पंतप्रधान मोदी ‘जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते’ आहेत हे नक्की, परंतु त्यासंदर्भातल्या बातम्या देताना एक प्रचंड मोठे ‘अर्धसत्य’ लोकांच्या माथी मारण्यात आले आहे...
पडघम - माध्यमनामा
रवि आमले
  • मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीचे बोधचिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Thu , 01 September 2022
  • पडघम माध्यमनामा नरेंद्र मोदी Narendra Modi मॉर्निंग कन्सल्ट Morning Consult

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय जागतिक नेते’

‘पीएम मोदी रिमेन्स मोस्ट पॉप्युलर ग्लोबल लीडर’

‘दुनिया के सबसे लोकप्रिय नेता हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी’

गेल्या सप्ताहातील या बातम्या. विविध दैनिकांत, वृत्तवाहिन्यांच्या वेबआवृत्त्यांत त्या झळकल्या होत्या. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर त्या आधारलेल्या होत्या. त्यानुसार आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ॲप्रूव्हल रेटिंग’ ७५ टक्के असून, ते जगातील अन्य कोणत्याही नेत्याच्या रेटिंगहून जास्त आहे. ते पाहून आपली प्रसारमाध्यमे अगदी हरखून गेली. अनेकांनी ‘दुनिया में फिर दिखी भारत की धाक’, ‘फिर लहराया भारत के पीएम का परचम’ अशा शब्दांत आपला आनंद व्यक्त केला. समाजमाध्यमांतील मोदीभक्त आणि भाजपचे नेते, कार्यकर्ते कसे मागे राहतील? त्यांनीही मोदींचे भरभरून गौरवगान केले.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तर या सर्वेक्षणाचा हवाला देऊन मोदींची थेट महात्मा गांधींशी तुलना केली. महात्मा गांधींनंतरचे ते एकमेव असे नेते आहेत की, ज्यांना लोकभावना समजते. आणि म्हणूनच ते आज जगातील सर्व नेत्यांपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, असे राजनाथसिंह म्हणाले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या सर्व बातम्या आणि चारणभाटांची गौरवगीते वाचल्यानंतर कोणासही असेच वाटेल की, पंतप्रधान मोदी हे खरोखरच जगभरात लोकप्रिय आहेत. पण खरोखरच हे खरे आहे काय? ज्या पद्धतीने विविध माध्यमांनी या बातम्या दिल्या, त्यांत तथ्य आहे का?

तथ्य आहे. मॉर्निंग कन्सल्टचे सर्वेक्षण सांगते की, मोदी यांचे ॲप्रूव्हल रेटिंग ७५ टक्के आहे. आणि त्यांची ही लोकपसंतीची टक्केवारी अन्य नेत्यांच्या टक्केवारीहून जास्त आहे. याचा अर्थ मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. वरवर पाहता हे असेच आहे. परंतु या बातम्या देताना एक मोठी लबाडी करण्यात आली आहे. एक प्रचंड मोठे अर्धसत्य लोकांच्या माथी मारण्यात आले आहे. ते समजून घेण्यासाठी मॉर्निंग कन्सल्टच्या त्या सर्वेक्षणावर नीट नजर टाकावी लागेल.

मुळात हे सर्वेक्षण नेत्यांची जागतिक लोकप्रियता आजमावण्यासाठी करण्यात आलेले नव्हतेच. त्याचा हेतू राष्ट्रप्रमुखांची लोकपसंती मोजणे हा होता. यात किती देशांतील राष्ट्रप्रमुखांची लोकपसंती पाहण्यात आली, तर अवघ्या २२. म्हणजे यास जागतिक वगैरे म्हणता येणार नाही.

दुसरी बाब म्हणजे ही लोकपसंती काही जागतिक स्तरावर मोजण्यात आलेली नाही. ती त्या-त्या नेत्याची त्यांच्या-त्यांच्या देशातील लोकपंसती आहे. म्हणजे मोदींचे ‘ॲप्रूव्हल रेटिंग’ हे फक्त भारतातीलच आहे. बातम्यांचे मथळे वाचून कोणाचाही असा समज होईल की, मोदी अन्य देशांतही लोकप्रिय आहेत, पण तसे नाही. त्यांच्या नावास केवळ भारतातील ७५ टक्के लोकांनी पसंती दर्शवली असून, २० टक्के लोकांनी नापसंती दर्शवली आहे. याच प्रकारे या यादीत ज्यांची नावे आहेत, त्या २२ राष्ट्रप्रमुखांची लोकपसंती ही त्यांच्या-त्यांच्या देशातील आहे. मोदींनंतर ‘जागतिक लोकप्रिय’ नेत्यांच्या यादीत मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचे नाव येते. आपल्याकडील बातम्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा, तर मग असे म्हणावे लागेल की, लोपेझ ओब्राडोर हे जगभरातील ६३ टक्के लोकांना पसंत आहेत.

खरे तर मॉर्निंग कन्सल्टनेच या सर्व नेत्यांच्या लोकपसंती टक्केवारीची एकमेकांशी तुलना करून लबाडी केलेली आहे. मोदींची भारतातील लोकप्रियता आणि जो बायडन यांची अमेरिकेतील लोकप्रियता यांची तुलनाच होऊ शकत नाही. तसे करणे हे तर्कदुष्ट आहे. पण नेमके तेच करण्यात आले आहे.

आता हे लोकपसंतीचे मापन कसे करण्यात आले आहे, तेही समजून घ्यावे लागेल. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत त्या-त्या देशांत ही पाहणी करण्यात आली. त्या सर्वेक्षणासाठी अमेरिका वगळता अन्य देशांतील ५०० ते पाच हजार नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. आता भारतातील ‘सँपल साईज’ नेमकी किती होती, ते काही स्पष्ट करण्यात आले नाही. परंतु अगदी कमाल संख्या धरली, तरी १३० कोटींच्या भारतात पाच हजार नागरिकांची मते घेण्यात आली, असे म्हणता येईल.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

थोडक्यात काय, तर पंतप्रधान मोदी हे भारतात लोकप्रिय आहेत आणि अन्य नेते त्यांच्या देशात जेवढे लोकप्रिय आहेत, त्याहून मोदी भारतात अधिक लोकप्रिय आहेत, याबाबत कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. मुद्दा एवढाच आहे की, ते जगात सर्वांत लोकप्रिय आहेत, असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष असू शकत नाही. आणि म्हणूनच मोदींच्या लोकप्रियतेबाबत देण्यात आलेल्या या बातम्या ‘फेक न्यूज’ याच सदरात मोडणाऱ्या आहेत.

प्रोपगंडाचे एक उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल. प्रोपगंडाचा पाया हा नेहमीच सत्याचा, तथ्यांचा असावा आणि त्यावर अर्धसत्य, अपमाहिती यांची इमारत रचली जावी, हा नियमच आहे. प्रोपगंडापंडित हेच सांगत. मोदींविषयक बातम्यांतून तेच प्रोपगंडा तत्त्व दृगोचर होते. अशा बातम्या अनेक वृत्तपत्रांनी, संकेतस्थळांनी प्रसिद्ध केल्या, याचा अर्थ काय, असा एक प्रश्न यातून समोर येतो.

त्याचे उत्तर असे की, काहींनी प्रोपगंडा वा भाटगिरीच्या हेतूने त्या दिल्या आणि बाकीच्यांनी त्या बातमीच्या, त्यातील माहितीच्या खोलात न जाता, त्यांचा नेमका अर्थ समजून न घेता, पुन्हा भाटगिरी म्हणून त्या ठोकून दिल्या. भाषिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंकेतस्थळे यांतील हल्लीचे उपसंपादक वा पत्रकार यांच्या भंपकतेची उंची लक्षात घेता, ती अशा बाबतीत नेहमीच आघाडीवर असणार हे वेगळे सांगावयास नको. अपमाहिती पसरत जाते ती अशीच आणि अशांमुळेच. आणि ‘विश्वगुरु’त्वाकर्षणाने झपाटलेले बिचारे वाचक मात्र त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्यांना खरेच वाटते की, आपल्या पंतप्रधानांच्या लोकप्रियतेचा ‘परचम’ सगळ्या जगात लहरत आहे.

................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......