लोकशाही एका आदर्शवत अवस्थेत स्वत:मध्ये कलेचं चैतन्यतत्त्व सामावून घेत असते, अशी माझी धारणा आहे...
ग्रंथनामा - झलक
टी. एम. कृष्णा
  • टी. एम. कृष्णा आणि ‘कलेची पुनर्घडण’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 15 October 2022
  • ग्रंथनामा झलक कलेची पुनर्घडण RESHAPING ART टी. एम. कृष्णा T. M. Krishna कला Art लोकशाही Democracy

कर्नाटक संगीत परंपरेतील एक प्रयोगशील गायक टी. एम. कृष्णा यांच्या ‘RESHAPING ART’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा ‘कलेची पुनर्घडण’ या नावाने ज्येष्ठ पत्रकार शेखर देशमुख यांनी नुकताच मराठी अनुवाद केला आहे. मधुश्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकात कृष्णा यांनी कला म्हणजे काय, समाज संवेदनशील आणि उदार होण्यासाठी कलाक्षमता कशा वृद्धिंगत करू शकतो, याविषयी चर्चा केली आहे. त्याचबरोबर लोकशाही, संस्कृती आणि अध्ययन प्रक्रियेचे मर्मही उलगडून दाखवले आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

तसं पाहायला गेलं तर माणूस हा एक महागुंतागुंतीचा प्राणी असल्याचा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. या प्राण्याचं एक अंग मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी, कुणावर तरी नियंत्रण ठेवण्यासाठी, कुणाला तरी वश करण्यासाठी, कडक शिस्त लावण्यासाठी आणि आदेश देण्यासाठी विकसित झालेलं आहे. पण या मानवप्राण्याला म्हणजेच आपल्याला अतिशय सुंदर अशी दुसरी बाजूदेखील आहे. ती म्हणजे, संवेदनशीलता आणि सहअनुभूतिदर्शकता. सबंध आयुष्य आपण या दोन्ही बाजूंवर थोडेफार विजय मिळवत एका मधल्या पोकळीत वावरत राहतो. याच संदर्भाने विचार करता लोकशाही हे अत्यंत महत्त्वाचं, निर्विवाद असं मानवतेला आकार देणारं साधन ठरतं. लोकशाही ही खरं तर उद्दिष्टपूर्तीसाठी जपलेल्या आत्मबळामुळे आपलं अस्तित्व टिकवून असते. तिचं मुख्य उद्दिष्ट समस्त जनतेस उत्तम माणूस म्हणून घडवण्याचं असतं. असायला हवं. कलेप्रमाणेच लोकशाहीची स्थापना हीदेखील आत्मज्ञानाच्या बळावर माणसाने केलेली इच्छित कृतीच असते! म्हणजेच, कला आणि लोकशाही हे दोन्ही घटक नागरिक, समुदाय आणि राज्यव्यवस्थेकडून माणुसकीची मागणी करत असतात. ही मागणी पूर्ण होणं प्रत्यक्षात सोपंही नसतं.

लोकशाहीला अपेक्षित असलेली हीच नस पकडून आपण कलाप्रकार, या कलाप्रकारांची उद्दिष्टं, कलाप्रकारांची रचना, परस्परसहभाग आणि नातेसंबंध इत्यादींची उभारणी करतो. यात सगळ्यात लोभस काय असतं, तर कला आणि लोकशाही हे दोन्ही घटक समानता, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, सहानुभूती या शाश्वत मूल्यांची रुजवात नि जोपासना करत असतात. हे दोन्ही घटक आपल्या आदर्श रूपबंधात माणसाला आत्मसंवादास प्रवृत्त करतात. त्याच्या मनातला दयाभाव जागवतात. कला आणि लोकशाही या दोन घटकांमध्ये एक प्रकारची संदिग्धतासुद्धा असते. याशिवाय कला आणि लोकशाही या दोन्ही घटकांचे अर्थ आपल्याला लागतात; परंतु त्यातले ग्रांथिक किंवा संवैधानाधिक पैलू आपल्याला पूर्णपणे उलगडत नाहीत.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एका अर्थाने हे सत्याचा शोध घेण्याचेच प्रयोग असतात. हे प्रयोग नागरिकांना भावलेले आणि नागरिकांसाठीच असतात. या मार्गाने जाऊन आपण जगण्यातल्या नैतिकतेचा अवलंब करू, अशी त्यामागे आशा असते. मूल्यांचं तसं नसतं. ती अनेकदा आत्यंतिक आग्रही असतात. सामाजिक-धार्मिक चालीरीतींमधून लादलेली असतात. परंतु, बाह्य दबावांपेक्षाही काय योग्य आणि काय अयोग्य, याची पारख केल्यानंतरच प्रत्येकाच्या जाणीव-नेणिवेतून नैतिकता उत्पन्न झालेली असते. कला आणि लोकशाही हे दोन घटक याच नैतिकतेच्या जाणीव-नेणिवेसह जगण्याचं आर्जव आपल्याला करत असतात.

