‘मोदी @ 20’ : पंतप्रधान मोदींच्या कल्पनांमधून एकविसाव्या शतकातील ‘नव्या भारता’ची परिभाषा तयार होत आहे…
ग्रंथनामा - झलक
ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशन
  • ‘मोदी @ 20’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 17 January 2023
  • ग्रंथनामा झलक मोदी @ 20 MODI@20: Dreams Meet Delivery नरेंद्र मोदी Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१मध्ये आपल्या राजकीय-प्रशासकीय कारकिर्दीची २० वर्षे पूर्ण केली. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि २०१४ ते २१ ही सात देशाच्या पंतप्रधानकीची सात वर्षे, असा हा २० वर्षांचा सलग प्रवास. त्यानिमित्ताने ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने ‘Modi @ 20 : Dreams Meet Delivery’ हे इंग्रजी पुस्तक एप्रिल २०२२मध्ये संपादित करून प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकात पी. व्ही. सिंधू, सुरजित एस. भल्ला, अमीश त्रिपाठी, अमित शहा, अरविंद पणगडिया, अनुपम खेर, अशोक गुलाटी, नंदन निलकेणी, सुधा मूर्ती, अजित डोभाल, एस. जयशंकर अशा विविध क्षेत्रांतल्या २१ मान्यवरांच्या लेखांचा समावेश आहे. मूळ इंग्रजी पुस्तक रूपा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाले आहे. नुकताच या पुस्तकाचा ‘मोदी @ 20 : स्वप्ने होती साकार’ या नावाने राजहंस प्रकाशनातर्फे मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. या पुस्तकामागची मूळ संयोजकांची ही भूमिका…

.................................................................................................................................................................

सर्व प्रकारच्या लोकशाही राजवटी या स्वभावत:च स्पर्धात्मक आणि विवादात्मक असतात. राज्यघटनेद्वारे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नागरिकांना दिलेले आहे, प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य आहे, न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र आहे व सजग नागरी समुदाय सक्रिय आहेत, अशा उदार प्रकृतीच्या लोकशाही व्यवस्थेत आपल्या कल्पना, आपले विचार निर्भीडपणे मांडण्याची समान संधी सर्वांना मिळत असते. हजारो वर्षांचा इतिहास असलेला व अशा प्रकारच्या वादविवाद-चर्चांची संपन्न परंपरा असणारा भारतासारखा देश तर याबाबतीत अग्रेसर असणे स्वाभाविक आहे.

त्याच्या जोडीला तरुणांचे प्रमाण अधिक असलेली अब्जाच्या घरात जाणारी लोकसंख्या, भाषा, संस्कृती व भौगोलिक अशी सर्व प्रकारची अफाट विविधता जिथे आढळून येते, अशा या वैविध्यपूर्ण देशाला एका समान एककेंद्री विचाराने एकत्र आणण्याची कल्पना तरी कोणी करू शकेल का? किंवा या कल्पनेच्या आसपास फिरकण्याचा तरी कोणी प्रयत्न केला असेल का? या सर्व परिस्थितीतही, ‘आयडिया ऑफ मोदी’ (मोदीजींची कल्पना) गेल्या दोन दशकांपासून या देशात प्रभाव निर्माण करून राहिलेली आहे. वस्तुस्थिती ही आहे की, पंतप्रधान मोदींच्या कल्पनांमधून एकविसाव्या शतकातील नव्या भारताची परिभाषा तयार होत आहे, नवी उभारणी होत आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. सन २०२१मध्ये त्यांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय सलग चालू राहिलेल्या आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची २० वर्षे पूर्ण केली. या वीस वर्षांतील साडेबारा वर्षे त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषवले, तर पुढील साडेसात वर्षांपासून ते आपल्या देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. प्रशासकीय कारकिर्दीची जबाबदारी एका व्यक्तीने सलग २० वर्षे सांभाळणे अशी अनोखी घटना भारतातच नव्हे, तर लोकशाही व्यवस्था असलेल्या अन्य कोणत्याही देशामध्ये आत्तापर्यंत अगदी क्वचितच घडलेली आढळते.

या वीस वर्षांमध्ये त्यांनी पाच निवडणुका लढवल्या. सन २००२, २००७ व २०१२ साली गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते निवडणुका लढले, तर २०१४ व २०१९ साली पंतप्रधानपदासाठी लोकसभा निवडणुकांना सामोरे गेले. या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांचे अस्तित्व पणाला लागले होते; पण ते एकाही निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. उलट प्रत्येक निवडणुकीगणिक त्यांची लोकप्रियता वाढत गेली. देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची लोकप्रियता वृद्धिंगत होऊन नामांकित संस्थांच्या सर्वेक्षणांमध्ये ‘जागतिक लोकप्रिय नेते’ म्हणून त्यांची गणना होऊ लागली.

आपल्या देशात २०१४ सालापूर्वी तीन दशकांमध्ये एकाही राष्ट्रीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळवून सत्ता स्थापन करता आली नव्हती. तेव्हा २०१४च्या निवडणुकीतही एकाही पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही, असेच अनुमान सगळ्या राजकीय विश्लेषकांनी काढले होते. नरेंद्र मोदी यांनी मात्र पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना, तीन दशकांची ही परंपरा खंडित केली व भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळवून देऊन केंद्रात सत्ता स्थापन केली. मोदींच्या नेतृत्वात भाजपने मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयाने सर्व विश्लेषकांचे निष्कर्ष चुकीचे ठरवले.

‘मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने मिळवलेला विजय हा केवळ त्यांनी देशाला दाखवलेल्या स्वप्नांमुळे आहे, प्रत्यक्षात त्यांच्या कारभारानंतर खरे काय ते जनतेला समजेल,’ असा दावा त्या वेळी विरोधक करत होते. प्रत्यक्षात २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने मोदींच्या नेतृत्वात निर्विवाद, अभूतपूर्व असा विजय मिळवल्यावर जनतेने केवळ आशेपोटी नव्हे, तर लोकांप्रती त्यांची असलेली निष्ठा व त्यांच्या जनसेवेमुळे मोदींना कौल दिला आहे, हे स्पष्ट झाले.

या संपूर्ण कालावधीत मोदींची लोकप्रियता नवनवी शिखरे गाठत होती. यासोबतच आत्तापर्यंत ज्या राज्यांत भाजपने एकदाही सत्ता मिळवली नव्हती, अशा राज्यांतही तो पक्ष सत्तेत येऊ लागला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एखाद्या राजकीय व्यक्तीला किंवा पक्षाला राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक म्हणून जी काही गृहीतके आजवर मानली गेली आहेत, त्यांपैकी एकही मोदींना लागू होत नाही. आत्तापर्यंत देशाच्या सत्तेवर पकड ठेवून बसलेल्या अभिजनवर्गाशी काहीही संबंध नसलेल्या, कोणतीही राजकीय वा आर्थिक पार्श्वभूमी नसलेल्या, सर्व अर्थाने आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकातील कुटुंबात मोदींची जडणघडण झाली आहे. २००१पूर्वी मोदी कोणत्याही स्थानिक निवडणुकीतसुद्धा निवडून आले नव्हते, आधी मातृसंस्था असणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि नंतर भारतीय जनता पक्षात पडद्यामागे राहून काम करण्यात ते समाधानी होते. आणि तरीही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरू केलेले मोदी हे गेल्या २० वर्षांत केवळ निवडणुकीतच अपराजित ठरले नाहीत, तर स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वांत विश्वासू व लोकप्रिय असे लोकनेते म्हणून नावारूपासही आले. राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर मोदींच्या उदयानंतर देशातील कानाकोपर्‍यातील स्थानिक निवडणुका असोत वा राष्ट्रीय पातळीवरील निवडणुका असोत, प्रत्येक निवडणुकीत तेच केंद्रस्थानी राहिले आहेत.

