हे सर्व लेखन २०१८ ते २०२० या दोन वर्षांदरम्यानचे आहे. भारतासाठी ही दोन वर्षे जणू दोन शतकांसारखी भासत आहेत...
ग्रंथनामा - झलक
अरुंधती रॉय
  • ‘आज़ादी’ या पुस्तकाच्या इंग्रजी व मराठी आवृत्तीचे मुखपृष्ठ आणि अरुंधती रॉय
  • Thu , 17 February 2022
  • ग्रंथनामा झलक आज़ादी AZADI अरुंधती रॉय ARUNDHATI ROY करोना Corona

प्रसिद्ध लेखिका, कादंबरीकार अरुंधती रॉय यांच्या ‘आज़ादी’ या मूळ इंग्रजी लेखसंग्रहाचा मराठी अनुवाद नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाला आहे. प्रवीण अक्कानवरू यांनी हा अनुवाद केला आहे. या संग्रहाला रॉय यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

ज्या वेळी आम्ही या पुस्तकाच्या शीर्षकासंदर्भात विचारविमर्श करत होतो, तेव्हा सायमन प्रोसेर या आमच्या युकेस्थित प्रकाशकांनी मला ‘आज़ादी’ हा विषय मनात उमटतो, तेव्हा त्याबद्दल काय वाटते, असे विचारले. क्षणाचाही विलंब न लावता मी ‘कादंबरी’ असे उत्तर दिले. या उत्तराचे माझे मलाच आश्चर्य वाटले. कारण एखाद्या लेखिकेला वेगवेगळ्या जगांतून, भाषांतून, कालखंडांतून, समाजांतून, तसेच राजकीय विचारधारांतून मुक्तपणे संचार करत शक्य तितक्या व्यामिश्रपणे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य कादंबरीच प्रदान करते. कादंबरी आत्यंतिक क्लिष्ट, तसेच बहुस्तरीय असू शकते, परंतु याचा अर्थ ती विस्कळीत, बोजड किंवा अनिर्बंध असेल असे नाही. माझ्यासाठी कादंबरी म्हणजे जबाबदारीयुक्त ‘आज़ादी’ आहे. खरेखुरे स्वातंत्र्य! कुठल्याही दडपणाशिवायचे. या खंडातले काही लेख एका कादंबरीकाराच्या नजरेतूनच लिहिले आहेत. यावर तिच्या कादंबरीविश्वाचा निश्चितपणे प्रभाव आहे.

काही लेख कल्पित आणि वास्तव जगातील धूसर होत जाणारी सीमारेषा अधोरेखित करतात. हे सर्व लेखन २०१८ ते २०२० या दोन वर्षांदरम्यानचे आहे. भारतासाठी ही दोन वर्षे जणू दोन शतकांसारखी भासत आहेत. यादरम्यान, कोविड-१९च्या हाहाकारामुळे आपले जग एका नव्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उभे आहे. आताशा हा प्रवास पार करून आपण जिथून माघारी परतणे मुश्कील आहे, अशा ठिकाणी पोहोचलो आहोत. किमान गतकाळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि विचारधारात्मक धारणांना तडा गेल्याखेरीज तरी निश्चितच नाही. संग्रहातील शेवटचा लेख याचसंदर्भात आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

करोना विषाणूमुळे ‘आज़ादी’ या संकल्पनेला अजून एक विचित्र आयाम प्राप्त झाला आहे. या मुक्त विषाणूने आंतरराष्ट्रीय सीमारेषांची जणू थट्टाच उडवली, अवघ्या जागतिक लोकसंख्येला घराघरांत डांबून ठेवले. हे एरवी इतर कुठल्याच गोष्टीमुळे शक्य झाले नसते. या साथीमुळे आपल्या आजवरच्या जीवनपद्धतीवर एक निराळाच प्रकाशझोत पडला.

ज्या मूल्यांवर आधुनिक समाज उभारला आहे, त्याबद्दल प्रश्न विचारण्यास, तसेच आजवर आपण कोणत्या गोष्टींना पूजनीय मानले आणि काय बाजूला सारले, हेही पडताळून पाहण्यास या साथीने आपल्याला भाग पाडले. या भीषण द्वारातून दुसऱ्या जगात प्रवेशताना सोबत काय न्यायचे आणि मागे काय सोडायचे, हा प्रश्न स्वतःला विचारावाच लागणार आहे. ही मुभा नेहमी असेल असेही नाही; परंतु याबद्दल विचारसुद्धा न करणे हा पर्याय मात्र आपल्याकडे खचितच नाही. आणि म्हणूनच, यासंदर्भात विचार करताना आपण मागे सोडलेल्या जगाची, आपल्यामुळे या ग्रहाच्या झालेल्या अपरिमित हानीची आणि आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मनुष्यप्राण्यांवर होत असलेल्या घोर अन्यायाची आणखीनच खोल जाणीव असणे, अत्यावश्यक झाले आहे.

