‘कविता ह्या हिणवलेल्या’ : काळाच्या ओघात नष्ट होत चाललेल्या गिरणगावाचे उरले-सुरले अवशेष मांडणारी अस्सल कविता        
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नानासाहेब गव्हाणे
  • ‘कविता ह्या हिणवलेल्या’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Mon , 28 February 2022
  • ग्रंथनामा शिफारस कविता ह्या हिणवलेल्या Kavita ya Hinavlelya अविनाश उषा वसंत Avinash Usha Vasant

‘पटेली’ या बहुचर्चित कादंबरीचे लेखक अविनाश उषा वसंत यांचा ‘कविता ह्या हिणवलेल्या’ हा कवितासंग्रह साहित्यविश्वात दाखल होतो आहे. प्रस्तुत संग्रहाच्या शीर्षकापासूनच ही वेगळी कविता असली पाहिजे, असे वाटते. आणि कविता वाचल्यानंतर ते खरेही ठरते. कवी स्वतःच्या कवितांना हिणकस ठरवल्या गेल्याचा एक पुरावाच कवितासंग्रहाच्या शीर्षकातून देतो आहे.

मलपृष्ठावर कवीने स्वत:चा पत्ता गिरणगाव, मुंबई असा दिलेला आहे. त्याचे वास्तव्य गिरणगावात असल्याचा हा आणखी एक धागा कविता वाचण्यासाठी वाचकाला उद्युक्त करतो. कारण, गिरणगाव म्हटले की, मराठी कवितेत सर्वप्रथम आठवतात ते नारायण सुर्वे! मुंबई या मायावी नगरीतले कष्टकरी, कामगार वर्गाचे हलाखीतले जगणे सुर्वे यांनी मराठी कवितेत प्रभावीपणे चित्रित केले. त्यांच्यानंतर नामदेव ढसाळ यांच्या कवितेनेही मुंबईतील विविध स्तरांतील माणसांच्या जगण्याचा उभा-आडवा छेद अत्यंत सूक्ष्मपणे आणि वेधकरित्या घेतला आहे. असो.

तर मुंबईच्या गिरणगावात वास्तव्य करणाऱ्या या तरुण कवीच्या कविता जेव्हा आपण वाचायला लागतो, तेव्हा साहजिकच मनात कुतूहल निर्माण होते. मुखपृष्ठावरील गिरणीचे चित्र, पोस्टाचे तिकीट, त्यावर असलेला नायगाव पोस्ट ऑफिसचा शिक्का या सगळ्या गोष्टी आपल्याला या कवितेला असलेली पार्श्वभूमी अधोरेखित करताना दिसतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या कविता चार भागांत विभागलेल्या आहेत. पहिला भाग ‘दिवसाची उठचळ’, दुसरा भाग ‘गिरणगावातून मुंबईतली उठबस’, तिसरा भाग ‘कोयना एक्स्प्रेस’ ही एक स्वतंत्र दीर्घकविता, तर चौथा भाग ‘उत्तररात्रीचं किडुक मिडुक’... अशा एकंदर ४६ कविता आपल्याला भेटतात. कवितेचे पीक भरघोस असण्याच्या काळात गिरणगावातला एक तरुण आपली जगण्याच्या असोशीतून आलेली निरीक्षणे प्रामाणिकपणे मांडतो आहे, हे चित्र निश्चितच सुखद आहे.

या कवितेला विचारांची डूब आहे. कवितेतून व्यक्त होत असताना कवी भाषेचे कसलेही अवडंबर माजवताना दिसत नाही. जे पोटातून आले आहे, तेच ओठांवर आहे, या भूमिकेतून झरणारी सहज, ओघवत्या बोलीभाषेतली ही कविता मुंबई आणि गिरणगावातल्या बोलीभाषेचा सहज उत्कट आविष्कार करताना कुठेच ढळत नाही.

‘सम्यक’ ही पहिलीच कविता कवीची दिशा आणि भूमिका स्पष्ट करते. सध्याच्या जात आणि धर्माच्या विखारी प्रचाराच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात असताना कवीला अशा माणसाला भेटायचं आहे, जो कसलाही भेद करणार नाही, ज्याला तुच्छता माहिती नसेल, ज्याला कसलीच नाती नसतील. या कवितेतून कवी वर्तमानातील सम्यकतेच्या गरजेला आवाहन करू पाहतो आहे.

समकालाचे नेमके भान कवीला आहे. ते प्रकट करताना तो म्हणतो, ‘ठरवतात हे लोक माणसाचं चरित्र एक दोन शब्दांत.’ सद्यस्थितीत माणसाला लगेचच तात्काळ निकालात काढण्याची वृत्ती बळावते आहे. त्याला ‘प्रतिगामी’ किंवा ‘पुरोगामी’ अशा गटात विभागले जात आहे. म्हणूनच कवी आठवण करून देतो की, आपला जो पूर्वज होता त्याला कसलेही चरित्र नव्हते. माणसानेच सारे भेद, गट-तट आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेले आहेत. शेवटी कवी असा आशावाद प्रकट करतो की, ‘चरित्र असल ना मानवाचेय मानवतावादी!’

कविता अस्वस्थतेतून निर्माण होते. समाजात जगत असताना मानवी जगण्याला भेडसावणारे प्रश्न, जाणवणारे ताण-तणाव, उपस्थित केले जाणारे सवाल कवी आपल्या कवितेतून अधोरेखित करत असतो. कवीच्या शब्दांना चिंतनाचे अस्तर लाभल्यामुळे कविता समाजाभिमुख होत असते. या संग्रहातल्या कवितेत या शक्यता ठळकपणे जाणवतात.

‘आई’ या कवितेतून कवी गिरणगावातील प्रत्येकाची आई आपल्या डोळ्यांसमोर उभी करत असतानाच समष्टीचे प्रखर भानदेखील अधोरेखित करतो. ‘धारवाला’ या कवितेतून धार लावणाऱ्या व्यक्तीचे चित्र रेखाटत हिंदू-मुस्लीम दंगलीचे संदर्भ नोंदवताना ‘ठिणग्या उडतात पत्तर का चलता चकार धार लागते पण कुणीच धारधार व्हवू नये धार लगतालगता जिंदगी का पत्तर व्हतो काला’ असे सूचक विधान करून दंगल ही कुणाच्याच हिताची नसते, हे परखड सत्य  प्रत्येकाला निक्षून सांगण्याचा प्रयत्न करतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कवीचे निरीक्षण सूक्ष्म आणि तरल आहे. समाजमाध्यमांवरील त्याने टिपलेली छायाचित्रे, विविध घटना-प्रसंग, घडामोडींना दिलेली प्रतिक्रिया याची साक्ष देतात. ‘रि-डेव्हलपमेंट’ या कवितेतून गिरणागावाचे रि-डेव्हलपमेंटच्या गोंडस नावाखाली होणारे वस्त्रहरण कवी

‘तुझ्याच फुकटच्या पाण्यावर जगणारे ते बांडगुळ कधी कळणार बे

गणपतीच्या स्टेजसाठी खो - खो कबड्डीचे मैदान तू विकलेस कवडीमोलात

आता तू ‘इको टाइम्स’ वाचतो ना’

अशा ओळींतून गडद करतो.

तर ‘कविता ह्या हिणवलेल्या’ शीर्षक कवितेत कवी आपल्या कवितांचा प्रवास उलगडतो. आपल्या कविता या रात्री जागर करणाऱ्या, धोक्याचे सूचन करणाऱ्या, आणि कुणीही वाली नसलेल्या असल्यानेच त्यांचा हा हिणवलेला पसारा सहजासहजी कुणाच्याच पचनी पडला नाही, प्रकाशकांची हेटाळणी कवी आणि कवितेच्या वाट्याला आली.

‘पावसाळा’ या कवितेत अब्दुलचाचा हे प्रातिनिधिक पात्र उभे करत बदाबदा कोसळणारा पाऊस आणि खवीस पावसाळा सगळ्यांसाठीच चांगला नसतो, कारण, ‘घरात घुसणारा पाऊस करतो घरघुशी,

उचलतो माणसं,

पन्हाळ्याच पाणी तिथं नेहमी बाद बाद पडत,

पावसाची सर थांबत नाय,

कोणी भेटत नाय सर,

कण्या खाऊन कणा उभारतो

कोळंबी करून केळ विकतो पथारीवर

बाद बाद पावसात’

ही भीषण परिस्थिती सर्वसामान्य माणसाला हतबल करते. तशाही परिस्थितीत प्रत्येक प्रसंगाशी दोन हात करण्याचे बळ एकवटून झगडणारा हा अब्दुलचाचा कवितेतून आपल्याला भेटतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘मुंबई १’ आणि ‘मुंबई २’ या दोन कविता एकप्रकारे मुंबानगरीचे आत्मचरित्रच आहेत आणि त्याचबरोबर ‘अंतर्बाह्य करतोय स्पर्धाच स्वत:च्या शरीरातल्या पेशींशी’ असे म्हणत या मायावी नगरीशी एकरूप आणि तादात्म्य पावल्याची ग्वाही कवी आपल्याला देतो. ‘एक कोटच घर’ या कवितेतून कवी स्वप्नाची राखरांगोळीच मांडतो, कारण स्वप्नांचा पाठलाग करण्यातच आयुष्य कधी शेवटाकडे येते, हेच कळत नाही. ‘सर्वसामान्यांच्या जगण्यातली अभाववग्रस्तता’ या कवितेतून ‘स्वप्न हे स्वप्नच असते एक कोट घराचे साबणपाण्यातले बुडबुडे फोडतात शहरातले वॉचमन त्याच पोट त्यावर’ हे वास्तव प्रकट करतो.

प्रस्तुत संग्रहातील कविता, तिची भाषा वाचकाला गुंतवून ठेवते, कारण ही कविता अनुभवांशी प्रामाणिक तर आहेच, पण ती तितकीच सहज आणि सोपी आहे. ती कुठेही बोजड वाटत नाही. या कविता वाचत असताना नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, प्रकाश जाधव यांच्या कवितांची आठवण होते. कुठलाही आव न आणता, कसलाही पवित्रा न घेता ही कविता सरळपणे वाचकाला भिडते. शीर्षक ‘कविता ह्या हिणववलेल्या’ असे असले तरी प्रत्यक्षात या कवितांमध्ये यत्किंचितही हिणकसपणा जाणवत नाही. उलट काळाच्या ओघात नष्ट होत चाललेल्या गिरणगावाचे उरले-सुरले अवशेष मांडणारी ही अस्सल कविता आहे.

..................................................................................................................................................................

लेखक नानासाहेब गव्हाणे साहित्याचे अभ्यासक आहेत.

gavhanenanasahebcritics@gmail.com 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......