अजूनकाही
कवी आणि सामाजिक कार्यकर्ते ईशान संगमनेरकर यांचा ‘माऊथ फ्रेशनर’ हा नवा कवितासंग्रह नुकताच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. निशा शिवूरकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
ईशान संगमनेरकर गेली अनेक वर्षे कविता लिहित आहेत. या कवीचे विचारविश्व समकालीन वास्तवाशी जोडलेले आहे. आजच्या काळातील खटकणाऱ्या, वेदना देणाऱ्या घटनांनी कवी अस्वस्थ होतो. ‘माऊथ फ्रेशनर’ या संग्रहातील कविता व्यथा, वेदना आणि अस्वस्थेच्या कविता आहेत. भारतीय संविधान, लोकशाही समाजवादी विचारधारा ही कवीची वैचारिक भूमिका आहे. याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमध्ये दिसते.
आपल्या देशातील संमिश्र संस्कृती, गंगा-जमुनी तहजीब आणि सहिष्णूतेचा वारसा नष्ट करण्याचे षडयंत्र सांप्रदायिक शक्तींनी गेल्या काही वर्षांमध्ये नियोजनपूर्वक रचले आहे. या संकुचित राष्ट्रवादाच्या राजकारणाला काही प्रमाणात यशही मिळते आहे. याची जाणीव या कवीला आहे. द्वेष, दुहीच्या या राजकारणाचा त्यांना त्रास होतो आहे. ‘प्रजा आणि नागरिक’, ‘गुजरात’, ‘गुढीपाडवा’ यांसारख्या कवितांमधून या राजकीय वास्तवाबद्दल कवी बोलतो आहे. त्यांना या वास्तवाची चिंता वाटते. ही चिंता कवीने सहज, साध्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांमध्ये विविध कवितांमधून व्यक्त केलेली आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
ईशान संगमनेरकर यांना जागतिक घटनांचे भान आहे. त्यांचे अख्ख्या विश्वाशीच बंधुतेचे, करुणेचे नाते आहे. त्यांना तुर्कीच्या समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत पहुडलेल्या ‘आयलान कुर्दी’ या लहानग्या सिरीयन लेकराच्या मृत्यूचे दु:ख पिळवटून टाकते. हिंसाचक्रापासून दूर पळताना आयलान आणि त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला. या एकाकी मृत्यूने साऱ्या जगातील संवेदनाशील माणसे दु:खी झाली. निलूफेर देमीर या फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात वाळूवर अर्धचेहरा दिसणाऱ्या त्याच्या शवाचा फोटो काढला. हा फोटो जगभरच्या माध्यमांनी प्रसिद्ध केला. या मुलाचा करुण मृत्यू ईशान यांच्या शब्दांना आवाहन करतो. तीन वर्षाच्या निर्वासित मुलाची ‘आयलान कुर्दी’ ही कविता वाचकाच्या मनाला चटका लावते. हिंसे विषयी वाचकाला विचार करायला लावते. कवीच्या मनातील प्रश्न वाचकांच्याही मनात उमटतात.
कवीला हिंसा मान्य नाही. ते अहिंसा, शांतता, सहिष्णूतेचा पुरस्कर्ते आहेत. अनेक कवितांमधून त्यांनी हिंसेला विरोध केला आहे. झुंडीची दहशत नाकारली आहे. ‘अखलाखला हाणा...’ या कवितेत आपल्या समाजातील हरवलेल्या विवेकाविषयी कवी अस्वस्थतेने लिहितो.
कविता संग्रहाच्या ‘माऊथ फ्रेशनर’ या नावात कवीने कंसात ‘शाहू-फुले-आंबेडकर’ असे लिहिले आहे. ‘शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असा नामजप करणाऱ्यांनी या महामानवाच्या विचारांना कर्मकांड बनवले आहे, याचा कवीला खेद वाटतो. कवीने कबीर, गुरूगोविंदसिंग, शिवाजीमहाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू, मदर तेरेसा, गाडगे महाराज यांच्यावर कविता लिहिल्या आहेत. राजर्षी शाहू कवितेत शाहूंचे चरित्र मांडले आहेत. हे सगळे त्यांचे नायक आहेत. या नायकांनी भारतीय जनमानस घडवले आहे. या महामानवांच्या उदारमतवादी विचारांचा वारसा कवीच्या शब्दांमधून व्यक्त झालेला आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
ईशान यांचे बुद्ध, येशु, गांधींच्या करुणेशी, क्षमेशी नाते आहे. विश्वाला ही करुणा, क्षमा वाचवेल, असा त्यांना विश्वास वाटतो. ‘तुम्ही’ या कवितेत गांधीजींचा खून करणाऱ्यांकडे बोट दाखवून कवी त्यांना ‘तुम्ही स्वातंत्र्य आंदोलनाशी द्रोह केला आहे’, असे परखडपणे सुनावतो.
धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्वांसाठी खुले आकाश, सहजीवन, सहअस्तित्व असं लिहिणाऱ्यां ईशान यांनी हिंदू धर्म आणि इस्लामच्या नावेही कविता लिहिल्या आहेत. कवी ‘हिंदू धर्म’ या कवितेत उदारमतवादी हिंदू आणि कट्टरतावादी हिंदुमधला भेद सांगतो, तेव्हा डॉ. राममनोहर लोहियांच्या ‘हिंदू बनाम हिंदू’ या निबंधाचे स्मरण होते. हीच जाणीव ‘याची दखल कोण घेतंय?’ या कवितेतही व्यक्त होते, तर इस्लामच्या नावे स्त्रियांना कमी लेखणाऱ्या समूहाला कवी प्रेषित महमद पैगंबरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या ‘हुमा’ या पैगंबरांच्या पतीची आठवण करून देतो. संगमनेरकर यांनी धर्माच्या नावाने होणाऱ्या ढोंगावर नेमकेपणाने बोट ठेवलेले आहे.
भारत-पाकिस्तान एकाच सांस्कृतिक उपखंडाचे भाग आहेत. एकमेकांचे शत्रू नाहीत तर मित्र आहेत, अशी कवीची धारणा आहे. ‘पत्रोत्तर’ या कवितेत दोन्ही देशातील बंधुभाव, प्रेम जोपासले जावे ही भावना कवी व्यक्त करतो. दोन्ही देशातील समंजस माणसांवर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच ‘गुरमेहर कौर’ ही युद्धाविरोधी बोलणारी तरुणी त्यांना आजच्या काळातील नायिका वाटते.
ईशान संगमनेरकर यांना वर्तमानाची असलेली प्रखर जाणीव ‘वर्तमान’ कवितेत व्यक्त होते. ही कविता वाचताना अफगाणिस्तानातील आजचे वास्तव नजरेसमोर उभे राहते. वर्तमानाची हीच जाणीव ‘भजन’, ‘मृत्यूशोक’, ‘महानगर’, ‘स्मारक’ इत्यादी कवितांमध्ये दिसते. वाढते शहरीकरण आणि विकासाचा अमानवी दृष्टीकोन कवीच्या चिंतेचा विषय आहे. ‘भारतीय नागरिक होताना’, ‘का निर्वासित होतात ही माणसं’ अशा कवितांमधून कवीची आधुनिक विकासचक्रामुळे विस्थापित होणाऱ्या दुबळ्या माणसांविषयीची आस्था प्रगट होते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
स्त्रीजीवनातील दु:खांशी, प्रश्नांशी, कवी विचार व भावनेने जोडलेला आहे. ‘लक्ष्मणरेषा’, ‘उत्तर द्या’, ‘तिचा प्रश्न, ‘अॅसिड हल्ला’, ‘लायसन्स’, ‘अगदी नकळत सरावाने’, ‘जन्नत जहन्नम’ अशा अनेक कवितांमधून कवी स्त्रियांच्या दु:ख, वेदना, अत्याचारांविषयी बोलतो. ‘तिचा प्रश्न’ या कवितेत तलाकपीडित स्त्रीची व्यथा कवी मांडतो. तेव्हा त्यांना मीनाकुमारी आठवते. ‘कंच्या पोथीत लिवलय!’ या कवितेत संगमनेरकर पितृसत्ता व धर्मसत्तेला प्रश्न विचारतात. वाचकांपुढे देवदासी, मुरळीचे जीवन उभे करतात.
‘प्रवरा, माय तुला काय म्हणू!’ ही या संग्रहातील विशेष उल्लेखनीय दीर्घ कविता आहे. या नदीच्या परिसरात कवी लहानाचा मोठा झाला. प्रवरेशी कवीचे उत्कट नाते आहे. ही नदी त्यांना आपली माय वाटते. तिचा भौगोलिक, सांस्कृतिक प्रवास कवी शब्दांमधून व्यक्त करतो. जोर्वे संस्कृती ते ज्ञानदेवापर्यंतच्या नदीच्या इतिहासाशी त्यांचे नाते जुळलेले आहे. प्रवरा नदीत त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान काळ दिसतो.
मिश्र संस्कृतीचा वारसा घेऊन कवीचा प्रवास सुरू आहे. या प्रवासात प्रार्थना, प्रेम आणि समर्पण आहे. वेदनेची पालखी घेऊन कवी आपली वाट चालतो आहे. या वाटेवर शब्दांच्या माध्यमातून वाचकाला सोबत घेण्याचा कवीचा प्रयत्न आहे. या संग्रहाला प्रस्तावना लिहिताना हा प्रवास मलाही करता आला. कवीचे आणि माझे चिंता आणि चिंतनाचे विषय समान आहेत. मानवी समाजाविषयी आम्हाला करुणा वाटते. त्यामुळे प्रस्तावना लिहिण्याचा कवीचा आग्रह मान्य करावा लागला. पुढील काळात अधिक अर्थपूर्ण कविता लिहिण्यासाठी ईशान संगमनेरकर यांना सदिच्छा!
‘माऊथ फ्रेशनर’ - ईशान संगमनेरकर
अक्षर प्रकाशन, मुंबई
मूल्य - २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment