‘बखर एका राजाची’, ‘डांगोरा एका नगरीचा’ आणि ‘उच्छाद’ या गाजलेल्या कादंबरीत्रयीचे लेखक प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या साहित्यिक-नोंदींविषयीचे ‘जवळिकीची सरोवरे’ हे नीतीन वैद्य यांचे पुस्तक उद्या, २३ जुलै २०२२ रोजी सोलापुरात समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. मुंबईच्या डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला प्रा.अविनाश सप्रे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
.................................................................................................................................................................
कादंबरी, नाटक, कविता, अनुवाद आणि समीक्षा अशा रूपात मराठी साहित्याला अत्यंत मौल्यवान स्वरूपाचे योगदान देणाऱ्या प्रा.त्र्यं.वि. सरदेशमुख यांचे २२ नोव्हेंबर २०१८ ते २२ नोव्हेंबर २०१९ हे जन्मशताब्दी वर्ष. अशा वर्षाची आठवण झाली की, मग औपचारिक समारंभ करून ते साजरे करण्याची आपल्याकडे सर्वसाधारण प्रथा आहे. वर्तमानपत्रांच्या आवृत्त्यांतून काही स्मरणलेखही प्रकाशित होतात. लेखकाच्या साहित्यावर एखादा परिसंवादही आयोजित केला जातो. असे भाग्य प्रामुख्याने लोकप्रिय असणाऱ्या आणि हयातीत प्रकाशझोतात वावरलेल्यांच्या वाट्याला येत असते. प्रा.सरदेशमुख मराठीतले थोर लेखक होते, पण प्रकाशझोतात नव्हते. मात्र त्यांच्या साहित्यातले मोठेपण समजलेल्या, उमजलेल्या आणि एक लेखक म्हणून त्यांच्याबद्दल निर्मळ, निःस्वार्थ आणि निरपेक्ष श्रद्धाभाव असणाऱ्या नीतिन वैद्य यांनी त्यांच्या साहित्याचे वाङ्मयीन जागरण अभिनव पद्धतीने वर्षभर करायचे ठरवले आणि सरदेशमुखांच्या जन्मशताब्दी वर्षात फेसबुकवरून त्यांचे अक्षरधन नोंदींच्या रूपात प्रसृत केले. त्यामुळे त्यांचे विचारविश्व आणि लेखन सर्वदूर आणि मोठ्या प्रमाणात जाऊ शकले. वर्षभरातल्या अशा एकूण शंभर नोंदी आता ‘जवळिकीची सरोवरे’ या नावाने ग्रंथरूपात प्रकाशित होत आहेत.
मराठीत सहसा न वापरलेला हा एक नवा ‘रूपबंध’ आहे आणि त्यातून प्रा.सरदेशमुखांचे ‘वाङमयीन चरित्र’ (Literary biography) साकार झाले आहे. त्याचबरोबर प्रा.सरदेशमुखांच्या विचारविश्वाचा नीतिन वैद्य यांनी घेतलेला वेध आणि दिलेला अर्थबोधही मार्मिक आणि अर्थपूर्ण स्वरूपाचा आहे. सरदेशमुखांचे विचार आणि विचार करण्याची पद्धती नीट आणि नेमकेपणाने समजून घेत नीतिन वैद्य यांनी या नोंदींवर भाष्य केले आहे. सरदेशमुखांचे वाचन किती प्रचंड होते, दृष्टीकोन कसा विश्वात्मक होता, चिंतन किती प्रगल्भ होते, आकलन कसे सर्वव्यापी होते, याचा साक्षात प्रत्यय म्हणजे या नोंदी होत.
प्रतिभावान लेखक दोन प्रकारचे असतात. एक, वर्डस्वर्थच्या ‘स्कायलार्क’ पक्ष्यासारखे. हा पक्षी आसमंतात विहरताना आणि विहार करताना, गाताना आपणाला दिसतो. दुसरे, ‘कीट्स’च्या ‘नाईटिंगेल’ पक्ष्यासारखे. हा पक्षी दिसत नाही, मात्र त्याचे सुस्वर ऐकू येतात. प्रा.सरदेशमुख या नाईटिंगेलसारखे होते, लोकान्तापेक्षा एकान्त प्रिय असणारे. त्यांचा स्वभाव अंतर्मुख स्वरूपाचा होता. सभा, समारंभ, व्यासपीठीय भाषणे, सर्वत्रची उठबस यांत त्यांना रस नव्हता. याचा अर्थ ते माणूसघाणे होते असे नव्हे. श्रीराम पुजारी, निशिकांत ठकार अशा जिवलग मित्रांच्या सहवासात ते मनःपूर्वक रमत असत.
नीतिन वैद्य, शिरीष घाटे, जयंत राळेरासकर, हेमकिरण पत्की, रजनीश जोशी अशा नंतरच्या तरुण पिढीतल्या मित्रांबद्दल त्यांना अपार प्रेम आणि जिव्हाळा वाटत होता. अशा मित्रांना घरी बोलावून त्यांच्या सहवासात ‘काव्य-शास्त्र-विनोद’ करण्यात ते रमून जात. अशा अनौपचारिक बैठकांना त्यांनी ‘मित्रसंध्या’ असे सुंदर नाव दिले होते.
‘Creative triends often stem from small group of people who know each other and share the same tastes at the same time . Friends , almost’ (‘This is not the end of the book’) असं एक वाक्य उंबर्तो इको आणि जे.सी. कॅरिएर यांच्यातल्या संवादात आहे. प्रा.सरदेशमुख यांची धारणाही अशीच होती असे म्हणता येईल.
अशाच प्रेमाने आणि विश्वासाने प्रा.सरदेशमुख यांनी आपले लिखाणाचे दफ्तर नीतिन वैद्य यांच्याकडे सोपवले आणि मौल्यवान साहित्यसंपदा असलेली अलिबाबाची गुन्हाच जणू नीतिनसाठी उघडली गेली. सरदेशमुखांच्या डायऱ्या, टिपणे ग्रंथातले उतारे, पत्रव्यवहार, विविध नोंदी, अप्रकाशित लेख, प्रतिभावंतांचे-विचारवंतांचे-कलावंतांचे स्मरण, साहित्यकृतींचे रसास्वाद, प्रतिभावंतांची अवतरणे, कवितांचे अनुवाद, आकाशवाणीवरील भाषणे, वेळोवेळी सुचलेले स्फुटविचार, व्यक्तिविशेष प्रसंगविशेष असा भरगच्च ऐवज नीतिन वैद्य यांच्या हाती आला.
याच ऐवजातून पुढे चार नवी पुस्तके प्रकाशित झाली. त्यांच्या ‘आशय’चे तीन ग्रंथदिन विशेषांकही आले. एवढ्यावर न थांबता नीतिन वैद्य यांनी त्यातल्या महत्त्वाच्या नोंदी फेसबुकवर प्रकाशित केल्या. त्या आता या ग्रंथरूपात प्रकाशित होत आहेत. प्रा.सरदेशमुख यांचे वाङमयीन आकलन समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
या नोंदी प्रकाशित करताना नीतिन वैद्य यांनी विशिष्ट अशी भूमिका घेतली आहे, तिचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. प्रा.सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षातले वाङ्मयीन दिनविशेष लक्षात घेऊन नीतिन वैद्य यांनी त्या त्या संदर्भातले प्रा.सरदेशमुख यांच्या प्रस्तुत दफ्तरातले विचार आणि त्यांच्या प्रकाशित ग्रंथातले त्या संदर्भातले उतारे नोंदींच्या रूपात सादर केले आहेत. यातली पहिली नोंद मर्ढेकरांच्या १०९व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने, तर शेवटची शंभरावी नोंद ‘जागतिक तत्त्वज्ञान दिवसा’च्या निमित्ताने सरदेशमुखांच्या वहीतील सौंदर्यविषयक संकल्पनेच्या संदर्भातील दिली आहे. या दोन बिंदूतल्या अन्य सर्व नोंदी सरदेशमुखांच्या चिंतनाचा प्रचंड आवाका दाखवणाऱ्या आहेत.
प्रा.सरदेशमुखांच्या साहित्य आणि समीक्षेसंबंधी मी अन्यत्र सविस्तर लिहिले आहे. त्यांच्यासंबंधीच्या कार्यक्रमात सोलापुरात एकापेक्षा अधिक वेळा बोललोही आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यामध्ये आणखी थोडी भर घालावीशी वाटते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
प्रा.सरदेशमुख यांची या नोंदींमधून समोर येणारी भूमिका समजून घ्यायला त्याचा थोडा उपयोग होईल अशी आशा आहे. एका बाजूला ‘कलावाद’ आणि त्यातून प्रसृत झालेली परिभाषा आणि दृष्टीकोन, तर दुसऱ्या बाजूला ‘वास्तववाद’ आणि त्यातून पुरस्कारलेल्या संकल्पना आणि संज्ञा या दोन्ही टोकात प्रा.सरदेशमुख यांचा समीक्षाविचार बसत नव्हता. त्यामुळे मराठी समीक्षाविश्वात ते ‘आऊटसायडर’ राहिले. मात्र याची खंत न करता ते आपल्या भूमिकेशी विचलित न होता दृढ राहिले. प्रा.सरदेशमुख यांची ही भूमिका ‘बोली अरूपाचे रूप दाविन’ अशी होती. सृजनशील निर्मितीतले अलौकिक सौंदर्य शोधणारी होती. ‘ज्ञाताच्या कुंपणावरून झेप घेणारी चिद्घनचपला’ असे तिचे स्वरूप होते. हे स्वरूप विषद करणारी त्यांची परिभाषाही समीक्षेतल्या रूढ परिभाषेपेक्षा वेगळी होती (काहींना ती अनाकलनीयही वाटली).
ही समीक्षा अधिभौतिकतेचा वेध घेणारी, मानवी अस्तित्वातील ‘चैतन्यतत्वा’ला मानणारी, ‘आध्यात्मिक’ (Spiritual) स्वरूपाची होती. (त्यामुळे बुद्धिवादी, पुरोगामी वगैरेंना न आवडणारी) पुन्हा आध्यात्मिक म्हटले की, आपल्यासमोर देव, दैव, कर्मकांडे, महाराज, बुवा, चमत्कार येत असल्यामुळे ही समीक्षेतली बुवाबाजीच आहे, असेही अनेकांना वाटत होते. शिवाय त्यांनी विशिष्ट ‘आयडियॉलॉजी’च्या दाव्याला आपला समीक्षाविचार बांधला नव्हता.
ते मुक्तचिंतक होते. त्यांची अध्यात्माची जाणीव मानवी अस्तित्वासह समग्र सृष्टीतील चैतन्यतत्वाचा शोध आणि वेध घेणारी होती. दृष्टी सर्वसमावेशक स्वरूपाची (कॅथॉलिक) आणि उदार होती. याचा अर्थ ती भोंगळ स्वरूपाची होती असे नव्हे. आवश्यक वाटेल तिथे ते परखडपणे आपला अभिप्राय नोंदवत. आर्तेगा गासे'च्या सरंजामशाही भूमिकेतून आलेला ‘कलेचे निर्मानुषीकरण’ हा सिद्धान्त कसा अमानुष आहे, जॉर्ज लुकाचमधला एकारलेला मार्क्सवादी आधुनिकतावादी भूमिकेवर कसा अन्याय करतो, हे सरदेशमुख स्पष्टपणे दाखवून देतात.
‘समीक्षकाने आपल्या व्यासंगाची व्याप्ती व मर्यादा यांची नीट कल्पना आपल्या लेखनातून देणे अगत्याचे होय. चुकोमाको, समीक्षकाने स्वतःचे निर्णय देण्यास कचरता कामा नये’, असे त्यांनीच एका नोंदीत म्हटले आहे, ते लक्षात घेण्याजोगे आहे. साहित्याचे श्रेष्ठत्व त्याच्या ‘परतत्वस्पर्शा’त आहे, असे ते मानत होते. महाविद्यालयात अध्ययन, अध्यापन केलेले असले तरी प्रा.सरदेशमुखांची समीक्षा विद्यापीठीय गरजेतून किंवा चर्चासत्रे, परिसंवाद आदिंच्या मागणीतून निर्माण झालेली नाही, तर तिचे निर्माण आंतरिक गरजेतून झाले आहे. त्यामागे ‘स्वान्तःसुखाय’ वृत्ती आहे. ज्या ज्या साहित्यिकांची, साहित्यकृतींची, साहित्य - प्रवृत्ती प्रवाह प्रेरणांची समीक्षा त्यांना कराविशी वाटली, त्याचीच समीक्षा त्यांनी केली आहे.
‘दोन गोष्टींचा ध्यास आयुष्यभर करीत आलो. पहिली, आपण कोण? कुणाशी आपले लागेबांधे? आपले अंतर्याम सुखी कशाने होते? दुःखी कशाने होते? हे आपल्याला कळावे आणि दुसरी, या कळण्यातून समग्र सृष्टीनिर्माणाशी आपला संवाद आणि संगती घडावी’, असे त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार स्विकारताना व्यक्त केलेल्या मनोगतात म्हटले आहे. त्यांच्या साहित्याप्रमाणेच समीक्षालेखनामागेही ही प्रेरणा आहे. त्यांचे वाङ्मयीन आकलन आणि आस्वाद समजून घेताना त्यामागे कार्यरत असलेला हा समीक्षाविचारही लक्षात घ्यायला हवा, असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.
वर्षभरातल्या दिनविशेषांच्या निमित्ताने नीतिन वैद्य यांनी त्यांच्या दफ्तरातील (आणि काही प्रकाशित ग्रंथांतील) ज्या नोंदी सादर केल्या आहेत, त्या एकदेशीय नाहीत. मराठीसह जगभरातील लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक, विचारवंत, तत्त्वज्ञानी, दार्शनिक यांच्यासंबंधीच्या त्या नोंदी आहेत. त्या त्यामागे असणारा प्रचंड व्यासंग दाखवणाऱ्या आहेत, तरी त्या व्यासंगाचे दडपण वाटू नये इतक्या सहज सुंदरपणे आल्या आहेत.
यातील मराठीतल्या नोंदी अशा - ज्ञानेश्वर, मर्ढेकर, दिलीप चित्रे, जी.ए. कुलकर्णी, साने गुरुजी, श्री.पु. भागवत, इंदिरा संत, माधव ज्युलियन, राम गणेश गडकरी, तुकाराम, पु.शि. रेगे, सावरकर, समर्थ रामदास, खानोलकर, ग्रेस, डॉ.आंबेडकर, बालकवी, नेमाडे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पु.ल. देशपांडे, आचार्य अत्रे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गो.नी. दांडेकर, राजा ढाले, अण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे, श्री.म. माटे, केशवसुत, शांत शेळके, दलित साहित्य.
आंतरभारतीय नोंदी - द.रा.बेंद्रे, म.गांधी, रवींद्रनाथ, गुरूदेव रानडे, कालिदास, योगी अरविंद, गौतम बुद्ध.
पाश्चात्य नोंदी - निकोलस बर्दिएव्ह, खलिल जिब्रान, मॅथ्यू अर्नोल्ड, मॅक्स प्लॅंक, म्यूग्युएल सर्वांतीस, एमिली डिकीन्सन, बर्ट्रंड रसेल, व्हिक्टर ह्युगो, हेन्रिक इब्सेन, राल्फ वाल्डो इमर्सन, बोरिस पास्तरनॅक, वॉल्ट व्हिटमन, फ्रॅंज काफ्का, सॅम्युएल बेकेट, जॉर्ज ल्युकाच, आर्तेगा गासे, लुई पिरांदेल्लो, हरमान हेसे, स्टीफन झ्वाईग, एरिक फ्रॉम, बनार्ड शॉ, सॉक्रेटीस, ऑस्कर वाईल्ड, जोसेफ कॉनरॅड, बर्टल्ट ब्रेख्त, टी.एस. इलियट, युनोमुनो, लिओ टॉलस्टॉय, नॉर्थ्रॉप फ्राय, इझरा पाऊंड, अल्बेर कामू, सार्त्र इ..
प्रसंगविशेष - जागतिक तत्त्वज्ञान दिन (तत्त्वज्ञानाचे महात्म्य), विज्ञान दिन (विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा संबंध), गुरूपौर्णिमा, शिक्षकदिन (गुरूस्मरण), आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस (अनुवादाचे स्वरूप व प्रक्रिया), आंतरराष्ट्रीय कविता दिवस (कवितेचा प्रवास), वाचनप्रेरणा दिन (ग्रंथानुभव आणि वाचनप्रक्रियेचे स्वरूप), मराठी आणि जागतिक रंगभूमी दिन (रंगभूमी आणि नाटक यांचे स्वरूप).
हे सारे आपले सोयरेसकळ आहेत अशा आत्मीयतेने प्रा.सरदेशमुखांनी त्यांच्यावर लिहिले आहे. लेखकाला नुसती प्रतिभा असून भागत नाही. त्याबरोबर अभ्यास, चिंतन, मनन, वाचन आणि विश्वभान असावे लागते. समीक्षेबद्दलही हेच म्हणता येईल. असे झाल्यावर लेखकाच्या प्रतिभेला आणि समीक्षकाच्या विचारांना सोन्याची झळाळी येते. या नोंदी वाचकांच्या मनात हे भान जागृत करतात.
‘बखर एका राजाची’, ‘डांगोरा एका नगरीचा’ आणि ‘उच्छाद’ हे प्रा.सरदेशमुखांचे कादंबरीत्रय गाजले. त्याच्या निर्मितीप्रक्रियेसंदर्भातल्या तीन नोंदी यामध्ये आहेत. त्या लेखकाची निर्मितीपूर्व अवस्था दर्शवणाऱ्या आहेत. आपल्या वडिलांसंबंधीही एक नोंद यात आहे. त्यातून त्यांचे सत्यनिष्ठ, सत्त्वशील, स्वाभिमानी स्वरूपाचे व्यक्तिमत्त्व कसे होते ते सांगितले आहे. त्यांचे वाचन चौफेर होते. बाबामहाराज आर्वीकर आणि द.रा. बेंद्रे त्यांचे जवळचे मित्र होते. अन्यायाविरुद्ध त्यांनी अपयशी पण कठोर लढा दिला. ‘दुर्दैवाने चिरडले जात असतानाही स्वधर्मनिष्ठ माणसे सन्मार्ग टाकत नाहीत, परस्परांच्या प्रेमाला खो देत नाहीत, हे मी अनुभवले होते’, अशी त्यांची नोंद आहे. वडिलांची ही व्यक्तिरेखा कादंबऱ्यांतूनही आली आहे. बखर-त्रयाचे बीज वडिलांनी सांगितलेल्या आठवणींत आहे.
नीतिन वैद्य यांनी म्हटल्याप्रमाणे ‘देसाईंचे अजरामर पात्र निर्माण करून त्यांनी वि.मं.ना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. द.रा. बेंद्रे सरदेशमुखांसाठी ‘मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक’ होते. त्यांच्यासंबंधीच्या दोन नोंदींतून त्यांच्याविषयीचा सरदेशमुखांचा आदरभाव व्यक्त होतो. बाबामहाराज आर्वीकर यांच्यावरील नोंदीतून सरदेशमुखांनी त्यांचे आध्यात्मिक थोरपण, सांगितलेले गुरूतत्त्व, त्यांच्या काव्यातले ‘विश्वात्मक चैतन्य’ आणि त्यांच्या उक्ती आणि कृतींमधून व्यक्त झालेल्या प्रेमभावाचे निरामय सुंदर दर्शन घडवले आहे. हे तीनही ‘महानुभाव’ प्रा.सरदेशमुखांच्या व्यक्तिगत जीवनातले भक्कम आधार होते. त्यांच्याबद्द्लची कृतज्ञता सरदेशमुखांच्या शब्दाशब्दातून व्यक्त झाली आहे.
