनशीलता कथेला गोष्टीच्या पार घेऊन जाते.

ज्या तऱ्हेनं आपला समाज हिंसक, बाजारू होत चाललाय, त्याबद्दल उदय प्रकाश संतापानं आणि विषादानं लिहितात. ते मला आवडलं. त्या वेळेला ‘शब्दालय’च्या सुमती लांडे यांची ओळख झाली होती. त्या म्हणाल्या, तू एवढं वाचतोस तर काहीतरी दे. म्हणून मग मी त्यांना ‘तिरिछ’चा अनुवाद करून दिला. ही कथा खूप अस्वस्थ करणारी आहे. तिच्याबद्दलची एक कमेंट सांगतो. एक विजय मोहिते नावाचा चित्रकार आहे. तो मला म्हणाला की, ‘मी ‘तिरिछ’ वाचलं, आणि मला वाटलं, आपल्याला वाचता येऊ लागलंय, त्याची ही शिक्षा आहे.’

जगताप – २००० साली तुमचं पहिलं अनुवादित पुस्तक प्रकाशित झालं – ‘तिरिछ आणि इतर कथा’. आणि २०१५ला ‘रघुनंदन त्रिवेंदी यांच्या कथा’… तुम्ही १५ वर्षांत अवघ्या पाच हिंदी पुस्तकांचे अनुवाद केले. मी जर तुमच्यासारखा चांगला अनुवादक असतो, तर १५ वर्षांत किमान १५-२० पुस्तकांचे तरी अनुवाद नक्की केले असते…

सावंत – मला महत्त्वाकांक्षा नव्हती, नाही. मी ज्या वेळेला उदय प्रकाश यांच्या पहिल्या कथेचा अनुवाद केला, त्या वेळेला मी त्यांचे चार कथासंग्रह मिळवले होते. त्यातून मी निवडक कथा घेतल्या. मी अनुवाद करताना एक निकष लावतो – तुम्ही कशाचा अनुवाद करता हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. मला कुणी म्हणालं ना, ‘अरे, तू काय चांगली कथा मराठीत आणलीस?’ तर मला ते आवडतं. ‘किती चांगला अनुवाद केलास’ यापेक्षा मी मराठीत काहीतरी चांगलं आणलंय, हे मला महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे जे मराठीत नाहीये ते आणावं, असं मला वाटतं.

मी अनुवाद केले नाहीत असं नाही. मधल्या काळात जवळपास ५०-६० कथांचे अनुवाद केले आहेत. पण त्या अजून पुस्तकरूपानं प्रकाशित व्हायच्या आहेत. संजय खातीर, शशांक, मणि मधुकर अशा लेखकांबद्दल मराठीत माहीत नाही, आणि त्यांच्यासारख्या कथाही मराठीत नाहीत. जी कथा मला चकित करून जाते, तेव्हा मला वाटतं, ही वाचकांनाही चकित करणार. उदय प्रकाशांच्या अनुवादित कथांचा एक संग्रह होईल इतके अनुवाद मी केले आहेत. ते पपायरस प्रकाशन करणार आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मध्यंतरी ‘शब्द’मध्ये जवळजवळ दर महिन्याला माझी एक अनुवादित एक कथा यायची. तेव्हा एकदा सुबोध जावडेकरांनी ‘शब्द’ला पत्र लिहिलं होतं – ‘हिंदी कथा मराठीत अनुवादित करून देऊ नयेत, त्यामुळे आम्हाला न्यूनगंड येतो.’ ही फार उमदी कमेंट होती.

जगताप -  एकेकाळी रोज दुपानंतर फोर्टमध्ये सापडणारे आमचे मित्र रिंढे हल्ली तिथं सापडत नाहीत, एवढं लोकांनी सध्या त्यांना वेगवेगळ्या कामांत गुंतवण्याचं काम केलेलं आहे….

