मला अक्कमहादेवींचे व्यक्तित्व स्त्री-मुक्तीचा प्रेरणास्रोत वाटतो. दुर्दैवाने मराठीच नाही, तर अन्य भारतीय भाषकांचेही या ज्ञानयोगिनीविषयी अज्ञान आहे
ग्रंथनामा - आगामी
निशा शिवूरकर
  • ‘स्त्री स्वातंत्र्याची वाटसरू : अक्कमहादेवी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 03 January 2022
  • ग्रंथनामा आगामी स्त्री स्वातंत्र्याची वाटसरू : अक्कमहादेवी Stri Swatantyachi Vatsaru - Akka Mahadevi निशा शिवूरकर Nisha Shivurkar अक्कमहादेवी Akka Mahadevi

अ‍ॅड. निशा शिवूरकर यांच्या ‘स्त्री स्वातंत्र्याची वाटसरू : अक्कमहादेवी’ या पुस्तकाचं प्रकाशन आज, ३ जानेवारी २०२२ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी मा. साधना दधिच यांच्या हस्ते महात्मा फुले वाडा, पुणे इथं होत आहे. त्यानिमित्तानं या पुस्तकाला शिवूरकर यांनी लिहिलेलं हे मनोगत…

..................................................................................................................................................................

समाजवादी विचारवंत डॉ. राममनोहर लोहियांचे विविध विषयांवरचे लेख ‘ललित लेणी’ या पुस्तकात आहेत. आचार्य श्रीपाद केळकरांनी या लेखांचा मराठीत अनुवाद केला आहे. पस्तीस वर्षांपूर्वी मी हे पुस्तक वाचले. पुस्तकातील ‘स्त्री-पुरुष संबंध’ या लेखात डॉ. लोहियांनी स्त्री-पुरुष संबंधांची चिकित्सा केली आहे. या लेखात एका ठिकाणी त्यांनी लिहिलेय, “नर-नारी समता सर्वांगीण असली पाहिजे. अमेरिकेत बाह्य समता आहे. मला अभिप्रेत आहे, बौद्धिक समता. व्यापार करणारी, भाषणे देणारी किंवा द्रौपदीसारखी राजकारणी व धर्मशास्त्र वगैरे क्षेत्रातली स्त्री आहे. तथापि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील स्त्री नाही. मादाम क्युरीसारख्या वैज्ञानिक स्त्रिया आहेत. दार्शनिक क्षेत्रात प्राचीन भारतात होऊन गेल्या, तशा स्त्रिया अन्यत्र कोठे नाहीत. मैत्रेयी, गार्गी प्रख्यात आहेत. लीलावती गणिततज्ज्ञ आहे. आध्यात्मिक समतेच्या दृष्टीने तत्त्वज्ञानी स्त्रियांच्या कहाण्या भारतातच सापडतात. आध्यात्मिक समतेच्या क्षेत्रात आणखी एक जबरदस्त स्त्री चारशे-पाचशे वर्षांपूर्वी कर्नाटकात होऊन गेली; कथा-कहाण्यात नव्हे, खरोखरीची. ती नग्न अवस्थेत फिरे. लिंगायत धर्माची प्रचारक महादेवी ही ती स्त्री होय. ती म्हणत असे - साधुता, गुण, दर्शन, ध्यान वगैरेबाबत पुरुष शेवटच्या मर्यादेपर्यंत जाऊन विरक्त व नि:शंक होऊ शकतो; वस्त्रांचा त्याग करतो तर मग स्त्रीही तसे का करू शकणार नाही? निर्मोही, अनासक्त, नि:संग, निर्विकार कोणताही शब्द वापरा, महादेवी खूप विद्वान स्त्री होती. तिचे नाव फारसे प्रसिद्ध नाही. कारण भारतीय पुरुषाला स्त्रीची प्रतिष्ठा करणे माहीत नाही.” अक्कमहादेवीचा व माझा परिचय या लिखाणातून झाला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