श्री.पु. भागवत सरदेशमुखांचे प्रकाशक तर होतेच, पण या औपचारिक आणि व्यावसायिक नात्यापलीकडे सरदेशमुखांबद्दल त्यांना निर्मळ मैत्रभाव आणि जिव्हाळा वाटत होता. त्यांच्या पत्रातील एक नोंद इथे आहे. श्री.पु. म्हणतात, ‘तुमची स्नेहभावना सच्ची आणि गंभीर डोहासारखी खोल आणि तुमची भाषा खऱ्याखुऱ्या नितळ जाणीवेने ओतप्रोत भरलेली आहे.’ श्री.पुं.नी सरदेशमुखांच्या लेखनासाठी सदैव त्यांचा पाठपुरावा केला, तशीच त्यांच्या लेखनाची पाठराखणही केली. लेखक आणि प्रकाशकांमधला हृद्य स्नेहबंध इथे पाहायला मिळतो.
या नोंदींतून प्रा.सरदेशमुखांची विचारमौक्तिके प्राचुर्याने पसरलेली आहेत. त्यात त्यांच्या विचारातले सौंदर्य पदोपदी दिसते. त्यांच्या मांडणीत मंत्रसदृश वाटावीत अशी सूत्रे आहेत. त्यातले अर्थगांभीर्य विलक्षण आहे. त्यांची भाष्ये तत्त्वबोध घडवणारी आहेत. या पुस्तकात आलेली त्याची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे -
१) एकंदर मानवजातीचा भव्य आटोप, अलौकिक सौंदर्यदृष्टी, पूर्वतत्त्वज्ञानाची स्वानुभवान्ती नवरचना आणि अभिनव वाग्विलास यांचा चौपदरी गोफ एकट्या ज्ञानदेवांनीच गुंफून ठेवला आहे.
२) अस्तित्व आणि त्याचा संहार, जगणे आणि मरणे यांचे निकट साहचर्यच नव्हे, तर परस्परछेद देऊन एवढ्या उतावळेपणाने व सामर्थ्याने मांडणारा (चित्रेंसारखा) दुसरा कवी मराठीने पाहिला नाही.
३) अस्तित्ववाद हा अध्यात्माचा आश्रय घेणारा आधुनिक आत्मवाद आहे.
४) युगकर्ता असतो तसा युगांतकही असतो. या दोन्ही भूमिका ज्याच्यात एकवटतात तो (आंबेडकर) युगंधर असतो.
५) विनाशाच्या मुखात असलेल्या आजच्या अस्तित्वाची एक चर्या भालचंद्र नेमाडेंनी ‘कोसला’त न्याहाळून पाहिली.
६) (व्हिटमन)च्या कवितेत जीवनाचं एक मनमोहक, उन्मादक दर्शन आहे.
७) मर्मांतिक चिंता, अनोख्या वैरीजगातल्या अज्ञात भयकेंद्रातून आदळणारे आघात, व्यक्तीची एकूण षंढता... असल्या-नसल्या सामर्थ्याचे टरकलेपण इ.चे प्रभावशाली चित्रण काफ्काच्या साहित्यात आढळते.
८) (वेटिंग फॉर गोदो) हे नाटकाचा वेष पांघरलेलं जीवनाच्या पोखरलेपणावर, पर्यायहीनतेवर रचलेलं एक तात्त्विक भाष्य आहे. अस्तित्वाची शून्यता व सर्व श्रद्धांचा झिडकार यांना वाचा देणारी ही साहित्यकृती आहे.
९) (एरिक फ्रॉम) मानुषता हे साध्य असावे, साधन नव्हे.
१०) (शेली)ची प्रेमगीतं वाचली म्हणजे विविध सुरांचा भव्य पियानो समुद्रतीरावर वाजवित कोणी कलावंत बसला आहे असे वाटते.
११) आधुनिक युरोपचा सद्सद्विवेक आणि त्याची जाणीव ज्या महानुभाव पुरुषांत जागी, जिवंत होती त्यापैकी तो (टॉलस्टॉय) एक होता.
१२) जे जे प्राचीन, अर्वाचीन व समकालीन त्या त्या सर्वांत वावरणारी एकसूत्रता व समान सचेतता जाणणारी संवेदनशीलता म्हणजे आधुनिकता.
१३) लघुनियतकालिकांतील कवींच्या कविता वेळोवेळी अग्निबाणाप्रमाणे जळत येऊन..रूतलेल्या... छिन्नविछिन्न समाजव्यवथेचे विरूपाकार...प्रकट करतात.
१४) (अनुवादासंबंधी) वैभवशाली अंतःकरणांबरोबर सहलीला निघाल्यासारखं वाटायचं. मूळ लेखक मौनात आणि आपण त्याच्याशी संवादात अशी अनोखी देवघेव अनुवादात चालते.
१५) नाटक असून असून असते काय? तर या विराट विश्वाच्या चलनवलनातले मानवी प्रतिभेने निर्मिलेले एक अणुमात्र घटित.
१६) कामू नव्या साहित्याचा मानदंड आहे. त्याच्यापाशी श्रद्धा आणि अलिप्तता ही कठोर स्वरूपात आहेत. तरीही अपरंपार सहृदयतेचे एक विलक्षण मिश्रण त्या कठोरतेशी झालेले त्याच्या साहित्यात दिसून येते.
१७) शास्त्रीबोवांची (तर्कतीर्थ) वाणी ऐकताना निर्मळ शंखस्वर ऐकावा तसं वाटत होतं.
१८) रवींद्रनाथ ही भारतीय कविपरंपरेने आम्हाला लाभलेली थोर पुण्याई आहे.
१९) मानवी अस्तित्व, त्याच्या निर्माणाची व्यामिश्र पार्श्वभूमी, विशिष्ट रिंगणावरील त्याच्या वास्तवाचे उद्ध्वस्तपण आणि त्यांचे अटळ असे भवितव्य यांचा तपशीलवार आलेख जीएंची कथा देत जाते. तिच्याबरोबर प्रवास करताना सुखदुःखान्वित होऊनही एक अद्भुत साक्षीपण आपण अनुभवू शकतो.
२०) माधव ज्युलियन पुष्कळ खंबीर आणि सत्त्वशील असूनही काळपीडेचे बळी झाले. कवीचे कलात्म व्यक्तिमत्त्व काळाने ग्रासून टाकले की, त्या व्यक्तिमत्त्वाने काळाची बाधा स्वतःला भोवू दिली नाही, यावर पुष्कळसे अवलंबून असते.
प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट असलेल्या या नोंदी झरोक्यासारख्या आहेत. त्यांच्या प्रकाशात प्रा.सरदेशमुखांची साहित्यसंपदा आणि त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर भाष्य केले आहे, ते लेखक, कवी, विचारवंत मराठी वाचकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणे शक्य होईल. प्रा.सरदेशमुखांची ही विश्रब्ध शारदा नीतिन वैद्य यांच्यामुळे आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर अपार परिश्रम करून त्यांनी प्रा.सरदेशमुखांच्या समग्र लेखनाची आणि त्यावरील संदर्भांची सूची ‘त्र्यं.वि.सरदेशमुख : साहित्य , संदर्भसाहित्य सूची आणि चरित्रपट’ या नावाने प्रकाशित केली आहे. त्यामुळे सरदेशमुखांच्या साहित्याचा अभ्यास आणि त्यावर संशोधन करणाऱ्यांची मोठीच सोय झाली आहे. याबद्दल नीतिन वैद्य यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. प्रा.सरदेशमुख यांना नीतिन वैद्य यांच्यासारखा अंतेवासी भेटला, हे त्यांचे आणि आपल्या सर्वांचे वाङ्मयीन भाग्यच होय.
प्रा.सरदेशमुखांच्या जन्मशताब्दी वर्षातल्या दिनविशेषांच्या अनुषंगाने नीतिन वैद्य यांनी या शंभर नोंदी प्रकाशित केलेल्या आहेत पण त्याव्यतिरिक्त सरदेशमुखांच्या दफ्तरात अजूनही कितीतरी नोंदी, विचारसूत्रे, टिपणे, अप्रकाशित लेख, संकल्पित पुस्तकांचे आराखडे इ.ऐवज असणार आहे, तो निश्चितच महत्त्वाचा आहे. हा ऐवज आहे त्या स्वरूपात ग्रंथरूपाने प्रकाशित करावा, अशी मी त्यांना विनंती करतो.
‘जवळिकीची सरोवरे’ - नीतीन वैद्य
डिंपल पब्लिकेशन, मुंबई
पाने - ३०२
मूल्य - ४०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment