‘शिक्षणगंगा : फिनलंडमधून आपल्या दारी’ – फिनलंड शिक्षणपद्धती आणि भारतीय शिक्षणपद्धती यांच्याविषयी तुलनात्मक विचार मांडणारं मराठी भाषेतील पहिलंवहिलं पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अनिल कुलकर्णी
  • ‘शिक्षणगंगा : फिनलंडमधून आपल्या दारी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 12 December 2022
  • ग्रंथनामा शिफारस शिक्षण Education फिनलंड Finland शिक्षणगंगा : फिनलंडमधून आपल्या दारी shikshanganga - Finlandmadhun Aaplya Dari हेरंब कुलकर्णी Heramba Kulkarni शिरीन कुलकर्णी Shirin Kulkarni

सलग पाच वर्षं फिनलंड हा ‘आनंदी देश’ म्हणून जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थानावर आहे. तेथील शिक्षणपद्धती सद्यस्थितीत सर्वोत्तम आहे. अनेक वर्षं फिनलंडमध्ये राहून तेथील शिक्षणव्यवस्थेचा अभ्यास करून या देशानं शिक्षणाच्या बाबतीत नेमकं कसं यश मिळवलं, यासंदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण देताना आणि त्यांचं शंकासमाधान करताना हेरंब व शिरीन कुलकर्णी यांनी फिनलंडचा इतिहास, शिक्षणपद्धतीचं सरकारशी नातं, रंजक परीक्षापद्धती, व्यावसायिक शिक्षण, रंजक अध्ययन-अध्यापनाच्या पद्धतीचं निरीक्षण करून या देशात असं काय आहे, ज्याच्यामुळे तेथील शिक्षणपद्धती यशस्वी मानली जाते, याचा अभ्यास केला.

त्याचबरोबर फिनलंड शिक्षणपद्धतीची माहिती भारतीय शिक्षकांना देत असतानाच, फक्त व्याख्यानं न देता शिक्षकांनाही सहभागी करून घेतलं. शिक्षकांना फिनलंडमधील शाळेचा अनुभव देण्याचाही प्रयत्न केला. फिनलंडमध्ये जसा रंजक गृहपाठ देतात, तसा शिक्षकांना दिला. शिक्षकांच्या २० बॅच घेण्यात आल्या. त्यातून हजारो शिक्षक प्रशिक्षित झाले. यामध्ये जे अनुभव व माहिती मिळाली, त्याचा उपयोग करून भारतातही आपण अशा प्रकारे शिक्षणपद्धती राबवू शकतो, याची माहिती सर्वांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशानं त्यांनी ‘शिक्षणगंगा : फिनलंडमधून आपल्या दारी’ हे पुस्तक लिहिलं आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भारतातील, प्रामुख्यानं महाराष्ट्रातील शिक्षणपद्धतीत फिनलंडच्या ‘शिक्षण-मॉडेल’चा कसा सकारात्मक वापर करता येईल, याचं अनुभवाधारित विवेचन उदाहरणांसहित दिलं आहे. केवळ आदर्शवादी उदाहरण देण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर भारतात दोन प्रकारच्या शाळाही प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या आहेत, आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुणे येथे ‘द अकॅडमी स्कूल’ आणि एक शाळा बेंगलोरमध्ये. त्या पालकांसाठी कुतूहलाचा विषय बनल्या आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हेरंब व शिरीन कुलकर्णी हे गेल्या १७ वर्षांपासून फिनलंडमध्ये राहतात. या काळात त्यांनी तेथील शिक्षणपद्धतीचा अभ्यास केला, तिकडचे प्रयोग भारतासाठी कसे अनुकूल ठरतील, याचा विचार केला. आणि त्यानुसार ते गेल्या काही वर्षांपासून भारतातील शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. तो सगळा अनुभव त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

हे पुस्तक वेगवेगळ्या शैक्षणिक मुद्द्यांना स्पर्श करते. त्यामुळे अनेक शैक्षणिक प्रश्नांची उकल व्हायला मदत होते. याची भाषा संवादात्मक असल्यामुळे आणि रंगीत चित्रांमुळे ते माहितीपर व मनोरंजकही झालं आहे. विशेषत म्हणजे या पुस्तकात क्यू.आर. कोड दिले आहेत. त्यांच्या साहाय्यानं आपण चलच्चित्र स्वरूपात रंगीत चित्रं आणि एखाद्या विषयाशी संबंधित अधिक माहितीदेखील पाहू शकतो, हे या पुस्तकाचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे.