२०१४ साली जनतेने एक प्रकारे थेट निवडून दिलेले पहिले पंतप्रधान ही नरेंद्र मोदी यांची ओळख आहे. ज्यांनी अगोदर लोकप्रियता मिळवून मग पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व पूर्ण बहुमत मिळवत पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, असे एकही पंतप्रधान त्यापूर्वी झाले नव्हते. या आधी एकतर उमेदवारांच्या नावाची घोषणा करून निवडणुका घेतल्या जायच्या किंवा मग पूर्ण बहुमत न मिळाल्याने तडजोडी करून नंतर पंतप्रधान ठरवले जात असत. पंतप्रधान मोदी हे स्वतंत्र भारतातले पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांचे नाव प्रथम पंतप्रधानपदासाठी घोषित करण्यात आले व त्यानंतर निवडणुका लढवून ऐतिहासिक असे पूर्ण बहुमत मिळवून ते सत्तास्थानी आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समाजाच्या सर्व घटकांतील, राज्यांतील, वयोगटांतील या पराकोटीच्या लोकप्रियतेमागे नक्की काय कारणे असू शकतात? गुजरातचे मुख्यमंत्रिपद सांभाळत असताना त्यांनी जे राबवले व नंतर ज्याची पुनरावृत्ती त्यांनी राष्ट्रीय पातळीवरही केली, ते सुशासनाचे प्रारूप? की देशापुढील नानाविध समस्यांना, संकटांना, आव्हानांना धीरोदात्तपणे सामोरे जाण्याची शक्ती? की जनभागीदारीच्या माध्यमातून सामान्य जनतेला प्रशासनात सहभागी करून घेण्यावर त्यांनी दिलेला भर? त्यामुळेच तळागळातील लोकांसोबत त्यांचे एक वेगळे नाते निर्माण झाले असेल का? की या यशाचे गमक केंद्र सरकार आणि देशातील लाखो लोकांमध्ये दृढ विश्वास व नाते निर्माण करणार्‍या ‘सबका साथ, सबका विकास’ या मोदींच्या धोरणामध्ये आहे?

हे सगळे असे चक्रावणारे प्रश्न आहेत की, ज्यांचे एकच एक ठोस उत्तर आपल्याला मिळू शकत नाही. २०२१मध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची २० वर्षे पूर्ण केली, त्या वेळी या पुस्तकाची कल्पना आमच्या मनात आली. त्यावेळेस आम्हांला जाणवले की, आपण जर गांभीर्याने हा विषय मांडला, तर हे एक साधेसुधे पुस्तक होणार नाही, ते विशेष लक्षणीय ठरेल. त्याचे कारणही खूप सोपे आहे. मोदींच्या २० वर्षांच्या कारकिर्दीतले असे कोणते काम किंवा धोरण आहे, ज्यामुळे आजतागायत त्यांची जादू जनतेच्या मनावर टिकून आहे? हा प्रश्न तुम्ही एखाद्या विद्वान व्यक्तीला विचारला, तर त्यांचे उत्तर हे एखाद्या राजकीय क्षेत्रातील विचारवंतापेक्षा वेगळे असू शकते आणि प्रत्यक्ष मतदान करणार्‍या सर्वसाधारण मतदारांच्या मतांपेक्षा, विचारांपेक्षा भिन्न टोकाचेही असू शकते आणि तरीही त्या सर्वांची उत्तरे बरोबरही असू शकतात; कारण २० वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीत मिळवलेल्या यशाचे कारण मोदींची कोणती तरी एक योजना किंवा कोणते तरी एकमात्र धोरण आहे, असे आपण म्हणू शकत नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एकंदरीतच आम्हांला जाणवले की, असे पुस्तक कोणा एका व्यक्तीच्या विचारांनी, मतांनी तयार होऊ शकणार नाही. मग ते कितीही अभ्यासपूर्ण असले, तरीही ते प्रभावी ठरू शकणार नाही. हे लक्षात आले, तेव्हा या लेखसंग्रहाची कल्पना आम्हांला सुचली. आपण विविध क्षेत्रांतील प्रभावी व्यक्तींकडून त्यांच्या त्यांच्या क्षेत्राशी संबंधित लेख लिहून घेतले, तर त्या लेखांमधून त्या त्या क्षेत्राशी संबंधित विश्लेषणात्मक व सैद्धांतिक अशा दोन्ही बाजू मांडल्या जातील, तसेच मोदींसोबत काम करताना अनुभवलेले किस्सेही त्यात येतील. या पद्धतीने लेखसंग्रह तयार केला, तर मोदींच्या कार्यकर्तृत्वाविषयी बोलणारे, त्यांच्या यशाचे रहस्य सांगणारे हे एकमेव पुस्तक ठरेल, असे आम्हांला वाटले. या कल्पनेवर सविस्तर विचारविमर्श करून ही एक उत्तम कल्पना असल्याचे पटल्यावर आम्ही सर्वांनी कामाला सुरुवात केली.

अशा प्रकारे पंतप्रधान मोदींच्या यशस्वी अशा २० वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीचा मागोवा घेणारा हा संग्रह अखेर पूर्णत्वास आला आहे. या पुस्तकामध्ये पाच विभाग असून एकूण एकवीस लेख आहेत. प्रत्येक लेख त्या-त्या क्षेत्रात प्रभावीरित्या कार्यरत असलेल्या मान्यवरांनी लिहिलेला आहे. या मान्यवर लेखकांनी त्यांच्या विषयांशी संबंधित सर्व कंगोर्‍यांना स्पर्श करून गेल्या वीस वर्षांत काय काय बदल झाले आहेत, त्याची सखोल मांडणी केली आहे.

पुस्तकाचा पहिला भाग ‘पंतप्रधान मोदींचा सामाजिक जीवनातील प्रभाव’ या विषयावर आधारित आहे. ऑलिंपिक विजेत्या पी. व्ही. सिंधू यांनी तरुणांसोबतचे नाते या विषयावर लेख लिहिला आहे. ‘अपोलो समूहा’च्या शोभना कामिनेनी यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणाबद्दलचे मोदींचे धोरण समजावून सांगितले आहे, तर अर्थतज्ज्ञ सुरजित एस. भल्ला यांनी अंत्योदय विचारानुसार समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या विकासासाठी, दारिद्र्य निर्मूलनासाठी पंतप्रधान मोदींनी राबलेल्या विविध योजनांचा प्रभाव व अंमलबजावणी या विषयाची विस्तृत चर्चा केली आहे.

दुसर्‍या भागात ‘राजकीय क्षेत्रातील मोदींचा प्रभाव’ या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. भारतातील अग्रगण्य लेखक अमीश त्रिपाठी यांनी ‘मोदींच्या नेतृत्वाखालील सांस्कृतिक पुनरुज्जीवन’ या विषयावर लेख लिहिला आहे. ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची वाटचाल’ या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशिवाय दुसरे कोण लिहू शकणार होते? या भागातील शेवटच्या लेखात अग्रगण्य मानसशास्त्रज्ञ प्रदीप गुप्ता यांनी वेगवेगळ्या आकडेवारीच्या व माहितीच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील निवडणुकांचे तंत्र कशा प्रकारे बदलले, यावर लिहिले आहे.

तिसर्‍या भागात मोदींच्या आर्थिक धोरणावर चर्चा करण्यात आली आहे. केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी आपल्या लेखात, भव्य विचार करून त्याप्रमाणे तो अमलात आणण्याची मोदींची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता याबद्दल चर्चा केली आहे.

