प्रमोद झिंजाडे : वैधव्याचे भोग वाट्यास आलेल्या आयाबहिणींना ‘माणूस’ म्हणून जगण्यास बळ देणारे प्रेरक नेतृत्व
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रशांत कोठडिया
  • प्रमोद झिंजाडे
  • Tue , 07 February 2023
  • पडघम कोमविप प्रमोद झिंजाडे Pramod Zinjade हेरवाड पॅटर्न Hervad Pattern महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिकेचा)चा २०२२चा ‘समाजकार्य – विशेष पुरस्कार (विधवा प्रथा निर्मूलन)’ मिळाला. तो त्यांना नुकताच, म्हणजे २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यात ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात आला. त्यानिमित्ताने प्रसिद्ध विनोदी साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) : स्मरणिका २०२३’मध्ये प्रकाशित झालेला हा लेख...

.................................................................................................................................................................

२०२३ साल उजाडत असताना, आपल्या सर्वदूरच्या बहुजन समाजातील महिलांची स्थिती आजही अतिशय विदारक आहे, हे तथाकथित पुरोगामी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वावरताना सहजपणे जाणवते. ग्रामीण भाग असो वा शहरी गरीब वस्त्या, कोणत्याही कारणामुळे एकट्या राहणाऱ्या महिलेला आणि विशेषतः वैधव्य आलेल्या स्त्रियांना ज्या अपमानास्पद, तिरस्कारपूर्ण आणि टिंगलटवाळीच्या वागणुकीला तोंड द्यावे लागते, याची कल्पनाही करवत नाही. विधवेने कोणत्याही सार्वजनिक वा खासगी समारंभात जाऊ नये, रंगीत कपडे घालू नये, हे कमी आहे की काय, तिच्या चेहऱ्यावर हास्याची रेघही उमटायला नको, अशी एक ना अनेक बंधने तिच्यावर वर्षानुवर्षे घातली गेली आहेत.

ही परिस्थिती कमी होती म्हणून की काय, कोविड महामारीने देशातील अक्षरशः कोट्यवधी आयाबहिणींना जणू एक वेगळेच अग्निदिव्यच करायला भाग पाडले. करोना विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या पुरुषमंडळींमुळे असंख्य संसार उघडे पडले आणि त्यामुळे विधवा झालेल्या महिलांची ही विदारक स्थिती अस्वस्थ करणारी असली तरी, या क्रूर प्रथेविरुद्ध बोलण्याची पुरुषमंडळींची हिंमत होत नसावी किंवा याबद्दल मौन धारण करणे, हे कदाचित त्यांना सोयीचे वाटत असावे. ही परिस्थिती पाहून लहानशा खेड्यातील एक व्यक्ती मात्र खूपच अस्वस्थ होती. प्रमोद झिंजाडे हे या अस्वस्थ होणाऱ्या संवेदनशील व्यक्तीचे नाव.

महात्मा फुले, क्रांतिजोती सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदी समाजसुधारकांच्या विचारांनी पूर्णपणे भारावलेल्या झिंजाडे यांनी, आपल्या तरुणपणी म्हणजेच १९८२ साली करमाळासारख्या दुष्काळी तालुक्यातील ‘पोथरे’ या त्यांच्या जन्मगावी ‘महात्मा फुले समाजसेवा मंडळ’ या संस्थेची स्थापना केली आणि ते मागील ४० वर्षांपासून सर्वांगीण ग्रामीण विकासाचे कार्य अविरतपणे करत आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

सुमारे दोन वर्षांपूर्वीची एका घटनेने झिंजाडे यांच्या आयुष्याला एकप्रकारे कलाटणी दिली. ११ जून २०२० रोजी झिंजाडे हे सांगली जिल्ह्यात एका कार्यकर्त्याच्या अंतिम संस्काराला गेले होते. चितेला अग्नी देऊन काही क्षण होतात न होतात, इतर विधवांनी त्या कार्यकर्त्याच्या पत्नीचे कुंकू पुसत तिच्या अंगावर जे काही तुटपुंजे दागिने होते, तेदेखील काढायला सुरुवात केली. ती हमसून हमसून रडत होती, ओरडत होती, पण या जुन्या प्रथेपुढे कोणाचे काय चालणार? पुढील काही मिनिटांतच तिच्या वैवाहिक जीवनाचे सारे रंगच पुसून टाकले गेले आणि तुला आता बेरंगी आयुष्य जगावे लागेल, असा संदेशच जणू तिला देण्यात आला.