या पुस्तकातून फिनलंडमधील शिक्षकाला असलेली स्वायत्तता, प्रत्येक विद्यार्थ्यांची बलस्थानं ओळखून त्याला नोकरी-व्यवसायाच्या योग्य संधी मिळवतील अशा पद्धतीनं दिलं जाणारं शिक्षण, शिकण्यातील अडचणीवर केली जाणारी उपाययोजना आणि स्पर्धेचं रूप घेतलेल्या परीक्षांना बगल देऊन विषयाच्या आकलनावर दिलेला भर, ही वैशिष्ट्यं आपल्यासमोर येतात.

नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना या पुस्तकाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. फिनलंडचं ‘शिक्षण-मॉडेल’ आपण आपल्या शिक्षणव्यवस्थेत कसं वापरू शकतो, याची महती सांगणारं हे पुस्तक निश्चितच उपयोगी आहे. प्रादेशिक भाषा आणि मातृभाषेमध्ये शिक्षण, याचा हे पुस्तक पुरस्कार करतं... फिनलंडसुद्धा याच मार्गावर चालत आहे.

हेरंब व शिरीन कुलकर्णी यांनी ‘कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन’ Council for creative education ही संस्था फिनलंडमध्ये स्थापन करून, तसंच देश-विदेशातल्या विविध प्रकारच्या परिसंवादांत भाग घेऊन, शिक्षण-प्रशिक्षणात सहभागी होऊन तेथील आणि फिनलंडमधील या पुस्तकात मांडलेले अनुभव निश्चितच शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहेत. सीसीईच्या साहाय्यानं महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी फिनलंडमधील शाळांना प्रत्यक्ष भेटीही दिल्या आहेत. सीसीईच्या अनेक ध्येयांपैकी एक ध्येय आहे - भारतातील शाळांचं विकसन. त्यानुसार छत्तीसगड, गोवा, दिल्ली, महाराष्ट्र या राज्यांमध्ये शैक्षणिक काम केलं जातंय. शिक्षकांसाठी त्यांनी अनेक अभ्यासक्रम विकसित करून ते राबवले आहेत.

हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर अनेक शंकांचं समाधानही करतं. भारताच्या केंद्र सरकारने जाहीर केलेलं नवं शैक्षणिक धोरण समोर ठेवून हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणावं लागेल. फिनलंड शिक्षणपद्धती आणि भारतीय शिक्षणपद्धती यांच्याविषयी तुलनात्मक विचार मांडणारं मराठी भाषेतील हे पहिलंच पुस्तक असावं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीत विशेषत: अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, मूल्यमापन, मूल्यांकन आणि शिक्षक-प्रशिक्षण या क्षेत्रात फिनलंडकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. महाराष्ट्रातील ज्या ज्या शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही नावीन्यपूर्ण करावंसं वाटतं, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक मोठी संधी हे घेऊन आलं आहे. फिनलंडमध्ये असलेली एसआयएसयू वृत्ती म्हणजेच परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, माझ्यापुढे असलेलं उद्दिष्ट मी साध्य करायलाच हवं, ही आपल्याकडच्या शिक्षकांमध्येही ठासून भरलेली दिसते.

या पुस्तकात फिनलंडच्या शिक्षणपद्धतीची तोंडओळख व इतिहास आणि तेथील बालशिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण, लहान मुलं व शिक्षणाची भाषा आणि शिक्षकपात्रता, शालेय शिक्षण, तेथील शाळांमधील काही रंजक गोष्टी, प्राथमिक शिक्षणात उच्चशिक्षणाची तयारी, परीक्षापद्धती यावर भर दिला आहे.

शिक्षकांचं कितीही प्रशिक्षण झालं आणि त्यांना कितीही मार्गदर्शन मिळालं, तरी संदर्भसाहित्याची गरज असतेच, काही यशोगाथा समोर असणं गरजेचं असतं, ती उणीव हे पुस्तक भरून काढतं.

डॉ. अविनाश धर्माधिकारी यांची प्रस्तावना आणि डॉ. वसंत काळपांडे यांचं आशीर्वादपर मनोगत या पुस्तकाचं महत्त्व विशद करतात. प्रमोद जोशी यांचं मुखपृष्ठ समर्पक आहे.

‘शिक्षणगंगा : फिनलंडमधून आपल्या दारी’ – शिरीन कुलकर्णी, हेरंब कुलकर्णी    

प्रकाशक - सीसीई, फिनलंड, पाने - १२८, मूल्य – ३०० रुपये.

अधिक माहितीसाठी आणि या पुस्तकातील काही प्रकरणं वाचण्यासाठी पहा -

https://www.ccefinland.org/shikshanganga

.................................................................................................................................................................

अनिल कुलकर्णी

anilkulkarni666@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......