‘शिक्षणकोंडी’ : ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाला वाचा फोडणारं आणि सामाजिक भान देणारं पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
ज्ञानेश्वर जाधवर
  • ‘शिक्षणकोंडी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Mon , 13 June 2022
  • ग्रंथनामा शिफारस शिक्षणकोंडी Shikshan Kondi ऊसतोड मजूर Ustod Majur ज्ञानेश्वर जाधवर Dnyaneshwar Jadhavar

स्थलांतरित मुलांना शिक्षणहक्क मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांची ‘शिक्षणकोंडी’ ही डायरी नुकतीच वाचली. यात अनेक कार्यकर्त्यांची रोजनिशी आहे, तर काही विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत. त्यांचं संकलन-संपादन परेश जयश्री मनोहर आणि संतोष शेंडकर यांनी केलं आहे.      

“आकाश आणि महादेव शाळा सोडून मंगल कार्यालयात वाढपी म्हणून कामाला जात असल्याची बातमी लागली. आज त्यांना कोपीवर गाठायचं ठरवून गेलो आणि दोघे सापडले. ‘काल शाळेत का नै आला?’ असं लेखकानं विचारलं, तर आकाश आणि महादेव म्हणाले, ‘पाहुण्यांकडे गेल्तो बारामतीला’. त्यावर लेखकानं परत विचारलं, “पाहुण्यांकडे गेलात, की लग्नात वाढायला गेलात? सांगा कुठल्या कार्यालयात गेल्ता’. असं लेखकानं जोरात विचारलं, तेव्हा त्यांनी एकमेकाकडं बघायला सुरू केलं.”

‘सुसंवादाची दमदाटी’ या प्रसंगापासून सुरुवात होते. मुलांना शाळेत जाता येत नाही, त्याला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे कंत्राटदार त्यांच्या सोयीसाठी मुलांना वाटेल ते काम लावतात. ते कधीच मुलांच्या शाळेचा किंवा त्यांच्या आरोग्याचा विचार करत नाहीत. अशा कंत्राटदारांना समजावून सांगताना ‘आशा’ प्रकल्प चालवणाऱ्यांची पंचाईत होते, पण त्यांना कायद्याच्या भाषेत सांगितलं, तर त्यांच्यात बदल होतो. हेच या अनुभवातून लक्षात येतं. पण प्रत्येक ठिकाणीच असं करणं शक्य होत नाही, म्हणून याबाबत शासनानं धोरणं ठरवली पाहिजेत. 

काही ऊसतोड मजुरांचे आयुष्य डोळ्यानं पाहिल्यामुळे असं लक्षात आलं की, जे गेल्या तीन पिढ्यांपासून ऊसतोडणीचं व वाहतुकीचं काम करतात, त्यांच्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही. उलट ते व्यसनाच्या आहारी जाऊन दु:खी व कष्टी आयुष्य जगत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या मुलांचीही वाताहत झाली आहे. परिणामी एका कष्टकरी समूहाच्या पिढ्या बरबाद होत आहेत. ज्यांनी धाडसानं हे काम सोडून देऊन पर्यायी मार्ग स्वीकारला आणि त्यांच्या मुलांना शिक्षण दिलं, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होताना दिसत आहे. हे कटू वास्तव ‘शिक्षणकोंडी’ हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्यासमोर येतं.

मजुरांचं वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य व अपघात विमा, निवासाची सुविधा, कौशल्य विकास, मुलांचं शिक्षण व प्रसूती रजा यासाठी शासनानं ठोस काम करायला पाहिजे. त्या संदर्भात काही ठोस तरतुदी करणं आवश्यक आहे. जेणेकरून ऊसतोड मजूर कुटुंबांना फायदा होईल. 

‘सुसंवादाची दमदाटी’, ‘घुमतोय अंगात भिलारबाबा’, ‘रेश्माचं दप्तर’, ‘आगळा वेगळा प्रवेशोत्सव’, ‘तळावरच झालं आशाचं बारसं’, ‘कोयता’, ‘आणि चहा करपला’, ‘अर्धा कोयता’, ‘ती वाढं बांधायला जाते’, ‘आग लावा त्या कोयत्याला’, ‘कोंबड्या गेल्या फडात’, ‘राधिकाची पाळी’, ‘सावधान! हार्वेस्टर येतोय’, ‘या महिलांना गर्भाशय का नाही?’, ‘गुरुजींच्या दोन बाजू’, ‘बळी’, ‘फडातल्या वेणा’, ‘शिक्षणप्रेमी मुकादम’, ‘नशिबाची गाडी’, आणि ‘मॅडम, मोठं काम करताय’, अशा ४० वास्तव प्रसंगाचं कथास्वरूपातील एकत्रीकरण करून हे पुस्तक आकाराला आलं आहे. यातील  प्रसंग ऊसतोड मजुरांचं जगणं, त्यांच्या मुलांचं शिक्षण आणि आरोग्य या संदर्भात बोलतात. लिहिणाऱ्यांची तळमळ प्रत्येक पानावर दिसून येते. हे पुस्तक वाचल्यावर असं वाटतं की, असं जगणं कोणाच्याच वाट्याला येऊ नये.