ही कोण महादेवी? खरेच ती फारशी प्रसिद्ध नव्हती. महादेवीविषयीचे कुतूहल व आकर्षण तेव्हापासूनच माझ्या मनात होते. मी जमेल तशी तिची माहिती घेत राहिले. तसतसे कुतूहलाचे रूपांतर आदरामध्ये झाले. स्त्री-प्रश्नांवर बोलताना मी आवर्जून अक्कमहादेवींविषयी बोलते. बहुतांश श्रोत्यांमध्ये तिच्याविषयी काहीच माहिती नसते. मराठीच नाही, तर अन्य भारतीय भाषकांचेही या ज्ञानयोगिनीविषयी अज्ञान आहे. पाच वर्षांपूर्वी बीदरला लिंगायत समाजाच्या मेळाव्यात मी अक्कमहादेवींविषयी बोलले. तेव्हा लिंगायत समाजातही बऱ्याच लोकांना ‘समाजातील संत’ या पलीकडे त्यांच्याविषयी फारशी माहिती नसल्याचे जाणवले. मला अक्कमहादेवींचे व्यक्तित्व स्त्री-मुक्तीचा प्रेरणास्रोत वाटतो. त्यांचे निर्भय जीवन, लिखाण, त्यांची भटकंती यात एक उत्साह व ऊर्जा आहे. त्यांची वचने म्हणजे अभंगसारख्या रचना वाचताना मला हा अनुभव अनेक वेळा आला.

डॉ. राममनोहर लोहियांनी म्हटल्याप्रमाणे पुरुषप्रधान व्यवस्थेने या विद्वान, साहसी स्त्रीचे जीवन फारसे ज्ञात होऊ नये, याची दक्षता घेतलेली आहे. गेली अनेक वर्षे अक्कमहादेवींशी माझे नाते जुळले आहे. त्यांचे जीवन, वचन-साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहचवणे, ही मला माझी जबाबदारी वाटायला लागली. अधिक शिस्तीने, नेटाने त्यांच्या व्यक्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. समाजवादी जनपरिषद, ‘दक्षिणायन’च्या कामासाठी जेव्हा जेव्हा कर्नाटकात गेले, तेव्हा खूप मित्र-मैत्रिणींशी अक्कमहादेवींविषयी बोलले. मिळेल ते साहित्य वाचत राहिले. माझे कुतूहल शमत गेले. अक्कमहादेवींवरील लिखाणाचा माझा निर्णय पक्का झाला.

विद्वान स्त्रियांचा उल्लेख करताना गार्गी, मैत्रेयी व लीलावती ही नावे नेहमीच घेतली जातात. खरे तर आपल्या देशात सामान्य कुटुंबातील अनेक स्त्रिया ज्ञानाच्या शोधासाठी नि:संग होऊन जगल्या. संत मीराबाई, काश्मीरमधील लल्लेश्वरी, तमिळनाडूची संत अडाळ, संत जनाबाई, संत बहेणाबाई, चोखामेळांची पत्नी सोयराबाई, अशा कितीतरी ज्ञात-अज्ञात स्त्रियांनी पुरुषप्रधान व्यवस्थेची चौकट मोडली. धर्माने ‘स्त्री’ म्हणून लादलेल्या बंधनांच्या विरोधात आवाज उठवला. या सगळ्याच स्त्रियांच्या वाट्याला प्रचंड हालअपेष्टा, उपेक्षा, अपमान आला. त्यांचे कर्तृत्व झाकून ठेवले गेले. दंतकथा बनवून अशा स्त्रियांना संपवण्याचाही प्रयत्न झाला. वारांगना, वेश्या, कुलनाशिनी, वेडी अशा शब्दांनी त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या षड्यंत्राला पुरून त्या उरल्या, निर्भयपणे आपल्या मर्जीप्रमाणे जगल्या.