याचा अर्थ, या दोन्ही सहजसाध्य व्यवस्था आहेत, असा अजिबातच नाही. अनेकदा कला भारदस्त रूपात समोर येते. ती तुम्हाला थेट आमनेसामने आव्हान देते. तुम्हाला तुमच्या स्वनिर्मित अंधारकोठडीतून बाहेरही काढते. अशा वेळी सळसळत्या लोकशाही व्यवस्थेत निषेध आणि असहमतीची अभिव्यक्ती, या दोन कृती अन्यायाविरोधात कसा आवाज उठवता येऊ शकतो, याची ठळक उदाहरणं ठरतात.

जेव्हा माझ्या तामिळनाडू राज्यातले अभावग्रस्त शेतकरी सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरोधात निषेध नोंदवण्यासाठी उंदीर खातात, डोक्याचं मुंडण करतात, तेव्हा शेतकऱ्यांना उद्वेगानं इथल्या नागर समाजाचं आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. इथं लोकशाही हादेखील एक कलाप्रकार आहे, हे मला चुकूनही सुचवायचं नाहीये. परंतु सैद्धान्तिक अर्थानं लोकशाही आणि कला समान आहेत. हे दोन्ही घटक मानवी जगण्यावर प्रभाव टाकताहेत, असं मात्र मला नक्कीच सुचवायचं आहे.

याउपर लोकशाही एका आदर्शवत अवस्थेत स्वत:मध्ये कलेचं चैतन्यतत्त्व सामावून घेत असते, अशी माझी धारणा आहे. अर्थात, हे विधान उलटं करून आपण असंही म्हणू शकतो की, कला हे लोकशाहीवादी तत्त्व आहे. एकीकडे असंही जाणवतं, ही लोकशाही अभावग्रस्त, सातत्यहीन जगण्याला सवाल करते. आपल्यातली हाव ओळखते. समस्यांना भिडू शकते. आव्हानही देऊ शकते आणि माणसातल्या धोकादायक दुर्गुणांना दूरसुद्धा करू शकते. किंबहुना, आपल्या सगळ्यांमध्ये एक उन्नत मानव वसतोय, याची जाणीव लोकशाही आपल्याला नेहमीच करून देत असते.

अंतिमतः लोकशाहीच सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण घडवत असते. त्यामुळे जोवर हे पोषक वातावरण समाजामध्ये समान प्रभावानं रुजत नाही, कला आपल्या अस्तित्वासाठी धडपडत-तडफडत राहते. इथं पुन्हा जोशपूर्ण लोकशाही प्रक्रियाच सर्जनशीलतेला नावीन्यपूर्ण कल्पनांचे पंख देत असते.

काळ कोणताही असो, ध्वनी आणि प्रकाशाचं आवरण भेदून कलावंत कला घडवत असतात. मोकळा श्वास घेत असतात. परंतु या विचारांच्या दिशेत एक प्रकारची विसंगतीसुद्धा आहे. अनेकदा लोकशाहीविरोधी देशांमध्ये किंवा जिथं लोकशाही प्रभावहीन बनलेली असते, तिथं कलावंत सृजनशील निषेधकृतींमधून व्यक्त होत असतात. निषेध नोंदवण्यासाठी अभिव्यक्त होणारे हे कलावंत सर्वार्थानं कला जगत असतात. सामाजिक-राजकीय हितसंबंधांना कळत-नकळतपणे उघडं पाडत असतात. स्वत:मध्ये दडलेल्या षडरिपुंशी संघर्ष करत कलेकडे घेऊन जाणारं साधन म्हणून हे कलावंत स्वत:ला प्रवाहात झोकून देतात.