समाजातील कष्टकरी कुटुंबांना अस्थिर ठेवून या घटकांची कुचंबणा शासन आणि कारखान्यांकडून होत आहे. कारण यांच्या वतीनं प्रश्न उभे करणाऱ्यांची संख्य़ा कमी आहे. किंबहुना नाहीच. हे प्रश्न नक्कीच सोडवता येऊ शकतात, मात्र त्यासाठी तयारी दाखवली जात नाही. त्यामुळे या प्रश्नांचा गांभीर्यानं अभ्यास झालेला नाही. परिणामी ऊसतोड मजूर सुधारणेपासून वंचित राहिला आहे. गेल्या ७० वर्षांत कारखान्यांच्या इतर सर्व घटकांचा विचार केला, पण फक्त मजुरांचा विचार केला गेलेला नाही, हे वास्तव आहे.

साखर कारखान्याच्या उद्योगात तीन स्तरावर वेगवेगळे मजूर काम करतात. एक ऊस पिकवण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतात, दुसरे कारखाना चालवण्यासाठी आणि तिसरं हे ऊसतोड करून वाहतूक करणारे. पहिल्या दोन मजुरांची सोय त्यांचे त्यांचे मालक करतात. पण ऊसतोड मजूर हा ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचाही नाही आणि कारखान्याच्या मालकांचाही नाही. म्हणून त्यांचा ‘चेंडू’ केला जातो. मध्यस्थी करणाऱ्या मुकादमांना तर फक्त त्यांच्या कमिशनशी देणंघेणं असतं, पण त्यांचीही काही ठिकाणी फसवणूक होते. मुकादम हा कारखाना व्यवस्थापन आणि मजूर यांच्यामधील दुवा आहे. त्यामुळे काही मुकादमांकडून मजुरांचंही शोषण होतं.

कारखान्यांकडूनही या मजुरांना पुरेशी मदत दिली जात नाही. वाहतुकीसाठी टायर, कोपीसाठी चटाया आणि बांबू दिले जातात. पिण्याच्या पाण्याची आणि लाईटची व्यवस्था काही कारखाने करतात, तर काही नाही. तरीही असंख्य़ अडचणीला तोंड देत महाराष्ट्रात जवळपास १२ ते १५ लाख ऊसतोड मजूर राबत आहेत. एकट्या बीड जिल्ह्यातून पाच-सहा लाख मजूर दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरातमध्ये ऊस तोडायला जातात.

पश्चिम महाराष्ट्राची स्थिती बरी आहे. कारण या पट्ट्यात पाऊस भरपूर पडतो आणि जमीनही सुपीक आहे. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या भागात शेती मोठ्या प्रमाणात पिकते. त्यात विविध पिकांची लागवड केली जाते. त्यात काम करण्यासाठी मराठवाड्यातून मजूर येतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

महाराष्ट्रातील बीड, जालना, नांदेड, उस्मानाबाद, लातूर व सोलापूर जिल्हातील काही तालुके दुष्काळी आहेत. या भागात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. इथं शेती पिकत नाही. परिणामी लोकांना पुरेसा रोजगार मिळत नाही. पर्यायी काही काम शोधावं, तर तेही मिळत नाही. त्यामुळे या भागातील अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी आणि भूमिहीन मजूर ऊसतोड करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात जातात.

१९७०-८०मध्ये ऊसतोड मजुरांचं प्रमाण कमी होतं. कारण कारखानेही कमी होते. पण ज्या वेळी कारखान्यांची संख्या वाढत गेली, तशी मजुरांची संख्याही वाढली. मग उत्तर महाराष्ट्र व विदर्भातीलही मजुरांची संख्या वाढली. सध्या हे मजूर कर्नाटकातही ऊस तोडण्यासाठी जातात.

या मजुरांच्या गावसोडण्यापासून ते गावाकडे परत येईपर्यंत असंख्य अडचणी आहेत. त्यात प्रामुख्यानं आरोग्य आणि मुलांचं शिक्षण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ऊसतोड मजुरांना फक्त असंघटित किंवा वंचित घटकातील मजूर म्हणून बघू नये. त्यांना आर्थिकदृष्ट्या गरीब, शोषित असंही पाहून जमणार नाही. लिंग, जात, धर्म, मानवता, वर्ग आणि समाजमूल्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या कसोट्यांमधून पाहून, त्यांचं विश्लेषण करून, विकासाच्या नजरेतून या कष्टकरी वर्गांच्या श्रम आणि मूल्यांकडे पाहावं लागेल. या वर्गाचं खरं स्वरूप खूप जटिल आहे. आणि त्याची खरी मेख सामाजिक रचनेत आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये दडलेली आहे.

मजुरांना सहन कराव्या लागणाऱ्या यातना, त्यांची दडपलेली मानसिकता, त्यांचा दबलेला आवाज, हे त्यांच्या समूहात जाऊन समजावून घेणं गरजेचं आहे. या मजुरांना काही कौशल्यं दिली आणि त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, तर नक्कीच बदल होऊ शकतो.

या पुस्तकानं ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. त्यामुळे हे पुस्तक सामाजिक भान देणारं आहे.

‘शिक्षणकोंडी’ - संकलन-संपादन : परेश जयश्री मनोहर व संतोष शेंडकर

रोहन प्रकाशन, पुणे

पाने - १०८

मूल्य - १२५ रुपये

.................................................................................................................................................................

लेखक ज्ञानेश्वर जाधवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागात पीएचडी स्कॉलर आहेत.

j.dnyan@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......