रिंढे षडयंत्र आहे…

जगताप – पण चांगलं षडयंत्र आहे. तुमच्यासारख्या दिवसाचे तास ४८ असलेल्या माणसानं संस्थात्मक पातळीवर काम केलं पाहिजे. साहित्यसंस्थांच्या कारभाराबद्दल एरवी आपण एवढं टीकात्मक बोलत असतो, तिथं जाऊन तुमच्यासारख्या निरलस माणसाने नि:स्वार्थी बुद्धीनं काम केल्यामुळे त्या कामाची गुणवत्ता नक्कीच वाढते. आणि ती वाढायची असेल तर तुमच्यासारख्या माणसाने थोडासा त्याग करायला हरकत नाही.

असो. तो वेगळा विषय आहे. अलीकडे तुम्ही कुठली इंग्रजी पुस्तकं वाचली? त्यातली कुठली आवडली? खूप पुस्तकं असतील, पण अगदी अलीकडची…

रिंढे कमी वाचतोय सध्या, कारण काही लेखनाची कामं चालली आहेत. ‘लीळा पुस्तकांच्या’ची दुसरी आवृत्ती आता संपलीय. दरम्यान मीच प्रकाशकांना सांगितलंय की, तिसरी आवृत्ती इतक्यात काढू नका, कारण मला अजून दोन-तीन पुस्तकांवर लिहायचंय. त्या लेखांची भर घालून आता तिसरी आवृत्ती येईल.

अलीकडे वाचलेल्या पुस्तकांपैकी एक म्हणजे ‘द हाऊस ऑफ ट्वेंटी थाउजंड बुक्स’ नावाचं एक पुस्तक आहे, साशा अब्रामस्की यांचं. चिमेन अब्रामस्की हा लंडनमधला डाव्या विचारांचा एक पुस्तकवेडा माणूस होता. त्याच्या नातवानं लिहिलेलं हे पुस्तक आहे. चिमेन वारल्यानंतर या नातवानं आजोबांच्या ग्रंथसंग्रहावर हे पुस्तक लिहिलंय. ते मला फार आवडलं.

प्रदीप सॅबेस्टियनचं ‘द बुक ब्युटिफुल : अ मेमॉयर ऑफ कलेक्टिंग रेअर अँड फाइन बुक्स’ हे आत्मचरित्र नुकतंच आलंय. ते एक मला महत्त्वाचं वाटतं. ते अजून पूर्ण वाचून झालं नाही. हा भारतातला असा एक लेखक आहे, जो इंग्रजीमध्ये ‘बुक ऑन बुक्स’ अशा प्रकारची पुस्तकं लिहीत असतो. खरं तर तो आम्हा सगळ्यांचा अप्रत्यक्ष गुरूपण आहे. तो दै. ‘हिंदू’मध्ये ‘एन्ड पेपर’ नावाचं सदर लिहायचा. तेव्हा आम्ही त्याची वाट बघायचो. त्याने त्या वेळी अनेक नव्या पुस्तकांचा परिचय करून दिला होता. त्या सगळ्या लेखांचं ‘द ग्रोनिंग शेल्फ’ नावाचं पुस्तक आलं. त्यानंतर त्याने एक कादंबरी लिहिली – ‘द बुक हंटरर्स ऑफ काटपाडी’. जी भारतीय इंग्रजीतली पहिली पुस्तकावर आधारित रहस्यकथा आहे. बाकी काही फारसं वाचलेलं नाही. इंग्रजी वाचन जवळजवळ पूर्ण थांबलंय. आता मी खूप किचकट वाचतोय. जुन्या शुद्धलेखनात छापलेलं. त्यामुळे आता मला दुसरं काही दिसत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

जगताप – शेवटचा प्रश्न दोघांसाठी. त्यानंतर आपण थांबूया. सावंतांच्या ‘पुस्तकनाद’मध्ये ‘पैशाची किंमत’ नावाचा एक लेख आहे. त्यात त्यांनी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचा एक सुंदर किस्सा दिलाय. त्यांनी ‘शिवचरित्र’ हे शिवाजीमहाराजांचं चरित्र लिहिलं. नंतर त्यांना असं वाटलं की, या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करावा आणि जगभरातल्या मोठ्या ग्रंथालयांमध्ये तो जावा. त्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केला. त्यासाठी कुणाकडून काही मदत मिळतेय का बघितलं. त्यात आठेक वर्षं गेली. शेवटी त्या चरित्राचा इंग्रजी अनुवाद झाला. पण त्या सगळ्या पैशाच्या जुळवाजुळवीमध्ये अनुवादकाला त्याचं मानधन द्यायचं राहून गेलं. जेव्हा केळुस्करांना ते शक्य झालं, तेव्हा त्यांनी त्याचा कार्यक्रम केला आणि अनुवादक प्रा. नीळकंठ ताकाखाव यांना नव्वद वर्षांपूर्वी जाहीर कार्यक्रम करून किती मानधन द्यावं? १०० तोळे सोनं. मला असं विचारायचंय की, गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या वाचकांकडून, जाणकारांकडून, समीक्षकांकडून असा काही १०० तोळे सोन्याच्या तोडीचा अनुभव, प्रतिक्रिया अनुभवायला आलेली आहे का?

सावंत तो किस्सा आहे ना तो वाचल्यावर मीसुद्धा खूप चकित झालो होतो. माझे ‘पुस्तकनाद’मधले बरेचसे लेख हे ‘अनेकडोट्स’ म्हणता येतील अशाच प्रकारचे आहेत. केळुस्करांचा हा किस्सा मला लिहायचा होतं, पण मला तेवढा एकच नको होता. त्यात भर काय घालायची, याचा विचार करत असतानाच मला गजानन माधव मुक्तिबोध यांच्या पत्रांचा संग्रह मिळाला. कवी अज्ञेय यांनी सात कवींच्या कविता घेऊन ‘तारसप्तक’ हा कवितासंग्रह संपादित केला आहे. त्याने आधुनिक हिंदी कवितेला सुरुवात केली. अज्ञेय यांनी असं ठरवलं होतं की, सात जणांनी वीस रुपये वर्गणी काढून पुस्तक प्रकाशित करायचं. प्रत्येकाला त्या पुस्तकाच्या १२-१२ प्रती मिळणार होत्या. शिवाय ते पुस्तक विकलं जाणार होतं. अज्ञेय यांनी कलकत्याच्या एका ओळखीच्या माणसाला सांगितलं की, तू सगळं कर. मग आम्ही तुला पैसे देऊ.

मुक्तिबोधांच्या त्या संग्रहात अज्ञेय यांची विचारणा करणारी अनेक पत्रं आहेत की, ‘अरे तू वीस रुपये केव्हा देणार?’, अरे, त्या माचवेला सांग तो वीस रुपये केव्हा देणार?’ शेवटी कंटाळून लिहिलेलं एक पत्र आहे, ‘तुम्ही जर आता पैसे दिले नाहीत ना, तर मीच त्या प्रकाशकाकडून प्रती घेईन. तुम्हाला काही देणार नाही.’ म्हणजे वीस रुपयेसुद्धा त्या वेळेला महाग होते.

त्याच काळात मला पु. शि. रेगे यांच्या ‘छंद’ या द्वैमासिकाचा एक अंक मिळाला. त्यात पुस्तकांच्या जाहिराती होत्या. त्या कशा तर दोनशे-अडीचे-तीनशे पानी पुस्तकांच्या किमती होत्या दोन-अडीच रुपये. त्याच अंकात फायरबोल्ट घड्याळाची जाहिरात होती. त्याची किंमत होती ९० रुपये. माझ्या छातीत धस्स झालं… दोन रुपयांचं पुस्तक आणि नव्वद रुपयांचं घड्याळ. मी कित्येक दिवस घड्याळ घेतलं नव्हतं, त्याचं बहुतेक हे कारण असणार.