अर्थतज्ज्ञ प्रा. अरविंद पणगडिया यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात घडलेल्या ‘आर्थिक धोरणातील सुधारणा’ या विषयावर लिहिले आहे. मोदींनी सूक्ष्म अर्थक्षेत्रामध्ये कशा प्रकारे बदल घडवून गरिबांना सक्षम करण्यावर भर दिला, या विषयावर प्रख्यात अर्थतज्ज्ञ, लेखिका डॉ. शमिका रवी यांनी आकडेवारी सादर करून त्याचे विश्लेषण केले आहे. भारतातील अग्रगण्य बँकर उदय एस. कोटक यांनी संपत्तीची निर्मिती करणार्‍या भागभांडवलदारांना सन्मान व प्रोत्साहन देण्याच्या मोदींच्या विचारपद्धतीवर लेख लिहिला आहे.

चौथ्या भागात ‘नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा’ या विषयावरील लेखांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा संघटनेचे महासंचालक अजय माथुर यांनी विकास आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही अत्यावश्यक गोष्टींचा मेळ घालून कशा प्रकारे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट नरेंद्र मोदी साध्य करीत आहेत, याबद्दल भाष्य केले आहे. ‘सर्व राजकारणी सारखेच असतात’, असे म्हणत राजकीय व्यक्तींवर विश्वास ठेवायला सामान्य जनता नेहमीच कचरत असते. मात्र या गृहीतकाला छेद देत नरेंद्र मोदी यांच्यावर संकटकाळात सामान्य व्यक्ती कशा प्रकारे विश्वास ठेवतात, मोदी हे सामान्यजनांचे प्रेरक कसे ठरतात, याचा उलगडा सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या लेखात केला आहे.

कृषी क्षेत्रातील विख्यात शास्त्रज्ञ प्रा. अशोक गुलाटी यांनी मोदी सरकारच्या काळात कृषी क्षेत्रात घडलेले महत्त्वपूर्ण बदल व व्यवस्थापन याविषयी लिहिले आहे. भारतातील अग्रगण्य आरोग्यतज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी यांनी करोनासारख्या संकटाकाळात नरेंद्र मोदी यांनी कशा प्रकारे देशाला व शेजारील राष्ट्रांना तारले, याविषयी चर्चा केली आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ नंदन नीलेकणी यांनी नरेंद्र मोदी हे किती ‘टेक्नोसॅव्ही’ आहेत व आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न ते कशा प्रकारे करीत असतात, हे स्पष्ट करताना, मोदींसोबत अनुभवलेले काही किस्सेही सांगितले आहेत. एखाद्या योजनेची किंवा धोरणाची अंमलबजावणी करताना मोदींची कार्यपद्धती कशी असते, ते कशा प्रकारे स्वत:ला झोकून देऊन काम करतात, ही त्यांची विविध वैशिष्ट्ये नेहमीच कुतूहलाचा विषय ठरली आहेत. त्यांच्यासोबत काम केलेली व्यक्तीच आपल्याला हे बारकावे सांगू शकते.

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या पर्वातील त्यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या लेखाच्या रूपाने आपल्याला ती संधी मिळाली आहे. एखादे जनआंदोलन उभे करायचे असेल, तर त्यामागील नेमकी प्रेरणा काय असते, कशा प्रकारे लाखो लोक एका विचाराने प्रेरित होऊन एकत्र येत असतात, या सगळ्यामागे नेमकी कोणती शक्ती कार्यरत असते, या आमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्हांला आध्यात्मिक गुरूंच्या लेखाची आवश्यकता होती. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी या विषयावर लेख लिहिल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. भारतातील अत्यंत लोकप्रिय व अनेकांचे प्रेरणास्थान असलेल्या व्यावसायिक व सिद्धहस्त लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांच्या लेखात नरेंद्र मोदी यांच्यामुळे समाजात, देशात कशा प्रकारे आमूलाग्र बदल घडत गेले, हे एका गोष्टीरूपाने शब्दबद्ध केले आहे.