लोकशाही व्यवस्था दयार्द्र, प्रेमळ, आस्थेवाईक, सहानुभूतिशील, समरस, कृतिशील आणि त्याग करण्यासाठी पुढे येणारी माणसं घडवण्याची आशा-अपेक्षा बाळगून असते. पण हे घडून येण्यासाठी प्रत्यक्षात लोकशाही-समाजवादी व्यवस्थेच्या रचनेमध्ये अपेक्षित लोकशाहीवादी तत्त्वंसुद्धा योजावी लागतात. परंतु, हे साधलं तरीही आपले सगळे प्रश्न सुटण्याची शाश्वती नसते. पण जर लोकशाहीचा पाया रचणारे संस्थापक लोकशाहीवादी चैतन्यभाव जपणारे असतील, तर मूळ घटनात्मक रचना नावीन्यपूर्ण संकल्पनांना, पुनर्मूल्यांकनाला आणि सुधारित उपाययोजनांना प्रोत्साहन देणारी बनते. अर्थात, एवढं झालं तरीही आपल्याला डोळ्यांत तेल घालून सावध असावंच लागतं. कारण सत्तेची धुंदी चढलेल्या माणसांच्या गटाने ताबा मिळवला, तर लोकशाहीचा गळा करकचून आवळला जाऊ शकतो. अशा प्रसंगी दिशा बदलवून टाकणारे हे धोक्याचे संकेत ओळखून नागरी समाजाने (civic society) त्वरेनं कृती करणं, सत्तेला निर्भीडपणे सवाल करणं, असहमती दर्शवणं, निषेध नोंदवणं आणि हिंसेची शक्यता रोखणं आवश्यक ठरतं.

शेवटी, लोकशाहीची सृजनशीलता तिच्या आकृतिबंधात, संकेतस्तंभांत, सातत्यपूर्ण निगराणीत, विस्तारत जाणाऱ्या मानवी क्षमतांत आणि चिकित्सेच्या नावीन्यात दडलेली असते. परंतु जेव्हा लोकशाही लीनदीन, निव्वळ आज्ञाधारक होते, तेव्हा तिची अवस्था स्वकृत्यदक्ष नियंत्रण कक्षासारखी होऊन जाते. ज्यांचं या आज्ञाधारक लोकशाहीवर नियंत्रण असतं, त्यांच्यासाठी ती धर्मनियमांना धरून असलेली मत्ता होते. तर सृजनशील, निषेधकृतींमधून अभिव्यक्त होणाऱ्या सजग समूहांसाठी ही धर्माधिष्ठित लोकशाही अडवणूक करणारी, दमन करणारी अधिकारशाही होऊन जाते!

लोकशाही व्यवस्थेसारख्याच पण ती प्रत्यक्षात रुजण्याआधीच्या काळात मनुष्यप्राण्याने स्वतःमधल्या ऊर्मी जिवंत ठेवण्यासाठी अमूर्त शक्यतांमधून असंख्य आकृतिबंध, प्रवाह, कलात्मक रचना आकारास आणल्या. कलेच्या अभिव्यक्तीतून आपण खरेखुरे, इमानी, भावयुक्त आणि उत्फुल्ल राहू, अशी आशाही त्याने वारंवार बाळगली.

मी तर म्हणतो, प्रत्येक संस्कृती कलानिर्मितीच्या शक्यतांचा अर्थ लावण्याचा आपापल्या परीने मार्ग शोधत असते. अशाच रीतीने जगण्याच्या अव्याहत प्रक्रियेत माणसाच्या कृतींमधून प्रतिबिंबित होणारा हर्षोल्हास आणि मनाला भुरळ घालणाऱ्या मनोरंजनात्मक हौसमौजेतून आजवर संस्कृती मुळं धरत आलेली आहे. पण अल्पावधीतच सामाजिक संस्था, त्यांचे कार्यक्रम-उपक्रम आणि माणसाअंगी आलेलं ज्ञानप्राप्तीचं सामर्थ्य, या प्रभावातून संस्कृतीला विकृत स्वरूप येत गेलं. पुढे धर्माचं स्फोटक मिश्रण त्यात मिसळलं गेलं. त्यातून विघातक असं संयुग आकारास आलं. कला यालाच तर बळी पडत आलीय.

साधारणपणे कला आपल्याला सुरक्षित कोशातून बाहेर ढकलते. आत्मसंवाद घडवून आणण्यास प्रवृत्त करते. परंतु, विघातक संयुगाला बळी पडलेली कला सत्त्वहीन, पिंजऱ्यातल्या एखाद्या पाळीव प्राण्यासारखी आकर्षक पण जखडलेली होऊन राहते! या अवस्थेत माणसांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं तिच्यात असलेलं अंत:बल ही कला हरवून बसते.

