ढसाळ यांच्या ‘गोलपिठा’मुळे कामाठीपुऱ्याचे दर्शन मराठी जाणीवेला याअगोदरच झाले आहे, ‘कामाठीपुरा’ या कादंबरीनेे ही ‘परंपरा’ कथात्म रूपात पकडण्याचा प्रयत्न केला आहे
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
दीपक बोरगावे
  • मुंबईतल्या कामाठीपुऱ्याच्या एका गल्लीची पाटी आणि ‘कामाठीपुरा’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Tue , 26 April 2022
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो कामाठीपुरा Kamathipura सुधीर जाधव Sudheer Jadhav गोलपिठा Golpitha नामदेव ढसाळ Namdeo Dhasal

तरुण लेखक सुधीर जाधव यांची ‘कामाठीपुरा’ ही कादंबरी नुकतीच सृजन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. तिच्याविषयीचे हे एक टिपण...

..................................................................................................................................................................

सामाजिक न्याय, समता, बंधुभाव, सत्य, मानवी मूल्ये आणि अशा बऱ्याच गोष्टींची संभाषितं मध्यमवर्गीय मानसिकतेच्या अवकाशात सतत होत असताना आपण वाचतो/पाहतो. या आकलनाच्या आरोह-अवरोहांतून आपणही आळवून आळवून केलेली चर्चांची उपनिषदं सुधीर जाधव यांच्या ‘कामाठीपुरा’ (सृजन प्रकाशन, २०२२) या नव्या कादंबरीत कोसळून पडतात. हे असे वाटणे, या समाजचित्रणाचे बुर्झ्वा आकलन आहे.

कामाठीपुरा ही मुंबईत देहविक्री करण्यासाठी साऱ्या देशातून भडव्यांनी विक्रीसाठी वेचून आणलेल्या, फसलेल्या, फसवलेल्या, रेप झालेल्या बाया-पोरींची वसाहत. आपल्या देशातील अफाट दारिद्र्याचे आणि सामाजिक व राजकीय वास्तवाचे हे अपत्य. रांडगल्ल्या, नंबरवाले बंगले, तवायतखाना, दारूचे अड्डे, चरसचे अड्डे, मटका, पताडा, स्त्रीदेह विक्रीच्या दहा ते बारा गल्ल्या, गुप्तरोगांचा दवाखाना आणि सतत कुठला ना कुठला राडा, हा या कामाठीपुराचा सांस्कृतिक भौतिकवाद.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

औद्योगिक शहराची निर्मिती ही भांडवली व्यवस्थेची सुरुवातीची पायरी असते आणि या अनुषंगाने झोपडपट्टी, गुंडगिरी, हिंसा, दहशत अशा गोष्टींची निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात गावाकडील आणि निमशहरी वसाहतीत अस्तित्वात असलेल्या दारिद्र्यामुळे स्वस्तात उपलब्ध होणारा कामगार वर्ग, हा अशा महानगरात स्थलांतरित होतो. या व्यवस्थेची ही गरजच असते. अधोलोक, अंडरवर्ल्ड, स्मगलिंग, चोरबाजार असे जग यातून निर्माण होत जाते.

महाराष्ट्रात या जगाच्या साहाय्याने राजकीय संघटना आणि पक्षदेखील उभे राहिले. हा इतिहास तसा फार जुना नाही. कामाठीपुरा या परिसराचा विकास आणि त्या विकासाचे स्त्रोत आपणाला या व्यवस्थेत शोधावे लागतील.

फ्रेंच मानसोपचारतज्ज्ञ फ्रॅन्झ फॅनन (१९२५-१९६१) यांच्या ‘The Wretched of the Earth’ (१९६१) या पुस्तकात ‘लुम्पेन प्रोलिटरेट’ (lumpen proletariat) अशी एक मार्क्सवादी संकल्पना आहे. राजकीयदृष्ट्या असंघटित अशा कामगार वर्गासाठी वापरण्यात आलेली ही संज्ञा आहे. तात्पुरत्या रूपात काहीतरी काम करणारा हा श्रमिक या ‘लुम्पेन प्रोलिटरेट’ वर्गाच्या केंद्रस्थानी असतो. ‘कामाठीपुरा’ या कादंबरीत चित्रित केल्या गेलेल्या विश्वाला आणि त्यातील सगळ्याच असंघटित पात्रांना ‘लुम्पेन प्रोलिटरेट’ असे म्हणता येऊ शकते.

