‘द अम्बुजा स्टोरी’ : सामाजिक विवेक जपत यशस्वीरित्या वाटचाल करणाऱ्या एका यशस्वी उद्योजकाची कहाणी
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
अनिल म्हस्के
  • ‘द अम्बुजा स्टोरी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 12 February 2022
  • ग्रंथनामा दखलपात्र द अम्बुजा स्टोरी The Ambuja Story नरोत्तम सेखसारिया Narotam Sekhsaria

ही भारतातील यशस्वी उद्योगांपैकी एक असलेल्या ‘अम्बुजा सिमेंट’ची यथोगाथा आहे. हे पुस्तक वाचताना मोठी स्वप्नं कशी पाहावी, त्यासाठी मानवी मर्यादांच्या पलीकडे जाऊन अविरत कष्ट कसे करावेत, याचीही प्रचिती येते. नीतीशास्त्रं, मूल्यं, एकात्मता जपत विराट यशाकडे वाटचाल करणारी ही चित्तवेधक कहाणी आहे.

हे आत्मचरित्र बनिया समुदायातील विविध बनिया बुधी लोकांचा पदानुक्रम स्पष्ट करतं. लेखक नरोत्तम सेखसारिया तथाकथित मध्यमवर्गीय बनिया बुधी कुटुंबापैकीच. हे सर्व समुदाय राजस्थानच्या विविध भागांतून येतात.

सुरुवातीला लेखक सेखसारिया यांनी १९५०च्या दशकातील त्यांच्या कुटुंबीयांचं राजस्थान ते मुंबई स्थलांतर, त्यांचं पारपंरिक काम, यांचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. १९६०च्या आसपास लेखक त्यांच्या निम्न मध्यमवर्गीय व्यावसायिक कुटुंबाच्या अनुभवातून वाटचाल करत होते. मात्र त्यांच्या काकांनी स्वत:ला मूल नसल्यानं सेखसारिया यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला, तो त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. काका मुंबईत आधीच स्थलांतरित झाले होते. आपल्या व्यवसायात जम बसवून स्वत:च्या स्वतंत्र घरात राहत होते.

या नवीन कुटुंबानं दिलेलं प्रेम व घेतलेली काळजी यातून लेखकाच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला. नवीन शाळा, समवयस्क मित्रपरिवार (टाटा, बिर्ला आणि इतर) मिळाला असला त्यांना स्थानिक भाषेतील शालेय शिक्षण ते इंग्रजी माध्यमातील शालेय शिक्षण, यांमधील स्थानांतर करताना संघर्ष करावा लागला. त्यावर मात करत ते इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

सेखसारिया यांनी भारतातील नामांकित रासायनिक अभियांत्रिक शिक्षणसंस्था असलेल्या यूडीसीटी (या संस्थेतूनच रघुनाथ माशेलकर, मनमोहन शर्मा, केकी गरदा, अश्विन दानी, मुकेश अंबानी यांनी शिक्षण पूर्ण केलं आहे.) या संस्थेतून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केली. पण उत्तम गुण असतानाही पुढे रासायनिक शिक्षणात सखोल अभ्यासाकडे न वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आधी स्वत:च्या पारंपरिक कापडगिरणी व्यवसायाचा अनुभव घेत त्यांमधील कौशल्यं शिकत इतर मोठे गिरणीमालक व परकीय कंपन्यांशी संबंध प्रस्थापित केले. त्याचबरोबर कापडगिरणीपुरत्या मर्यादित असलेल्या कुटुंबाच्या व्यवसायाला इतर क्षेत्रांत नेण्यासाठी स्वत:पुढे नवीन ध्येयं व उद्दिष्ट्यं ठेवली.

स्वत:च्या आयुष्याचा प्रवास सांगतानाच त्यांनी तत्कालीन भारताच्या बदलत्या राजकीय व सामाजिक-आर्थिक परिस्थितीचंही वर्णन केलं आहे. तसंच त्याचा व्यवसायावर पडणारा परिणाम आणि सरकारची काही विशिष्ट धोरणं उद्योजकांच्या मार्गात कशा प्रकारे अडथळे निर्माण करतात, याचंही सविस्तर विश्लेषण केलं आहे.

सेखसारिया यांनी मुंबईच्या कापडगिरणी वर्तुळात यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावलं. (यामध्ये त्यांनी पंजाबमधून उच्च प्रतीचा कापूस कशा प्रकारे आयात केला, जपानच्या मेरिडिय जोन्सची कापूत निर्यात बंदी हाताळणं, रुमानिया सरकारशी आलेले संबंध, याचंही सविस्तर वर्णन केलं आहे.)

हे यश प्राप्त करत असतानाच कापडगिरणी व्यावसायिकांना लावलं जाणारं ‘मध्यमवर्गीय व्यावसायिक\उद्योजक’ हे लेबल, त्यांना मोठे उद्योजक मानलं न जाणं, याबाबत सेखसारिया समाधानी नव्हते. हा दुय्यम दर्जा टाळणं, स्वत:च्या परिघाबाहेर जाऊन नवीन प्रकल्प उभे करत मोठा उद्योजक होण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये प्रबळ होत होता.

पुढे त्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून अम्बुजा सिमेंट नामक कंपनी स्थापन केली. गंमतीची गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबाला सिमेंट उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. सेखसारिया यांनी चांगल्या साथीदारांच्या मदतीनं आपल्या नवउद्योजकतेच्या प्रवासाचा प्रारंभ केला. हा प्रकल्प अस्तित्वात येताना त्यांना प्रारंभी मोहा येथील स्थानिक निवासींचा विरोध, स्थानिक पातळीवरील क्षूद्र राजकारण, यांचा सामना करावा लागला. मात्र GIIC व गुजरात राज्य सरकारचा सक्रिय सहभाग आणि एच. के. खान यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या सनदी सेवकांमुळे कोडीनार येथे सात लाख टन सिमेंट उत्पादनक्षमता असलेला प्रकल्प सुरू करण्यात सेखसारिया यांना यश मिळालं.

मात्र तिथं उच्च प्रतीच्या लाइमस्टोनच्या खाणीचा अभाव, तत्कालीन १९८०च्या दशकात आयात-निर्यात सुलभीकरणाच्या पर्यावरणाचा अभाव, ट्रक-ड्रायव्हर लॉबीशी सामना, आधीच प्रस्थापित असलेल्या मोठ्या कंपन्यांकडून होणारी कडवी स्पर्धा, या सर्व आव्हानांचा सामना करावा लागला. हा जरी ८०च्या दशकातील संघर्ष असला तरी तो सध्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी साध्यर्म्य साधणारा आहे.

अम्बुजा सिमेंटच्या सर्व प्लांटमधील सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांचं उच्चप्रतीचं धूळ-कण कपात तंत्रज्ञान होय. (पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ लागू होण्याच्याआधी सेखसारिया यांनी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिडेटरबरोबरच अधिक प्रगत असलेलं रिव्हर्स एअर बॅगहाऊससारखं तंत्रज्ञान वापरलं. त्यामुळे कंपनीद्वारे होणारं धूळ-कण उर्त्सजन ५० mg प्रती क्युबिक मीटर इतकं कमी होतं. भारतातील इतर ठिकाणी ते १५० ते २०० mg, तर युरोपमध्ये ५० ते १०० mg इतकं होतं.) यातून आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काळाची पावलं ओळखणाऱ्या गुणांची प्रचिती येते. तसंच कंपनी परिसरात झाडं व वनस्पतींची लागवड, नयनरम्य गुलाबांच्या गार्डनचा विकास, यातून पर्यावरणाबाबतचा त्यांचा दृष्टीकोनही स्पष्ट होतो.

त्याचबरोबर आपल्या कामगारांची काळजी घेण्याबाबत आणि त्यांचे हितसंबंध जपण्याबाबतही सेखसारिया जागरूक असल्याचं दिसतं. उदा. कंपनीचे शेअर व इक्विटी जाहीर करताना ते कामगारही खरेदी करतील, याची काळजी घेतली, तसंच भविष्यात शेअरच्या किमती घसरल्यावर ते कंपनीद्वारे योग्य दरात परत विकत घेऊन कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे अल्पकाळात कंपनीच्या शेअरच्या किमती वाढून दुप्पट झाल्या. यातून सेखसरिया यांचा दृष्टीकोन आणि त्यांची कामगारांप्रतीची आस्था व तळमळ जाणवते.

कोडीनार येथील पहिला प्लांट कार्यान्वित करण्यासाठी लागलेला १८ महिन्यांचा काळ आणि नंतरचे प्लांट कार्यान्वित करण्यासाठी लागलेला तीन महिन्यांचा काळ, यांतून अम्बुजा सिमेंटची यशस्विता दिसून येते. शिवाय पुढील काळातला विस्तार व तज्ज्ञता याचीही साक्ष मिळते.

उत्तर भारतातील विस्तारासह हिमाचल प्रदेशमध्ये दर्शलागढ येथील प्लांट अभियांत्रिक चमत्काराचं अभूतपूर्व उदाहरण आहे. (इथं लाइमस्टोनच्या वाहतुकीसाठी खोल दरीमध्ये तीन किमीचा कन्वेयर बेल्ट तयार करण्यात आला आहे.) दीड मिलियन टनांची क्षमता असणारा हा प्लांट तयार करताना सेखसरिया यांच्या व्यक्तिमत्त्वातील जोखीम घेण्याची वृत्ती दिसून येते. त्याचबरोबर त्यांनी पीपीसी आणि ओपीसी अशी वर्गवारी असणाऱ्या सिमेंटचं प्लांटद्वारे वर्गीकरण करून गुजरात प्लांटद्वारे पीपीसी तर हिमाचलमध्ये ओपीसीचे उत्पादन चालू केलं. गज अम्बुजाच्या स्थापनेनंतर कोडीनार बंदरातून पनवेल बंदरात समुद्रमार्गानं सिमेंटची वाहतूक सुरू केली. पुढे त्यांनी मंगलोर, तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागांत उद्योगविस्तार केला.

सेखसारिया यांचं वेगळेपण म्हणजे त्यांनी संघकार्याचं महत्त्व लक्षात घेत, सामुदायिक बंध जपत, कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वायत्तता प्रदान केली. वैयक्तिक आयुष्यात तंबाखू सेवनाच्या अपायकारी व्यसनामुळे १९९३मध्ये त्यांना कॅन्सर या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागला. मात्र त्यावर मात करत ते पुन्हा एकदा नव्या उमेदीनं नवमहत्त्वाकांक्षा घेऊन कार्यरत झाले.

एस्केल उद्योगाचे कांतिसेन श्रॉफ यांच्याकडून नम्रता, साधेपणा यांसारख्या मूल्यांची प्रेरणा घेताना सेखसारिया यांनी सामाजिक बंध जपले. सरकारने ‘उद्योजकांची सामाजिक जबाबदारी’ (Corporate social responsibility) सक्तीची करण्याच्या दशकभर आधी सेखसारिया यांनी सामाजिक विकासामध्ये काम करायला सुरुवात केली होती. हे काम अधिक विस्तारितरित्या करण्यासाठी त्यांनी ‘अम्बुजा सिमेंट फाउंडेशन’ची स्थापना केली. त्यातून होणाऱ्या शिक्षण, स्वयंसहाय्यता गट, कौशल्यविकास, आरोग्य या क्षेत्रांतील कामाचा आढावाही या आत्मचरित्रात घेतला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तथापि हे आत्मचरित्र थोडंसं पाल्हाळिक वाटलं. शेअर बाजाराचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतल्यानं काही वेळा तांत्रिक भाषा येते. तसंच प्रत्येक प्रकल्पातील महत्त्वाचे साथीदार असलेल्या कुलकर्णी यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचं अजून सखोल विश्लेषण करायला हवं होतं, असं वाटतं. कुटुंबाची तपशीलवार माहितीही थोडी कंटाळवाणी वाटते.

सेखसारिया यांना काही जन्मजात विशेषाधिकार भाग्यकारक ठरले असले तरी परिश्रम, कार्याबाबतची वचनबद्धता, नैतिकता, समाजाच्या कल्याणासाठी काम करण्याची तत्परता, ही त्यांची वैशिष्ट्यं वाखाणण्याजोगी आहेत.

ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, अशा विद्यार्थी, युवा उद्योजकांसाठी, किंबहुना प्रत्येक नागरिकासाठी सेखसारिया यांची ही प्रेरणादायी आहे. त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, ‘जीवन गुंतागुंतीचं नसून साधं-सरळ आहे. तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात असा, पण आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड करू नका. त्यातून यश येईलच, पण ते आनंददेखील घेऊन येईल.’

या आत्मचरित्रातून नरोत्तम सेखसारिया यांच्या ‘मी करू शकतो’ (I Can) या सार्थ उदगारांची महती पटते. साधीसरळ लेखनशैली, एकरेषीय मांडणी, स्पष्ट विचार, तसंच अपयश स्वीकारण्याची वृत्ती आणि यशाचं श्रेय सर्व सदस्यांना देण्याचा उमदेपणा, यामुळे हे आत्मचरित्र वाचनीय झालं आबे. सामाजिक विवेक जपत यशस्वीरित्या वाटचाल करणाऱ्या एका यशस्वी उद्योजकाची ही कहाणी बरंच काही शिकवण्याचंही काम करते. जेव्हा भावनेला सक्रिय संघर्षाची जोड मिळते, तेव्हाच नवनिर्मिती प्रत्यक्षात येते. त्यासाठी भावना, इच्छाशक्ती, संघर्ष करण्याची तयारी, हे घटक महत्त्वाचे ठरतात. थोडक्यात महात्मा गांधींच्या अंतोदय, विश्वस्त, नई तालीम या तत्त्वांची जपणूक करणारे सेखसारिया आजच्या नवउद्योजकांसाठी आदर्शवत ठरतात.

‘The Ambuja Story’ - Narotam Sekhsaria

Harper Collins

Pages - 331

Price - 699 Rs.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Ambuja-Story-Ordinary-Created-Extraordinary/dp/9354890334

.................................................................................................................................................................

लेखक अनिल म्हस्के प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आहेत. तत्पूर्वी ते इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये होते.

anilmhaske22@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Shubhan Thavkrr

Fri , 18 February 2022

Very good article. Gives the very precise and depth of the book in a crisp manner, egaer to read the book.Thank you for book review sir.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......