कितीतरी काळापासून नेमक्या याच टप्प्यावर येऊन कला थबकलीय. म्हणजेच पिंजराबद्ध झालेली आहे. परंतु असे काही अपवादात्मक प्रसंग येतात, जेव्हा ताब्यात ठेवण्याच्या प्रयत्नांना न जुमानता कला आपल्या तावडीतून बाहेर पडते नि या ना त्या रूपात प्रतिबिंबित होते. ही मुक्तता, हे स्वातंत्र्य अर्थातच खरंखुरं पण अल्पकाळासाठीचं असतं. वेळ साधून आपण ताबडतोबीनं कलेवर ताबा मिळवतो आणि पुन्हा एकदा तिला कोंडवाड्यात कोंबतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लोकशाहीपासून मिळणारा आनंद तसा दूरच असतो. पण कलेपासून मिळवलेला आनंद, तिला आलेलं विकृत रूप आपण झाकून टाकतो. तुम्हाला लक्षात येईल, यात जे परिघावरचे लोक असतात, ते समानतेची मागणी करत असतात, विशिष्ट समाजसमूहांच्या वर्चस्वाचा निषेध करत असतात. परंतु, कलात्मक संघर्षात (aesthetic war) हे समाजसमूह उडी घेत नाहीत. इथं, सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक आणि कलेच्या संदर्भातली विषमता सर्वत्र वेढून नसते, तर ती कलेच्या आराखड्यात व्यवस्थित मुरलेली असते. या विरोधात जर लढा उभारायचा तर तो भिन्न पातळ्यांवर उभारावा लागेल. कलेच्या माध्यमातून अंतर्गत आणि बाह्य, दोहोंच्या दरम्यान आणि दृष्टीपल्याडच्या अशा बहुस्तरीय आघाड्यांवर माणसांचं एकसमान पातळीवर येणं आपल्याला जाणीवपूर्वक जपावं लागेल. एका साच्यातल्या, एकारलेल्या आकृतिबंधाला कला बळी पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. माझ्या नजरेत हीच साचेबद्धता मोडून उद्ध्वस्तीकरणातून उत्क्रांतीकडे घेऊन जाणारी, आपल्याला मुळांसकट हलवून टाकणारी प्रक्रिया आहे.

संगीतकलेमध्ये घालवलेल्या आजवरच्या आयुष्यात मी माझ्यातल्या असंख्य उणिवा जोखल्या आहेत. संस्कृती, माणूस, समाज, राजकारण, अस्मिता, मालकी हक्क, कलाव्यवहार, कला अवकाश, प्रस्थापितांचं नियंत्रण आणि धर्म आदी घटकांशी नित्य संघर्षलोदेखील आहे. आत-बाहेर बरंच काही आहे. परंतु ते काय आहे, हे मला अद्याप ठाऊक नाहीये. याउपर माझ्यात नक्कीच एक प्रकारची ऊर्जावाही सळसळ असल्याची माझी भावना आहे. हीच सळसळ मला प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास, सातत्याने नवतेचा शोध घेण्यास आणि एका अंतहीन मार्गावर अविश्रांतपणे वाटचाल करण्यास प्रवृत्त करतेय.

 ‘कलेची पुनर्घडण’ - टी. एम. कृष्णा

मराठी अनुवाद - शेखर देशमुख

मधुश्री पब्लिकेशन, पुणे

मूल्य – २५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या पुस्तकात विषयांची विविधता आहे. साध्या विषयापासून ते ‘खाद्यसंस्कृती’तील ‘वादग्रस्त’, तसेच ‘त्याज्य’ विषयही आढळतात. लेखांचा ग्राफ साधेसुधे पदार्थ ते अनोखा, विलक्षण असा आहे…

खाद्यपदार्थ हे निव्वळ खाद्यपदार्थ नसतात, त्यांचे आपल्या जीवनातील अनेक गोष्टींशी साधर्म्य असते, हे बिर्याणी आणि संसार यातून ते स्पष्ट करतात. इब्राहीम अफगाण यांच्यासोबत हा चविष्ट प्रवास कुठेही कंटाळवाणा न होता मजेमजेत होतो. त्यांनी दिलेला एका खाद्यप्रेमीचा वचननामा प्रत्येकाने स्वीकारावा. त्याचे पालन करावे. त्यामुळे भारताची त्यातही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध होईल.......

आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे...

इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे.......