अशा सगळ्या गोष्टी एकत्र करून मी तो लेख लिहिला. त्याच लेखात मी लिहिलंय, कुठल्याही अनुवादकाला यापूर्वी मिळाला नसेल, आणि कधी मिळणार नाही, अशी एक रक्कम दिली गेली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मला असा काही अनुभव आला का, तर हो. मी नेमाडे सरांना ‘पुस्तकनाद’ दिलं होतं. नंतर जेव्हा सोलापूरचा पहिला पुरस्कार मिळाला, तेव्हा मी जाऊन त्यांना म्हटलं की, मला एक पुरस्कार मिळालाय. तेव्हा ते म्हणाले, ‘अरे, तुझं ते पुस्तक मला फार आवडलंय. मध्ये मध्ये काढून मी त्यातले लेख वाचतो. तुला हाच नाही, आणखी पुरस्कार मिळणार आहेत.’ नेमाडेसरांनी असं म्हणणं हाच मोठा पुरस्कार आहे, आणखी काय पाहिजे!

रिंढे आधी त्या १०० तोळे सोन्याबद्दल एक स्पष्टीकरण देतो. अनुवादकाला १०० तोळे सोनं देणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती. पण ते देणं त्यांना शक्य कसं झालं? त्याचा अर्थ लोक भरपूर वाचत होते आणि चांगलं चाललं होतं, असं वाटू शकतं. तर तसं नाही. उलट केळुस्करांचं शिवाजीचरित्रसुद्धा बराच काळ छापून येत नव्हतं. पैसे नव्हते. त्यांनी शाहू महाराज आणि तुकोजीराव होळकर यांच्याकडे मदत मागितली होती. त्यांनी जे पैसे दिले, त्यातून हे झालं.

मला त्या तोडीची एक प्रतिक्रिया आठवतेय. सातारा की सांगलीहून एकदा एका वाचकाचा फोन आला. ते रिक्षा चालवतात. त्यांनी ‘लीळा पुस्तकांच्या’ वाचलं. मग त्यांनी कुठून तरी नंबर मिळवून मला फोन केला. म्हणाले, ‘तुमचं पुस्तक मला फार आवडलं. अशी पुस्तकं असतात हे मला माहीत नव्हतं.’ मग मी त्यांना विचारलं, ‘तुम्ही कुठून घेतलं?’ ते म्हणाले, ‘विकत घेतलं. मी पुस्तकं विकत घेऊन वाचतो.’ या रिक्षावाल्या वाचकाची ही प्रतिक्रिया मला १०० तोळे सोन्यापेक्षा जास्त मोठी वाटते.

सावंत मला ताकाखाव यांच्याबद्दल अजून थोडं सागांयचंय. हा लेख छापून आल्यावर मला ‘बॉम्बे बुक डेपो’चे पां. ना. कुमठा यांचं पत्र आलं. ते त्यांचे विद्यार्थी. त्यांना ताकाखाव यांच्याकडे पीएच.डी. करायची होती, पण ते शक्य झालं नाही. जी. ए. कुलकर्णी यांनी त्यांच्याकडे पीएच.डी. केली. ‘त्यांच्याकडे पीएच.डी. केली असती, तर मी आणखी काहीतरी केलं असतं’, असं त्या पत्रात कुमठा यांनी लिहिलंय.

मध्यंतरी ताकाखाव यांच्या नातवाचा ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये एक छोटा लेख आला होता. मग मी मित्रांकडून त्याचा नंबर घेतला. त्याला विचारलं, ‘तुमच्या आजोबांचं काही तुम्ही ठेवलंय का?’ तर त्याला त्यांच्या साहित्याबद्दल काहीही माहिती नव्हती. ताकाखाव यांचा कुणीतरी शोध घेतला पाहिजे. त्यांनी आणखी काय काम केलंय, ते पाहायला पाहिजे.

जगताप मला असं वाटतं की, ही मुलाखत आता खरी रंगत चाललीय. पण वेळ बघता आणि तुमच्याही सहनशीलतेचा अंत न पाहता, आपण हा पूर्वार्ध आहे असं समजू, उत्तरार्ध भविष्यात कधीतरी होईल, अशी आशा करूया. आणि आता इथंच थांबूया. धन्यवाद.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......