‘यशवंत बाळाजी शास्त्री’ : एका ‘रोमांचक’ पुस्तकाची गोष्ट!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
प्रवीण बर्दापूरकर
  • ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ. मध्यभागी नलिनी शास्त्री, यशवंत बालाजी शास्त्री आणि ग. त्र्यं. माडखोलकर
  • Tue , 28 March 2023
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो यशवंत बाळाजी शास्त्री ग. त्र्यं. माडखोलकर तरुण भारत

ही नोंद एका पुस्तकाच्या गोष्टीची आहे. ते पुस्तक वाचायला मिळालं कसं, त्याचीही एक गोष्ट आहे, पण ती नंतर सांगतो.

पुस्तकाचं नाव आहे ‘यशवंत बाळाजी शास्त्री’. लेखकाचं नावही तेच आहे. खरं तर, या पुस्तकाला नाव (Title)च नाही. मुखपृष्ठावर आहे, ते केवळ लेखकाचं नाव! यशवंत बाळाजी शास्त्री हे नाव मी सर्वप्रथम नागपूरला ऐकलं. १९७७ साली मी पत्रकारितेत आलो आणि २६ जानेवारी १९८१ रोजी पुढील पत्रकारिता करण्यासाठी नागपुरात डेरेदाखल झालो.

नागपूरच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांतच यशवंत बाळाजी शास्त्री हे नाव आणि त्यांच्याविषयीच्या धाडसी, तसंच काहीशा रंगतदार कथा ऐकायला मिळाल्या. ते कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी होते, हे कळल्यावर तर त्यांच्याविषयी ऐकण्यात उत्सुकता वाटत असे. कधी कधी त्या कथा दंतकथा वाटत, इतका भक्तीभाव संगणाऱ्याच्या बोलण्यात असे.

यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या आठवणी सांगणाऱ्यात ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचे आमचे तत्कालीन मुख्य वार्ताहर, कसदार बालसाहित्य लिहिणारे लेखक म्हणून तेव्हा ओळखले जाणारे दिनकर देशपांडे यांच्यापासून ते बुजुर्ग दि. भा. उपाख्य मामासाहेब भुमरे अशा अनेक मान्यवरांचा समावेश होता.

यशवंत बाळाजी शास्त्री या पुस्तकाची प्रथम आवृत्ती डिसेंबर १९७५मध्ये प्रसिद्ध झाली. म्हणजे हे पुस्तक प्रकाशित झाल्याला आता जवळजवळ ४८ वर्षे होत आहेत. ज्या पुण्याच्या प्रेस्टिज पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केलं, ती प्रकाशन संस्थाही आता बंद झाली आहे. २१८ पानांच्या या पुस्तक वाचनाचा अनुभव एका शब्दांत सांगायचा, तर ‘रोमांचित’ करणारा आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

११ जानेवारी १९११ रोजी जन्मलेल्या यशवंत शास्त्री यांचं हे आत्मचरित्र म्हणजे अनेक अफलातून आठवणींचा खच्चून भरलेला खजिनाच आहे. मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यातल्या देवरी या छोट्याशा गावी यशवंत शास्त्री यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण विदर्भात झालं. मुंबई, पुणे, नागपूर अशा तीन ठिकाणी त्यांनी पत्रकारिता केली. याशिवाय अनेक क्षेत्रात त्यांचा वावर होता. चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या कामाच्या निमित्ताने उत्तर भारत आणि पाकिस्तानातही ते भरपूर फिरले. तेव्हाच्या महागड्या हॉटेलात त्यांनी वास्तव्य केलं. त्यांना भेटलेली सगळीचं माणसं माझ्या पिढीला नावानिशी माहिती आहेत, पण  त्यापैकी अनेकांना प्रत्यक्ष भेटता आलेलं नाही. यशवंत शास्त्री मात्र त्या अनेकांना केवळ भेटलेच नाही, तर त्यांच्यासोबत त्यांनी कांही केलं.

त्यात आचार्य अत्रे, नानासाहेब परुळेकर, पांडोबा भागवत यांच्यासारखे संपादक आहेत; मीनाकुमारीपासून अनेक अभिनेत्री-अभिनेते, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आहेत.