पाचवा भाग हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला भारत देश सर्व जगाशी कशा प्रकारे स्पर्धा करीत आहे, या विषयावर आधारित आहे. या भागात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशांतर्गत व सीमेवरील सुरक्षासंबंधित आव्हाने कशा प्रकारे हाताळतात, या संदर्भात विस्ताराने लिहिले आहे. ब्रिटनस्थित मनोज लडवा आणि अमेरिकास्थित भरत बरई या दोन्ही मान्यवरांनी तीन दशकांहून अधिक काळ नरेंद्र मोदी यांच्यासोबत घालवला आहे. मोदींची सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यामागची प्रेरणा व सामर्थ्य या विषयावर भाष्य करताना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक अनुभव, किस्से त्यांनी त्यांच्या लेखात कथन केले आहेत. परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी २०१४पासूनची पंतप्रधान मोदी यांची परराष्ट्र नीती व भविष्यात जागतिक पातळीवर भारताचे स्थान कुठे असेल, याबद्दलचे नरेंद्र मोदी यांचे विचार या विषयावर भाष्य केले आहे.

या शतकाच्या सुरुवातीच्या दोन दशकांत वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रसिद्ध, लोकप्रिय, विद्वान मान्यवरांना एकाच विषयावर एकत्र आणून एका चांगल्या दर्जेदार साहित्याची निर्मिती करण्याचा बहुमान आमच्या ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनला मिळाला, याबद्दल आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजतो. आम्हांला आशा आहे की, लोकांना या लेखसंग्रहातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामागील प्रेरणेचे रहस्य उमजेल व त्यासोबतच नव्या शतकातील पहिल्या दोन दशकांमध्ये नव्या भारताचा उदय कशा प्रकारे होत आहे, हेही समजेल.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले होते की, ‘तुमची स्वप्ने पूर्ण होण्यापूर्वी तुम्हांला ती स्वप्ने पाहावी लागतील’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांसोबत नव्या भारताचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अतोनात मेहनत घेतली आहे, घेत आहेत, हेच त्यांच्या २० वर्षांच्या सार्वजनिक आयुष्याचे निर्विवाद सत्य आहे. आम्हांला आशा आहे की, आम्हांला ही साहित्यनिर्मिती करताना जसा आनंद झाला, तसाच तुम्हा सर्वांना ‘Modi @ 20 : Dreams Meet Delivery’ हे पुस्तक वाचताना आनंद होईल. आता हे पुस्तक तुमच्या हवाली करीत आहोत. ते वाचण्याचा आनंद घ्या!

अनुवाद : फ्रेडी डी’कोस्टा

‘मोदी @ 20 : स्वप्ने होती साकार’ - ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशन

मराठी अनुवाद – आनंद हर्डीकर आणि इतर | राजहंस प्रकाशन, पुणे | मूल्य ८९५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या पुस्तकात विषयांची विविधता आहे. साध्या विषयापासून ते ‘खाद्यसंस्कृती’तील ‘वादग्रस्त’, तसेच ‘त्याज्य’ विषयही आढळतात. लेखांचा ग्राफ साधेसुधे पदार्थ ते अनोखा, विलक्षण असा आहे…

खाद्यपदार्थ हे निव्वळ खाद्यपदार्थ नसतात, त्यांचे आपल्या जीवनातील अनेक गोष्टींशी साधर्म्य असते, हे बिर्याणी आणि संसार यातून ते स्पष्ट करतात. इब्राहीम अफगाण यांच्यासोबत हा चविष्ट प्रवास कुठेही कंटाळवाणा न होता मजेमजेत होतो. त्यांनी दिलेला एका खाद्यप्रेमीचा वचननामा प्रत्येकाने स्वीकारावा. त्याचे पालन करावे. त्यामुळे भारताची त्यातही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध होईल.......

आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे...

इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे.......