या साथीच्या सावटाआधी लिहिलेले हे सगळे लेख (एक वगळता) झालेल्या क्षतीची भरपाई करण्यात किंचित तरी मदतीचे ठरतील, अशी मला आशा आहे. अगदीच सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर आपण प्रतीकात्मक धावपट्टीवर उभ्या असलेल्या अशा एका विमानात बसलेले आहोत, ज्याने अजूनपावेतो अज्ञात स्थळी सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी उड्डाण केले आहे. भावी इतिहासकारांसाठी हा काळ तर विशेष अकादमिक रुचीचा ठरणार आहे.

‘डब्लू. जी. सेबाल्ड लेक्चर ऑन लिटररी ट्रान्सलेशन’ हे २०१८च्या जून महिन्यात लंडनमधील ब्रिटिश लायब्ररीत मी दिलेले व्याख्यान हा या संग्रहातील पहिला लेख आहे. आपल्याला ज्ञात असलेल्या हिंदुस्थानी भाषेची, दुःखद आणि काहीशा मनमानी पद्धतीने, लिपीही भिन्न असलेल्या हिंदी आणि उर्दू या दोन वेगवेगळ्या भाषांत कशा प्रकारे भोंगळ विभागणी केली गेली आहे, या विषयाने सदर लेखाचा बराचसा भाग व्यापला आहे. (या प्रक्रियेतली घोडचूक म्हणजे हिंदी ही हिंदूंची आणि उर्दू मुस्लिमांची असा जोडला गेलेला सहसंबंध). एका शतकाहून अधिक काळ चालत आलेल्या या गोष्टीत खरे तर त्या संकटाची निशाणी सुप्तपणे लपली होती. ते आज ‘हिंदू राष्ट्रवाद’ या नावाने आपल्यासमोर सुनियोजितपणे उभं आहे.

आपल्यापैकी अनेकांना २०१८ हे मोदी आणि त्यांच्या हिंदू राष्ट्रवादी पक्षाचे सत्तेतील अखेरचे वर्ष ठरेल असे वाटले होते. या संग्रहातील सुरुवातीचे लेख तोच आशावाद व्यक्त करतात. २०१९च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्यानंतर बऱ्याच निवडणूकपूर्व भाकितांमध्ये मोदी आणि त्यांच्या पक्षाची लोकप्रियता नाट्यमयरीत्या घसरत असल्याचे दाखवण्यात आले होते. अशा नाजूक वेळी देशातले जनमत प्रभावित करण्यासाठी एखादा तोतया हल्ला किंवा युद्धही छेडले जाऊ शकते, अशी धाकधूक आपल्यापैकी बऱ्याच जणांना होती.

‘धोकादायक लोकशाहीतील निवडणुकांचा हंगाम’ (३ सप्टेंबर २०१८) हा लेख इतर अनेक बाबींसोबत या भीतीबद्दलही भाष्य करतो. त्या वेळी आपण सर्वांनी श्वास रोखून धरले होते. आणि २०१९ च्या फेब्रुवारीत, अर्थात निवडणुकांच्या काही आठवडे आधी, हल्ला झालाच. काश्मीरमध्ये एका आत्मघातकी दहशतवाद्याने बॉम्बहल्ल्यात आपल्या ४० सुरक्षा जवानांचा जीव घेतला. हल्ला खोटा की खरा, ठाऊक नाही; परंतु वेळ मात्र अचूक साधण्यात आली होती. मोदी आणि त्यांचा पक्ष राक्षसी बहुमताने पुन:श्च सत्तेवर आला.

आणि आता मात्र, या पुस्तकात धांडोळा घेतल्याप्रमाणे, भाजपने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या वर्षभरातच खेळलेल्या विविध खेळींनी भारताचा चेहरामोहरा ओळखूही न येण्याइतपत बदलला आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जे स्वप्न पाहिले आहे (आणि अजूनही त्यासंदर्भात पूर्णतः हार मानलेली नाही, हे या पुस्तकावरूनही सिद्ध होतेच) त्या राज्यघटनेत वर्णिलेल्या आणि अद्याप प्रत्यक्षात येऊ न शकलेल्या धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक प्रजासत्ताकाचा पायाच उद्ध्वस्त केला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. फॅसिझमची सुसज्ज यंत्रणा डोळ्यांत डोळे घालून आपल्यावर चाल करून येत आहे. करोनाच्या साथीमुळे या प्रक्रियेचा वेग वाढलेला असताना, अजूनही आपण त्याच्या खऱ्या स्वरूपाचा उच्चार करण्यास कचरत आहोत.

मी जेव्हा फेब्रुवारी २०२०च्या शेवटच्या आठवड्यात ही प्रस्तावना लिहायला सुरुवात केली, तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबीय भारताच्या शासकीय दौऱ्यावर आले होते. म्हणजेच या प्रस्तावनेलाही या तडा गेलेल्या काळातून, साथीच्या या प्रवेशद्वारातून पार व्हावे लागले आहे.

भारतात ३० जानेवारी रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळला. बाकीच्यांचे जाऊ द्या, अगदी सरकारलाही याची दखल घ्यावीशी वाटली नाही. जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून तसेच तिथल्या जनतेला जगापासून तोडत, माहितीपासून पूर्णतः वंचित करून दोनशेहून अधिक दिवस लोटले आहेत. तसेच बहुतेकांच्या मते असंवैधानिक असणाऱ्या नव्या मुस्लिमविरोधी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात लाखोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरूनही दोन महिने होत आले आहेत. मोदी आणि ट्रम्प यांचे चेहरे छापलेले मुखवटे परिधान केलेल्या गर्दीसमोर, जाहीर सभेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय क्रिकेट खेळतात, दिवाळी साजरी करतात आणि बॉलिवूडचे सिनेमे बनवतात, ही बहुमूल्य माहिती पुरवली. आम्हाला आमच्याबद्दलचीच माहिती ऐकून धन्य वाटले! यादरम्यान त्यांनी भारताला तीन अब्ज डॉलर किमतीचे एमएच-६० हेलिकॉप्टर्स विकले. आजवर फार कमी वेळा भारताने स्वतःला जाहीररीत्या इतके अपमानीत केले आहे.

परंतु ज्या ठिकाणी ट्रम्प यांनी ती रात्र घालवली, त्या दिल्ली हॉटेलमधील ग्रँड प्रेसिडेन्शिअल सूटपासून, तसेच जिथे त्यांनी मोदींसोबत व्यापारी वाटाघाटी केल्या, त्या हैदराबाद हाउसपासून जवळच दिल्ली जळत होती. शहराच्या ईशान्य भागातील कामगार वस्त्यांत राहणाऱ्या मुस्लिमांवर हल्ले करण्यात आले होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हिंसेचा ज्वर वातावरणात काही काळापासून होताच. राजकीय नेते नव्या नागरिकत्व कायद्याविरुद्ध शांततापूर्ण मार्गाने ठिय्या आंदोलन करणाऱ्या मुस्लीम महिलांना उघड उघड धमक्या देत होते. जेव्हा हिंसाचार सुरू झाला, तेव्हा मुस्लिमांनीही प्रत्युत्तर दिले. घरे, दुकाने, गाड्या जाळण्यात आल्या. एका पोलिसासमवेत अनेक जण मारले गेले. आणखी कित्येकांना बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी झाल्यामुळे रुग्णालयात भरती करावे लागले. इंटरनेटवर भयावह चित्रफिती फिरत होत्या. त्यातल्या एका चित्रफितीत वर्दीधारी पोलीस रस्त्यावर जखमी अवस्थेत एकमेकांवर चोळा-गोळा होऊन पडलेल्या मुस्लीम पुरुषांना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी दमदाटी करत होते. (त्यानंतर त्यांच्यातील फैजन नावाचा एक जण मृत्यू पावला. त्याचा कसा छळ करण्यात आला आणि एका पोलिसाने कशी आपली काठी त्याच्या घशात घुसवली होती, यासंदर्भातील थरकाप उडवणारी बातमी ‘हफिंग्टन पोस्ट’ने केली होती.)

ट्रम्प यांनी त्यांच्याभोवती सुरू असलेल्या या भयानक परिस्थितीबद्दल अवाक्षरही काढले नाही. त्याऐवजी त्यांनी नरेंद्र मोदी यांना ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी बहाल केली. माझ्या माहितीप्रमाणे आतापावेतो ही उपाधी गांधींनाच उद्देशून वापरली जात असे. मी काही गांधींची चाहती नव्हे, परंतु तेसुद्धा या उपाधीस खचितच पात्र नव्हते.

ज्या वेळी मृतदेह गटारांमध्ये तरंगत वर येत होते, तेव्हा कुठे भारतीय सरकारी अधिकाऱ्यांनी कोविड विषाणूसंदर्भातील पहिली बैठक बोलावली. २४ मार्च रोजी जेव्हा मोदींनी राष्ट्रव्यापी टाळेबंदी जाहीर केली, तेव्हा मात्र भारताने स्वतःची भयावह, लाजीरवाणी गुपिते जगासाठी खुली केली.

पुढे काय?

या जगाची नव्याने कल्पना करणे. बस इतकेच!

‘आज़ादी’ - अरुंधती रॉय

मराठी अनुवाद - प्रवीण अक्कानवरू

मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

पाने - १८०

मूल्य - २५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या पुस्तकात विषयांची विविधता आहे. साध्या विषयापासून ते ‘खाद्यसंस्कृती’तील ‘वादग्रस्त’, तसेच ‘त्याज्य’ विषयही आढळतात. लेखांचा ग्राफ साधेसुधे पदार्थ ते अनोखा, विलक्षण असा आहे…

खाद्यपदार्थ हे निव्वळ खाद्यपदार्थ नसतात, त्यांचे आपल्या जीवनातील अनेक गोष्टींशी साधर्म्य असते, हे बिर्याणी आणि संसार यातून ते स्पष्ट करतात. इब्राहीम अफगाण यांच्यासोबत हा चविष्ट प्रवास कुठेही कंटाळवाणा न होता मजेमजेत होतो. त्यांनी दिलेला एका खाद्यप्रेमीचा वचननामा प्रत्येकाने स्वीकारावा. त्याचे पालन करावे. त्यामुळे भारताची त्यातही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध होईल.......

आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे...

इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे.......