महत्त्वाचं म्हणजे ती सर्व माणसं आणि त्या काळात आलेल्या अनुभवांना यशवंत बाळाजी शास्त्री अतिशय धाडसानं सामोरे गेलेले आहेत. खरं तर काही अनुभवांच्या बाबतीत रंगेलपणे सामोरे गेले, असंही म्हणता येईल, कारण केवळ धूम्रपान आणि मद्यपानच नव्हे, तर आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि काहींच्या ‘उत्कट सहवासा’विषयीसुद्धा यशवंत बाळाजी शास्त्री यांनी अतिशय नितळपणे लिहिलं आहे. किती नितळपणे, तर त्यांच्यावर एका स्त्रीकडून झालेल्या बळजोरीची हकिकतही ‘स्त्रीकडून पुरुषावर झालेला बलात्कार’ म्हणून त्यांनी सांगून टाकली आहे. कुठलीही लपवाछपवी केलेली नाही. 

महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या (दुसऱ्या) पत्नी शालिनी शास्त्री यांच्या केवळ पुढाकारानंच नव्हे, तर त्यांच्या निवेदनासह हे पुस्तक यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या मृत्युपश्चात प्रकाशित झालेलं आहे. शालिनी आणि यशवंत शास्त्री या दाम्पत्याच्या परस्परांतील विश्वास, सामंजस्य आणि खुलेपणाचा एक प्रातिभ आविष्कार म्हणूनही या पुस्तकाकडे पाहता येईल.

‘मी धर्मश्रद्ध आहे, पण धर्मांध नाही. ईश्वरावर माझा विश्वास आहे, पण मी मूर्तिभंजक नाही. मला माणसाचे दैन्य पाहावत नाही. कारण मी दारिद्रयाचा अनुभव घेतला होता,’ अशी भूमिका (पृष्ठ ४३) मांडत यशवंत बाळाजी शास्त्री व्यक्त झालेले आहेत. उल्लेखनीय म्हणजे व्यक्त होण्याच्या त्यांच्या या भूमिकेविषयी ते ठाम आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

ज्या नागपूरच्या ‘तरुण भारत’ दैनिकासाठी यशवंत बाळाजी शास्त्री यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली, ते दैनिक तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र नव्हतं. ‘तरुण भारत’ संघाचं मुखपत्र कसं झालं, याची यशवंत बाळाजी शास्त्री यांनी दिलेली माहिती वाचनीय आहे. ती देताना यशवंत बाळाजी शास्त्री म्हणतात, ‘मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आकस नाही. आयुष्यात वेळ मिळाला असता, तर कदाचित मी संघाचा स्वयंसेवकही झालो असतो. ’ हे सांगून रा.स्व. संघ एखादी संस्था ताब्यात कशी घेतो, त्याचे तंत्रही सांगून यशवंत शास्त्री मोकळे होतात.

प्रख्यात साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी सुरू केलेलं  ‘तरुण भारत’ हे दैनिक संघाचं मुखपत्र कसं  झालं, हे कथन करतांना त्यांनी म्हटलं आहे- ‘‘एखादी संस्था संपूर्ण हस्तगत करावयाची झाल्यास, त्यासाठी संघाचे तंत्र मोठे मासलेवाईक असते. संघाची माणसे एका मागून एक अशी त्या संस्थेत  शिरकाव करून घेतात आणि हा हा म्हणता शिरजोर होतात. बाळासाहेब देवरस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक) यांच्या हाती ‘तरुण भारत’ची सूत्रे गेली आणि द्रुतगतीने ‘तरुण भारत’चे स्वरूप पालटत गेले. संघाचे तंत्र आणि मंत्र उपयोगात आणला जाऊ लागला.’’ (पृष्ठ ११६)

एक मोठी अदभुत म्हणावी अशी घटना यशवंत बाळाजी शास्त्री यांनी कथन केली आहे. शेवटचे मोगल सम्राट आणि गझलकार बहाद्दूर शहा जफर यांची अजरामर ‘ना मैं किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ’ ही गझल यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या हाती कशी पडली आणि पुढे अमीनाबाई यांनी ती गाऊन प्रसिद्धीचे ‘चार चाँद’ कसे, ही सविस्तर हकिकत (पृष्ठ ७६) मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

आणखी एक मोठी खळबळजनक घटना यशवंत बाळाजी शास्त्री यांनी कथन केली आहे आणि ती आहे, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर झालेल्या हल्ल्याची. (या घटनेविषयी नागपुरातील ज्येष्ठ संपादक-पत्रकारांनी आम्हाला अनेकदा सांगितलं आहे, पण प्रत्येकाच्या सांगण्यात तपशील वेगळे असत. नेमकी घटना या पुस्तकात आहे.) १२ मार्च १९५५ रोजी नागपुरात ही घटना घडली होती. ‘भारत सेवक समाजा’च्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू नागपूरला आले होते. विमानतळावरून पंडित नेहरू राजभवनाकडे जात असताना जेल रोडवर रहाटे कॉलनीनजीक बाबुराव कोचरे या इसमाने त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला लगेच पकडले. ही घटना अर्थातच खळबळजनक तसंच आंतरराष्ट्रीय महत्त्व असणारी होती.

पंतप्रधानांच्या दौऱ्याचं वृत्तसंकलन करण्यासाठी त्यांच्या ताफ्यातील एका मंत्र्याच्या कारमध्ये तेव्हा असलेले यशवंत बाळाजी शास्त्री या घटनेचे एक पत्रकार म्हणून हे एकमेव साक्षीदार होते. नागपूर आणि परिसराची संदेश वहन यंत्रणा खंडित होण्याच्या आत यशवंत बाळाजी शास्त्री यांनी ती बातमी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी ‘ब्रेक’ केली, हे सर्व तपशील असलेली ती हकीकत केवळ पत्रकारांनीच नाही, तर सर्वांनीच ‘जर्नालिस्टिक थ्रीलर’ म्हणून वाचण्यासारखी आहे. (पृष्ठ १३९)

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत घडलेल्या ‘जर्नालिस्टिक चकमकी’सह अशा अनेक आठवणींचा खजिना म्हणजे यशवंत बाळाजी शास्त्री हे पुस्तक आहे. अर्थात यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या सर्वच मतांशी सहमत होता येत नाही, हेही तेवढंच खरं.

राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या कृतीवर टीका करणारा माझा ब्लॉग प्रकाशित झाला आणि ट्रोल्सनी धुमाकूळ घातला. नेमक्या त्याच काळात ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ वाचताना मला धैर्य आणि बळ मिळालं. पुस्तकं सच्चे सोबती कसे असतात, जणू याचाच प्रत्यय या पुस्तकानं दिला.

...............................................

हे पुस्तक कसं प्राप्त झालं याचीही एक गोष्ट सांगायलाच हवी – अद्याप भेट न झालेले माझे एक वाचक मित्र आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे त्यांचं नाव. (माजी मुख्यमंत्री नव्हेत! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही पुस्तकांत रमणारे खूप चांगले वाचक राजकारणी आहेत.) हे पृथ्वीराज चव्हाण मूळचे साताऱ्याचे  आणि आता पुण्याला स्थायिक आहेत. शिक्षणानं अभियंता तसंच व्यवस्थापनशास्त्राचे पदवीधारक म्हणजे उच्च विद्याविभूषित आणि एका खाजगी उद्योगात उच्चपदस्थ आहेत. त्यांच्या घराण्याची नाळ सत्यशोधक चळवळीशी जुळलेली असल्याची परंपरा आहेत. त्यांचे पणजोबा नारायणराव चव्हाण या चळवळीचे एक नेते होते. त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाईचं नगराध्यक्षपदही भूषवलं आहे. वडील शिक्षक होते. पृथ्वीराज यांच्यावर वाचनाचा संस्कार त्यांच्या आई-वडिलांकडून झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून म्हणजे, १९८८-८९पासून ते माझ्या लेखनाचे वाचक आहेत. अधून-मधून आम्ही फोनवर संपर्कात असतो. 

‘यशवंत बाळाजी शास्त्री’ हे पुस्तक प्रकाशित करणारी प्रेस्टिज पब्लिकेशन्स ही सर्जेराव घोरपडे यांनी सुरू केलेली एकेकाळची आघाडीची पुण्याची प्रकाशन संस्था. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या लेखनाचे अनुवाद, गोविंदराव तळवलकर यांची, अशी असंख्य महत्त्वाची पुस्तकं प्रेस्टीजनं अतिशय देखण्या स्वरूपात  प्रकाशित केलेली आहेत. आता ही प्रकाशन संस्था बंद झाली आहे. प्रेस्टिजची काही पुस्तकं पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती लागली. ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ हे एक. हे पुस्तक वाचल्यावर त्यांना माझी आठवण झाली. हे पुस्तक भेट म्हणून पाठवताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे- ‘‘My pleasure to send autobiography of a journalist to a journalist whom I like and respect .’’

अशी पुस्तकं पाठवणारे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे ग्रंथप्रेमी मित्र सगळ्यांना लाभोत. कुणाला जर ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ हे पुस्तक हवं असेल, तर त्यानं पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी ९८६०५१०००१ या सेलफोनवर सकाळी १० ते सायंकाळी ६ ही कार्यालयीन वेळ वगळून संपर्क साधावा.

.................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......