मुंबईमधील कामाठीपुरा ही वसाहत बऱ्याच अर्थाने स्थलांतरित (migrated) वसाहत आहे. स्त्रीच्या देहाची विक्री हा केंद्रीय मुद्दा असला तरी, या अनुषंगाने निर्माण झालेले अनेक धंदे इथे सुरू झाले, ते पुढे ऑक्‍टोपसी हजार हातांसारखे पसरत गेले; विस्तारत गेले. गुन्हेगारी, हिंसा, राडा, रेप, दारूचे गुत्ते, हाफ-मर्डर, मर्डर, जुगार, मटका, फसवाफसवी, गुलामगिरी याचबरोबर एड्स आणि हजारो गुप्त रोग इथे पोसले गेले. त्यांच्या उपचारांसाठी अनेक छोटी-मोठी हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स उभी राहिली. ‘लाल चिमणी’ हे सरकारी हॉस्पिटल याचेच एक उदाहरण म्हणता येईल.

स्त्री देह विक्रीच्या तळाशी मूलतः असणारे कारण दारिद्र्यच आहे. कादंबरीच्या सुरुवातीला केरळमधून आलेल्या दुर्गाचे किंवा सोनमचे उपकथानक, हे या अफाट दारिद्र्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. चिनुच्या बापाची कथा ही पितृसत्तेच्या अक्राळविक्राळाचा अर्क आहे, आणि तोही प्रातिनिधिक समजायला हरकत नाही. ही विकृती काय एकट्या कामाठीपुऱ्यातील प्रातिनिधिक कथा नाही. ती आपणाला सगळीकडेच पाहायला मिळते; फरक फक्त कमी-जास्त दाहाचा. स्त्रीवर सरळ होणारा हल्ला किंवा तो हळूहळू पोटात सुरी खुपसल्यासारखा. शांता दादाची (शांताराम काशिराम कांबळे) अंगावर येणारी भयंकर कथा ही कामाठीपुऱ्यातील मानुष मूल्याचे दर्शन करणारी कथा आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

लक्ष्मीअक्का हे कामाठीपुऱ्यातील एका दहशतीचे नाव. पण शांतादादा आणि कामाठीपुऱ्यातील त्याच्या गॅंगने या भयंकर लक्ष्मीअक्काला नमवलेले असते. यातील दोन्ही बाजूनी होणाऱ्या भयंकर हिंसेचे शब्दचित्र या कादंबरीत कल्पनेच्या पलीकडचे आहे. ही कादंबरी वाचत असताना हिंदीतील ‘सत्या’ आणि मराठीतील ‘चक्र’ या सिनेमांची प्रकर्षाने आठवण झाली.

कामाठीपुरा म्हणजे केवळ गुन्हेगारी, हिंसा, दारूचे आणि पत्त्यांचे अड्डे, हत्यारे, चाकू-सुरे, तळपत्या तलवारी, चॉपर, लोखंडी सळ्या आणि हॉकी स्टिक्स नव्हे. शांतादादा आणि परमेश्वरीच्या कथानकात मानवी मूल्यांची जोपासना केली जाते, याची चिन्हे ठळकपणे उमटतात. नामचीन भाई, खानसाब, अमीरजादा अशा मुस्लीम मंडळींची कुठल्याही बायका-मुलींवर वाईट नजर नसते. कामाठीपुरासारख्या कुप्रसिद्ध इलाख्यात बायका-मुली सुरक्षित आहेत, असे उल्लेख या कादंबरीत येतात.

जातपात, धर्मभेद हे प्रश्न कामाठीपुऱ्यात नाहीत. हा इलाखा धर्मनिरपेक्ष आहे. मात्र, इथे राजरोस, उघडउघड स्त्रीदेहाची खरेदी-विक्री चालते. लाखो रुपयांचा रोकडा हिशोब इथे चालतो. दहशत आणि हिंसा इथे नांदते आणि त्याचा सरळ संबंध हा आर्थिक गणिताशी असतो; तो जगण्याच्या प्रत्यक्ष कोलाहलाशी आणि संघर्षाशी असतो. इथे मृत्यू स्वस्त आहे; रोगराई कल्पनेच्या पलीकडची आहे. अफाट देहाची, पिळदार शरीराची पोरं इथं काही वर्षांतच रोगग्रस्त होऊन नाहीशी होतात.