काहीही चूक नसलेल्या एका दुःखी महिलेचा आक्रोश ऐकून झिंजाडे यांच्या मनात कालवाकालव होणे स्वाभाविकच होते. हृदयात वेदनेची कळ उमटली आणि यांनी मनोमन ठरवले की, ही अन्यायी व भयावह प्रथा बंद व्हायलाच हवी. त्या दृष्टीने काय करावे, याबाबतचे विचारचक्र त्यांच्या डोक्यात सुरू झाले. लोकांचे पुन्हा एकदा प्रबोधन करून त्यांच्यामध्ये या अनिष्ट प्रथेविरोधात जागृती करण्याची आवश्यकता असल्याचे झिंजाडे यांना जाणवले. मात्र केवळ प्रबोधन व जागृती करून भागणार नाही, तर या प्रथेविरुद्ध कायदेशीर बाबींचाही शासकीय पातळीवरून पाठपुरावा करणे किती महत्त्वाचे आहे, हे पण त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान कोविडच्या महामारीचे थैमान सुरू झाले. कोविडच्या या आव्हानात्मक काळात झिंजाडे यांना, राज्यातील विविध ठिकाणी गोरगरीब कष्टकऱ्यांना अन्नधान्य व इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्याची मोहीम प्राधान्याने हाती घ्यावी लागली. करोनाचे संकट ओसरल्यावर मात्र झिंजाडे यांनी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान’ या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आणि आपल्या नव्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीस प्रारंभ केला.

सद्य परिस्थितीत ‘व्हॉट्सॲप विद्यापीठा’च्या माध्यमातून विद्वेष पसरविण्याचा जो नंगा नाच सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांचा विधायक कार्यासाठीही वापर करता येतो, याचे झिंजाडे यांनी जणू उदाहरणच समाजापुढे ठेवले. या व्हॉट्सॲप गटामध्ये राज्यातील सरपंच, सामाजिक संस्था, बचत गट, शासकीय अधिकारी यांचा समावेश केला आणि या अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करणे किती गरजेचे आहे, हे पटवून देण्यासाठी या गटातील सभासदांशी संवाद सुरू केला.

झिंजाडे हे मुळातच कृतिशील कार्यकर्ता असल्यामुळे, त्यांनी स्वतःच एक उदाहरण घालून देण्याचे ठरवले. या पारंपरिक अनिष्ट रूढीच्या बंधनातून स्वत:च्या पत्नीला मुक्त करण्याचा झिंजाडे यांनी मनोमन निश्चय केला आणि त्या दृष्टीने, ‘माझ्या मृत्युपश्चात माझ्या पत्नीवर या प्रकारच्या अवमानकारक रूढी, परंपरा लादू नयेत, तिचे कुंकू पुसून टाकू नये, तिच्या बांगड्या काढू नये आणि कोणत्याही प्रकारे तिचे विद्रुपीकरण करू नये’, असे शंभर रुपयांच्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्र तयार केले आणि २९ मार्च २०२२ रोजी ते शासन दरबारी सादर करून एका विधायक चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आणि अंधारमय समाजातील एका पणतीच्या प्रकाशात त्याने आश्वासक पाऊल टाकले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियाना’चा समन्वयक या नात्याने झिंजाडे यांनी या विषयावर ग्रामीण भाग पिंजून काढायचे ठरवले. याकरता त्यांनी राज्यातील सरपंचांशी पत्र, व्हॉट्सॲप, पत्रकं, या माध्यमातून संवाद सुरू केला. २०१९मध्ये कोल्हापूर व सांगली परिसरात आलेल्या पूरामध्ये मदत कार्य करत असताना, प्रमोदची ओळख कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या गावचे सरपंच श्री. सुरगोंडा पाटील यांच्याशी झाली होती. या भेटीत झिंजाडे यांनी विधवा प्रथा निर्मूलन कार्याविषयी सूतोवाच केलेच होते. मात्र पुढील काही महिन्यांतच कोविड महामारीसारखे संकट येईल, याची कोणाला कल्पना असणार?

देशभराप्रमाणेच हेरवाड गावातील जवळपास वीस महिलांना वैधव्य आल्यामुळे, त्यांना जे भोगावे लागत होते, हे श्री. सुरगोंडा पाटील यांनी प्रत्यक्षात पाहिले होते. याच जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. राजू मगदूम हेदेखील झिंजाडेंच्या विचाराने प्रभावित झाले होते आणि त्या दोहोंच्या मनातही या अनिष्ट प्रथेविरुद्ध आपल्या गावात कार्य सुरू करण्याचा विचार घोळतच होता. याच दरम्यान, हेरवाड गावाच्या पंचक्रोशीत वसलेल्या अर्जुनवाड या गावातील श्रीमती अंजली पैलवान या तरुण महिलेवर विधवा होण्याचा दुर्दैवी प्रसंग गुदरला. श्रीमती पैलवान यांनी झिंजाडे यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना मार्गदर्शन करताना झिंजाडे यांनी 'आपण स्वतःचे

उदाहरण घालून द्या’ असे सुचवले. त्याचा परिणाम म्हणून, अंजलीबाईंनी पुढाकार घेत हळदी-कुंकवाचा समारंभ आयोजित केला आणि दागदागिने परिधान करून सण साजरे करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या या धाडसाचे दबक्या आवाजात का होईना, गावात थोडेफार कौतुकही झाले. वरील सर्व परिस्थितीचा परिपाक म्हणजे, हेरवाड ग्रामपंचायतीने (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) ‘विधवा प्रथा निर्मूलना’चा ५ मे २०२२ रोजी एकमताने मंजूर केलेला खालील ऐतिहासिक ठराव.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