धर्म ही संपूर्णत: पुरुषकेंद्री, पुरुषसत्ताक व्यवस्था आहे. सर्वच धर्मांनी स्त्रियांना दुय्यम स्थान दिले, स्त्रीला पापयोनी मानले, धार्मिक अधिकार नाकारले. भक्ती व मोक्षासाठी स्त्रियांना सतत संघर्ष करावा लागला. मदर तेरेसांना संतपद द्यायचे किंवा नाही यावर बरीच चर्चा होऊन अखेर मृत्यूनंतरच त्यांना संतपद जाहीर झाले. मंदिर, मशीद प्रवेशासाठी आजही संघर्ष सुरू आहेत. शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील स्त्रियांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली जाते आहे. मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या स्त्रियांना अडवले जाते आहे. धर्मगुरू, मौलवी, पुजारी पुरुषच आहेत. या पार्श्वभूमीवर बाराव्या शतकातल्या परिस्थितीची कल्पना आपण करू शकतो.

स्त्री-शूद्रांना धार्मिक अधिकार नाकारणाऱ्या हिंदू धर्माच्या विरोधात अनेक संघर्ष, चळवळी झाल्या आहेत. बाराव्या शतकात कर्नाटकात बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची केलेली स्थापना, ही अशा धर्म सुधारणांमधील महत्त्वाची चळवळ आहे. लिंगायत धर्मात सर्व जातींच्या स्त्री-पुरुषांना मुक्त प्रवेश होता. शरण चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विविध जात समूहांतील स्त्रिया आल्या. गार्गी, मैत्रेयी यांची उदाहरणे व्यक्तिगत पातळीवरची आहेत. तर शरण आंदोलनातील सहभागी स्त्रिया समूह म्हणून भेटतात. लिंगायत चळवळ किंवा शरण आंदोलन महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाशी जुळणारी व समकालीन अशी चळवळ आहे. गंगाबिका, गोग्गवा, नागलांबिका, काळव्वा, सत्यक्का, लिंगम्मा, नीलम्मा, बोतादेवी, महादेवी अशी स्त्री-संतांची मोठीच परंपरा निर्माण झाली. या स्त्रियांना लिहिता-वाचता येत होते. वचन स्वरूपात त्यांनी काव्यरचना केल्या. या रचनांमधून त्यांची बंडखोरी, संघर्ष व्यक्त होतो. अक्कमहादेवींना शरण चळवळीत बसवेश्वर, अल्लमप्रभूच्या बरोबरीने स्थान आहे. स्त्रियांना घर, संसार, नवरा, कुटुंबाच्या बाहेर काढणारी, लिहायला-वाचायला शिकवणारी शरण चळवळ ही भारतीय स्त्री-मुक्ती चळवळीतील महत्त्वाची घटना आहे. अक्कमहादेवींमुळे मला ती समजून घेता आली.

पूर्णपणे विरागिणी होऊन उडुतंडी ते श्रीशैल्य असा ९७० कि.मी.चा प्रवास महादेवींनी एकटीने रानावनातून काट्याकुट्यातून पायी चालत केला. ऊन, वारा, कोसळता पाऊस कशाचीच तमा बाळगली नाही. ना जंगली श्वापदांना घाबरली, ना माणसातील पशुचे भय बाळगले. मी हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी महादेवींच्या वचन रचनांचा उपयोग झाला. अत्यंत ओघवत्या शैलीत, काव्यात्मकतेने व निसर्गाशी एकरूप होत लिहिलेली ही वचने महादेवींचा प्रवास आपल्या पुढे उभा करतात. या वचनांमधून तिच्या प्रतिभेची साक्ष पटते. तसेच तिच्या निर्भयतेचे व ज्ञानाच्या ओढीचे दर्शन होते.

घर, कुटुंब, नवरा, मुले-बाळे, संसार नाकारणाऱ्या स्त्रियांना आजही समाजात सन्मानाने वागवले जात नाही. स्त्रीने जे काही करायचे ते नेटका प्रपंच करूनच. अक्कमहादेवींसारख्या स्त्रियांनी पारंपरिक जगणे नाकारले. स्वत:च्या संसारापेक्षा विश्वाच्या पसाऱ्याचा अधिक विचार केला. सत्याचा, माणसाचा, विश्वातील अगम्य शक्तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा शोध थक्क करणारा आहे. बुद्ध, महावीर, बसवेश्वर, गुरुनानक, कबीर, येशू, महंमद पैगंबरांनी जसा मानवी संस्कृतीच्या विकासाचा मार्ग शोधला, तसाच शोध या स्त्रियांनीही घेतला. ‘अक्कमहादेवी’ वाचताना मला हा शोध समजून घेता आला. मी त्यांची ऋणी आहे. त्या ऋणात राहूनच हे लिखाण केले आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

बसवण्णांनी स्थापन केलेल्या क्रांतिकारी, उदारमतवादी, सहिष्णू लिंगायत विचारधारेपुढे सध्या सांप्रदायिक, संकुचित आणि प्रतिगामी विचारांचे आव्हान उभे राहिले आहे. यातूनच विचारवंत डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचे खून झाले आहेत. बसवण्णांनी वैदिक धर्म स्पष्टपणे नाकारला. बसवण्णांना मानणाऱ्या समाजाला आजचा हिंदुत्ववाद स्पष्टपणे नाकारायला पाहिजे होता, परंतु लिंगायत समूहामध्ये हिंदुत्ववादी राजकारणाचे समर्थन वाढलेले दिसते. ‘दया हाच धर्म आणि सत्य हीच नीती’ असे बसवण्णांनी सांगितले. अक्कमहादेवींनीही हाच विचार मांडला. आपल्या सगळ्यांपुढेच या देशातील बहुसांस्कृतिक उदारमतवाद टिकवून ठेवण्याचे आणि तिचा प्रसार करण्याचे आव्हान निर्माण झालेले आहे. माझे लिखाण त्याच प्रयत्नांचा छोटा भाग आहे.

अक्कमहादेवींविषयी लिहिताना अनेक वेळा कन्नड साहित्याचे अभ्यासक, विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गींची आणि पत्रकार गौरी लंकेश यांची आठवण झाली. लिखाणापूर्वी त्यांची भेट झाली असती तर लिखाण अधिक सकस झाले असते असे वाटत राहिले. ‘अक्कमहादेवी’ समजून घेताना आपल्याला कन्नड भाषा येत नाही, याची खंत वाटत राहिली. कन्नड भाषिक मैत्रिणींकडून महादेवींची वचने ऐकली तेव्हा त्यातील नाद-माधुर्याने स्तंभित व्हायला झाले. तो नाद मला वाचकांपर्यंत पोहोचवता येणार नाही, याची जाणीव मला आहे. वाचक समजून घेतील अशी अपेक्षा आहे.

‘स्त्री-स्वातंत्र्याची वाटसरू : अक्कमहादेवी’ अ‍ॅड. निशा शिवूरकर,

मैत्री पब्लिकेशन, पुणे

मूल्य – १५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या पुस्तकात विषयांची विविधता आहे. साध्या विषयापासून ते ‘खाद्यसंस्कृती’तील ‘वादग्रस्त’, तसेच ‘त्याज्य’ विषयही आढळतात. लेखांचा ग्राफ साधेसुधे पदार्थ ते अनोखा, विलक्षण असा आहे…

खाद्यपदार्थ हे निव्वळ खाद्यपदार्थ नसतात, त्यांचे आपल्या जीवनातील अनेक गोष्टींशी साधर्म्य असते, हे बिर्याणी आणि संसार यातून ते स्पष्ट करतात. इब्राहीम अफगाण यांच्यासोबत हा चविष्ट प्रवास कुठेही कंटाळवाणा न होता मजेमजेत होतो. त्यांनी दिलेला एका खाद्यप्रेमीचा वचननामा प्रत्येकाने स्वीकारावा. त्याचे पालन करावे. त्यामुळे भारताची त्यातही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध होईल.......

आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे...

इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे.......