कामाठीपुऱ्याच्या बाहेर असणाऱ्या उपऱ्या माणसाला हे जग समजायला कठीण आहे. या जगाची क्लिष्टता ही केवळ तिथे राहणार्‍या माणसालाच कळते/समजते. या जगात ‘बाप’ नावाच्या प्राण्याला कुणी घाबरत नाही, पण आईला इथे ज्याम आदर आहे. ‘भाई’ नावाचे मिथक इथे कायम उपस्थित असते. प्रत्येक गल्लीत किंवा कामाठीपुऱ्यातल्या वेगवेगळ्या परिसरात एक एक भाई असतो. तो त्या परिसराचा/गल्लीचा स्वयंघोषित आणि अनभिषिक्त राजाच असतो. या सर्व भाईंचे एकमेकांशी दृढ नाते असते. एक भाई दुसऱ्या भाईच्या राज्यात किंवा गल्लीत कधीच ढवळाढवळ करत नाही. एकमेकांशी दुश्मनी तर कधीच नसते. उलट अगंतुकांच्या दंगलीत, राड्यात हे भाई एकमेकांना मदत करायला हजर राहतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कामाठीपुऱ्यातील गोविंदा म्हणजे दहीहंडी उत्सव आणि गणपती विसर्जन मिरवणूक यांची खास दीर्घ चित्रणं या कादंबरीत विलक्षण अशीच आहेत. कारण यांना खास कामाठीपुऱ्याचा गंध आहे. इतरत्र होणारे आणि कामाठीपुऱ्यातील हे उत्सव अगदी वेगळे आहेत. इथे सरळ काही घडतच नाही, असा हा मामला आहे. यात सलग येणारी चिनूची दीर्घ आणि खळाळ, अशी एक प्रेमकथाही आहे. प्रेमकथा म्हणजे नायक (चिनू) आणि नायिका (राधा) यांचे दोन किंवा तीनच प्रसंग असावेत, पण ती कामाठीपुऱ्याच्या वेगाने सरकते आणि भेदक तपशिलांनी धक्के देते. ती वस्तुतः मुळातूनच वाचावी अशी आहे.

या कादंबरीतील एकेक शब्द आणि वाक्यरचना काही वाचकांना हादरवून टाकणाऱ्या आहेत. काही उदाहरणे पाहा : लुक्के, वटक, हातात नंगी घेऊन, गेम केला, गोयंदा, बचकानी पोरं, हेलपायला, झवाडी, लंबर (नंबर) इत्यादी. ‘खचप’ असा एक शॉर्ट फॉर्म आहे. त्याचा मूळ अर्थ वाचकांनी स्वतःच वाचावा. काही शब्द अंकात बोलले जातात. उदाहरणार्थ, ‘छब्बीस’ म्हणजे छावी, ‘तीर्री’ म्हणजे मयत, ‘सत्ता’ म्हणजे लंगडा, ‘दस्सा’ म्हणजे मेंढी. याला ‘कोड भाषा’ असेही म्हणता येईल.

या कादंबरीत कामाठीपुऱ्यामध्ये बोलली जाणारी टपोरी भाषा आली आहे. बरीच उदाहरणे देता येतील. ही काही पहा : क्या बात कर रैला है (क्या बात कर रहा है); भेंचो ये मेरा मॅटर है; चलो अभी एन्ट्री मारते है; पार इज्जतीचा भाजीपाला व्हायचा... या अशा अस्सल अभिव्यक्तीमुळे हा परिसर अधिक जिवंत आणि गडद होतो. यात येणाऱ्या पात्रांची नावे पहा- फेफ्टी, चौपाटी, चिनू, संत्या दादा, हनम्या, लुक्का, पावट्या, चंग्या, लट्या, हनीफ तेडा, बटल्या राजू, आऱ्या वगैरे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या कादंबरीत खुली आणि मोकळी वर्णने आली आहेत, मग ती हाणामारीची, राड्याची किंवा लैंगिक असोत. पण कुठल्याच अर्थाने ती अश्लील वाटत नाहीत. उलट ती कामाठीपुऱ्याचे गांभीर्याने आकलन करणारी वाटतात.

स्त्री व पुरुष दलित आत्मकथने आणि अस्सल ग्रामीण परिसरातून आलेल्या कथा-कादंबऱ्यांनी (उदा. रा. रं. बोराडे, आनंद यादव, उद्धव शेळके, राजन गवस इत्यादी) मराठीतील शब्दकळा आणि महाराष्ट्रीय समाजाच्या आकलनाचे विश्व अगोदरच विस्तारित आणि समृद्ध केले आहे. या आगळ्या साहित्यिक परंपरेला पुढे घेऊन जाणारी ही कादंबरी आहे. कवीश्रेष्ठ नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपिठा’मुळे कामाठीपुऱ्याचे दर्शन मराठी जाणीवेला याअगोदरच झाले आहे. या संहितेने ही ‘परंपरा’ कथात्म रूपात पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा हा गलिच्छ परिसर आज नामशेष झाला आहे. याच परिसरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या सुधीर जाधवसारख्या लेखकांत (किंवा कामाठीपुरा जगलेल्या व्यक्तींमध्ये) मात्र तो अजूनही जिवंत आहे. या कादंबरीतील अनेक पात्रांच्या डायमेन्शन्सकडे पाहता आणि कामाठीपुरा अजून वेगवेगळ्या अर्थाने समजावून घेण्यासाठी/समजावून देण्यासाठी सुधीरने काही पात्रांवर दीर्घकथा किंवा स्वतंत्र कादंबऱ्या लिहाव्यात, असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......