हेरवाड ग्रामपंचायतीने उचललेल्या या पावलाची देशभरातील सर्व भाषिक वर्तमानपत्रांनी दखल घेतल्यामुळे याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्या पाठोपाठ माणगाव ग्रामपंचायतीनेही अशाच प्रकारचा ठराव मंजूर केला. कोल्हापूर जिल्हा परिषदेने या ठरावांचे समर्थन करणारे एक परिपत्रकही जारी केले. शासकीय पातळीवरही त्याची तातडीने दखल घेतली घेतली गेली.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी ‘विधवा प्रथा निर्मूलन अभियान’ आणि ‘स्त्री आधार केंद्र’ यांच्या सहभागासह २७ मे २०२२ रोजी पुण्यातील विधानभवनात परिवर्तन बैठकीचे आयोजन केले. त्यामध्ये सर्व संबंधित खात्याचे तसेच पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि विशेषतः विधवा झालेल्या महिला उपस्थित होत्या. या अनिष्ट प्रथेचे पूर्णपणे उच्चाटन करण्याचा निर्धार सदर बैठकीत व्यक्त करण्यात आला आणि या प्रथेविरुद्ध कायदा झाला पाहिजे, ही झिंजाडे यांची भूमिका उचलून धरत, शासनाकडे यासाठी आग्रह धरण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले.

...........................................................................................................................................

“आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे असे घडते. तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, याकरता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. यासंदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात यावी, त्यास ही सभा मंजुरी देत आहे.”

(ग्रामपंचायत सदस्य श्रीमती मुक्ताबाई संजय पुजारी यांनी हा ठराव मांडला आणि श्रीमती सुजाता केशव गुरव यांनी त्याला अनुमोदन दिले).

...........................................................................................................................................

मागील चाळीस वर्षांपासून, रोजगार हमी योजनेची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून झटणाऱ्या झिंजाडे यांच्या भरीव कार्याला ‘विधवा प्रथा निर्मूलन अभियाना’मुळे एक वेगळेच परिमाण लाभले आहे. जमिनीवर घट्ट पाय रोवून असलेल्या झिंजाडे यांनी ठिकठिकाणी राबवलेल्या पाणलोटक्षेत्र विकासाच्या ‘पाणीदार’ प्रकल्पांमुळे करमाळासारख्या दुष्काळी भागातील शेती पिकू लागली आणि अक्षरश: हजारो जिरायती शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रातून कायमचे बाहेर आले आहेत. उपजीविकेसाठी कायम भटकंती करणाऱ्या अनुसूचित जाती व भटक्या जमातीतील विशेषत: पारधी जमातीच्या कुटुंबांचे पुनर्वसन आणि त्यांच्या मुलामुलींना कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण या पंचक्रोशीतील भटक्या व विमुक्त समाजाच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडून आले आहे. दिल्यामुळे ‘रोजगार हमी योजने’च्या प्रेरणेतून देशपातळीवर सुरू झालेल्या ‘मनरेगा’ या रोजगाराभिमुख क्रांतिकारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून शासनाने राज्यभरातील हजारो सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पण झिंजाडे यांच्या नेतृत्वाखालील ‘महात्मा फुले समाज विकास मंडळा’कडे सोपवली आहे.

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी व्हावे म्हणून झिंजाडे पायाला भिंगरी लावून सर्वदूर फिरत आहेत, लोकांशी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधत आहेत. त्यांना सर्वत्र उत्साहवर्धक प्रतिसादही लाभत आहे.

दुसऱ्या बाजूने याबाबत कायदा व्हावा म्हणून. ते शासनालाही साद घालत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून झिंजाडे यांनी कायद्याचे मसुदास्वरूप प्रारूपही तयार केले असून, हा कायदा व्हावा म्हणून ते शासन दरबारी न थकता पिच्छा पुरवत आहेत. राजर्षी छत्रपती श्री. शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात, श्री. प्रमोद झिंजाडे यांच्या या महत्त्वपूर्ण व अभिनव अभियानास हृदयपूर्वक शुभेच्छा देत असताना, वैधव्याचे भोग वाट्यास आलेल्या आयाबहिणींना ‘माणूस’ म्हणून जगण्यास बळ देणाऱ्या त्यांच्या या अतुलनीय कार्यास सलाम!

.................................................................................................................................................................

हेही पाहा-वाचा-अनुभवा : 

हेरवाड गावाने टाकलेले क्रांतिकारी पाऊल हे एक पाऊलच ठरण्याची शक्यता जास्त आहे. त्याची पायवाट तरी होईल का?

हेरवाड, माणगाव आणि बनवाडी : सामाजिक सुधारणेची नवी सुरुवात करणाऱ्या या खेड्यांची संख्या येत्या काळात वाढत जावो…

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा